Monday, December 22, 2014

।।भासबोध।। १६२ ते १७५

मी उन्हांत राहिन चालत । काटे जरि तळपायांत । तळपाया असिधाराव्रत । एकचि यशस्वितांना ।। १६२ ।। दास-वाणी ।। देखणे दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें । इतुकेच ज्ञान तें पामरें । अंतरली भगवंता ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२९ दिखाऊ श्रीमंती, डामडोल, भपकेबाज सत्संग आणि कानमंत्र देण्याचे भव्य सार्वजनिक कार्यक्रम इतकेच ज्ञान असणारे भोंदू गुरू असतील तर गरीब बिचारे अज्ञानी शिष्य भगवंताला कधी भेटू शकतील का ? सद्यकाली ऐशीच करणी । अंधश्रध्दांचे जाल फेकोनी । 'व्यावसायिक' बडवे होवुनी । गरीब भोळे हेरिती ।। १६३ कैसे सावध करावे ?। कोठले पाठ यांना द्यावे ?। पाठ 'अशांची' भाग पाडावे । सोडण्या ! आकळेना ।। १६४ जैसी श्वापदे कराल जंगली । तैशी सत्ता शर्यतींत धावली । परस्परांवर चिखलफेक केली । यथेच्छ ! जनसामान्य फासावर ।। १६५ कुणास नाही कसली क्षिती । सामोरे आलेले 'भक्ष' भोगिती । नासले-सडलेले करिती । 'लोकार्पण' ।। १६६ ।। दास-वाणी ।। अधर्मास स्वधर्मे लुटिले । कुकर्मासि सत्कर्में झुगटिले । लाटूंन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०९/४८ समर्थांच्या या संग्रामशूर साधकाने अखंड स्वधर्मपालन करून अधर्म नेस्तनाबूत केलाय. सत्कर्मांचेच आचरण करून वाईट कृत्यांना झुगारून दिलय. विचारपूर्वक आचरणाने अविचारांना हाकलून देऊन वाटेला लावलय. साधकलक्षण समासात समर्थांनी साधकाच्या समाजातील वर्तणुकीची पथ्ये सांगितली आहेत. नेमाने खुरपिता तण । निश्चित वाढेल उत्पादन ? । मशागतीची तेवढीच जाण । कृषिवला हवी ।। १६७ अबालवृध्द वाऱ्यावरी । नाहक मारती शस्त्रधारी । विकृत मानसिकतेवरी । उपायो कोणता ?।। १६८ अहिंसा उपाय हिंसेवरी ?। निष्पाप जीवां मारेकरी । सर्वत्र युगानुगे अवनीवरी । खंडिती हा इतिहास ।। १६९ 'दया' शब्द त्यांना वर्ज । कितीही करा विनंत्या-अर्ज । संपदा, सत्तेचा लोभ, माज । दुष्कृत्या ठरते कारण ।। १७० सत्कृत्य शब्द फसवा । परस्पर विरोधी भावा । गोवत्स कधि, कधि छावा । गोंडस, तरि भिन्न वृत्ती ।। १७१ विषवल्ली रुजविणे । तुलसिवृंदावन लावणे । क्रिया एक परि भिन्न असणे । परिणाम ! स्वाभाविक ।। १७२ दुष्कृत्यांची जाणा महती । निवारण्या सुकृतांची माहिती । ज्यांना मान्यता लौकिकार्थी । अभावे त्यांच्या कैची ? ।। १७३ कोठलाही प्रस्तर कठोर । फोडितो वेगवान जळप्रहार । पेटता वडवानळ रौद्र । जळ शीतळ शमविते ।। १७४ परंतु जळ प्रळयवेळी । निसर्गाची अमोघ खेळी । प्रस्तरी वा वडवानळी । निराकरण्या ना सक्षम ।। १७५

Wednesday, December 17, 2014

।।भासबोध।। १३८ ते १६१

अभ्यासले म्हणे संत । सहिष्णुता तरी अंतरांत । कांही केल्या ना रुजत । पीठासनाधिष्टांच्या ।। १३८ कांही जात्याच देखणे । भरडती जात्यांत दाणे । भारुडादि लोकसाहित्य लेणे । संशोधिती निष्ठेने ।। १३९ संतोपदेशांची अमृतजळे । नासविती माजविति शेवाळे । ते तर अंगभूत बुळबुळे । भाबडे भोळे धडपडती ।। १४० कांही साहित्य'दुर्वास' । परस्परांचा करिती दुस्वास । घरकुल जरि साहित्य'सहवास' । 'वांदरे' स्थितं ।। १४१ फोडित बसती काव्यकोडी । मोडीत निरर्थ, भरती ग्रंथकावडी । तोडींत लौकिक,हिरवी माडी । चढती ! 'समीक्षण्या' कलाकृती ।। १४२ सदा स्मरावे विहित कर्म । आप्तस्वकीय रक्षण धर्म । जगराहाटीचे हे वर्म । कुठल्या 'नामे' साधते ।। १४३ 'नाम' घेता कोण अवतरतला ?। सांसारिक कर्तव्या उभा ठाकला ?। संकटसमयी खरेच धावला ?। कधी, कसा दाखवा बा ।। १४४ अमुक-तमुक म्हणे केले 'त्याने' । कोणी टिपिले 'त्याला' नजरेने ?। आनंद-वेदना, सुख-दु:खाने । भारिले मनुष्ये पळ स्व'कर्मे ।। १४५ चिमणी चिल्ली घरट्यांत । पक्षिणी घास इवल्या चोचींत । भरवुनी, पोसुनि पंख बलवंत । आभाळमायेस वाहते ।। १४६ जन्मती रोज असंख्य जीव । जीवापाड चुकवीत घाव । अवकाळिचे निष्ठुर डाव । माय सहजी परतवे ।। १४७ मादी स्वाभाविक जरि वत्सल । रिपुदमना परि कराल, कळिकाळ । विशेषत: रक्षण प्रतिपाळ । करण्या पोटच्या चिमुकल्यांचा ।। १४८ ।। दास-वाणी ।। आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोध येणे । ऐसीं नव्हेत की लक्षणे । सख्यभक्तीची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/२१ जरा मनासारखी गोष्ट घडली नाही तर देवाला आमचे चांगले पाहावले नाही म्हणायचे आणि रागारागाने दैनंदिन पूजाअर्चा सुद्धा सोडून द्यायची. हे लक्षण सख्यभक्तीचे बिलकुल नाही. न मागताही तो देतोच हे सुदाम्याच्या निरपेक्ष सख्यभक्तीवरून समजून घ्यावे. जो तो जाणितो स्वकर्माने । सुख-दु:ख भोगणे-निवारणे । वृथा कां द्यावी भूषणे-दूषणे । अन्य कुणा ?।। १४९ सख्य, मैत्र राखते वैर दूर । वोलांडुनि मोद-क्रोध अपार । वोसंडुनि जाय प्रेमभरे अंतर । सवंगड्यांचे ।। १५० द्वापारयुगी मैत्रीच न्यारी । सद्यकाली माजले कलिधारी । लांगूलचालन दारोदारी । करिती 'दामा'साठी ।। १५१ ।। दास-वाणी ।। पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश । नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ती नवमी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०९/२४ पंचमहाभूतांमधे आकाशतत्व सर्वांत सूक्ष्म म्हणून सर्वव्यापक आहे. देवदेवतांच्या अनेक रूपांमधे जगदीश्वर जसा सर्वश्रेष्ठ त्याचप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन इत्यादी नऊ प्रकारच्या भक्तींमधे नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वोच्च मानावी. भक्तिमार्गाचा कलशाध्याय म्हणजे स्वत:चे संपूर्ण समर्पण.सायोज्यमुक्ती ही आत्मनिवेदनाची फलश्रुती. स्वगतासि नाहीच वेळ । क्षुधातृषा व्यापिती हरेक पळ । अन्यथा चिंतांचा जाळ । मूलतत्वे भिनली श्वासांत ।। १५२ कुणाची, कशास भक्ती ? । कधी, कुठे मिळेल शाश्वती ? । जंजाळ, जाळी, अवमान, अनिती । भीती भारते अंतर ।। १५३ पंचतत्वांची नसते करणी । निसर्ग नसतो सुखद:खा कारणी । सावरी वा काटेरी सजवितो लेणी । आपणची जाणा ।। १५४ अवकाश अथवा रुधिर कण । सर्वसमान अवघे योजन । फिरणे, पण केंन्दस्थानि कोण ?। आकळेना ।। १५५ ऐसी कोठली अवजड 'ज्ञान'मोळी । डोईवरी ? ज्यामुळे खांद्यावर झोळी । 'भीक्षांदेहि' देती दारोदारी हाळी । कष्टकरी जनांच्या ।। १५६ ।। दास-वाणी ।। सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजें वाया । पदार्थज्ञान ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/०६ अध्यात्मिक प्रवासात देहाच्या चार अवस्था मानल्या जातात. जागृती - जागेपण स्वप्न - झोपेतील जागेपण सुषुप्ती - गाढ झोप तुर्या - समाधी अवस्था, योगनिद्रेमधे आहे परंतु पूर्ण जागा. काहीजण तुर्येलाच ब्रह्मज्ञान मानतात, परंतु जाणे ब्रह्म जाणे माया ती तुर्या . त्यामुळे तुर्यावस्था मधेच राहते. अपूर्ण म्हणून ती निव्वळ भौतिक, पदार्थज्ञान. तुर्येच्याही पलीकडे जे आहे ते विमलब्रह्म. शुद्धज्ञानसमासात समर्थ साधकाचा क्रमविकास सांगताहेत. आम्हासि ठावकी एकचि अवस्था । तिला विविध नामे संबोधिता । कर्मधर्म संभवतो विशेषत: । तारून नेण्या 'पैल'तिरी ।। १५७ मनात कुजवुनि भोग, निद्रा । जागृतावस्थेंत 'ढोंगी' मुद्रा । दिवास्वप्नांत शोधिती अभद्रा । बहुतेक 'साधु' सद्यकाळी ।। १५८ अनेक मंचिले म्या विद्वत्जन। तयांनी मथिले तत्वज्ञान । परि सामान्य जनता जनार्दन । वंचितचि राहिला भाबडा ।। १५९ लाल दिव्यांच्या आधी गाड्या । मुखशुध्दीस खाकरा, खाजा, रेवड्या । सत्कर्मांच्या उठविण्या वावड्या । कार्यकर्ते सज्ज सदा ।। १६० पंचाधीक दशकांवरती शतकोटी । किड्या, मुंग्यासम जन राबती । त्यांच्या कल्याणासाठी । काय बा केले ?।। १६१

Tuesday, December 9, 2014

।।भासबोध।। १२६ ते १३७

कन्या, पुत्राच्या यशाची गाज । घुमत राहावी दाही दिशांत रोज । होण्यास धन्य माय तांतास काज । या परते कोणते ?।। १२६ डंका तिन्हीलोकी वाजावा । सत्कार, सन्मान उचित व्हावा । गुरु, जनलोकांनी वाखाणावा । ऐसा असावा पराक्रम ।। १२७ संसार करणे, फुलविणे । गृहस्थधर्म यथोचित सांभाळणे । प्रेमादर, सौजन्य अखंड बाळगणे । हेचि आमुचे 'अध्यात्म' ।। १२८ वेद, पोथ्यां, पुराण, ग्रंथ । कांहीही विवादले आपसांत । रुजा घालीत संत महंत । वृथा करोत कालापव्यय ।। १२९ अखेर त्यांची होते कोंडी । सोडविता तृष्णा-क्षुधेची कोडी । मनीचा गुंता भाग पाडी । कुकर्मांचे अवसरण्या मार्ग ।। १३० वृथा जिवाची घालमेल । अंतरांत मंथनी कल्लोळ । व्यर्थ कष्टकऱ्यांचा जाय वेळ । 'अध्यात्म' कोडी उलगडता ।। १३१ विनाकारणे उगा ओवी । लिहिली जाते माझ्या करवी । तर्क-बुध्दीने घुसळुन रवी । अर्थ नवनीत जमविण्या ।। १३२ ।। दास-वाणी ।। भक्तांस देवाचें ध्यान । देवावाचून नेणे अन्न । कळावंतांचें जे मन । तें कळाकार जालें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/३० खरा देवभक्त कीर्तनकार फक्त देवाचे सगुण सावळे सुंदर रूप समोर उभेच आहे या भावामधे कीर्तन करतो त्यामुळे त्याला परमेश्वराशिवाय अन्य काहीही मनात येतच नाही. एखादा कलाकार कितीही उत्कृष्ठ असला तरी आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण हाच त्याच्या भजनाचाही हेतू असतो. परिणामी तो हरिकलाकार ठरतो, हरिकथाकार नाही. कलाकारी, निसर्गाचे देणे । निष्ठेने सादर करणे । जनसामान्यांचे रंजन करणे । कीर्तन म्हणा ।। १३३ असे नित्यनेमे मनापासून । करितो जो 'कीर्तन' । सर्वसामान्यांच्या अंतरी लीन । होतसे सहजची ।। १३४ यालाच म्हणावे 'भक्ती' ?। सकारात्मक ऊर्जा, शक्ती । प्रसन्न जो करितो चित्तवृत्ती । अहेतुक, नकळत सहसा ।। १३५ ।। दास-वाणी ।। ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२८ तोंडातला घास तोंडातच घालावा लागतो. नाकात घालून चालत नाही. ज्या इंद्रियाचा जो भोग आहे तोच त्याला द्यावा लागतो. ईश्वराने सृष्टी निर्माण करताना घालून दिलेले नियम आपल्या लहरीनुसार, आसक्तीला अनुकूल असे बदलायला लागलो तर जीवन शिल्लकच राहणार नाही. निसर्गविरोधी करती कृती । त्यांस म्हणती विकृती । तोडुन-फाडुन ऐशा अपप्रवृत्ती । जाळा वा गाडा खोलवरी ।। १३६ बाह्यरूप देतो निसर्ग । अंतरंग घडवी संस्कारजग । बोलाक्षरांचे विविधरंग । साकारति इंद्रधनू ।। १३७

Friday, December 5, 2014

।।।भासबोध।। १०७ ते १२५

स्वरुधिराक्षरें म्हणे निषेध । अंधश्रध्दा निवारण्या औषध । शिकले सवरले वैद्य, विरोध । न करता, करिती मूर्खपणा ।।१०७ ।। दास-वाणी ।। पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ । गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१५ कुत्रा, गाय, बैल, पाळीव पक्षी यांना ईश्वरी कृपेने काही विशेष गुण, उपयुक्तता प्राप्त असल्याने मालक त्यांचे पालनपोषण, कोडकौतुक करतात. त्याच दैवी कृपेने मनुष्याला तर कितीतरी अधिक गुण मिळतात. परंतु सद् गुणांची जोपासना केली नाही तर मानवी देह लाभून सुद्धा आयुष्य हलाखीत वाया जाते. गुणरूप दशकात समर्थ जाणत्याची लक्षणे सांगताहेत. मनुष्य कधि सामान्यप्राणी । दावी कधि श्वापदांची करणी । माया, ममता, वात्सल्य, आर्त विनवणी । गाउलीच्या मात्र नेत्री न चुके ।। १०८ मनुष्य कधि मृदु लाघवी । कधि करि हिंसा पाशवी । 'उत्क्रांती' ही कोण्या कारणे म्हणावी । सांगा बरे ।। १०९ केवळ क्षुधा कारणे व्याघ्र । वा अन्य श्वापदे गति वाढवुनि शिघ्र । नरडीचा घोट घेण्यांत व्यग्र । निसर्गत: होती ।। ११० परंतु मनुष्य अकारणे । विकृतिचि लेवूनि पांघरुण् । अश्रापास ताडणे, फाडणे । यांत मानिती धन्यता ।। १११ भेटल्याविना नाहि जवळीक ।पेटल्याविना नाही शृंगारपावक । सुटल्याविणा ना चिमुटभर राख । जीवमात्रांची ।। ११२ म्हणोनि जाणा सारखेपण । वृत्ती, कृतींतले गुणावगुण । श्वास-उत्छ्वास नि प्राण । मित्र सर्व जीवितांचे ।। ११३ खावटी, उकड्या, सडके धान्य । ओंजळींत घेउन जनसामान्य । नाइलाजे करिती मान्य । म्हणती 'उपकार' सत्तेचे ।। ११४ म्हणे भुकटी सुग्रास । नरड्यांतून उतरण्या सायास । पोटभरीचा नुसता आभास । दीन, हीन, गरिबांना ।। ११५ गाडीवर लाल दिवा । मुखशुध्दीस सुका मेवा । आपोआप संपदेच्या पेवा । येतसे बाळसे ।। ११६ करदाते प्रामाणिक । कायम खिशांस यांच्या भोकं । बेजार, त्रस्त मागिती भीक । चार घांस शिजविण्या ।। ११७ खुर्च्यांवरी 'तयार' दांभिक । ढोंगी, गुंड वा संघनायक । अंन्तर्बाह्य 'निर्लज्ज' सेवक । भोगा फळे स्वकर्माची ।। ११८ भांडती, तंडती, ओकती गरळ । 'मासे' पकडण्या फेकिती गळ । ओठांत सवंग 'अभंगां'चे जाल । अबाल-वृध्दा फसविण्या ।। ११९ लाल, पिवळा, निळा, हिरवा । मधे, विरलेला किंचित भगवा । ऐशा विचित्र रंगधनुच्या गांवा । नशिबी आपुल्या वास्तव्य ।। १२० ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणासवें आळस । आळसे निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/३५ मन एकाग्र नसणे म्हणजे दुश्चीत. कामात लक्ष लागत नाही म्हणून आळस येतो. काम पूर्ण झाले नसले तरी झोप येते, ही विलासी निद्रा. या सतत येत राहिलेल्या झोपेमुळे आयुष्याचा नाश होतो. ते निष्फळ वाया जाते. दुश्चीतनिरूपण समासात समर्थ अपयशाची कारणे सांगताहेत. नीज म्हणे, 'माझ्या बाळा ! कुशीत घेते, ये लडिवाळा' !। कर्माचा निश्चित घोटाळा । ऐकाल तर होईलची ।। १२१ एकाग्रता, निष्ठा, असोशी । जोडींत राहावी कर्मांसी । जैसे बीज रुजता तरुवरासी । समाधनानंद ! मिळेचि तैसा ।। १२२ ।। दास-वाणी ।। श्रवणापरीस मनन सार । मनने कळे सारासार । निजध्यासें साक्षात्कार । नि:संग वस्तु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०१/४१ धर्मग्रंथांचे वाचन, निरूपण, कीर्तन स्वत: ऐकणे तसेच करणे हे श्रवण. ऐकलेल्याची किंवा बोलायची सतत उजळणी हे मनन. सार म्हणजे योग्य म्हणून ग्राहय. असार हे अयोग्य म्हणून त्याज्य. मनननामुळे सारासार विचार पक्का होतो. तोच कायमस्वरूपी आचरणात आणला की निजध्यास झाला. अखंड ब्रह्मचिंतनाची फलश्रुती म्हणून होतो तो आत्मसाक्षात्कार. वाचावे, ऐकावे, बोलावे । ज्ञानेंद्रियांचे भान राखावे । निसर्गाशी कृतज्ञ राहावे । सदासर्वदा ।। १२३ या कृतींद्वारा ज्ञानवृध्दी । आपोआप जीवन समृध्दी । सकारात्मकता सहज साधी । लाभते खचितची ।। १२४ अक्षरबीज आपोआप । रुजते मनांत खोलवर खूप । अंकुरता धारिते वृक्षरूप । सिध्द फुलण्या, फळण्यास ।। १२५

Tuesday, December 2, 2014

।।भासबोध।। नवा अध्याय ८६ ते १०६

।। दास-वाणी ।। ज्येष्ठ बंधू बाप माये । त्यांची वचने न साहे । सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०६/२६ ज्यांच्या छत्राखाली आपण वाढलो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण फुललो, किंबहुना आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे अशा वडिलबंधू, आई बाप यांच्याशी सुसंवाद तर दूरच साधे धड बोलणे सुद्धा आवडत नाही. ते बोलायला लागताच त्यांचा मान न ठेवता रागारागाने निघून जातो तो तमोगुणी मनुष्य. माय, तांत, बंधू, सखा । जाणा जीवाच्या तुकड्या सारखा । त्यांना जो होईल पारखा । गर्दींत सुध्दा एकाकी ।। ८६ विस्मरण, कृतघ्नपणाची नांदी । पांठ फिरवणे, लक्षण घरभेदी । निंदनीय वर्तन तयांप्रती । अक्षम्यचि होय ।। ८७ डोईवरी आभाळमाया । काळी आई, मखमल पाया । तैसेचि वागवावे आप्तस्वकीया । तेचि होय 'माणूस'पण ।। ८८ छकुल्यास ठेवोनि अर्धपोटी । कष्टकरी कवळ धारितों ओष्ठी । हा अविचार ? नाही ! जगराहाटी । कर्मासाठी शक्ती न मिळे अन्यथा ?।। ८९ म्हणोनि राखणे भाकरतुकडा । भोजनोत्तरी दिवसाअखेरी, पायंडा । सुसंस्कृत गृहिणी देती धडा । परंपरा 'अतिथी' साठी ।। ९० सातजणांत एक तीळ । वाटता, मिळे सुख सकळ । कोणताही कठिण काळ । सहज होई सुकर ।। ९१ मारितो कां भूल थापा ? अतिशहाणा हा कोणं बाप्पा ? आवरा, अटकाव करा या पापा ? आरडती आढ्य, संभावितं ।। ९२ 'धर्मास लावितो चूड । उतरवा याचे वेड । करण्यास परतफेड । हाणा, चोपा !' गोंगाटं !।। ९३ अध्यात्म मोक्ष, गती । हा स्वयंसिध्द मंदमती । कैसा जाणेल ? उपरती। यांस होईल ?।। ९४ गरम, नरम, विविध पराठे । थंडीमधे खावे, वाटे । 'नाम' 'देव' सगळे खोटे । घुमान घुमण्या लेखकूंना ।। ९५ उभे आयुष्य म्हणे संशोधनी । अध्यासनाधिष्ठित साहित्यिकांनी । परंतू सहिष्णुता आचरणी । बाणविण्यांत अपयशी ।। ९६ बालयोगी ज्ञानदेव । सांसारिक तुकोब्बा, नामदेव । न मिरविता संतभाव । झालेचि ना जनमान्य ?।। ९७ मग कां बरे सायास । मिरविण्या वृथा आभास । भाटांना ठेउन आसपास । 'उमेद' 'वार' करिति ढोंगी ।। ९८ धरा धरा काकतकर । मोजुनी मारा पैजार । शमविण्या सूडाची धार । वार करा नेमके ।। ९९ गति, मोक्षावरती करीत बसला वार । लागेल ऊर्ध्व, मग येइल भानावर ?। तेंव्हा तरि यांवे उचलायाला चार ? । सुखरूप दावण्या 'माहेरा'चे द्वार ।। १०० ।। दास-वाणी ।। लोकी भले म्हणायाकारणे । भल्यास लागते सोसणें । न सोसता भंडवाणे । सहजचि होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०२/१३ लोकांनी जर आपल्याविषयी चांगले बोलावे असे वाटत असेल तर कार्यकर्त्याला समाजाचे भले बुरे बोल सोसावेच लागतात. तरच कार्य पुढे जाते. आपण प्रत्युत्तरे, वादविवाद करत बसलो तर 'काय भांडकुदळ आहे हा माणूस' अस सहज ऐकून घ्यावे लागते. काळोख असतो ठाय । प्रकाश पावतो विलय । तेज शोधीत जाय । क्षितिजी भेटतो अंधार ।। १०१ मुकाट न राहता बोलावे । शब्दचि पाहिजे ऐसे नव्हे । कोठल्याहि ज्ञांनेंद्रियाद्वारे व्हावे । संभाषण ।। १०२ बरे, वाईट पाहावे तैसे । व्यक्तिसापेक्षच सहसा असे । भावांचे आयाम विविधसे । असावे संग्रही ।। १०३ अंधारच असतो सत्य नि स्थाई । प्रकाशा मावळतीची घाई । जन्म सांगाती घेउन येई । मृत्यू ! विश्वहि जाणा तैसेची ।। १०४ कोण जाणे. अंधाराचा ध्यास । कां न बरवा वाटें प्रकाश ?। हीच बहुधा ओलांडण्या वेस । घालमेल जीवाची ?।। १०५ पुत्र कमावितो पुण्याई । आज मजला कामा येई । व्यक्तण्यास साहाय्यभूत होई । नकळत पण निश्चित ।। १०६

Tuesday, November 25, 2014

।।भासबोध।। आजपासून नवा अध्याय: १ते ८५

।।भासबोध।। आजपासून नवा अध्याय: मनांत वसते येते ते स्वप्नी उमलते । संसार,व्यापार कारणे चिंता असते । या विचारांत असता सामान्यजनांते । ग्रासते निद्रा ।। १ कष्ट, संकट, वेदना । व्यापीत असतां आप्तजना । मुक्तीच्या पाहाणे स्वप्ना । जाणा महत्पाप ।। २ हवी हविशी जर वाटे मुक्ती । मुळांत कोण्याकारणे अवतरती ?। संसार मांडुनी हे अवनीवरती । कहार होती गिळावया ।। ३ पटकुर पसरावे पदपथी । 'त्याच्या' नांवे दया मागती । त्यत्तीस कोटींपैकी किती येती । ऐशा निष्क्रीय निलाज-या भेटावया ।। ४ ।। दास-वाणी ।। स्वप्नी बद्ध मुक्त जाला । तो जागृतीस नाहीं आला । कैचा कोण काये जाला । कांहीं कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०६/६२ मी आणि माझे नातलग, संपत्ती, व्यवसाय यात गुरफटलेला आणि त्यातच परमसुख मानून धडपडणारा म्हणजे बद्ध. हा बद्ध एके दिवशी गाढ झोपला अन् त्याला आपण ध्यानस्थ बसलोय असे स्वप्न पडले. जागा झाला आणि पुन्हा नेहमीचेच उद्योग सुरू केले. पारमार्थिक जागृतीचा पत्ताच नाही. अशा स्वप्नातील मुक्तीला काय अर्थ ? परमेश्वरापायी चित्त एकाग्र तो खरा मुक्त ! तैसे कोठलेही ज्ञान । शोषित गेले कण कण । तर्काने परस्परांशी सांधून । विषय आकळतो परिपूर्ण ।। ५ उदाहरण एकलव्याचे । वा गर्भस्थित अभिनन्यूचे । अंकुरल्या, जोपासल्या कोंभांचे । त्यांनी केले वटवृक्ष ।। ६ पाहाता, ऐकता चाणाक्षपणे । विश्लेषतां परिणाम, कार्यकारणे । समोर येतो सहजपणे । अन्वयार्थ ।। ७ म्हणोनि गुरु चराचर स्थीत । जेथून जावे तेथे संगत । वावरती ! राखोनि सावधचित्त । असावे आपण ।। ८ 'मुक्ती मुक्ती' सर्वदा आरडती । 'उक्ती उक्तीं' त्रिकाल संगाती । 'भक्ती भक्ती' कां न आग्रहिती । कर्मयोगाची हे ।। ९ पाठपुरावा पळण्याचा । कर्मनिष्ठेपासून ढळण्याचा । सर्वसंगपरित्यागाचा । उपदेश, सांगा, योग्य कां ?।। १० रणांगणी वा भवसागरी लढतां । कमकुवत शरीर, मने होता । सैन्य, प्रजा कामी येतां । सत्ता गाजविण्या कुणि नुरेल ।। ११ म्हणुनि राखावे समाजभान । 'मी' म्हणावे, 'सेवक प्रधान' !। ऐसेचि वदले असावे, 'जाण, । राजा' दास शिवबासी ।। १२ मग आपोआप स्वानिनिष्ठा । जागेल स्वादिल्या मिठा । उद्योगारोग्य, संपन्न पेठा । सजवितील नगरि-देशा ।। १३ न्हाऊ-माखू घातलेली घरी । धुळींत लोळति सडकेवरी । रक्त-मांस एकचि जरी । गोमट्यासि न्याय वेगळा कां ?।। १४ 'देव' तुमचा आंधळा । प्रसाद भक्षुनी निद्रिस्त गोळा । काणा करोनिही डोळा । न पाहे तिकडे ।। १५ दुर्दैवी, प्रतीक्षेंत, मूढ । कधी मिळेल सुवर्ण कु-हाड । वाकोनि पाहती आड । तोल जाता होति मुक्त ।। १६ गति मिळता गर्तेंत जाती । 'मोक्ष' लोभाने सर्वस्व त्यजती । उखळे पांढरी करिती। बुवा, बाबा, भोंदूंची ।। १७ जनावेगळा कसा राहील ?। भुकेला कंदमुळे खाईल ?। भिक्षेसाठी झोळी करेल । पुढ ! जनताजनार्दनीच ना ?।। १७ सेवा, साधना वा परिचार । अखेरीस माध्यम शरीर । पोसाण्या लागते अन्न आणि नीर । कोठ शिजवतील बाबा, साधू ।। १८ आपला खारीचा वाटा । गरजूंना देण्या, अनेक वाटा । संसार करोनि नेटका । सद्भावे अर्पिती जन ।। १९ भले राहा ब्रह्मचारी । अभ्यासूनि वेद चारी । सुविहित चालल्या संसारी । विचलित करु नका गृहस्था ।। २० निसर्गे दिधल् दान । दुर्लक्षुनि करू नका अवमान । सुलक्षणे, सुज्ञपणे अवलंबुन । जिवंतपणी वा मरणोत्तर ।। २२ नर नारी कां दोनचि स्थिती । योजने या कारणे कोणती । विचार कोणी केला ? किती ?। नि:संगासि प्रतिपादिता ।। २३ म्हणोनि योगी-भोगी आदि । जनतेचा खरा प्रतिनिधी । तोलत संपदा-आपदा 'आनंदी'। सांगतो, 'राहा सदा' !।। २४ माहीत असतां हे सर्व । कां सांगती, 'अध्यात्म' पर्व । गति-मुक्ति-मोक्षादिंचा संभव । भाबड्या अंतरी रुजविती ।। २५ म्हणोनि योगी-भोगी आदि । जनतेचा खरा प्रतिनिधी । तोलत संपदा-आपदा 'आनंदी'। सांगतो, 'राहा सदा' !।। २४ माहीत असतां हे सर्व । कां सांगती, 'अध्यात्म' पर्व । गति-मुक्ति-मोक्षादिंचा संभव । भाबड्या अंतरी रुजविती ।। २६ 'ते' तर त्यत्तिसकोटी । त्यातला उपकारक जगजेठी । निवडून, दीन दुबळ्यांसाठी । नेमस्तेल, तो महंत ।। २७ गरीबांस कसे कळावे ? पाणावल्या पांपणींतले गाळावे कि गिळावे । बहुधा दु:खचि ! सुख कसे मिळावे । काट्यांच्या वाटेंत ?।। २८ म्हणे 'ते' त्यत्तिसकोटी । वसंत असता उरी-पोटी । तरी क्षुधाशांतीसाठी । कपिला गोमाता रानोमाळ ।। २९ म्हणे 'शोध घ्या स्व अंतरी,। भेटतील तिथे 'दैवते' सारी !' । मग कशास करण्या वारी । प्रेरित वृथा करिति 'संत' ? ।। ३० कशास हवा महंत ? अंकुश घेवुनि जणु माहुत । अगम्य गति-मोक्षाप्रती जनमत । कोण्या कारणे रेटावया ? ।। ३१ तर्क बुध्दीच्या विश्लेषक कसोट्या । देणग्या निसर्गाच्या मोठ्या । ढोंगी, भोंदू संत 'माणसांच्या' । स्वार्थी हेतूंनी गाडल्या ।। ३२ संत-महंताना नकोच जाणकार । जनता राहिला जर भाबडी निरक्षर । तेंव्हाच झोळींत पडेल भरपूर । भिक्षा, दक्षिणा नि संपदा ।। ३३ चर्चा करणे कां बा व्यर्थ ? चिंतनास जर देईल दिशा नि अर्थ ! मौन धारण्या निरर्थ । जावेचि कां ?।। ३४ उंच डोगरी चढोनि जावे । बहुत आरडा ओरडावे । हवेतर हवेशी भांडावे । हर्षोल्हासित होत्साते ।। ३५ हर्षोल्हास, सुख वाटावे सर्वांशी । वेदना दु:ख राखावी आपुल्यापाशी । कोठे न्यायचे असते 'त्या' दिशी ।सांगा बरे ऐहिक ? ।। ३६ या विचारें थांबवू नका सुकर्म । काज जगण्याचे तेचि वर्म । करित राहिलांत निकामि धर्म । 'पूज्य' राहिल गांठीशी ।। ३७ तुमच्या अनाठइ 'धर्म'भावे । आळशी साधु भोंदू सेवतील 'खवे' । सागतील, 'असेचि करित राहावे । उभयतांच्या कल्याणार्थ ' ।। ३८ रक्षेने बरबटतील अंगे । नग्नदेही धावतील कुंमंडलु-त्रिशुळा संगे । शुध्द जळनिधीत करोनि दंगे । नासतील उत्सर्जिताने ।। ३९ 'पुरुषार्थ' शब्द कालबाह्य । सर्वक्षेत्रांत महिला सक्रिय । 'मानवार्थ' उपाधीचा अनुनय । करावा भविष्यी ! हे बरें ।। ४० पुरुष, तरिही व्यवहार निरर्थ । कुटुंबात अडचण, त्रास व्यर्थ। पेलण्या संसार रथ । असमर्थ, मोडके, जणु चाकं ।। ४१ असावे नेहमी मितभाषी । तसेच नेहमी मृदुस्पर्शी । मनांना गवसणी घालण्यासी । उपकारक सर्व हे ।। ४२ म्हणोनि वंदन ज्ञानोब्बांसी । लहानं जरि अचाट कर्तृत्वदर्शी । दशकोत्तरिषष्ठ वर्षी । घालावा शिवबासी मुजरा ।। ४३ ओवींत ना कठोर व्यंजन । रयतमनीची अपार जाण । संभवती क्वचितच युगांतुनं । ऐसे आदर्श योगी ।। ४४ हृदय आवेगे उचंबळे । पापणीकांठी नीर साकळे । जीवमात्र जगति सगळे । घेतांतच अनुभव ।। ४५ प्रेम, वात्सल्य, करुणा । परी काजांच्या नाना । परि पाहता परिणामा । असति मात्र एक ।। ४६ कुणा आंचती विरहज्वाळा । कुणा दुरावा क्षणिक साहेना । कोण्या मनी आनंद माईना । विविध स्वरुपी प्रकटे ।। ४७ हे लिहितसे मी जरी । निगळेल कुणी भवसागरी ?। दखल घेवोनि परोपरी । विचार अन्या सांगेल ?।। ४८ नाही !... नका म्हणू उपदेश । कृपा मागतो तुमच्यापास । जगण्यातल्या कडु-गोड अनुभवांस । मांडण्या धजलो तुम्हापुढे ।। ४९ मज नसे तो अधिकार । नाही अभ्यास चिंतनाची धार । परंतु चिंता हृदयी अपार । भाबड्या, अबालवृध्दांची ।। ५० कैसा करतील उपदेश । ज्वलामुखीच्या तोंडास । जन्मत:च दैवाने गरिबास । धरिले ! होरपळत, आक्रंदती ।। ५१ नका दवडू समय अकारण । पुनःपुन्हा तेचतेच करुन पठण । जगण्यास आवश्यक उदरभरण । योग्य ते साधेल कां ?।। ५२ संकल्पना भ्रामक, कालबाह्य । तात्विक चिंतनाचे आरण्यकाव्य । कर्म करिता नसते संभाव्य । 'फोल'पट अखेरिस ।। ५३ 'अर्थ' असे सद्यकाली परम । निरर्थ गाळणे, त्यासाठी घाम । मोक्ष, काम वा धर्म । मिळवावा,भोगावा 'अर्था'ने ।। ५४ दारिद्रयाशी ज्याचा संग । भले प्रस्तर सहजि करि भंग । लौकिकार्थे तेचि खरा अपंग । जगाने त्याने मरणांत ।। ५५ मार्गक्रमण्या केवळ 'अर्थ' हवा । अन्यथा, क्षुधा-तृषेशि केवळ 'हवा' । मारा, चोरा, वा कर्जाने मिळवा । कारण 'अर्थ' महा-परम ।। ५६ 'अर्था'नेचि साधते सगळे । भोळ्या-भाबड्यासि गिळण्या बगळे । शुभ्र पर लेवून कावळे । भवसागरी 'ध्यानस्थ' ।। ५७ 'अर्था'नेच प्राप्त होई महत्ता । 'अर्थ' कारणे कोसळती महासत्ता । 'अर्थ' देतो आव्हान ललना-जगतां । विचलित करण्या तर्क-बुध्दी ।। ५८ कैसा वर्णू आनंद । मन होइ विभोर स्वच्छंद । पडेल कोणतेही बिरुद । उणेच, ओवण्या शब्दांमाजी ।। ५९ चक्र, अंकुश, पद्म, शुंडेवरी । मोदक सेवुनि पोटभरी । किलकिल्या नजरेचि पांखर धरी । भक्तावरी सर्वदा ।। ६० शा र दा त्रैक्षरी तत्व । शाश्वती रक्षण दायित्व । देवोनि आप्तांसि ! पूर्णत्व । पावाल, समाधाने ! ।। ६१ कळकाच्या बनांत शारदा । ग्रथाचिये पानांत शारदा । उदयास्ताच्या कनकांत शारदा । सर्वदा खुणावते ।। ६२ दृष्टी मात्र तैसी पाहिजे । मग तर्कांतुनि अर्थ निपजे । आपोआप पडघम वाजे । स्वसंवर्धनाचा ।। ६३ कसला 'कुंभ' कोण जाणे । अमृतबिंदू 'सांडले' म्हणे । नग्न देहांची प्रदर्शने । साधण्या धावति साधू, बाबा ।। ६४ ऐसे भ्रामक, भाकड कारण । परिणामी,नद्या जलनिधींचे प्रदूषण । मैला भरल्या गंगेचे करिती पूजन ?। कधी होतिल बा शहाणे ?।। ६५ ।। दास-वाणी ।। मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०५/२१ निर्भयता, दानी प्रवृत्ती, इंद्रियजय, स्वाध्याय, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, मृदुता, दया, तेज, क्षमाशीलता हे सर्व गुण दैवी संपत्तीचे अलंकार मानले जातात. मोक्षप्राप्त संतांना हे दागिने शोभतातही. असे हे श्रीमंत संत असंख्य सामान्यजीवांना देहबोधावरून आत्मबोधावर आणून ठेवतात. 'आपणासारिखे करिती तत्काळ ' हेच पारमार्थिक राजेपण होय. कोण अभागी भाग्यवान झाले । कुठल्यास्थळी रंकांचे राव झाले । कोण्या संत-महंते घडवियले । दाखवाना बाप्पा ।। ६६ 'मरा मरा' म्हणत वाल्याने । ऋषीपद प्राप्तिले अनवधानाने । मागल्या द्वारे प्रवेश संपदेने । करणे ! मान्यता पावली परंपरा ।। ६७ प्रज्ञा वा धनवंत जगी । जे जाहले ते तर कर्मयोगी । अध्यात्म, गतिची 'मिरगी' । टाळिली !मांदियाळींत 'संतां'च्या ।। ६८ कालापव्यय अनाठाई । कधीच त्यांनी केला नाही । उजळल्या भवतिच्या दिशा दाही । तर्क, बुध्दी, श्रमाने ।। ६९ मृदु भावांचा मृद्निधी । साकारुन, वज्रलेप सर्वांगी । देऊन, म्हणती, 'वचने बोलकी' । काव्य-प्रस्तर फोडित बसा ।। ७० समज दृढ एक, दुर्बोधता । उकले-आकळेना तीच कविता । चर्चा-चर्वण, विरोध करिता । स्वानंद मिळवितो समीक्षक ।। ७१ गावे, सांगावे अगदी सहज । न आळविता अनवट 'भिन्न-षड्ज' । भारवाहक उपदेशांचे सावज । वृथा श्रोत्यां करो नये ।। ७२ रसिक अखेरच्या पंक्तीत । भेदरून मंचावरचे साठवित । श्रवण-दृष्टीद्वारे मनांत । शोधण्या येतो विरंगुळा ।। ७३ प्रथम पंक्ती विद्वान विश्लेषकांची । तदनंतर मूल्यधारी प्रवेशकांची । मागे फुलवाती वळणाऱ्यांची । गर्दी असते अधे-मधे ।। ७४ दुर्बोध ज्यांचा काव्य-स्रोत । सरस्वती सारिखा सदा गुप्त । दर्शना-स्नांनांस दुरापास्त । त्यांस म्हणती 'कविश्रेष्ठ' ।। ७५ सुबोध, साधे, सरळ नि सोपे । कां न लिहिती बाया नि बापे ?। कष्टेविणा कळेल आपोआपे । ते यांना वर्ज कां ?।। ७६ संवाद साधण्या बोलीभाषा । करण्या अंतरांत प्रवेशा । माहिती, वर्णने, नोंदी वितरण्या ग्रंथभाषा । ऐसी योजना असावी ।। ७७ लिहिले, बोलले ते पोहोचणे । लक्षित परिणाम साधणे । सायास त्याचसाठी करणे । क्रियेंतून अपेक्षित ।। ७८ ।। दास-वाणी ।। भरोन वैभवाचे भरीं । सद् गुरूची उपेक्षा करी । गुरूपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/१०/३४ प्राप्त वैभवाच्या जोरावर आपल्या सद् गुरूचीही उपेक्षा करतो. ज्या गुरूकृपेमुळे आपल्याला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळाली ती गुरूपरंपरा लोकांना सांगण्यासही मुद्दाम टाळाटाळ करणारा शाहाणा असला तरी मूर्ख म्हणजेच पढतमूर्ख. ( समर्थांची ज्ञानगंगा ... www.samarthramdas400.in) गुरु तर गुरुच होय । मग कोठल्याही रूपे उभा ठाय । नि:शब्द, निरव देवोनिजाय । ज्ञानामृत क्षणोक्षणी ।। ७९ गुरूसम नाही सखा । जीव एक, दोन देहांत सारखा । एक बोले, दुजा देइ हाका । अखंडित ।। ८० गुरु, जगण्यांतला पालकचि होय । तापल्या गोरसावरची देई साय । मथुनि देइ जैसि यशोदामाय । नवनीत बाल'ब्रह्मांडा' ।। ८१ ।। दास-वाणी ।। वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटी । आशागुणे हिंपुटी । करी तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/२२ जे जे चमकदार, शानदार दृष्टीला पडेल ते मनाला आवडेल इथपर्यंत ठीक आहे. ते सर्व वैभव आपल्यालाच प्राप्त व्हावे ही इच्छा निर्माण होणे, त्याची सतत चुटपुट लागणे हे अयोग्य. नुसते मनोरथ सिद्धीस जात नाहीत त्यामुळे हिरमुसला होतो हे रजोगुणी स्वभावाचे लक्षण होय. (समर्थविचार ....... www.samarthramdas400.in) सद्यकाळी चळबुळ 'पक्षां'त । सत्तास्थाने ठेवेोनि 'लक्षां'त । किमान कांही कोटींत । संपदा वोरपण्या ।। ८२ चमक एकुटी काय करेल ? शंकाच असते किति टिकेल । परंतू फोलपण जाणतील । ऐसे बहुत विरळा ।। ८३ संपदा, सत्तेची धाकुली । भगिनी ! दाखवित वाकुली । अधिकारा पाठोपाठ गेली । रडत बसली निवृत्ती ।। ८४ जे 'त्याचे' ते कां वांछावे ? । मुखरस गळेतो अभिलाषावे । कर्ज, वा अपहार अवलंबावे । पात्रांत सामावण्या ?।। ८५

Saturday, November 1, 2014

।।भासबोध।। ३५१ ते ४०० (पुस्तकासाठी विश्राम)

।। दास-वाणी ।। लागता सद् गुरूवचनपंथे । जालें ब्रह्मांड पालथें । तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/५१ सद् गरूंनी एकदा मंत्र दिला, साधना सांगितली, त्या मार्गाला लागला की अगदी जगबुडी आली तरी ज्याची आपल्या गुरूवरील निष्ठा कणभरही कमी होत नाही तो सत् शिष्य. आत्यंतिक अडचणीतही जो साधना सोडत नाही किंवा बदलत नाही तो पैलतीर गाठतोच ! गुरु वागला यथार्थ । तरीच शिकवण सार्थ । शिष्य समाधानी परिपूर्त । मग होतो ।। ३५१ गुरु सद्यस्थित आगळे । फोल बोलांचे फेकीत जाळे । नको ते दावीत बळेबळे । नकळे कोठे नेतील ।। ३५२ न ठावे मज ब्रह्म । करित राहाता उचित कर्म । निरपेक्ष न राहाणे हेचि वर्म । गृहस्थाश्रमी जाणिले ।। ३५३ आकंठ लुटतो आनंद । भोव-यांचा करुन भेद । भव-सरितेंचा झुळझुळ नाद । ऐकतो ! हेचि का हो ब्रह्म ।। ३५४ नाही कोणी शिकवीत । अनुभवाची सारी करामत । ज्ञानेंद्रियांना ठेवोनि प्रवृत्त । अखंड अंतरी रुजवितो ।। ३५५ सद्भावनेस जागृत ठेवोनी । घडवीत राहातो जीवमात्र, प्राणी । सात्विक लक्षणि मधुरवाणी । अवलंबुनी अविरत ।। ३५६ तर्कबुध्दीचा दिवा । ज्ञानघृते तेववा । जे करितांत 'देवा'चा धावा । प्रतीक्षेंत अखंड राहोत ।। ३५७ सिध्द करिते रोज विज्ञान । अंधश्रध्देचे फोलपण । बंद डोळे आणि कान । गल्लाभरूं, परि 'संतां'चे ।। ३५८ अरे पाहा अवती-भवती । ठाई ठाई विज्ञानाची प्रचिती । करू नका आयुष्यांची माती । निष्फळ भजनी लावूनिया ।। ३५९ मंगलग्रह समृध्द लाल । मृद्-जळयोगे परिपूर्ण स्थलं । वसति योग्य म्हणे ठरेल । भविष्यांत कदाचित ।। ३६० प्रथम, द्वितीयाचे क्षेत्र । तृतीय प्रथमपदासि पात्र । चमत्कार नाही, गणितीय सूत्र । साधे, सरळ, सोपे ।। ३६१ एक येतो, एक जातो । रितेपणा भरून पावतो । सोबत्यांच्या प्रतीक्षेंत राहातो । तरी कां बा आपण ।। ३६२ एकलेपणाची वेदना । जन्म देई विविध प्रलोभनां । अपहार, आत्मघात मना । वारंवार मग खुणावतो ।। ३६३ सिध्द करा, जर खरे वाटे । की मी बोलतो खोटे । अनुभवांचे वेचीत काटे । पोहोचलो येथवरी ।। ३६४ ।। दास-वाणी ।। विवेके अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । नि:संग योगी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०४/१२ सार असार किंवा नित्य अनित्य विवेक केल्यामुळे कुठल्याही वस्तु विषयी आकर्षण उरले नाही. विरक्ती मुळे व्यावहारिक गोष्टींशी फारकत घेतली. अंतर्बाह्य मोकळा झालेला हा नि:संग साधक योगी मानावा. ऐसा कैसा अतर्क्य निष्कर्ष । काढिती समर्थराम दास । नि:संग, विरक्त पळपुट्यास । म्हणती साधक योगी ?।। ३६५ शेजेवरी वर्षे इतुकी । कुठल्या 'योगे' भोगिली सखी । लुटावयास ना उरले बाकी । म्हणुनि पळे पाहा 'चोर' ।। ३६६ म्हणे हे आदर्श रामभक्त । नशीब, राम नाही सद्यकाळांत । धरुनी छाटी, कमंडलूस । असते दिले सुळावरी ।। ३६७ शोषितासि निराधार सोडे । त्या मातीवरी उभारी वाडे । त्यांच्या मनगटी सुवर्णकडे । चढवू पाहाती कां दास ।। ३६८ हे तर जाणा नारी अरि । संसारास म्हणती उघड्यावरी । न्हाणुल्या लेकी, सुना घरी । टाकुनि ! म्हणति 'व्हा साधक' ?।। ३६९ ।। दास-वाणी ।। जाणावें दुसर्याचें जीवीचें । हें ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०५/३४ समोरच्या माणसाच्या मनातील विचार त्याच क्षणी तो काही न बोलता ओळखणे याला मनकवडा म्हणतात. ही आश्चर्यकारक गोष्ट असल्याने तो फार मोठा ज्ञानी आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञानाचे लक्षण नाही. पाहावें आपणासी आपण या नांव ज्ञान. स्वत्व तर जाणांवेचि प्रथम । तत्पश्चात इतरांचे अंतर्याम । जाणिवेशि तोलतां जाणीव । सुख-दु:खे प्रकर्षें भिडतील ।। ३७० ।। दास-वाणी ।। रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०३/४४ रथ किंवा कुठलेही वाहन वेगात धावत असताना दोन्ही बाजूची जमीन तितक्याच वेगाने उलट दिशेने मागेमागे सरकत आहे असा भास होतो. प्रत्यक्षात जमीन स्थिरच असते. भौतिक शास्त्रातील दृष्टांत वापरून समर्थ सांगताहेत की मायेमुळे अनेक रंग रूप आकारांत व्यक्त झालेला मुख्य देव आपल्याला दिसतो, भासतो परंतु त्याचे मूळ स्वरूप निर्गुण, निराकार असेच आहे. (सूक्ष्म आशंका निरूपण समास ज्ञानदशक. ) भूमी जर धावली उलट्या दिशेने । वेग रथाचा वाढेल दुपटीने । भौतिक सिध्दतो ऐशा लक्षणे । वैज्ञानिक सत्य ।। ३७१ कोठे सांगा दिसतो 'देव' । मूर्ती तर पाषाण संभव । 'त्या'च्या नावें उच्चरव । कोणत्या कारणे करावा ?।। ३७२ सुसंस्कृत, विकृत स्वभावता । माणसे विविध स्थळी भेटता । विशुध्द जोपासता वा नासता । कोठे असतो तुमचा 'देव' ?।। ३७३ आंता ऐका सांगणे । एकचि आहे मागणे । करोनि टाका आम्हास उणे । अध्यात्म, गति, मोक्षांतुनी ।। ३७४ आम्ही तर 'गति' प्राप्तं । जगता जगता मरणांत । मोक्ष आम्हा सदाचि परोक्ष । राहिला तर बरेचि ।। ३७५ असो थंडी, वारा, ऊन । स्वेदगंगेत आनंदे न्हाऊन । बांसगांव ठेवू बांधून । कुबट कद, सोवळी ।। ३७६ शिशिर, ग्रीष्म वा श्रावणसरी । सर्वत्र आम्हा आनंदाच्या परी । निर्ढावलेल्या कणखर शरीरी । झेलू, रिचवू, पचवू अखेरपर्यंत ।। ३७७ ।। दास-वाणी ।। तेजीं असे परि जळेना । पवनीं असे परी चळेना । गगनी असे परी कळेना । परब्रह्म तें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०४/३२ निर्गुण निराकार असलेले परब्रह्म हे सर्व चराचराला व्यापूनही शिल्लकच असते. तो ईश्वर अग्नीमधेही असतोच पण इंधनासारखा जळून संपत नाही. वायूमधेही अस्तित्वात असतो पण वावटळीबरोबर हलत नाही. तेच परब्रह्म आकाशात असते तरी जनसामान्यांना ते दिसत नाही. सिद्धपुरूषांना मात्र ते विमलब्रह्म ठायीठायी अनुभवास येते. काय पडले आकाशांतुनी ? 'सिध्द' ? हे तर अध्यात्माचे वाणी । आद्य निसर्गाची लेणी । संबोधिती 'परब्रह्म' ?।। ३७८ नसते ज़र एक पेशीय जीव । 'अध्यात्म' ठोकण्या उत्क्रांत मानव । जाहले असते संभव ?। सांगा बरे ।। ३७९ आतां तरी या भानावर । पंचमहाभूतांचा आविष्कार । क्षणोंक्षणि देतीं साक्षात्कार । वंदनीय खरे तेची ।। ३८० हडपोनि संचित, करोनि निर्धन । वृध्द माय-तांत हताश पराधीन । देतां,दयानिधींच्या भरवशां सोडून । ऐसे करंटे वर्णांने कैसे ।। ३८१ मजपाशी नाही लौकिक, धन । 'शब्द' केवळ उपजीविके साधन । त्या आधारे मन तवाव, प्रसन्न । ठेवू पाहातो ।। ३८२ जर कांही अधिक उणे । लिहिले गेले उद्वेगाने । त्यासाठी 'क्षमस्व' म्हणणे । आवश्यक अखेरीस ।। ३८३ नाही अधिक्षेप करणे, अंतरी । बल वापरुन कर्म घरी-दारी । नाही केले ! विश्वास धरी । मायबापा ! अन्यायगर्भी संताप ।। ३८४ सोड सोड ना माझ्या अक्षरबाळा । धड धड वाजतो पडघम आगळा । वेड-सूड, मूळ विकृतविकार ज्वाळा । बघ मजला बाहती ।। ३८५ मी संतापी, करंटा भोगलोलूप । मज सगळे पुण्य नि पाप । सारखेचि ! अनुष्ठान-जप-तप । नावडलेच निरंतर ।। ३८६ ।। दास-वाणी ।। उंचनीच नाही परी । राया रंका येकिच सरी । जाला पुरूष अथवा नारी । येकचि पद ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/२४ त्या मुख्य देवापाशी कुठलाही भेदभाव नाही. मग तो राजा असो वा भिकारी, स्त्री असो वा पुरूष सर्वजण एकाच समान पातळीवर येतात. प्रत्येकाला साधनेअंती येणारा आत्मानुभव सारखाच उत्कट असतो . मी लिहितो तो उपदेश ?। मलाच येउ लागला त्याचा वास । काय म्हणुनि 'सद्भावी' 'संतास' । 'पोकळ' मग म्या म्हणावे ।। ३८७ तरि निक्षून सागतो बाप्पा । ढोंगीपणा, भाकड, थापा । टाळा ! दावा निखळ रूपा । जैसे निसर्गे घडविले ।। ३८८ जीवजंतू वा उत्क्रांत मानव । स्थल काल भिन्न तरि एकच भाव। निसर्ग मर्यादेंत शोधणे ठाव । जगण्या !जोवर ना मरण ।। ३८९ जनकल्याण संतांचा श्वास । शब्द माझे, तर उत्सर्जित नि:श्वास । कदाचित बोधाचे भास । होइल ! परि फसूं नका !।। ३९० जर समान नर नारी । त्यजुनि संसार भोगोत्तरी । शोधाया मोक्ष-गति, द-या खोरी । सांगिती केवळ नरास कां ?।। ३९१ निसर्गे जखडिले नारीस । उच्चाटुनि 'मातृपदास' । श्वशुरगृही भोगत राहाते त्रास । परागंदा पती जरी ।। ३९२ ओवींत गुंफिता शब्दक्रमणा । नकळे कोठेनि मिळाली प्रेरणा । दासांच्या मार्गप्रदीप्तीविणा । बहुधा नसते झाले संभव ।। ३९३ आसने मर्यादित जरी । मात्र कामना अंतरी धरी । स्वप्नाळू बुभुक्षित चर्येवरी । भाव कांही मिटेना ।। ३९४ सर्व मण्यांची माळ एक । कुणि पोवळ्, पाचू वा मौत्तिक । सूत्रांतुनि ओघळणे स्वाभाविक । त्यांसा कैसे उमगेना ?।। ३९५ अंत येता नाही परतणे । प्रत्येक जीव अंतरि हे जाणे । 'वेळ' आली तरी झगडणे । आप्तां सांगे 'सोडू नका' ।। ३९६ सहज निवृत्ती कठिण फार । उसने अवसान करी जोर । 'बलवंत' आहे शरीर, अंतर । कथित राही परिवारा ।। ३९७ सनई, चौघडे, ढोल, ताशे । मर्तिक, विवाह वा बारसे । धनिकांघरी 'सोहळे' असे । होती ! सेवकां पर्वणी ।। ३९८ मी आरडतो कोणत्या काजे ?। कष्टकल्लोळांची वेदना गाजे । महानगरांत आयुष्य माझे । व्यतीत झाले ! म्हणोनी ?।। ३९९ शतके चार, अखंड प्रवास । मजसाठी कैसा महत्प्रयास । प्रेमभरे कवटाळा पामरास । उरी धरोनि, निरोप द्या ।। ४००