Thursday, February 16, 2012

’स्थलातीत, कालातीत...’


’स्थलातीत, कालातीत...’
उठा उठा चिऊताई
सारी कडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही!
सोनेरी हे उन आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही!
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
भीर भीर उडताती
चोहीकाडी!
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या!
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूरभूर!
माहीत आहेत या कवितेचे कवी ? बर्‍याच मराठीच्या अभ्यासकांना, प्राध्यापकांनाही हे माहीत नसावं, पण आपल्यापैकी प्रत्येकानं बालपणांत ऐकलेल्या, वाचलेल्या, गाईलेल्या या काव्यपंक्ती आहेत, विख्यात कवि, वि.वा. शिरवाडकर ;कुसुमाग्रज’ यांच्या ! खरंतर मलासुद्धा हे माहीत नव्हतं ! पण बर्‍यांच वर्षांपूर्वी, नाशिकमधल्या, रुंगठा हायस्कूलमधल्यामुलांनी,’ कुसुमाग्रजां’च्या, वर उल्लेखिलेल्या आणि अहि-नकुल, कणा आणि अन्य अनेक कवितांवर आधारित नृत्यनाट्याच्या प्रयोगाच्या चित्रीकरणाच्यावेळी मला ते कळलं आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसला...
उद्या, कविश्रेष्ठ ’कुसुमाग्रज’ तथा वि. वा शिरवाडकर यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे.. ’लहान मुलांना ताल, ठेका यांची जन्मत:च जाण असते. त्यांना मात्रा, वृत्त, यमक लघु-गुरु यांची ओळख करून द्यायला हवी...म्हणजे छोट्याछोट्या रचना भावव्यक्ततेसाठी, ती करूं शकतांत... अर्थ आशय वगैरे खूप नंतरची गोष्ट आहे...मोठ्यामोठ्या कवींनासुद्धा कधीकधी त्यांनी लिहिलेल्या कवितेचा अर्थ लावता येत नाही... आणि मग समीक्षक शोधत बसतांत आशय, अंत:प्रवाह वगैरे...’ बालचित्रवाणीसाठी त्यांच्या नाशिकमधल्या राहात्याघरी, ’कविता’ करू इच्छिणार्‍या मुलांसाठी मोकळेपणानं मर्गदर्शन करतांना, १९८९ साली ते बोलत होते.
..
विष्णु वामन शिरवाडकर ’कुसुमाग्रज’ एक मानवतावादी कवी होते ज्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि मुक्ती या विषयांवर भरपूर लिखाण केलं. सोळा कवितासंग्रह, तीन कादंबर्‍या, आठ लघुकथासंग्रह, सात निबंध-मालिका, अठरा नाटकं, आणि सहा एकांकिका अशी संपन्न साहित्य संपदा हे त्यांच मराठी सारस्वताला लाभलेलं योगदान होतं अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी विभूषित ’कुसुमाग्रजां’ना १९७४ मधे साहित्य अकादमीगौरव आणि १९८८ मधे भारतीय साहित्यक्षेत्रांतला सर्वोच्च ’ज्ञानपीठ’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यांत आलं

मराठीतले नामवंत कवी, लघुकथाकार, नाटककार, कादंबरीकार, गजानन रंगनाथ शिरवाडकर यांचा जन्म दिनांक २७ फ़ेब्रुअरी १९१२ रोजी पुण्यांत झाला. त्यांचं बालपण, नाशिकजवळच्या, पिंपळगांव बसवंत इथं गेलं.  मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण नाशिकच्या ’न्यू इंग्लिश स्कूल, जी पुढं रुंगठा हायस्कूल म्हणून ओळखली जाऊ लागली..त्या शाळेंत झालं. त्यांनी नंतर स्वत:ला विष्णु वामन शिरवाडकर अशी नवी ओळख त्यांनी स्वत:च दिली.
तारुण्याच्या सुरुवातीलाच, ढोंगी, परंपरेच्या जोखडांत जखडलेल्या दांभिक, तथाकथित ’विद्वानां’बद्दल त्यांच्या मनांत असंतोष खदखदतच होता. त्याचचं पर्यवसान, वयाच्या २०व्या वर्षी, नाशिकमधल्या हरिजनांना राममंदिर प्रवेश नाकारणार्‍या कर्मठ, कर्मकांडप्रेमी, अन्यायभावनाप्रेरित ब्राह्मणांच्या विरोधांत अहिंसात्मक ’सत्याग्रह’ करण्यांत आणि मंदिर सर्व जाती जमातींच्या ’भक्तां’साठी खुलं करून देण्यासाठीच्या चळवळींत सहभागी होण्यांत झालं. आयुष्यभार, नाशकांतल्या वास्तव्यांत त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग घेतला आणि कांही आंदोलनांचं नेतृत्वही केलं.
’जीवनलहरी’ हा त्यांचा पहिलावहिला काव्यसंग्रह, ते अवघे २० वर्षांचे असतांनाच प्रकाशित झाला.
अर्थात, १९४२ हे वर्ष, कुसुमाग्रजांच्या जीवनांतलं एक संस्मरणीय वर्ष ठरलं कारण त्या वर्षी मराठी साहित्यांतल्या परमपितृवत, कविवर्य वि.स. खांडेकरांनी स्वत:च्या खर्चानं, कुसुमाग्रजांचा, ’विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्याच्या प्रस्तावनॆंत, कुसुमाग्रजांच वर्णन ’जाज्वल्य मानवतावादी’ असं करतांना खांडेकरांनी लिहिलं, ’कुसुमाग्रजांच्या शब्दांतून उचंबळलेला जाणवतो सामाजिक असंतोषाबरोबरच, दुर्दम्य आशावाद आणि निष्ठा ’जुने जाउद्या मरणालागुन’ म्हणत अंकुरणार्‍या उद्याच्या जगाबद्दल’ (खांडेकर स्वत: किती उच्चकोटीचे मानवतावादी होते हे त्यांनी, त्यांच्या, दिदींनी अजरामर करून ठेवलेल्या ’ये, जवळि घे जवळी, प्रिय सखया भगवंता’ या, उचंबळणार्‍या सागरांत मधोमध एकाकी पडलेल्या खडकाचं रूपक, गीतस्वरूपांत, माणसाला पंख असतांत’ या चित्रकृतीसाठी लिहून निर्विवाद सिद्ध केलय.). पुढे हाच दुर्दम्य आशावाद त्यांच्या ’ययाति आणि देवयानी’ या नाटकांतल्या  ’तम निशेचा सरला..अरुणकमळ प्राचीवर फुलले’ या पदांतून प्रकट झालेला दिसतो..
१९९० मधे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर, नाशिककरांनी आयोजिलेल्या भव्य सत्कार-सोहळ्यांत, ’मी जन्मानं, आणि जन्मानंच फक्त, जरी पुणेकर असलो तरी माझी खरी कर्मभूमी ही नाशिकच आहे आणि म्हणून नाशिककरांनी आयोजलेला हा कौतुक सोहळा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान आहे’ असं अत्यंत भारावलेल्या अंत:करणानं उपस्थित श्रोत्यांना सांगितलं होतं. याचं सोहळ्यांत त्यांनी त्यांच्या ’कणा’ या प्रसिद्ध कवितेसह, सहा रचना ऐकवून प्रेक्षकांच्या आयुष्यांतल्या कांही क्षणांना, ’याचि देही, याचि डोळा’, सुवर्णझळाळी प्राप्त करून दिली होती.
आणि...
त्या क्षणांचा मीही साक्षीदार आणि ’आनंदविभोर प्रेक्षक-श्रोता होतो...

Thursday, February 9, 2012

जाणता राजा


जाणता राजा
समर्थ रामदास आणि शिवप्रभु गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती हे समकालीम जरी असले तरी प्रत्यक्षांत त्यांची भेट झाल्याचे ऐतिहासिक निर्वाळे मिळतनाहीत असे जाणकार इतिहासतज्ञ सांगतांत. मात्र शिवाजीमहाराजांच्या, ’महाराष्ट्रधर्म आणि अस्मिता’ जागविण्याच्या, जगविण्याच्या बहुमोल कार्याकडे समर्थांचं बारकाईनं लक्ष होतं. ’राम’ या संकल्पनेची बीज, शिवप्रभूंमधे समर्थांनी पाहिली निरखली पारखिली जोखली आणि खात्री झाल्यावर आणि मनांतली ’रामराज्या’ची संकल्पना, छप्तपतींच्या काळांत पूर्णत्वास येण्याचे संकेत जेंव्हा मिळूं लागले तेंव्हा समाधानपावते ते लिहिते झाले... बहुधा १६७४ मधे त्यांनी ही शिवस्तुती लिहिली ती किती अप्रतिम आहे हे परतपरत वाचल्यावर त्याची प्रतीती येते
निश्चयाचा महामेरू,(कृतनिश्चयी म्हणजे निश्चय प्रत्यक्षांत उतरविण्याची योग्यता असलेला ’उत्तुंग’) बहुत जनांसी आधारू(जनतेनं, रयतेनं ज्याच्याकडे विश्वासानं पाहावं असा), अखंड स्थितिचा निर्धारू( कायम स्वरूपी ’स्थिति’ म्हनजे स्थैर्याचा संकल्प सोडलेला), श्रीमंत योगी(सद्‌गुणसंपन्नतेने धनसंपदेने ’श्रीमंत’, पण योगसाध्य संयमी वृत्ती अंगी बाणवलेला)
नरपति,(पायदळ) हयपति,(घोडदळ किंवा तुरंगदळ) गजपति,(हत्तिदळ) गडपति(किल्ले, कडेकोट, दुर्ग), भूपति(प्रदेश), जळपति(नौदल,सागरसीमा), पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी
वसुंधरेच्या या सर्व भौतिक घटकांचा अधिनायक. त्यां काळांत अवकाशयानांचा शोध लागला असता तर, महाराजांनी ’अवकाश’पतिपद सुद्धा धारण केलं असतं, जसं मराठ्यांच नौदल स्थापन करून त्यांनी, सरदार कान्होजी आंग्रे यांना ’सरखेल’ या नौदल प्रमुखपदाची धुरा सांभाळण्याचे आदेश दिले होते.
यशवंत, कीर्तिवंत(जेता आणि सर्वमुखी कौतुकपात्र), सामर्थ्यवंत, वरदवंत( स्वबळाच्यायोगे मिळविलेल्या यशाद्वारे, लोकाधार ठरलेला), पुण्यवंत, नीतिवंत.जाणताराजा(सत्कृत्ये आणि कल्याणकारी रीतीरिवाज यांची जाण असलेला)
आचारशील, विचारशील(वागण्या-बोलण्यां्ला बुद्धीचा निकष लावून, समाजाभिमुख मान्यताप्राप्त) , दानशील, धर्मशील(स्वार्थत्यागाची मानसिकता बाळगणारा, नेतृत्वधर्म, जो ’धर्म’ म्हणून राजाचा असतो तो आचरनारा), सहजपणे सुशील सकळाठायी (सर्वांसाठीच जन्मत: सत्कृत्यक्षम),
धीर उदार, गंभीर,(धैर्या बरोबर आलेलं औदार्य, गांभिर्य) शूर क्रियेसि तत्पर(निधड्या छातीने संकटांशी, शत्रूला विचार करायलासुद्धा वेळ न देता समर्थपणे दोन हात करणारा), सावधपणे नृपवर तुच्छ केले (अनेक बलाढ्य शक्तींना ’मांडलिक’पणी रगडून, राजांनी काळजीपूर्वक बाjUला ठेवले...कां ? तर त्यांची बलस्थानं कदाचित भविष्यकाळांत ’स्वराज्या’साठी उपयुक्त ठरतील या हेतूने.
देव(श्रद्धेय) धर्म(कर्मप्राप्त कर्तव्यदक्षता) गोब्राह्मण(जे स्वबळावर संकटांशी लढू शकत नाहीत असे सर्व), करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण (साक्षांत नारायण म्हणजे विष्णू ज्याच्या अंत:करणांत प्रकट होवून कार्यप्रवृत्त केले आहे असा), प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही(कर्तव्यच्युत स्वकीयालासुद्धा कठोर शासन करून ’राज’धर्म पाळणारा), महाराष्ट्रधर्म राहिला कांही, तुम्हा कारणे(महाराष्ट्राची म्हणून असलेली अस्मिता, आत्मगौरव, प्रतिष्ठा अबाधित राहिली, ती, हे राजा, केवळ तुझ्यामुळे...)
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसि धाक सुटला, कित्येकांसि आश्रयो जाहला(शत्रू, जनहितबाधक, अस्तनीतले निखारे, अराजकी, फुटीर यांचा केलेला संहार पाहून बाकीचे भयभीत झाले, तसेच शरण आलेल्यांसाठी ’दयार्णव’ अपार मायेचा सागरसुद्धा होणारा हा राजा म्हणजेच...)
शिवकल्याण राजा...
मराठी साहित्यांतल्या या अद्वितीय ’गुणवर्णनपर स्तुति’रचनेवर तेवढाच ’समर्थ’ स्वरसाज चढवून, बाळासाहेब हृदयनाथ मंगेशकर यांनी तो दिदींच्या वैश्विकस्वरांत गुंफला आहे, केवळ तानपुर्‍याच्या पार्श्वनादावर. तो ऐकतांनां तर आपण खरोखरच प्रत्यक्ष शिवप्रभूंना पाहात आहोत असा भास होतो...
ही अनुभूती खरंतर सर्वांनीच घ्यावी अशी...
*****