Thursday, June 21, 2012
पुणं अग्रणी ? का ?
सौरऊर्जेच्या उपयोगांत, पुणं अग्रणी ठरूं पाहात आहे अशी माहिती मिळाली आणि विचार करायला लागलो की, आणखी कांही, पुण्याला ’अग्रभागी’ ठेवणार्या घटना गोष्टी आहेत का ? आणि जवळपास पंचवीस मुद्दे मिळाले, पुण्र्करांची मान आणि पाठीचा कणा...जो आधीच, ’शिष्ठ्पणा’ आणि बर्यापैकी ’आढ्यताखोरी’ यामुळ...ताठ आहे तो आणखी ताठ व्हावा असे !
गेल्या वीस वर्षांतला विक्रमी वेगाने विकास..जगांतील सगळ्यांत जास्त ’पब्ज्’ असलेलं शहर..आणि विक्रमी ’धूम्रकांडधारीं’च शहर...सगळ्यांत जास्त ’संगनक प्रणाली’ संस्था २१२ पुण्यांत आहेत. त्या खालोखाल बंगळूरू २०८, हैदराबाद ९७ वगैरे. आणि म्हणूनच पुणं हे, महाराषट्राची ’सिलिकॉन वॅली’ म्हणून ओळखलं जातं.. तसंच पुण्यांत ३५ अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत..विक्रमी संख्या..जगांत कुठल्याही एका शहरांत असलेली..
पुणे विद्यापीठाशी आज तारखेला ५७ अभियांत्रिकी महाविद्यालय संलग्न आहेत...परत विद्यापीठ स्तरावरचा हा एक आगळा विक्रम
संरक्षण-सज्ज वायुदल आणि प्रवासी वाहतूक करणारी व्यापारी वायुयानं एकाच धावपट्टीवरून आकाशांत झेपावतांत इथं. पुण्यांत सगळ्यांत जास्त सार्वजनिक आणि शासकीय न्यास किंवा संस्था आहेत.’पुणे विद्यापीठांतून सर्वांत जस्त सण्ख्येनं विद्यार्थी परदेशांत शिक्षणासाठी जातांत. एकेकाळी आय्आय्टी कानपूरचा क्रमांक या बाबतींत पहिला होता. पुण्यांत सध्या मूळ मराठी स्थानिकांची संख्या फक्त ३८% आहे..तर, २०% उत्तरप्रदेशी, १०% तमिळ, १४% आंध्रा प्रदेशी, १०% केरेळय समाज, ८% मूळचे परदेशस्थ, ५% आफ्रिकावासी, २% बंगाली, आणि उरलेले ६%, त्यावितिरिक्त इतर प्रदेशांतून सर्व जाति धर्म पंथाचे जनसामान्य आलेले आहेत, त्यामुळं पुण्याचा सामाजिक चेहेरा आतां खरंच, बहुरंगी बहुढंगी झाला आहे. शिवाय पुणे पोलिसांचा गुन्हे अन्वेषण, तपास यंत्रणा आणि उलगडा, वचक, नागरी सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण, याबाबींमध्ये, मुंबई पाठोपाठ, ख्यातकीर्त म्हणून क्रमांक लागतो. पुण्यांत विक्रमी संख्येनं दुचाकी, स्वयंचलित वाहन आहेत. आणि त्यामुळं रहदारी...पादचारी, फ़ेरीवाले आणि दुचाकी(आशियांत प्रथम क्रमांकाची संख्या..), तीन चाकी चारचाकी आणि अवजड वाहनांची...यांचा आणि अर्थातच त्यामुळं प्रदूषणाचा, दाटपणाही बहुतेकवेळा असह्य होईल अशा पातळीला असतो..
मुंबई आणि दिल्ली खालोखाल, सर्व क्रीडाप्रकारांमधल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या स्तरावर, सहभागी खेळाडूं पाठविण्यांत पुण्याचा क्रमांक लागतो. आणि कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक, संशेधक हे पुण्याचे आहेत...नारळीकर माशेलकर हे कांही ’मासले’
अमेरिकेंत कामकरणार्या निष्णांत भारतीय व्यावसायिकांपैकी, अधिकतम संख्या ही पुणेकरांची आहे. तिथं कायम किंवा अस्थायी वास्तव्य करणाया भारतीय कुटुंबांऐकी,जवळपास ६०% पुणेकर आहेत.
भारतांत, एकाच शहरांत ७ विद्यापीठ असलेलं पुणं हे एकमेव शहर आह
पुण्यांतून किती नद्या वाहतांत माहीत आहे ? मुळा, मुठा, पवना, राम आणि देव नदी अशा पांच एकूण..
तसच धरण ? खडकवासला, पानशेत, वरसगांव, टेमघर, पवना आणि मुलशी अशी एकून सहा... आणि तरीसुद्धा दर उन्हाळ्यांत पुण्याला अवर्षण सदृश परिस्थितीला तोंड द्यावं लागतं..
पण...
सर्वांत जास्त प्रदूषित शहर, सर्वांत जास्त प्रदूषित चौक...स्वारगेट्..आणि सर्वांत जास्त गरीब वस्ती, झोपडपट्टीवासी, कठोर माणसाचं काळीज सुद्धा द्रवावं अशा परिस्थितींत राहाणारे, अन्न-वस्त्र-निवारा या तीन जगण्यासाठी आवश्यक गोष्टींपासून वर्षानुवर्ष वंचित राहिलेले ’नागरिक’ सुद्धा या पुण्यांतच आहेत
ज्या पुण्याचा आपल्याला ’अभमान’वगैरे वाटतो...मित्रहो...!!
Saturday, June 16, 2012
प्रेमाला कसले मोल
प्रेमाला कसले मोल
’प्रेम, म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमच आमचं अगदी ’सेम्’ असतं’
कविकुलदीपकांच्या मांदियाळींतले एक अग्रणी वारकरी, वीणेकरी आदरणीय मंगेशजी पांडगांवकरांच्या कवितेंतल्या या लोकप्रिय ओळी..’प्रेम’ ला ’सेम्’ चं यमक अगदी ’फिट्ट्’ बसलय...
सगळं ठीक आहे...पण..
’तुमचं आमचं सगळ्यांच ’प्रेम’ अगदी ’सेम्’ असत कां हो ? आईच मुलांवर, पतीच पत्नीवर, आणि मैत्रीणीच मित्रावर, किंवा उलट्या क्रमानं(विवाहपूर्व..अर्थातच), शेतकर्याचं पिकावर, शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर...सगळी सारखी ’प्रेमं’ असतांत ?
या प्रत्येक ’प्रेम-प्रकारां’वर एक स्वतंत्र लेख होईल इतकी ती भिन्न असतांत
याच ’प्रेम भावनेचा एक अनोखा प्रकार आहे पुढे वाचाल त्यां गोष्टींत
तर...
एका कृषिवलाच्याघरी पाळलेल्या कुत्रीनं एक दिव्स कांही गोडगोड गोजिरवाण्या बछड्यांना जन्म दिला. आपल्याच सारख्या, परिसरांतल्या सहकार्यांना कदाचित ही पिलं पालता येतील आणि घराच्या घरपणाला रात्रीसुद्धा ’जागत’ ठेवणारा सवंगडी मिळेल या हेतून, कृषिवलानं कुंपणाबाहेर एक सूचना-फलक लावायच ठरवल. तो फलक कुंपणाच्या दाराला लावत असतांनाच त्याला जा्णवलं की आपला सदरा कुणीतरी मागून ओढत आहे. कृषिवलानं मागे वळून बघोतलं तर त्याचा गुढग्याशी एक छोटा त्याला दिसला.
’काका, मला एक पिलू द्याना...विकत !’ छोटा म्हणाला,
’बेटा, ही पिलं फार उच्च जातकुळीची आहेत. बरीच किंमत मोजावी लागेल तुला. आहेत का एवढे पैसे तुझ्याजवळ ?’ कृषिवलानं आपल्या कपालावरचा घाम पुसत छोट्याला विचारलं..
छोट्यानं निराशेनं खाली मान घातली सुरुवातीला पण क्षणभर थांबून, एक हात विजारीच्या खिशांत घातला आणि मूठभ्र नाणी काढली. वर पाहात, आशेने ती मूठ सेतकरीकाकांकडे करीत उघडली त्यानं,
’काका माझ्याकडे हे एवढेच पैसे आहेत. मला कमीतकमी पाहूतरी द्यानां त्या पिलांना..’ विनवणी करीत उच्चारला छोटा
’गड्या, एवढ जर मी केलं नाही तुझ्यासाठी तर मला तो’ वर आभाळाकडे पाहात दादा म्हणाले, ’क्षमा करेल कां ?’ आणि चत्कन शीळ घालीत त्यानं श्वानमातेला सद घातली. तत्क्षणी मागे दुडूदुडू धावणार्या चार कापसाच्या गुंड्यांसह बाहेर दाखल झाली श्वानमाता..
’ती पाहतांच बाळें, काळीज धन्य झाले’ अशी अवस्था, कुंपणाच्या कांटेरी तारेला अगदी चिकटून, पिलांना निरखणार्या छोट्याची झाली...डोळे आनंदानं भिरभिरू लागले, मनांत खुशीचा मोर, पिसारा फुलवायला लागला...आणि तेवढ्यांत त्याच लक्ष श्वान-सदनाकडं गेलं..आंतमधे कांहीतरी हालचाल दिसली त्याला
आणखी एक कापसाचा गोळा पाठोपाठ बाहेर येत होता, हळूहळू चालत..किंवा खुरडत म्हणा हवंतर..बाकीच्या आपल्या भावंडांना गाठण्याची धडपड करीत..
छोट्याचे डोळे आणखी आनंदानं विस्फारले गेले. आणि तो उच्चरवांत, त्या पिलाकडे तर्जनी दाखवत, मागणी मांडू लागला...
’काका मला तेच हवय..सगळ्यांत शेवटी आलेलं..’
सेतकरीदादा, छोट्याच्याशेजारी बसत, थोड खंतावत म्हणाले, ’बेटा, नको नेवूस त्या पिलाला घरी. ते कधीच खेळू किंवा पळू शकणार नाही तुझ्या बरोबर, या बाकीच्या पिलांसारखं !’
छोटा दोन पावलं मागे सरकला, खाली वाकला, आणि आपल्या विजारीचा एक पाय वर गुंडाळू लागला..
आणि दृश्यमान झाला एक दैवदुर्विलास...छोट्याच्या विजारीच्या गुंडाळलेल्या पायाआड होता एक पंगू पाय दोनेही बाजूला खास बनविलेल्या आधाराच्या पोलादी पट्ट्या लावलेला...’ काका, अहो मलातरी कुठं धावता येतय इतरांसारखं. मी पण तरीसुद्धा खुरडत राहातोच की सवंगड्यां मागे त्यांना गाठायच्या प्रयत्नांत.. मला असाच माझ्याबरोबरीचा एक नवा सवंगडी सापडेल ना, या कापसाच्या गोळ्यांत..! आणि त्यालापण, या, आपल्याबरोबरच्या अपंग, बलहीनांना मागे सोडत धावणार्यांच्या जगांत सांभाळणारा, त्याला समजून घेणारा, त्याच्या जगांतला आणि जगण्या-जागण्यांतला कुणीतरी हवांच की हो काका.. !’
शेतकरीदादा, पांपणीकांठावर सांकळलेल दहिवर सदर्याच्या बाहीनं टिपत, छोट्यापासून नजर लपवत खाली वाकले. त्या पिलाला उचलून त्यांनी पोटाशी ध्ररलं आणि, रुद्ध कंठांतून शब्दफुटेनासा झाल्यामुळं थबकले क्षणभर..
पन परत भानावर येवून, मंदस्मित करीत, ते पिलू त्या छोट्याच्या हातांत देवू लागले..
छोट्यानंपण, लगेच पिलाला हातांत घेवून कुरवाळत छातीशी धरलं. पिलू सुद्धा, त्याच्या इवल्याश्या लालचुटुक जिभेनं छोट्याचा खुललेला चेहेरा चाटायला लागलं...
जगांतल्या सगळ्या वात्सल्यमूर्तींनी हेवा करावा असं दृश्य साकार होत होतं तिथं त्या क्षणी...
डबडबल्या डोळ्यांनी,पण अत्यंत आनंदित स्वरांत छोटा शेतकरीदादांना प्रष्ण करता झाला..
’किती पैसे देवू दादा मी याचे ?’
शेतकरीदादाच्या ’कुर्दांत’ चर्र झालं..गळ्यांत दाटलेला हुंदका बड्या मुश्किलीनं दाबत शेतकरी दादा म्हणाले,
’अंहं.. कांही देवू नकोस मला...खूप दिलस तू आतांच आम्हा दोघांना, मला आणि या दुर्दैवी जीवाला...प्रेम-वात्सल्य-माया-ममता यांची पखरण करीत. यापेक्षा अधिक मूल्यवान कांहीच नाही बाळा या जगांत...’
आंसवं, नेत्रगामी व्हायच्या आधीचं सेतकरीदादांनी, झटकन पाठ फिरवली आणि ते जड अंत:करणानं घराकडे चालायला लागले...
हा मजकूर लिहितांना आझीसुद्धा अवस्था जवळपास त्या शेतकरीदादा इतकीच बिकट झाली होती...
प्रेमाला कसले मोलं, स्पर्शांला उजवा कौलं
ही मधुभावाची भूल, निष्पाप वेलिवर फूल
प्रेमांत नसे हव्यास, बरसतो जसा पाऊस
निरपेक्ष देवुनी कांस, निष्पर्णा देई जोश
प्रेमाने फुटति धुमारे, प्रेमांत नसति देव्हारे
मागते प्रेम क्षण सारे, पत्र मात्र ठेवुनि कोरे
प्रेमांत नसे कुरघोडी, सहजीवन असते गोडी
शब्दांची भाषा थोडी, आवंतण नजरचं धाडी
हे असे विश्व मायेचे, स्नेहाचे, अनुबंधांचे
खोट्या नात्यांपलिकडचे, अन् विशुद्ध आनंदाचे
*****
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com
www.target point blank.blogger.arun kakatkar
Thursday, June 14, 2012
एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस...
Friday, June 8, 2012
महर्षी वाल्मिकींची, ’रामायणां’तील तपशीलांची अचूक मांडणी...
महर्षी वाल्मिकींची, ’रामायणां’तील तपशीलांची अचूक मांडणी...
श्रीरामाला, आयोध्येचा राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर, वाल्मिकीमुनिविरचित ’रामायण’ अस्तित्वांत आलं. महर्षी वाल्मिकी हे अवकाशस्थ ग्रह-तारे, नक्षत्र, आकाशगंगेंतील प्रमुख तारे सूर्यमाला, धूमकेतू, अशनी, राशिचक्र, कुंडली आणि ग्रहगोलांची त्यामधली भ्रमणं, हालचालींबद्दल सखोल अभ्यास असलेले तज्ञ होते, हे त्यांनी, रामायणांतील अनेक प्रमुख घटनांच्यावेळची, ग्रहस्थिती ज्या अचूकपणे नोंदवून ठेवली आहे त्यावरून सिद्ध होतं. अवकाशस्थ, चक्रनेमिक्रमे भ्रमणव्यस्त अस्तित्वांची, एकमेकांच्या संदर्भांतली स्थानांची, हजारो वर्षांमधे क्वचितच पुनरावृत्ती होते..
’प्लॅनेटेरिअम्’ नावाच्या एका संगणक प्रणालीद्वारा, रामायणांतल्या उल्लेखनीय घटनाच्यावेळी महर्षी वाल्मिकींनी नोंदलेली ग्रहस्थिती जर ताडून पाहिली तर त्या घटनांचे, इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे असलेले दिनांक, वार आदि अगदी स्पष्टपणे दृग्गोचर होतांत.
भारतीय, नागरी सेवेंतल्या, पुष्कर भटनागर नावाच्या अधिकारी व्यक्तीनं, ही संगनक प्रणाली, अमेरिकेंतून प्राप्त केली. तिथं या प्रणालीचा उपयोग सूर्य-चंद्रांची ग्रहण, सूर्यमालेंतल्या इतर ग्रहांच पृथ्वीपासून अंतर आणि स्थानांची निश्चिती या गोष्टी जाणून घेण्यासाठी सामान्यत: करतांत. आधी वर्णन केल्याप्रमाणे भटनागर महोदयांनी, प्रणालींत रामायणांतल्या घटनांची ग्रहस्थिती, समाविष्ट केल्याबरोबर त्यांच्यापुढ दिनांक, वार उभे ठाकायला लागले.. अगदी घटना आणि त्यांचा अचूक क्रम ताडून पाहाण्या इतपत..रामजन्मापासून ते १४ वर्ष वनवासोत्तर रावणाशी झालेल्या युद्ध आणि विजयानंतर, आयोध्येंत पुनरागमन राज्याभिषेक वगैरे सर्व घटना अचूक ताडल्या गेल्या.
महर्षी वल्मिकींनी बालकांडांतल्या १९व्या सर्गांत, आठव्या आणि नवव्या श्लोकांत नमूद केल्या प्रमाणे, चैत्र शुद्ध नवमीला, अवकाशस्थ ग्र्ह-नक्षत्रांची स्थिती निम्ननिर्देशाप्रमाणे होती:
सूर्य मेष राशींत, शनी तूळेंत, गुरु कर्केंत, शुक्र मीनेंत, मंगळ मकरेंत, चांद्रमास चैत्रांतलीतली अमावस्योत्तर नवमी, कर्क लग्न (कर्क राशी, पूर्वेला उदितावस्थेंत), चंद्र मिथुन राशींत, पुनर्वसू नक्षत्रांत, दिवसा माध्यान्हीच्या सुमारास...
’प्लॅनेटेरिअम्’ मधे ही सर्व माहिती अंतर्भूत केल्यावर, असं स्पष्टपणे दिसंलं की ही ग्रहस्थिती असलेला दिवस म्हणजे रामजन्माचा दिवस, ख्रिस्तपूर्व १० जानेवारी ५११४ हा होता. म्हणजे आजपासून जवळजवळ ७१२६ वर्षांपूर्वीचा..भारतीय दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रांतल्या शुक्लपक्षांतली नवमी...ज्या दिवशी राष्ट्रांत सर्वदूर ’रामजन्मोत्सव’ साजरा होतो..’रामनवमी’ म्हणून...
युरोप किंवा भारतीय उपखंडांतल्या अनेक..ख्रिस्तपूर्व किंवा ख्रीस्तोत्तर... इतिहास संशोधक, पर्यटकांनी नमूद करून ठेवलेल्या नोंदींप्रमाणे रामजन्म आयोध्येंत झालां हे निर्विवाद सत्य अधोरेखित होत. या लेखक-संशोधकांच्या ग्रंथांत, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, कालिदासांचं’रघुवंशम्’, बुद्ध आणि जैन साहित्याकृतींचा समावेश होतो.
आयोध्येच्या तत्कालीन सुबत्ता, गृहसंकुलं, महाल, प्रार्थना आणि कला मंदिरं, पथ आणि महामार्ग, नगर-रचना यांतली, अधिपत्यांतल्या प्रदेशांत सर्वदूर प्रकर्षानं जाणवणारी सुबकता, प्रसन्न वातावरण आणि समशीतोष्ण हवामान, यांच वर्णन या सर्व ग्रंथ-साहित्यांत ठाइठाई वाचायला मिळतं. शरयू तीरावरच्या आयोध्येच्या अलिकडच्या-पलीकडच्या तीरावर, गंगा आणि पांचाल प्रदेश आणि मिथिलानगरी स्थित होते.
सात सहस्रकं हा सामान्यत:, मानवी जीवनाचा आणि कदाचित राष्ट्रांच्या, भूप्रदेशांच्या आणि उपखंडांच्या आयुष्यांतसुद्धा खूपच प्रदीर्घ कालावधी असतो. या कालावधींत भूपृष्ठाखाली घडणार्या घडामोडींमुळे, भूकंप, अतिवृष्टीमुळं पूर, नद्यांचे बदलणारे प्रवाह, परकीय आक्रमणांतून युद्ध, त्यांतून नरसंहार, नागरी आणि ग्रामीण वस्त्या उध्वस्त होणं, कडेकपारी, दरडी कोसळूनं त्याखाली गादली जाणं, हे वारंवार घडतचं असतं. त्यामुळं, इतिहासाचं अध्ययन, अभ्यास संशोधन आणखीच अवघड होवून बसतं. आयोध्येच्या आसपासच्या नद्यांनी आपले प्रवाह, जवळजवळ तीस-चाळीस किलोमीटर् उत्तर/दक्षिणे कडे सरकल्यामुळं बदलले आहेत, त्यामुळं मूळं नगरीच्या क्षेत्रफळांत बरीच घट झाली आहे. रामाला तर त्याच्या शैशवांतच, म्हनजे वाल्मिकी रामायणातल्या नोंदॆऎप्रमाणे वयाच्या तेराव्या वर्षी आयोध्येपासून दूर जावं लागलं..महर्षी विश्वामित्रांच्या तपोवनस्थित सिद्धाश्रमांत, उपनयनोत्तर ब्रह्मचर्याचरण करीत सर्वंकष शिक्षणासाठी.
त्यानंतर श्रीराम, जनकराजाच्या मिथिला नगरींत दाखल झाले, सीतास्वयंवरांत एक राजपुत्र म्हणून. तिथं त्यांनी शिवधनुष्यभंग करीत सीतेचं पाणिग्रहण केलं आणि आयोध्येला प्रयाण केलं
वाल्मिकी रामायणांतल्या वर्णनाप्रमाणे, इतिहासतज्ञांनी शोधकार्य सुरू थेवून, श्रीरामाच्या या ’प्रवासां’तल्या घटनाक्रमांनुसार जवळपास तेवीस ठिकाणांची खातरजमा करून निश्चिती केली. त्यांतली कांही ठिकाणं अशी:
सृंगी आश्रम, रामघाट,त्राटिकावन, सिद्धाश्रम, गौतमाश्रम, सध्या नेपाळांत असलेलं जनकपुर, सीताकुंड वगैरे..
स्मृतिमंदिरं आणि वंदनस्थळं ही, अद्भुतकार्य करणार्या ’संभवामि युगे युगे’ अशा ’माणसांसाठीच उभारली जातांत...काल्पनिक, ’कुठलाही आधार नसतांना ’कथित’ रचनांद्वारा उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांसाठी नाही.
महर्षी वाल्मिकींनी, आयोध्याकांडांतल्या दुसर्या सर्गांतल्या चार ते अठरा श्लोकांम्धे वर्णन केल्या प्रमाणे, राजा दशरथाच्या कुंडलींतल्या नक्षत्रांना रवि, मंगळ आणि राहू यांनी ग्रासल्यामुळं निर्माण झाल्ल्या परिस्थितीमुळं, जी बहुतेक ’सम्राटा’च्या मृत्यूप्रत प्रवासाची नांदी ठरते किंवा त्याच्या विरुद्ध कटाला चिथावणी देणारी ठरते.. त्यानं श्रीरामाला सिंव्हासनावर बसवून राज्याभिषेकासाठी पाचारण केलं.
राजा दशरथाची रास होती मीन आणि जन्मनक्षत्र, रेवती. वर वर्णन केलेली ग्रहस्थितीच दिवस होता ५ जानेवारी ५०८९, ख्रिस्तपूर्व. याचं दिवशी, मंथरेनं कान भरल्यामुळं आधीच मत्सरग्रस्त असलेल्या कैकयीच्या हट्टापोटी, दिलेल्या वचनपूर्तीसाठी दशरथानं श्रीरामांना १४ वर्षांच्या वनवासासाठी अयोध्येबाहेर धाडलं. म्हणजे श्रीराम तेंव्हा पंचवीस वर्ष वयाचे होते.(५११४-५०८९ ख्रिस्तपूर्व). रामायणांतल्या अनेक श्लोकांत, या उपर्युक्त विधानांच्या पुष्ट्यर्थ पुरावे मिळतांत. वनवासाच्या तेराव्या वर्षाच्या उत्तरार्धांत श्रीरामानं खरदूषणाशी केलेल्या युद्धाचा उल्लेख वाल्मिकी रामायणांत मिळतो. त्या दिवशी अमावस्या होती आणि मंगळ अवकाशमध्यावर होता. ’प्लॅनेटेरिअम्’नं ग्रहस्थितीचे हे संदर्भ मिळतांच, त्या दिवशी, ७ ऑक्टोबर ५०७७ ही तारीख होती’ सूर्यग्रहण होतं आणि ते ’पंचवटी’ (दंडकारण्यांत, नाशिक जवळ) मधून दृश्यमान होत होतं, हे खात्रीपूर्वक ’सांगितलं’
भटनागरजींचे एक सहकारी, डॉ. राम अवतार, यांनी, वाल्मिकीरामायणांतल्या वर्णनाप्रमाणे, श्रीराम वनवासाला निघाल्यापासून म्हणजे आयोध्येपासून, ते रामेश्वरम्, धनुष्कोडीपर्यंतचया, मार्गक्रमणेंतल्या सगळ्या स्थळांबाबतींत संशोधन करण्यासाठी तिथं प्रत्यक्ष जावून माहिती जमा केली. अशा १९५ स्थळांबाबत, जिथं वनवासादरम्यानच्या, श्रीराम आणि सीता यांच्या आयुष्यांतल्या ठळक घटना निगडींत आहेत. उदाहरणार्थ:
तमसा तल(मंदाह), श्रिगवेपुर(शिगरूर), भारद्वाज आश्रम(अलाहाबाद जवळ), अत्री आश्रम, मार्कंडेय आश्रम, (मारकुंड),चित्रकूट, रामकुटी(गोदावरी तीरी), पंचवटी,सीतासरोवर, रामकुंड(नाशिक जवळील त्र्यंबकेश्वरमधे), शबरी आश्रम, किष्किंधा(अन्नागोराई नावाचं ग्राम) आणि अर्थांत धनुष्कोडी आणि रामेश्वर मंदिर. वाल्मिकीसांगतांत की श्रीरामसेनेनं रामेश्वरम् ते लंका सागरसेतू बांधला आणि त्या सेतूवरून, उसळणार्या जलधीला वेंघत(पाल्कची सामुद्रधुनी) श्रीरामसेनेनं, युद्धांत, कुंभकर्णादि बलाढ्य सेनापतींसह प्रत्यक्ष रावणाचा पराजय करून सीतेला अशोकवनांतून मुक्त करून आयोध्येला परत आणलं. आता, सागराच्या पृष्ठभागाखाली अजून अस्तित्व राखून असलेल्या या सेतूची उपग्रहावरून घेतलेली छायाचित्र, संगणकाच्या महाजालावर उपलब्ध करून दिली आहेत...कांही शंकेखोरांचे दात घशांत घालण्यासाठी...
सीतेला दैत्यांच्या पाहार्यांत, ख्रिस्तपूर्व ५०७६ मधे, जिथं ठेवलं होतं ती सीता वाटिका,अशोकवन’ देशांतल एक प्रमुख पर्य्टनस्थळ म्हणून विकसित करायचं नुकतचं, श्रीलंकेच्या शासनानं, निश्चित केलं आहे.
श्रीराम हे सूर्यवंशांत जन्मले होते. ते या वंशाचे चौसस्ठावे नृपति होते. त्या आधीच्या त्रेसस्ठ नृपतींच्या नावांसह उल्लेख, ’आयोध्या का इतिहास’, या जवळपास नव्वद वर्षांपूर्वी राय बहादुर सीताराम यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आढळतो. लुइसिआना विद्यापीठांतल्या प्राध्यापक सुभाष काक यांनी लिहिलेल्या, The Astronomical Code
of the Rig Veda, या ग्रंथांतसुद्धा श्रीरामांच्या त्रेसस्ठ पूर्वजांचा, ज्यांनी आयोध्येवर राज्य केलं.. नामनिर्देशासह उल्लेख सापडतो. त्यांतली कांही ठळक नावं:
राजा दशरथ, त्या आधी अज, रघु, दिलिप वगैरे..
असेतु-हिमाचल, भारतवर्षांतली अबाल-वृद्ध जनता, विशेषत: हिमाचल, राजस्थान आणि मध्यप्रदेशांतली आदिवासी,जनजाती.. श्रीरामांच्या ’असण्या’बद्दल आणि ती केवळ ’पुराणांतली वांगी’ नाहीत याबद्दल पूर्णपणे नि:शंक आहेत. या आदिवासींमधले बहुतेक उत्सव, सण समारंभ श्रीराम-सीता आणि श्रीकृष्ण यांच्या आयुष्यांतल्या घटनांशी निगडीत असतांत. हे सगळे प्रसंग आणि घटनास्थळ म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ठेव्यांतला एक महत्वाचा घटक अ होता, आहे आणि भविष्यांत असेल.
रामायण काल हा प्रेषित मोहंमद किंवा जीझस् ख्र्रिस्ट् यांच्या जन्माच्या किंवा इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी, हे धर्म या जगांत अस्तित्वांत येण्याच्या बराच आधीचा होता.
हिंदू, म्हणजे हिंदु-स्थान चे रहिवासी आणि इंडियनस् म्हनजे इंडियाचे रहिवासी हे दोन समान अर्थी शब्द आहेत . इंडियाची ओळख भारत...ज्ञानियांचा प्रदेश,,, आणि आर्यावर्त...जिथं आर्यांची वस्ती आहे, आणि हिंदुस्थान (’इंडस्’ या शब्दावरून व्युत्पत्ती) अशीही जगांत आहे.
रामराज्यांत जन्मावरून जातपात ठरविण्याची पद्धतच नव्हती. महर्शी वाल्मिकी जन्मान जरी वाटमारी करणारे आदिवासी होते तरी सीतेनं, लंकादहनानंतर अग्निपरीक्षा दिल्यावरही, केवळ एका परिटानं तिच्या पावित्र्याबद्दल शंका व्यक्त केलेली ऐकून, श्रीरामांनी दिलेल्या आज्ञेवरून आयोध्येचा त्याग केल्यानंतर आश्रय घेतला तो महर्षी वाल्मिकींच्या आश्रमांतच, आणि लव-कुशही तिथंच सैशवांतून बाल्यांत आणि तारुण्यांत आले.
महर्षी वाल्मिकींच...पहिल्या भारतीय अवकाशवेत्त्यांचं...अवकाशविज्ञानाचं आणि ग्र्ह-नक्षत्र-तार्यांच्या भ्रमण आणि आवर्तनांच्या गणिती नियमिततेचं ज्ञान आणि भान हे इतक अचूक आणि स्पृहणीय होतं की प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटावा. हे ज्ञान आजच्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व कसोट्यांमधे यशस्वी ठरत आहे. नवीन संगणक प्रणालीनं सुद्धा याला दुजोरा देत वाखाणणीच केली आहे.
ज्या प्रमाणे शबरी ही एक आदिवासी स्त्री होती त्याच प्रमाणे, रावणाचा पराजय करणारं श्रीरामाचं सैन्यदळ हे मध्य आणि दक्षिण भारताच्या विविध प्रदेशांतल्या आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींनी परिपूर्ण होतं. रामायणांतील प्रमुख घटना आणि बारीकबारीक संदर्भ हे प्रत्येक भारतीयाचा म्हणजे जनजाती-जमाती, मुस्लिम, ख्रिश्चनधर्मीय यांचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा आहे.
इस्लाम धर्मसंस्थापक, प्रेषित मोहमदाचा जन्म १४०० वर्षांपूर्वीचा तर ख्रिश्चन धर्मप्रमुख संस्थापक, जीझस् ख्राइस्ट्चा जन्म २००० पेक्षा कांही अधिक वर्ष पूर्वीचा, गौतमबुद्धाचा जन्म २६०० वर्षांपूर्वीचा...आणि श्रीरामाचा तब्बल ७००० वर्षांपूर्वीचा. त्यामुळं पृथ्वितलावरच्या, भूकंप, पूर, नद्यांचे बदललेले प्रवाह, दिशा आणि इतकच नाही तर परकीय आक्रमणांमुळं भौतिक, भौगोलिक हानी आदि विविध कारणांनी झालेल्या घडामोडीमधून, श्रीरामाच्या जीवनांतल्या घटनांच, रामायणकालाचं संशोधन करण हे अर्थातच सर्वांत जिकिरीचं’ पण त्यामुळ खचून न जाता आपण आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा शोध घेण, तरीही अव्याहतपणे सुरूच ठेवणार आहोत ना ?
त्यामुळं भारतीय म्हणून आपल्याला आपल्या पुरातन जवळपास दहा हजार वर्षांचा इतिहस असलेल्या, नागरी संस्कृती, समाजरचना, प्रागतिक आणि नवनव्या संकल्पनांच स्वागत करणारी मानसिकता यांचा रास्त अभिमान बाळगायला हवा, आणि ख्रिस्तपूर्व १५०० वर्ष, आर्यांनी भारतीय उपखंडावर आक्रमण केलं होतं ही दिशाभूल करणार्या सिद्धांताचं खंडन करायला हवं.
ज्या मॅक्स्मुल्लर्नं हा सिद्धांत प्रथम मांडला, त्यानच नंतर तो नाकारलाही, हे सर्वश्रुत आहे.
पारतंत्र्यांत असतांना आपण सगळे मेकॉलेप्रेरित आणि मान्यताप्राप्त शिक्षणप्रणालीनुसार ’विद्याभ्यास’ (आभास ?) केला.. ’प्रत्येक भारतीय हा निम्नदर्जाचा मानव असून त्याच ’साहित्य’ म्हणजे इंग्लंड्मधलं एक फडताळ भरून पुस्तकं...ग्रंथ तर सोडाच..सुद्धा नसतील’ अशी हेटालणीवजा समजूत मनांत रुजविणं हा त्या शिक्षण प्रणालीचा मुख्य उद्देश होता.
त्यांतून एखाद्या भारतीय माणसांत विशेष चमक दिसल्याबरोबर, ’हा, इंग्लंड्मधून आक्रमण करून, इथं स्थाईक झालेल्या आर्य वंशाच्या कुटुंबातलाच असला पाहिजे..’ अशी बतावणी करायलाही तत्कालीन ’गोरे’ मागेपुढे पाहात नसत.
कुणीही या, मानहानीकारक सिद्धांताच्या पाठचं असत्य खॊडून, सत्यशोधनार्थ कृतिप्रवण झालं नाही त्या काळी...म्हणून आतां वेळ आली आहे की सर्व भारतीयसंस्कृतिसंवर्धक, संशोधक, विचारवंत, ज्ञानी, बुद्धिवादी आ सगळ्यांनी आतापर्यंत डोळ्यावर ओढून घेतलेली झापड दूर करून सत्याला सामोरं जावून ते विश्वाला ठणकावून सांगण्याची, आणि, ’ही तर भाकड पुराण कथा...’ म्हणून अवहेलना करणार्यांचे डोळे आणि कान उघडण्याची !
एकत्र येवूया, उपल्ब्ध पुरावे कागदपत्र, माहिती यांचा सूक्ष्म अभ्यास, विश्लेषण करूया, ज्या योगे आपण पुरातन समृद्ध भारतीय जीवनशैली, आणि समाजव्यवस्था यांच्यावर आनखी प्रकाश टाकू शकूं...मुद्रित आणि आधुनिक संवेदनेशील माध्यमांनी या सगळ्याची दखल घ्यायला हवी आणि वातावरणनिर्मिती करायला, आणि सुशिक्षित अबालवृद्ध जनमानसाला ही माहिती समजावून घेवून पचनी पाडायला साहाय्यभूत व्हायला हवं...त्यांतून उद्या कदाचित आणखी पुरातत्व संशोधक हे काम पुढं न्यायला तयार होतील, आणखी निर्भयपणे सारे निष्कर्ष अभिमानानं विश्वभरांत पोचवतील...
******
अरुण काकतकर
24ak47@gmail.com
www.target point.blank.blogger.arun kakatkar
Saturday, June 2, 2012
एक सत्यकथा..चक्रावून टाकणारी.
एक सत्यकथा..चक्रावून टाकणारी.
ज्यांनी, न्यायासनानं निर्वाचित केलेल्या न्यायमंडळाचे सदस्य म्हणून कधी एखाद्या दाव्याचं काम, न्यायप्रदानांत साहाय्यभूत होणेहेतू, बघितलं असेल, त्यांनाही...सर्व साक्षी-जवाब नोंदवून झाल्यावर आणि ते लक्षपूर्वक ऐकल्यावरही...विचार करायला प्रवृत्त करेल असी ही एक सत्यकथा !
तुम्हाला रहस्यमय हत्या, खून वगैरे गोष्टी ऐकाय-वाचायला आवडतांत ? प्रष्ण तसा निरर्थक, कारण सर्वसामान्यपणे असं कांही उत्कंठावर्धक वाचाय-बघायला कुणाही वाचक-प्रेक्षकाला आवडेलंच ना ? अगदी कायदा-सुरक्षा आणि न्यायदंड विभागाला सुद्धा डोकेदुखी ठरेल असं कांहीतरी घडलय या घटनॆंत..अगदी वेगळीच कलाटणी देणारं कांहीतरी...
१९९४च्या, न्यायवैद्यकशाश्त्र परिषदेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभांत, अध्यक्षहोदयांनी ही, एका ’मृत्यू’ची(...खून ?..)आवाक्करून, विचार करायला लावून मेंदूचा भुगा करायला लावणारी.. ’कथा’ सांगितली...उपस्थित श्रोत्यांना सुन्न करणारी...
तर ही ती घटना...२३ मार्च १९९४ रोजी वैद्यकीय अधिकार्यानं, रोनाल्ड् ओपस्च्या मृतदेहाची तपासणी केली. त्यानं निष्कर्ष काधला की रोनाल्ड्ला मरण आलं ते एका बंदुकींतून सुटलेल्या आणि डोक्याच्या कवटींतून आरपार गेलेल्या गोळी मुळं. रोनाल्ड्नं, आत्महत्या करण्याच्या उद्देशानं, एका दहा मजली इमारतीच्या गच्चीवरून खाली झेप घेतली होती.. त्याच्या उद्देशाच्या पुष्ट्यार्थ त्यानं त्याच्या खिशांत एक चिठी स्वतंच्या खिशांत ठेवली होती..असो
पण, तुम्ही लाख ठरवाल हो, तस होईलचं याची खात्री तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी देवू शकतांत कां ? तर झालं असं की उडीमारल्यावर, दहापैकी नवव्यामजल्यासमोर रोनाल्डचा, मृत्युप्राप्ति-इच्छुक देह आला आणि त्या मजल्यावरच्या एका घराच्या खिडकींतून, कांच फोडत, सणाणत आलेली बंदुकीची गोळी त्याच्या मेंदूंतून आप्रपार गेली आणि त्याला अक्षरश: क्षणार्धांत, यमसदनाप्रत’ धाडती झाली ! दिवदुर्विलास म्हणावा की दु:खांतली समाधानाची (कसलं कर्माचं समाधान ?) बाब म्हणावी, पण ना रोनाल्ड्ला किंवा ना, ज्याच्या बंदुकींतून गोळी सुटली होती त्याला माहीत होतं, की त्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर कांही दुरुस्तीचं कामचालू असल्यामुळं जरा खाली एक जाळी पक्की बसवली होती त्या दिवशी...कामगार पडुन होणारी संभाव्य दुर्घतना टालण्यासाठी ! त्या जाळींनं, रोनाल्ड्चं आत्महत्येचं (सु?) नियोजित स्वप्न पार धुळीस मिळवलं असतं कदाचित..
नवव्या मजल्यावर्च्या ज्या घरांतून, ती’ जीवघेणी’ गोळी सुटली होती तिथं एक जरा पोक्त, प्रौढ जोडपं राहात होतं. कांही कारणावरून त्यांच्यांत त्या दिवशी सकाळपासूनच केरबुर सुरू झाली होती आणि वाद वाढतावाढता त्याच पर्यवसान, निरर्गल भाषा, शिव्याशाप देत, एकमेकांच्या कुळांचा उद्धार करीत कडाक्याच्या भांडणांत होत होतं.शेवटी’क्रोधात् भवतिसंमोहा्त् । संमोहात् स्मृतिविभ्रम॥ स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो । बुद्धिनाशात् प्रणश्यती ॥ या चतु:सूत्रीप्रमान, पुरुषीअहंगंडानं पछाडलेल्या ’नरा’(धमा ?)नं आपली बंदूक स्वभार्येवर रोखून, तिच्यासकट भांडणाला संपविण्याच्या हेतून, चाप ओढला आणि...
गोळी सुटली पण गृहस्थाचा नेमचुकून, ती इच्छित लक्षाला..पत्नीला.. न लागता खिडकीचं तावदान फोडून, बाहेर ’पडू’ घातलेल्या, रोनाल्डो नामक, आधीचं निराशेने ग्रस्त होवून मृत्यूप्रत प्रवासास निघालेल्या रोनाल्डोच्या मस्तकाला भेदून मेंदू छिन्नविछिन्न करीत पार झाली.
आता, एखाद्यानं खून करण्याच्या हेतून झाडलेली गोळी इच्छित लक्षा ऐवजी तिसर्य़ांच व्यक्तीला लागून तो ’परलोकवासी’ झाला तर अर्थातच त्या तिसर्या व्यक्तीच्या खुना बद्दल, गोळी झाडणारा खुनी ठरतोचं, नाही कां ? त्या नवव्या मजल्यावरील गृहस्थावर जेंव्हा सदोष महुष्यवधाचा आरोप ठेवण्यांत आला, तेंव्हा गृहस्थानं, आपल्या पत्नीसह...जिचा तो खून करणार होता खरं म्हणजे..आरोपाचा निषेध करू लागला. बचावात्मक पवित्र्यांतल्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्या बंदुकींत गोळ्या भरलेल्या आहेत याची दोघांनाही कल्पना नव्हती. आणि पत्नीनही पुष्ट्यार्थ विधान केलं की, ’अहो ! यांची ही फार पूर्वीपासूनची सवय आहे. कांही छोट्सं भाण्दन झालं, की हे माझ्यावर बंदूक रोखून,"’घालू कां गोळी ?" असं धमकावतांत...त्यांना स्वत:ला आणि मलाही तो बार ’फुसका’ आहे हे ठाऊक असतं !’ गृहस्थ पण परोपरीनं, त्याचा खून वगैरे करण्याचा अजिबात हेतू नव्हता हे सांगत होता. ह्या सगळ्या ’वायफळ’ स्पष्टिकरण, बचावानंतर, अर्थातच, बंदूकींत ’अनवधानानं’ राहिलेली गोळी, अगदी अहेतू सुटली असं गृहित धरल्यावर, रोनाल्डोचा मृत्यू हा एक अपघात मानला गेला.
काय गंमत आहे पाहा, ’दैव देतं, पन कर्म नेतं’ हा वाक्प्रचार, या घटनेच्या बाबतींत कसा चमत्कारिक रितीनं खरा ठरत होता. उडी मारल्यानंतर, आठव्या मजल्यावरच्या ’संरक्षक’ जाळीनं, रोनाल्ड्ला वाचवलं असतं कदाचित, पण यमदूताचा फास बंदुकीच्या गोळीरूपानं त्याच्या गळ्या भोवती आवळला गेला होता.
या खटल्यातल्या या अतर्क्य घटनेच्या मुळाशी जायचा जेंव्हा, बचावपक्षाच्या वकिलानं प्रयत्न केला तेंव्हा त्याला आणखी एक धागा, जोडप्याच्या बचावासाठी मिळाला.. कोण्या एका व्यक्तीनं, घटना घडली त्या दिवसाच्या सहा महिने आधी, त्या पति-पत्नीच्या चिरंजीवांना, त्या बंदुकींत गोळ्या भरतांना म्हणे बघीतलं होतं ! आणि Lo and behold !!..
आईनं चिरंजीवांना दरमहिन्याला मिळणार्या ’खर्ची’च्य रकमेमधे भारी प्रमाणवर्कपात करायला सुरुवात केली होती त्याचा राग चिरंजीवांच्या मनांत होता. त्याला आपले पिताश्री, घरगुती भांडणानंतर, दरवेळी आईला बंदूक रोखून धनकावतांत हे ही पक्क माहीत होतं, त्यानुळ आईचा सूड, परस्पर वडिलांच्याहस्ते घेण्यासाठी, महाशयांनी, ’कधीतरी तें बंदूक रोखतीलचं..’ या खात्रीनं, बंदुकींत गोळ्या भरून ठेवल्या होत्या. काय(दुष्ट)शक्कल होती !.
पण परिणामत:, चिरंजीव हे खुनी ठरत होते रोनाल्ड्चे.. जरी त्यांनी स्वत: बंदुकीचा चाप ओढला नव्हता तरी..
पुढे आणखी तपासासाठी शोधयंत्रणा आणखी खोलांत शिरली..
आणि एक अतर्क्य वळण मिळालं या’चित्तरकथे’ला..
त्या चिरंजीवांचं नांव होत..रोनाल्ड्..मृत्युमुखी पडलेला दुर्दैवी(?) जीव. आईला मारण्याच्या प्रयत्नांना येणार्या अपयशामधून आलेल्या नैराश्येच्यापोटी, ’आपण स्वत:चं जीव देवून, हा सगळा छळ संपवुया !..’ असा (अ)विचार करून त्यानं दहाव्या मजल्यावरच्या सौधवरून मृत्यूप्रत उडी घेतली होती..आणि योगायोगानं काय घडलं हितं ? तुम्ही जाणतांच !
रोनाल्ड६६तर आता या जगांत नव्हता. त्यानं स्वत:चा खून केला होता. त्यामुळं, न्यायासनानं, आत्महत्या’ म्हणून खटला बंद केला..
अखेरीस !
Tuesday, May 29, 2012
दोन कथा...दोन तात्पर्य...
दोन कथा...दोन तात्पर्य...
’चार गोष्टी..न परतणार्या’
एक सधन स्त्री, एका विमानतळावरच्या प्रतीक्षालयांत, आपल्याला घेवून जाणार्या विमानाची वाट पाहात होती. कदाचित बराच वेळ प्रतीक्षा करावी लागेल या विचारानं तिन, दरम्यानच्या मनोरंजनासाठी, वृत्तपत्र-विक्रेत्याकडून कांही नियतकालिकांची खरेदी केली, आणि संभाव्य ’क्षुधाशमनार्थ’ कांही खाद्यपदार्थांचीही बेगमी केली.
बाईसाहेब, खरिदलेल्या वस्तूंसह, परत प्रतीक्षागृहांत दाखल झाल्या आणि आपल्या आरामदायी आसनाचं अधिग्रहण कर्त्या झाल्या. कांही कालावधीनंतर, त्यांच्या शेजा्रच्या आसनावर एक गृहस्थ येवून बसला आणि हातांतलं नियतकालिक चाळू लागला.
बाईसाहेबांनी, नियतकालिकांतला एक लेख वाचायला सुरुवात केली आणि बरोबरच्या खाद्यपदार्थातलां एक तोडात टाकला. गृहस्थानंसुद्धा बाईसाहेबांच्या कृतीची अगदी नकळत पुनरावृत्ती केली आणि खाद्यपदार्थातला एक घेवून तो चघळू लगला.
बाईसाहेबांच्या हे लक्षांत आल्यावर त्यांच्या कपाळाला एक आठी पडली...पण, ’जाऊ दे ! अनवधानानं झालं असेल कदाचित..’ या विचारानं त्यांनी दुर्लक्ष केलं, आणि आणखी एक ’घास’ उचलला आणि ग्रहण केला. थोड्या वेळानं, गृहस्थानं, एखादी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी तसं, खाद्यक्रिया सुरू ठेवली आणखी एक घास उचलून, खायला सुरुवात केली.
गृहस्थाच्या प्रत्येक कृतीबरोबर, बाईसाहेबांचा पारा चढतच होता, पण मन धास्तावलं होतं, ’उगाच वादावादी वाढेल’ म्हणून त्यां जरी, मूग गिळून गप्प होत्या, तरी संतापापोटी उद्भवलेल्या बेचैनीमुळं, मनोमनी गृहस्थाला शिव्याशापांची लखोली वाहतच होत्या, ’ऐत्या बि्ळावर नागोबा, मेला !’ वगैरे, वगैरे..
करतां करतां, वाचनांत मग्न दोनीही सहप्रवाशांपैकी गृहस्थाच्या लक्षांत आलं की खाद्यपदार्थाचा एकच तुकडा उरला आहे आंता. त्यानं त्याचे दोन समान भगकेले आणि त्यापैकी एक शिल्लकठेवून दुसरा खाऊन टाकला. ’आता मात्र हद्द झाली याच्या निर्लज्जपणाची’ असं म्हणत बाईसाहेब तिरिमिरीनं उठल्या. आपलं सामान बरोबर घेवून संतापदग्धावस्थेंत त्यांनी आपल्या नियोजित ठिकाणी ताडताड निर्गमन करत्या झाल्या.
इच्छित स्थळी पोहोयच्या आधी, प्रसाधनगृहांत जाऊन त्यांनी, झाल्या प्रसंगातल्या, त्या गृहस्थाच्या गर्हणीय वागणुकीच्या क्रोधानं, कपाळावर, कानशीलावर, नाकाच्या टोकावर, जमलेले घर्मबिंदू टिपण्यासाठी, ’पर्स्’ उघडली आणि...
बाईसाहेबांचा चेहेरा त्यांनाच समोरच्या आरशांत बघवेना.. इतका उतरला होता..क्रोधाचे, नाराजीचे, कांहीही न करता आल्याच्या घुसमटीचे सगळे रंग उतरले होते एका क्षणांत...कारण त्यांनी खरीदलेले खाद्यपदार्थ त्यांच्याच पर्स्मधे नीट अवगुठितावस्थेंत, सुखरूप होते. त्यांनी वाचनादरम्यानं उपभोग घेतला होता तो त्या गृहस्थानं खरेदी केलेल्या पदार्थांचा...ज्याच्यावरच्या रागानं, गेला जवळजवळ तासभर त्या धुमसत होत्या..बाईसाहेबांनी खजिल मनानं, त्या गृहस्ठांना, त्याच जागी शोधण्याचा प्रयत्न केला...पण तो गृहस्ठ पण मार्गस्थ झाला होता तोपर्यंत...एका वेगळ्या समाधनानं. जवळच्या वस्तूला भागीदार मिळाल्याच्या समाधानानं
पण आता कांहीही होवू शकत नव्हतं...दोघांचे मार्ग भिन्न झाले होते. परत कधी भेट होईल याची श्यक्यता पुसटशीही नव्हती.. हातांत होता फक्त पश्चात्ताप...आणि मनांत आयुष्यभर कुरतडून खाणारी खंत...
’अशी पांखरे येती,
आणिक स्मृती ठेवुनी जाती..
दोन दिसांची (दोन घडीची..म्हणूया हवंतर..या गोष्टीच्या संदर्भांत ) रंगत संगत,
दोन क्षणांची नाती !!’
या गीता प्रमाणे किंवा
’माडगुळकरांच्याच गीत रामायणांतल्या, ’पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या, भरत भेटीच्यावेळी, ’परत चला दादा, परत सिव्हासनाचं अधिग्रहण करून राज्यशकटाचं नियंत्रण हाती घ्या..’ अशी कळकळीची विनंती करणार्या परमप्रिय बंधूच आणि आयोध्येच्या जनतेचं सांत्वन करीत समजूत घालणार्या श्रीरामाच्या तोंडी, आयुष्याचं क्षणभंगूरत्व, हृद्य शब्दांत मांडून अजरामर केलेल्या गीतांतील ओळीप्रमाणॆ..
’दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाहि गांठ’
तर कथेचं
तात्पर्य:
चार गोष्टी या जगांत अशा आहेत की त्या निसटल्या की परत ’हांसिल’ माही होवू शकत..
एक : फेकलेला दगड
दोन: उच्चारलेला शब्द
तीन: नुकसानीला कारणीभूत झालेला, घडलेला प्रसंग आणि,
चार: सरलेली वेळ !!
*****
एका केशकर्तकाच्या आयुष्यांतला एक दिवस...
एक दिवस एक फुलंविक्रेता केशकर्तनालयामधे आला, या नापित महोदयांच्या..केशकर्तनाची क्रिया पूर्ण झाल्यावर, सहाजीकच त्यानं सरसावत, खिशांत हात घालत, ’किती झाले ?’ असा स्वाभाविक प्रष्ण विचारला. नापित महोदय, आपले हात मागे घेत आणि मागे सरत उद्गारले, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’ चेहेर्यावर आश्चर्य आणंत, पण मनांत, सुखावत, फूल-विक्रेत्यानं, खिशांतला हात तसाच ठेवला.
दुसर्या दिवशी आपलं दुकान उघदायला गेल्यावर नापिताला दाराशी एक पुष्पगुच्छ आणि एक आभार-पत्र ठेवलेलं मिळालं आणि त्याच्याही चेहेर्यावर मंदस्मित झळकलं
नंतर कांही वेळानं एक पोलिसदादा केशसंभार कर्तनार्थ दाखल झाले दुकानांत. परत सगळा प्रसंग, जो आदल्या दिवशी घडला होता त्याची पुनरावृत्ती झाली म्हणजे पोलिसदादानं पैसे काढणं, नापितानं ते नम्रतापूर्वक नाकारत, त्याचं कारण सांगणं वगैरे वगैरे.
पुढल्या दिवशी परत आदल्या दिवशी सारखीच फुलं दाराशी..फक्त एक बदल म्हणजे आज आभार-पत्राबरोबरी एक ताज्या बटाटावड्यांचा पुडाही होता.
त्या दिवशी मग एक ’खासदार’..चक्क..आले डोकं भादर्ण्यासाठी केशकर्तनालयांत..कर्तनोत्तर परत, ’नाई नाई मला कांही मोबदला नकोय, कारण मी हा आठवडा ’समाजसेवा-सप्ताह’ म्हणून व्यतीत करणार आहे ! ठेवा तुमचे पैसे तुमच्याच खिशांत परत...’. सुरू झालं नापिताचं पालुपद...’खासदार’ महोदय तत्परतेनं पैसे परत खिशांत कोंबत, शिळेवर एक त्यांच आवडत चित्रपटगीत वाजवत, टणाटण निघाले परतीच्या वाटेनं.
चौथ्या दिवशी सकाळी, सत्कारणार्थ आपल्या ’कर्मभूमी’कडे निघालेल्या नापिताला, लांबूनच दिसलेलं दृश्य बघून तो बुचकळ्यांत पडला...जवळ गेला तो काय ! अहो आश्चर्यम्..
दुकानाबाहेर एक डझनभर खासदार उभे होते ’नापित कधी एकदा येतो आणि दरवाज्याच्या फळ्या उघडतो’ याची वाट पाहात.
तात्पर्य:
मित्रांनो ! हाच तर फरक आहे, सर्चसामान्य भारतीय नागरिक आणि
जनतेला, ’मुकी बिचारी, कुणिही हांका !’ म्हणत आणि त्यांच्या (मतपेटींत खोट्या आश्वासनांनी हुरळून मतं टाकणार्या) भोळसटपणाला हसंत त्यांना ’हाकणार्या..भारतीय राजकारण्यांमधला !!
आणि म्हणून शासनकर्ता राजकीय पक्ष, बालकांच्या वारंवार बदलाव्यालागणार्या ’दुपट्या-लंगोटां’प्रमाणेच बदलून, अंगी परिवर्तनवाद बाणवायला पाहिजे आंता आपल्याला...
अरुण काकतकर
24ak47@gmail.com
www.target point blank.blogger.arun kakatkar
Monday, May 28, 2012
’१२७ तासांची एक विलक्षण झुंज’
’१२७ तासांची एक विलक्षण झुंज’
’काय करणार ? दगडाखाली हात अडकलायना आमचा ? तो सुटेपर्यंत नाइलाजा आहे’ अशाप्रकारच विधानं आपण स्वत: करीत असतो किंवा कुणा आप्त-स्वकीय किंवा मित्रमंडळींकडून ऐकत असतो. पण ही ’हताशा’ कांही माणसांना शरण जाते कारण त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाच्या आणि धडाडीच्या आक्रमकतेला, ’कार्यकक्षा’ वगैरे नसतांत.
’अनंत अमुची ध्येयासक्ती’ या काव्योक्तीचं, ही मंडळी मूर्तिमंत उदाहरण असतांत...
तुम्ही एक कादंबरी वाचली आहे ? इंग्रजी.. ? कादंबरीच नांव 'Alive..'. विषय: युरोपांतल्या पर्वतराजींत एका हिमाच्छादित शिखरावर, अपघातानं कोसळलेल्या एका विमानांतल्या, जवळजवळ ’चमत्कार’ वाटावा अशा पद्धतीनं वाचलेल्या कांही प्रवाशांची गोष्ट ! निसर्गाच्या ’उलट्या काळजा’शी स्पर्धा करीत त्यांतल्या दोन चिवट वीरांना, तब्बल २७ दिवस नियोजन आणि खडतर प्रवास केल्यानंतर, जित्याजागत्या ’माणसां’च्या प्रदेश दृष्टिपथांत आला...आणि मग सगळ सुरळीतं झालं...त्याची गोष्ट...वास्तवाच्या ’हिमाच्छादित ’विस्तवां’त होरपेळलेली...
असंच आणखी एक वास्तव...एक जिद्द, ’दुर्दम्य’.
राल्स्टन्चा जन्म, २७ ऑक्टोबर १९७५ रोजी, इंडियानापोलिस्मधे, डोन्ना आणि लॅरी, या जोडप्याच्या पोटी झाला पण त्याच्या कुटुंबानं, त्याच्या ११ व्या वर्षी डेन्व्हर्ला स्थलांतर केलं. शालेल शिक्षण कोलोरॅडो राज्यांतल्या, ग्रीनवुड् नावांच्या एका खेड्यांतल्या, चेरी क्रीक् हाय्स्कूल् मधे झाल्यावर त्यानं, पिट्स्बॉरोतल्या कामेजी मेलॉन् विद्यापीठांतून, यंत्र अभियांत्रिकी, फ्रेंच् हे मुख्य विषय आणि ’पियानो-वादन’ हा आवडीचा, अशा विषयांमध्ये पदवी प्राप्त केली.
विद्यापीठांत त्यानं ’निवासी सहायक’ म्हणूनही काम केलं. परदेशांतही शिक्षण घेतलं आणि, तो एक स्वयंस्फूर्त खेळाडूही झाला पुढं. अॅरिझोना राज्यांतल्या फिनिक्स् मधल्या ’इंटेल्’ कंपनीतल्या छानशा नोकरीचा या महाभागानं २००२मधे राजिनामा दिला.. कां ? तर गिर्यारोहणाचा त्याचा ’जन्मजात’ ध्यास त्याला कांही केल्या स्वस्थ बसूं देत नव्हता..कोलॅरॉडोमधले सगळे दुर्गम कडे त्याला सर करायचे होते..१४,००० फुटांपेक्षाही अधिक उंचावरचे...जवळजवळ ५३ की ५४ कडे होते असे..हे धाडस सुद्धा त्याला ऐन हिवाळ्यांत करायचं होतं...एकट्यानं..जे त्या आधी कुणीही स्वप्नांतसुद्धा आणलं नव्हतं. पण या पठ्ठ्यानं, आपलं ते स्वप्न प्रत्यक्षांत आणलंच एके दिवशी !
ऑगस्ट २००९ मधे राल्स्टन्नं, जेसिका ट्रस्टी नांवाच्या युवतीशी विवाह केला आणि या दांपत्याला, फेब्रूअरी २०१० मधे एक छानसा छकुला मिळाला जेसिका कडून. त्याचं नांव ठेवल राल्स्टन्नं, लिओ...लिओ राल्स्टन्. सध्या हे कुटुंब, कोलोरॅडोमधल्या बोल्डर् या गावांत वास्तव्य करतय !
आता कहाणी राल्स्टनं दैवाशी केलेल्या...त्याच्यावर गुदरलेल्या संकटाशी केलेल्या दोन हातांची.
२००३ मधे म्हणजे लग्ना आधी जवळजवळ सहा वर्षं, २६ एप्रिल ला, उटाह् मधल्या पूर्व वायनी काउंटीत, हॉर्स् शू कडेकपारींत, म्हणजे कॅनियन् नॅशनल् पार्क्च्याच एका भागांत राल्स्टन् नेहमीप्रमाणे गिरिभ्रमण करीत होता. परतीच्यावाटेवर एका घळींतून खाली येतांना, एक लोंबकल्ळणारी, तोल हरवलेली महाकाय शीळा वेगानं खाली आली आणि राल्स्टन्च्या हातावर पडून त्याचा उजवा तळवा आणि मनगटापर्यंतचा हात अडकला, आणि कपारीची भिंत आणि ती शीळा यामधे चिरडला गेला...राल्स्टन्नं आपल्या या गिरिभ्रमणाची कोणालाच कल्पना दिलेली नव्हती त्यामुळं, त्याचा शोध घेत कोणी येईल याची श्यक्यतांच नव्हती.
’आपण आतां कांही वाचत नाही या ’शीला-पातां’तून.. आता फक्त मरणाची वाट पाहायची..’ असे नैराश्यजनक विचार मनांत घोळवत, राल्स्टन्नं, तब्बल पांच दिवस, हात दगडाखालून सोडविण्याचा प्रयत्न करीत, जवळच्या पाण्याचे...३५० मि.लि. म्हणजे, छोटी शीतपेयाची बाटली असते नां ? तेवढे.. अगदी छोटे घोट घेत, त्याच अवस्थेंत काढले.प्रयत्न व्यर्थ ठरत होते कारण शीळेचं वजन होतं, जवळपास ३६० किलोग्रॅम्..तीन दिवसांच्या, अथक प्रयत्नांनतर, तहानेनं व्याकूल आणि अर्धमेला झालेल्या राल्स्टन्नं, स्वतंचा दगडा खाली अडकलेला हात, सुटका करून घेण्यासाठी, तळहात आणि कोपर यामधे, स्वत:च तोडायचा ठरवलं..गिर्यारोहणाच्या कांही टोकदार हत्यारांच्या साहाय्यानं, राल्स्टन्नं, सुरुवातीला कांही ’ओरखडे’वजा जखमा करून बघितल्या..वेदनांचा अंदाज घेण्यासाठी. चौथ्या दिवशी त्याच्या लक्षांत आलं की सुटका करून घ्यायची असेल तर नुसतं मांसच नाही तर हाताच हाडसुद्धा ’तोडणं’ आवश्यक आहे. आणि, त्याच्याकडे उपलब्ध असलेली हत्यारं या कामासाठी सक्षम नव्हती, हे ही त्याला ठाऊक होतं..
पांचव्या दिवशी, जवळच पाण्याचा शेवटचा थेंब जेमतेम शिल्लक राहिक्याचं त्याच्या लक्षांत आलं आनि त्यानं त्याच्या ’महाप्रयाणाची’ तयारी सुरु केली. समोरच्या दगडावर स्वत:च नांव आणि संभाव्य ’मृत्यु-दिनांक’, वेळ आदि माहिती कोरली..स्वत:च्या चलत्ध्वनिसंचावर, कुटुंबियांसाठी ’शेवटचा संदेश’ चित्रमुद्रित केला..त्या रात्री ’आपण मरणार’ या खात्रीनं तो पडल्यापडल्या परत मूर्छित झाला..
आणि अहो आश्चर्यम्... दुसर्या दिवशी...१ मे, गुरुवार...सकाळी त्याला चक्क ’जितेपणी’ जाग आली. मनांत कल्पना आली त्याच्या की आपण आपलं हाड, फांदी मोडतो तसं मोडलं तर ? आणि ’जिगरबाजानं केलं कि हो तसं ! आणि मग एका गंजलेल्या, दोन इंची पात्यानं..जे त्याच्याकडच्या सामुग्रीचा भाग होतं.. त्यानं तुटलेल्या हाडाचा लटकतां भाग कापायला सुरुवात केली..स्वत:कडच्या त्या चिमुकल्या हत्याराचं तो कौतुकानं वर्णन करतो, ’स्वच्छ प्रकाश देणार साधन किंवा बहु-उपयोगी’ वगैरे तसलं कांही हत्यार असतं तरी हेच केलं असत ना मी ?’
हात ’तोडून’ स्वत:ची सुटका करून घेतल्यावर, राल्स्टन् त्याच अवस्थेंत, घळ उतरून घसरत खाली आला..’पि्टॉन्-मिटॉन्स्’ आनि दोरखंडाच्या मदयीनं ’रॅप्लिंग्’ करीत..एका हातानं...ऐन दुपारच्या उन्हांत. त्याची गाडी १३ किलोमिटर् दूर होती.. आणि दळणवळणाचं कुठलही साधन नव्हतं त्याच्याकडे..पण त्याच वेळी, एरिक् आणि मोनिक् मीजर आणि त्यांचा मुलगा अॅंडी, या नेदरलॅंड्च्या प्रवासी गिर्यारोहकांनी त्याला बघितल आणि त्वरित संबधित अधिकार्यांशी संपर्क साधून मदत-कार्याला सुरुवात केली.तो पर्यंत, राल्स्टन्च वजन ४० पौंड् कमी झालं होतं आणि शरीरांतील एकूण रक्ताच्या २५ टक्के रक्त वाहून गेलं होतं.
अतिरक्तस्रावानं आपण मरणार, याची राल्स्टन्ला पुरेपूर खात्री पटली होती एव्हाना..पण दरम्यान, तो घरी न परतल्यामुळे , कुटुंबियांनी चौकशी सुरू केली होती आणि ते शोध पथक हेलिकॉप्टर्सकट पोहोचलं होतं दुर्घटनास्थळी...हात तोडल्यानंतर सहा तासांनी..
राल्स्टन् म्हणतो, ’आधी हात तोडला असता तर रक्तस्रावानं किंवा तोडला नसता तर तहान-भूक-अशक्तपणानं...माझं कलेवर झालं असतं तसंही !’.. सुटकेसाठी हात तोडण्याची खुणगांठ त्यानं मनाशी वेळेवरच बांधली होती. नंतर, कालांतरानं, त्याच्या तोडलेल्या हाताला कृत्रिम हात , तळवा, कोपरासकट, बसवून मिळाला हॉस्पिटल्मधे...
तो तुटलेला हात, घळींत पडलेली शीळा हलवून, शोधून आणण्यासाठी १३ माणसं, कांही अवजड यंत्रसामग्रीसह झटली, आणि राल्स्टन्नं त्या हाताचं व्यवस्थित दफन केलं अखेरीस !!
म्हणतांत ना..I was complaining about my shoe untill I saw a person without feet.. तसंच कांहींसं...
रोजच्या परिस्थींतल्या छोट्या मोठ्या संकटांची चिंता आणि तक्रार करीत बसणार्या आपणा सर्वांसाठीच ही कथा..अगदी वास्तव आणि सत्य घटना, आठ नऊ वर्षांपूर्वीच घडलेली..an eye opener नाही कां ? किंवा असही असेल, की, जिवावरचं बेतलं तर परिस्थितीनुसार सर्वसामान्य माणसंसुद्धा पुरेशी लढाऊ, जिगरबाज आणि प्रसंगी आक्रमकही होतांत...
******
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com
www.target point blank.blogger.arun kakatkar
Subscribe to:
Posts (Atom)