Thursday, March 28, 2013

जगण्याचा ’३१ मार्च’

जगण्याचा ’३१ मार्च’ परवा, माझा शाळेंतला वर्गमित्र भेटला. शाळेंत असतांना खूपच हुशार होता तो. इतका की त्याला एखाद्या विषयांत मिळालेल्या गुणांपेक्षा मला सर्व विषयांत मिळालेल्या गुणांची बेरीज सुद्धा कमी असायची. अर्थातचं तो वार्षिक परीक्षेंत पहिला तर आम्ही कांही दयार्द्रहृदयी गुरुजनांच्या कृपेने, वरच्या वर्गांत ढकलले गेलेले... असो.. तर त्याला म्हटलं ’बर्‍याच दिवसांनी भेटतोय्‌ आपण.. आज संध्याकाळी ये ना घरी ! जरा बसू...गप्पा मारत..’ (आजकाल हे स्पष्ट करायला लागतं नाही तर लोक कांहीबाही अर्थ काढीत बसतांत उगा !) तर म्हणला, ’नको बाबा मार्च अखेर आहे. सगळे हिशेब चुकते करून ताळेबंद करायचाय्‌. एका पैशाची तफावत झाली तर सरकारी हिशेब तपासनीस जीव खातांत..’ ’ठीकै बाबा.’ म्हणून निरोप घेतला आणि बोरकर..’बाकीबाबां’च्या दोन कविता आठवल्या,पहिली विझवून दीप सारे, मी चाललो निजाया आतां अशाश्वताची उरली मुळी न माया आणि दुसरी आतां माझ्या व्यथाकथा कुणा न येती सांगता वृथा त्यांना कां दूषण, ना ये मलाच सांगता मनांत आलं ! जगण्याच्या अखेरच्या दिवशी, सगळ्यांनाचं ताळेबंद द्यायचा असतो आपापल्या कर्मांचा, पाप-पुण्याचा... नाइतरी, कविवर्य रॉय किणीकरांनी त्यांच्या रुबायांमधे म्हटल्या प्रमाणे इतिहास घडविला त्यांची झाली कीर्ती इतिहास तुडविला त्यांची देखिल कीर्ती तेंव्हा, आपण इतिहास घडविला की तुडविला ? त्याची नोंद झाली किंवा नाही ? सऽऽगळे जमा-खर्च स्मरून.. सगळे हिशेब द्यावे लागतांत बंद करून खाती, टांक मोडून जावं लागतं, सोडून नातीगोती मोह, माया, द्वेष, मत्सर, ममता, प्रेम, लळा, नावं वेगळीवेगळी तरी खेळ खोटा सगळा भाता वर-खाली तोवर ’तेवर’ उधळायचे धकधक थांबली की मग फक्त ’लाकूडं’ उचलायचे पण या हिशेबांत राहून जातो मरण्याला आलेला खर्चं म्हणतील, ’कसं फेडायचं हे ? थोडं कां झालय्‌ घरचं ?’ कारण अहो.महागाईच्या तापल्या तव्यावरचं.. महागलय्‌ मरण सुद्धा, दमड्या लागत्यांत लई पड झड, रोग राई, हजार तोंडांची खाई तपासणी अन्‌ औशीधपाणी, देतय कोण फुकाट ? कद्रावलेले आप्त, पाहून मरनारा जातो मुकाट लहानग्यांन्ला वाढवायचं की म्हातार्‍यांना जगवाय्‌चं ? उलटुन पडतोय घास, पाणी तरी बळं भरवायचं.. उर्ध्व लागला तरी लावत्यांत नाकाड्यावर नळी इस्पितळाची भर करायला उभी दागदरांची फळी ’मुलग्याला यायला येळ लागल ? ठेवा शीतगृहांत’ माती झाली तरी सैल सोडावा लागतुया हात तिरडीचे बांबू नि निखार्‍याला कोळसा, नाई सस्त सुतळ बी आवळायला ’वासा’ आता नाही येणे जाणे, गात वरात निघते, भजनी नी टाळकरी का भौ फुकटांत येते ? चिरीमिरी द्यावी लागते, भेटायला ’पास्‌’ जगन्याला तर हायेच, पर मरनाला बी त्रास ? तूप साजुक किरवंत मागतोय्‌ ’धाडतो’ म्हनतोय्‌ ’स्वर्गांत’ डोरल्यांतल्या वाट्या बी हळूच घालतांत खिशांत सरणावर लाकुडफाटा अखेर लागतोचं जाळाया कवटी फुटेस्तोवर कोण असतो आंसवं ढाळाया ? द्या फेकून रानांत, विसरून सुरकुतलेले हात आजचं जिणं जगून घ्या, कशाला उद्याची बात ? कोल्ही कुत्री ’मातीमोल’ खाउन, देतिल तरी दुवा उरल्यासुरल्या तुकड्यांच मुंग्या करतिल रवा आत्मा म्हनं जातो वर आभाळांत वस्तीला तितं कुठं जागा हाई ? गर्दी आलिया भरतीला ! एखादी सकाळ उजाडते मळभ घेवुन मनांत प्रष्ण उठवतो काहूर, घुमतो स्वत:च्याच कानांत आयुष्य अंगावर येतय्‌ मित्रा ! संपायचं कधी रे सगळं ? आंतल्या आंत कोंडतोय जीव ,चावी गहाळ, बाहेर नुसतच टाळं जगण बरोबर घेऊन आलय, मरणाचा वसा , म्हणून भोगला हरेक क्षण, भरून घेतला पसा खोटं खोटं जगायला खरीखरी हवा नि श्वास नवी वस्त्र ? नको.. आतां ’कोर्‍या’चाच ध्यास तिकाटण्यावर नको मडकं.. नको कर्मकांडं आलं तसच जाऊद्या गळक फुटकं भांड तुझी मदत काय मित्रा, या ’कार्यांत’ होणार आसवं गाळणारे सगळे माघारी घालवणार ? आपल्या माघारी उरलेल्यांना, आपलं मरण हा ’आंत बट्ट्याचा’ व्यवहार वाटू नये म्हणून मग म्हणायचं.. ( ही भावना, मी माझ्या ’नक्षत्रांचे दिवस’ या नव्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर मांडली... की सांडली म्हणू ? पण आहे ! ) मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा, दान करुनी पार्थीव-नेत्र, द्या, मज मरणा, आयाम नवा श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करती रवा रवा आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी, विरहाला विसरुनी तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक, स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी’ शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी ***** परत रॉय किणीकर.. हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ, या विदूषकाला नाहि रडाया वेळं लावून मुखवटे नवा खेळ चल लावू सोडून सावल्या पडद्यामागे जावू पडद्यामागे जावू

Wednesday, March 20, 2013

योग्य तेच जाणावे.. *******

ते दयार्णव, भूतमात्रांना स्वत:च्या तोंडचा घास काढून भरविणारे, एकनाथ, नामदेव, तुकोब्बादि संत कुठे आणि आटले स्रोत ओसाड जाहली गांवे, चिडिचाप वळचणी एकाकी अन्‌ दावे भुइ भेगाळलि तापले चहुकडे वारे, निष्पर्ण शाख अन्‌ सताड उघडी दारे पेटती रोज वडवानळ रानोमाळी, दुष्काळ, अवकळा, विदीर्ण अंतर जाळी अशा भीषण परिस्थितींत कुणि नालायक भक्तांना घाली न्हाऊ, अन्‌ म्हणे ’चला ! ओलेती राधा पाहू’ बांधा मुसक्या अन्‌ बसवा गर्दभ अंकी गेला हा तरिही राहिल वृत्ती बाकी तुकयाच सांगितो, ’हाणा पैजाराने, का ? जगावेच कां ? ऐशा नराधमाने ?’ सुज्ञांस याहू्नी जास्त काय सांगावे अभ्यासुन उक्ती, योग्य तेच जाणावे योग्य तेच जाणावे.. *******

Tuesday, March 19, 2013

मीनाताईं ’शब्दांच्या पलीकडले

दुपारी खूप उशीर झालाव्‌ता.. सकाळी १०ची शिफ्ट आहे असा निरोप मिळाल्यामुळं बहुतेक सगळे वाद्यवादक हजर झाले होते तासभर झाल्यानंतर चुळबुळ सुरू झाली त्यांतल्या ज्येष्ठ मंडळींच्या ’कंपू’त..’ये कौन काकतकर है ? उसको मालूम है ना के एक मिनिट ज्यादा हुवा तो दूसरी शिफ्ट्‌ का भी पैसे देने पडेंगे.. हम दूरदर्शन वगैरा नही जानते.. हमे हमारा पैसा इंडस्ट्रीके रेट्स्‌नुसार मिलनाही चाहिये.. और अगर काकतकरने नही दिया तो देख लेते है उसको...’ अस्वस्थता आतां अशी धमकीवजा शब्दांत उतरायला लागली.. फिरोजशहा मेहेता रस्त्यावरच्या HMVच्या ध्वनिकलागाराबाहेर एक एक जण जावू लागला कुणी वडापाव तर कुणी तंबाखू चोळायला तर कोणी पान चघळायला.. कोण बोलणार ? कारण वाद्यवादक ही जमात त्याकाळी, भल्याभल्या संगीतकारांना पण आवरत नसे इतकी त्यांची, म्हणजे जमातीची एकजूट भक्कम होती..( त्या काळी माझ्या, २३, मुकुंद निवास या, राहात्या दादरच्या घरा आगेमागे दोन प्रसिद्ध वाद्यवादक राहायचे.. समोर शहासदन मधे प्रभाकर जोग आणि पाठीमागे सीकेपी हॉल्‌शेजारी परशुराम बिल्डिंग्‌च्या कौलारू भागांतल्या एका छोट्या खोलींत, पार्सेकर.. श्रीधर पार्सेकरांचे बंधू... दोघेही अप्रतिम व्हायोलीन्‌वादक.. आणि मी करीत असलेल्या वर्णाला अपवाद ठरावेंत असे) बाबूजी.. अण्णा सुधीर फडके तर त्यांना ’दैत्य’ म्हणायचे... सगळे आपापल्या ’हुनर’मधे अत्यंत वाकबगार होते. पण एका सडक्या सफरचंदाची ’लागण’ टोपलींतल्या इतरांना होते ना ? तशी कांहीशी गत झाली होती या ’जमाती’ची.. कारण एरवी सर्वसामान्यपणे गाण्याची साथ आणि ’Take' साठी साथ यांत जमीन आस्मानाचा फरक असतो.. बीट्‌ टू बीट्‌.. बार‌ टू बार्‌.. वाद्यमेळ संयोजकानं आखल्याप्रमाणे त्या वाद्यावर तेवढा स्वरसमूह वाजवायला लागतो.. जरा इकडतिकड झालं तर परत पहिल्यापासून.. म्हणजे त्या काळी तरी.. १९८४मधे अशीच आजकालच्या मानानं ’असुविधा’ होती. पैसे खूप मिळायचे वाद्यवादकांना.. इतके की संगीतकार बस आणि लोकल्‌नं तर निरोपे म्हणजे ’मेसेंजर्‌’ आणि वादक त्यांच्या स्वत:च्या ’शोफर’चलित चारचाकी वाहनांतून अशी अवस्था होती.. त्यामुळे आजकाल इलेक्ट्रॉनिक्‌ वाद्य विशेषत: ’सिंथेसाइझर्‌’ आल्यापासून संगीतकार, वाद्यमेळ संयोजक यांनी हुश्श केलय. आतां आकुस्टिक्‌ ची सर.. म्हणजे चर्मवाद्य(तबला, ढोलकी, खंजिरी, डफ), तंतुवाद्य(सतार, सारंगी, व्हायोलिन्‌, दिलरुबा, संतुर), फूंकवाद्य‍(क्लॅरिनेट्‌. बांसरी, सनई, सुंद्री, सॅक्साफोन्‌) यांची सर आणि त्या स्वरांतला आत्मा इलेक्ट्रोनिक्‌ वाद्यातून मिळवता येणं श्यक्य नाही पण त्या .जमाती’च्या छळवादापेक्षा हा Compomise’ स्वीकारतांत बापडे.. बरं आतां तांत्रिक सुधारणांमुळे चुकलेले तुकडेतुकडे वेगवेगळे भरतां येतांत सुधार करून.. त्यामुळं सगळ्यां ’फौजे’ला एकत्र बोलाविण्याचं कारण नसतं.. तर जवळ जवळ दीड तासानं दिदी प्रवेश करत्या झाल्या, कारण, मीनाताईंच्या ’शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमासाठी दिदी गाणार होत्या ’माणसाला पंख असतांत’ या, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(१९७४) पहिले मराठी साहित्यिक, सुप्रसिद्ध मराठी लेखक ’ययाती’कार वि.स. खाडॆकरांच्या कथेवर आधारित चित्रपटांतलं एक गाणं ! ’ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता’.. एक दलित तरुणी सामाजिक अन्यायाला कंटाळून करुणा भाकतेय देवाची... समाजरूपी सागरांतल्या, आजूबाजूनं जाणार्‍या होड्या, बोटी यांच्याकडून दुर्लक्षित बेटाप्रमाणं. असं दृश्यांकित रूपक साधणारा प्रसंग. गाण्याच्या ध्वनिमुद्रिका Out of Stock झाल्याव्‌त्या त्यामुळं पुनर्ध्वनिमुद्रण अनिवार्य होतं इतक्या वर्षांनी म्हणजे १९८४ मधे.. दिदी ध्वनिमुद्रणाला कलागारांत पोहोचल्याबरोबर सगळी चिडीचाप झाले. इतर चौकशी करतांना दिदींच्या कानावर वाद्यवादकांची कुरबुर पोहोचली.. वापरलेली भाषा, धमक्या..यासह. दिदींनी सगळ्या वाद्यवृंदाकडे एकदा पाहिलं. ऐंशी टक्के चेहेरे वरमले.. कारण दिदींची नाराजी किती नुकसानीची ठरू शकते याची त्यांना कल्पना होती. मधले व्हायोलीनचे स्वरसमूह अमरनं.. अमर हळदीपूरनं वाजवले.. क्या बात है.. मींड, मुरक्या.. सबकुछ लाजवाब. एका उत्तम गीताच, साक्षांत सरस्वतीच्या कंठातून अवतरलेलं स्वरस्वरूप ऐकायला मिळालं आणि धन्य झालो..पुनश्च.. आरोही नंतर ! कार्यक्रमासाठी मीनाताईंनी माझंही एक गीत निवडून मला आयुष्यभराचं ऋणी करून ठेवलं, ’आनंदघन क्षणांचा रावा दुरून यावा’ असे होते शब्द आणि गायलवतं श्रीकान्त पांरगांवकरनं, शिवाय ’सुरसुखखनि, तू विमला’ या नाट्यपदावर आधारित, शांताबाईंनी लिहिलेलं , तू असतां मज संगे..’ हे भावगीत आणि कांही बालगीतं उषाताई, विनय मांडके आणि सुरेशनं.. वाडकरांच्या... गाइली होती. ’असावा सुंदर चॉक्‌लेट्‌च बांगला’ गायलावता आरती काकतकर आणि दामले आणखी एक अशा तीन बालगायकांनी. या गाण्याचे मूळ गायक योगेश आणि त्याची लहान बहीण, बसले होते प्रेक्षकांत, शांताबाई आणि साक्षांत दिदींबरोबर. मीनाताईंनी सुरसुखखनि थेट बाबांच्या.. मास्टर्‌ दीनानाथांच्या ढंगात गायलं आणि ’ये जवळी..’ची मूळ बंदिश, ’ए सुगुराई..’ दिदींनी सादर केली मीनाताईंच्या कांही आठवणी सांगतांना.. गाण्या आधी.. मी विचारलं, ’दिदी, स्वर द्यायला सांगू कां अमरजींना ?’ माझ्याकडे पाह्यलं त्यांनी.. एक मंदस्मित केलं.. मी काय समजायचं ते समजलो आणि गप नियंत्रण कक्षांत पळालो.. सर्व वर्णन वाचल्यावर, कार्यक्रम किती उच्चकोटीचा झाला असेल हे मी सांगायची आवश्यकतां भासू नये नाही कां ? दुर्दैवानं हा कार्यक्रम दूरदर्शन कडे नाही.. पण माझ्याकडे प्रत आहे त्याची.. *****