Thursday, February 9, 2012

जाणता राजा


जाणता राजा
समर्थ रामदास आणि शिवप्रभु गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती हे समकालीम जरी असले तरी प्रत्यक्षांत त्यांची भेट झाल्याचे ऐतिहासिक निर्वाळे मिळतनाहीत असे जाणकार इतिहासतज्ञ सांगतांत. मात्र शिवाजीमहाराजांच्या, ’महाराष्ट्रधर्म आणि अस्मिता’ जागविण्याच्या, जगविण्याच्या बहुमोल कार्याकडे समर्थांचं बारकाईनं लक्ष होतं. ’राम’ या संकल्पनेची बीज, शिवप्रभूंमधे समर्थांनी पाहिली निरखली पारखिली जोखली आणि खात्री झाल्यावर आणि मनांतली ’रामराज्या’ची संकल्पना, छप्तपतींच्या काळांत पूर्णत्वास येण्याचे संकेत जेंव्हा मिळूं लागले तेंव्हा समाधानपावते ते लिहिते झाले... बहुधा १६७४ मधे त्यांनी ही शिवस्तुती लिहिली ती किती अप्रतिम आहे हे परतपरत वाचल्यावर त्याची प्रतीती येते
निश्चयाचा महामेरू,(कृतनिश्चयी म्हणजे निश्चय प्रत्यक्षांत उतरविण्याची योग्यता असलेला ’उत्तुंग’) बहुत जनांसी आधारू(जनतेनं, रयतेनं ज्याच्याकडे विश्वासानं पाहावं असा), अखंड स्थितिचा निर्धारू( कायम स्वरूपी ’स्थिति’ म्हनजे स्थैर्याचा संकल्प सोडलेला), श्रीमंत योगी(सद्‌गुणसंपन्नतेने धनसंपदेने ’श्रीमंत’, पण योगसाध्य संयमी वृत्ती अंगी बाणवलेला)
नरपति,(पायदळ) हयपति,(घोडदळ किंवा तुरंगदळ) गजपति,(हत्तिदळ) गडपति(किल्ले, कडेकोट, दुर्ग), भूपति(प्रदेश), जळपति(नौदल,सागरसीमा), पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी
वसुंधरेच्या या सर्व भौतिक घटकांचा अधिनायक. त्यां काळांत अवकाशयानांचा शोध लागला असता तर, महाराजांनी ’अवकाश’पतिपद सुद्धा धारण केलं असतं, जसं मराठ्यांच नौदल स्थापन करून त्यांनी, सरदार कान्होजी आंग्रे यांना ’सरखेल’ या नौदल प्रमुखपदाची धुरा सांभाळण्याचे आदेश दिले होते.
यशवंत, कीर्तिवंत(जेता आणि सर्वमुखी कौतुकपात्र), सामर्थ्यवंत, वरदवंत( स्वबळाच्यायोगे मिळविलेल्या यशाद्वारे, लोकाधार ठरलेला), पुण्यवंत, नीतिवंत.जाणताराजा(सत्कृत्ये आणि कल्याणकारी रीतीरिवाज यांची जाण असलेला)
आचारशील, विचारशील(वागण्या-बोलण्यां्ला बुद्धीचा निकष लावून, समाजाभिमुख मान्यताप्राप्त) , दानशील, धर्मशील(स्वार्थत्यागाची मानसिकता बाळगणारा, नेतृत्वधर्म, जो ’धर्म’ म्हणून राजाचा असतो तो आचरनारा), सहजपणे सुशील सकळाठायी (सर्वांसाठीच जन्मत: सत्कृत्यक्षम),
धीर उदार, गंभीर,(धैर्या बरोबर आलेलं औदार्य, गांभिर्य) शूर क्रियेसि तत्पर(निधड्या छातीने संकटांशी, शत्रूला विचार करायलासुद्धा वेळ न देता समर्थपणे दोन हात करणारा), सावधपणे नृपवर तुच्छ केले (अनेक बलाढ्य शक्तींना ’मांडलिक’पणी रगडून, राजांनी काळजीपूर्वक बाjUला ठेवले...कां ? तर त्यांची बलस्थानं कदाचित भविष्यकाळांत ’स्वराज्या’साठी उपयुक्त ठरतील या हेतूने.
देव(श्रद्धेय) धर्म(कर्मप्राप्त कर्तव्यदक्षता) गोब्राह्मण(जे स्वबळावर संकटांशी लढू शकत नाहीत असे सर्व), करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण (साक्षांत नारायण म्हणजे विष्णू ज्याच्या अंत:करणांत प्रकट होवून कार्यप्रवृत्त केले आहे असा), प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही(कर्तव्यच्युत स्वकीयालासुद्धा कठोर शासन करून ’राज’धर्म पाळणारा), महाराष्ट्रधर्म राहिला कांही, तुम्हा कारणे(महाराष्ट्राची म्हणून असलेली अस्मिता, आत्मगौरव, प्रतिष्ठा अबाधित राहिली, ती, हे राजा, केवळ तुझ्यामुळे...)
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसि धाक सुटला, कित्येकांसि आश्रयो जाहला(शत्रू, जनहितबाधक, अस्तनीतले निखारे, अराजकी, फुटीर यांचा केलेला संहार पाहून बाकीचे भयभीत झाले, तसेच शरण आलेल्यांसाठी ’दयार्णव’ अपार मायेचा सागरसुद्धा होणारा हा राजा म्हणजेच...)
शिवकल्याण राजा...
मराठी साहित्यांतल्या या अद्वितीय ’गुणवर्णनपर स्तुति’रचनेवर तेवढाच ’समर्थ’ स्वरसाज चढवून, बाळासाहेब हृदयनाथ मंगेशकर यांनी तो दिदींच्या वैश्विकस्वरांत गुंफला आहे, केवळ तानपुर्‍याच्या पार्श्वनादावर. तो ऐकतांनां तर आपण खरोखरच प्रत्यक्ष शिवप्रभूंना पाहात आहोत असा भास होतो...
ही अनुभूती खरंतर सर्वांनीच घ्यावी अशी...
*****

No comments:

Post a Comment