Saturday, December 31, 2011

’पोट कशानं भरावं ?’


पोट कशानं भरावं ?
या केविलवाण्या, भाबड्या प्रष्णाचं उत्तर देतांना, आपल्या विविध अन्यायकारी कररूपी, कराल दाढा करकरवत, तो भुकेचा शहेनशहा आणि महागाईचा दैत्य, उपहासानं म्हणतोय‌... .
पोट दलितांच्या अश्रूंनी, संपदेच्या शस्त्रांनी, नेत्यांच्या आश्वासन-पत्रांनी भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट अज्ञानाच्या तमानं, मजुरांच्या घामानं, अनितीच्या प्रेमानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट स्वप्नांतल्या मृगजळानं, लक्षभोजनांच्या गाळानं, भुकेपोटी येणार्‍या कळांनी भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट मंत्र्यांच्या हास्यानं, अधिकार्‍यांच्या दास्यानं, जनतेच्या सर्वनाशानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट वैमनस्याच्या आगीनं, सत्कर्माच्या रागानं, अपहृत चंदन, सागवानानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट अंधश्रद्धेच्या बळींनी, विस्थापितांच्या कपाळशूळानी, संधिसाधूंच्या पिकल्या पोळीनं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट शासनाच्या सुस्तीनं, गांवगुंडांच्या मस्तीनं, शेत गिळणार्‍या वांझ गस्तीनं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट बलात्कारितेच्या असहाय धाव्यानं, भ्याड गनिमी काव्यानं, दुर्बल हताश काव्‌व्यानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट धर्माच्या मुखवट्यानं, हुंडाबळींच्या दुखवट्यानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट रोज मिळणार्‍या लाचेनं काळ्या पैशाच्या आचेनं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट महानगरांतल्या धुरानं, नेमेचि गिळणार्‍या पुरानं, सर्वभारल्या अतिरेकी अत्याचारानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट चार घंट्यांची ग्लानी देणार्‍या ठर्यानं, रेससाठी पोसलेल्या घोड्यांच्या खरार्यानं,झोपद्यांवर कोसळणार्‍या दगडी भिंतीपल्याडच्या, गगनचुंबी इमारतींतून येणार्‍या सुगंधी फवार्‍यानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट शिवीगाळीच्या, द्वेषात्वेषाच्या कर्दमानं, गावगुंडांनी दिलेल्या दमानं, मतपेटीनं निरसनं केलेल्या भ्रमानं भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट जाहीर संपत्तीच्या आंकड्यांनी, दगडी देवाला घातलेल्या साकड्यांनी, एकमेकांचे पाय ओढणार्‍या खेकड्यांनी भरावं...
पोट कशानही भरावं !
पोट पोपटानं ओढलेल्या पाकिटांतल्या भाकितानं, तथाकथित हितचिंतकांनी टाकलेल्या कातेनं, विझू विझू पाहाणार्‍या जगण्याच्या ज्योतीनं भरावं...
पोट कशानही भरावं !
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

Wednesday, December 28, 2011

ऋतूंची लावणी...


शेकोटीचे दिवस साजणी, रोमांतुन हुडहुडी भरे..
कटू स्मृतींची पाने गळती, आनंदाची ऊब उरे.
******.

ऋतूंची लावणी

वैशाखी बघ धग गात्रांतुन, सवय लागली वाळ्याची..
शिशिरधुंद गंधित रात्रींतुन, निनादली सय चाळांची (चाळ्यांची ?)

पदरावरचे राघू-मैना निपचित झाले काहुन आज ?
धडधड पदराआड नि तेंव्हा, दडून बसण्या शोधी काज
पदरपदर का भिजवुनि श्रावण, शमविल लाही अंगाची ?

अधिर जिवाचे ऊष्ण उसासे, भिरभिरते कशि पहा दिठी
सुगींत जरिकांठी जरि खुपली, तरी मधाची मऊ मिठी
मावळतीला मळभ साजणा ! लवते पापणि डोळ्याची...

नको दाउ भीती विरहाची, बेगिन येना आज घरा
धगधगत्या स्पर्शांतुन उसळुन, थंडावा शिडकवी जरा
प्रतिमा डबडबल्या भाळी, सय भिंग जडविल्या चोळीची..

१३ मे १९८९




PASSAYADAAN...FREE ADAPTATION...


GLOBAL PRAYER…

O Supreme, Unseen, infinite, unknown..
Grace thou verbal, vocal, vibrant throne..

Bestow me with heavenly, transcendental cool
Not more, only a blessing blissful..

Let hatred fade n’ affection flower
N’ goodwill clouds hover and shower..

Content lamp glow and light
Life n’ like take a flight..

Abundance overflow and death drown
Cosmic aura crust the crown..

Fulfill the dreams with greedless need
Beyond faith, creed, cast n’ apartheid..

Sanctity mingle with gentle folk
No fear around ever choke..

Clear the air of all disgrace
Let it reflect on every face..

Flora n’ fauna n’ fragrance upbeat
Spark-in vigor, wit n’ grit..

Chirping birds, savage beast
Live n’ let live with lust the least..

Speck less moon and soothing sun
Delight human in the eternal run..

Joy to the brim, bubble the chime
All be grateful to root n’ prime..

Yen for perception yearn a word’s worth
‘Caused a just n’ vocal dream-birth..

O state of minute, vacuum n’ space
Part n’ full of every face..

May little dreams morph real n’ fill
Of joy n’ cheer DNYAANAA lays a keel…

Traslated by Arun Kakatkar.

Monday, December 26, 2011

’दोन लावण्या...’


’दोन लावण्या’
चवल्या-पावल्यांचा केलाय मी वांधा
रुपया रूपाचा कलदार बंदा...
भाळ आभाळावर उगवतीचा शिलेदार..थंडावा रातिचा कां जळ नजरेवर ?.. डाळिंबि व्हटाची पहाट जणू हाकारं..
रंग-कांतिची पुनव उतरली, जनु चाफा बहरलाय औंदा....
नथं नाकांत थरथरे, तिरिप जशी माध्यान्ह..कानि कुडिबुगडी, सांज गुपितांचं कोंदन..मान कमळदेठ धाडि पांचव्याचं आवतान...
केस मोकळे द्वाड, पसरले..झाकत्यांत अटकर बांधा...
धडधडत्या वक्षी, दिठी काढुद्या नख्‌शी..मनगतांव माझ्या बसवा राघवपक्षी..अवघ्या मुशींत रिचवा बेगिन तुम्ही रसरशी...
लुटा कवळ्या तरनाईचा चंदा...
( ही राम कदमांनी संगीतबद्ध करून, दूरदर्शनच्या कार्यक्रमांत, माधुरी सुतवणेनं गायली होती.)
*****
हाड फोडते थंडी तरिही, थोडक्यांत असते गोडी..
राया जरा सैल करा मिठि थॊडी..
कनगींत भरुनिया दाणं तुमी निवांत..गोविंदविडा घ्या,देते लावुनि ! पंत..मन चुळबुळते तरि ठेवा त्याला शांतं...
वाकळ घेवू आंतुन, वरती पांघरुया घोंगडी...
आडसालि उसाची होइल साखर आंता..चतईच्यां वाकितं, हिरकणं बसवुनि देता ?..नजरेचं माज्या कसबं तुमी जाणता..
धुंद सुखाच्या, भरून आनल्या तुम्हासाठी कावडी...
गारटःआ असोनी, दमटपना कां वाटे ?..चोरटे स्पर्श शहार्‍याचे फुलविति कांटे..ठिणगीचा झाला वणवा, डोंगर पेटे...शमवायाला डोंब तुम्हि बरसा वळिवझडी...
*****
अरुण काकतकर.

Thursday, December 15, 2011

एक फडकती लावणी...


न्हाउनी, उभे लाउनी येशि सुस्नात
हाल करतेस, झटकुनी केस, वीज मगजांत
नितळ कृश पोट, पन्हाळी पाठ, ओलसर ओठ
निरि धरी छातिशी, वरी, कटीशी गाठ
झाकता उभारी, वस्त्रे अपुरी अंगा,
ही नार करी बेजार, थांबवा दंगा
कांति सावळी, गालि अवखळी,खट्याळी खेळे
चंचला नजर, करि ठार भाबडे भोळे
विखारी रात्र, अनावर गात्र, तांब नजरेंत
विरहाचि आग, काळजी, राग, हुर्दात...

Monday, December 5, 2011


’थप्पड’...
’थप्पड’ म्हणजे, लहान मूल फारच हट्ट करू लागले तर, ’कल्याणकारी’ क्रोधापोटी, आई किंवा वडिलांनी हलकेच गालावर मारलेली चापटी. शारीरिक इजेपेक्षा मानहानीकारक, मानसिक क्लेश देणारी.. ! ही जेंव्हा उलट्या तळव्याने, जरा जोरांत मारली जाते तेंव्हा ती गालावर आपली गुलाबी (किंवा ’वांगीरंगाची’) नाम(मात्र)मुद्रा उठविते.
असो... ! विनोदाचा भाग सोडू...
पण
शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, वीरभू, रांगडी माती पवित्र झाली
गड-दगडांच्या त्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला
उत्तुंग हिमांकित शुभ्र बुरुज राखाया, कणखर देशाची नित्य स्फुरतसे काया
मायभू चरणिच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी जवान सरसावला
गनिमाच्या या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले...
ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, गालांत हसत जिंकतो क्रुद्ध शत्रूला
असं सार्थ वर्णन लागू पडणार्‍या एका ऋजु व्यक्तीला कोण्या एका माथेफिरूच्या ’थप्पड’हल्ल्याला बळी पडावं लागलं या इतक दुर्दैव नाही. पण हा ’चप्पल-बूट्‌-हस्त’ ताडनाचा सिलसिला बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेंत सुरू झाला, अध्यक्षांवरील हल्ल्यांपासून. त्यामधे गोळीबारांत बळी पडलेले जागतिक कीर्तीचे राष्ट्रप्रमुख जॉन्‌ केनेडी, मार्टीन ल्यूथर्‌ किंग, इंदिराजी ! श्रीलंकेत, हल्ल्यांतून बचावले राजीवरत्न गांधी, पण मानवी बॉम्ब्‌नं पेरांबदूरमधे त्यांचा प्राण घेतला. त्यानंतर चिदंबरम्‌, आणि आता शरदराव...
आदरणीय शिवसेनाप्रमुख, महाराष्ट्राचा ’ढाण्यावाघ’, मराठी माणसांच्या स्वाभिमानाचे आधारवड बाळासाहेबांचे, शरदराव, राजकारणा पलीकडचे स्नेही. बाळासाहेबांची बहुतेक विशेषण त्यांनाही लागू होतांत. म्हणूनच त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा शिवसेनाप्रमुखांनी निषेध केला.  
प्रेषितांचे पाय मातीचे...ठीक आहे ’म्हण’ म्हणून. पण आधी मातीचे नुसतेच पाय. त्यांतून फोफावलेली विषवल्ली स्वत:ला प्रेषित म्हणवून घेते आजकाल..अशाच एका नेत्या(?)वरही, राष्टकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यांत अडलल्या मुळे, तिहारमधे नेतांना हल्ला झाला पण त्याचा साधा निषेधही कोणी केला नाही हो !).आणि मग त्याच माळेंत, महात्मा गांधींच्या समाधी समोर बसून केलेल्या चिंतन’ फिंतनाला विसरून, आपल्या वयायोगे प्राप्त झालेल्या अपेक्षित परिपक्वतेला विसरून, ’एकच ?’ असा अत्यंत चीड आणणारी ’आचरत कोटी करणार्‍या, ’सिद्धी’पुरुषअला आम्ही का लेखू नये ?
पण आपल्याकडे, हल्लेखोराच्या बिचार्‍या निरपराध कुटुंबियांना, नातेवाइकांवर, नंतर ज्या पद्धतीनं मानसिक, शारीरिक हल्ले होतांत तेही तितकचं गर्हणीय आणि निषेधार्ह. म्हणजे एकानं गाईची ’हिंसा’ केली म्हणून दुसर्‍यानं ’वासरा’ची करावी तसंच कांहीसं ! एकानं कांही विशिष्ट हेतून हिंसा केली म्हणून त्याची सर्व ज्ञाती वाईट ? मग त्याची घरदारं जाळणं, त्यांना रस्त्यावर आणणं ही कुणी शिकविलेली आणि आचरणांत आणलेली 'अहिंसा,...मग 'गांधी' टोपीखाली काळे धंदे करणारे वाईट, म्हणून गांधीटोपी घालणारा मुंबईचा डबेवाला वाईट ? अशी त्रैराशिक मांडणार्‍यांचे सडके मेंदू तर मग हिट्‌लर्‌पेक्षाही हिंस्र मानायला हवेत !
दीडशे वर्ष, ब्रिटिशांच्या सत्तेशी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणार्‍या कच्च्याबच्यांची, ज्यांत आमच्या नाशिकचा बाबू गेनू होता, पुण्याचे चाफेकर बंधू होते, नाशिकचे कान्हेरे, राजगुरूनगरचे राजगुरू, पंजाबातले भगतसिंह, मदनलाल धिग्रा होते. विसरलांत इतक्यांत ? आणि ’रानी झांसीवाल’ ? ’कित्तुर चेन्नम्मा’ ? अहो अजून उणीपुरी सत्तर वर्षही नाही झाली हो त्या हुतात्म्यांना अनंतांत विलीन होवून ! स्वत:ला फाशी झाल्यानं आपण एका निष्पाप स्त्रीला वैधव्याच्या खाईंत लोटून,  किंवा संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याला सुरुंग लावतो आहे असले विचार त्या क्रांतिकारकांच्या भडकलेल्या मनाला कधीच स्पर्श करू शकले नाहीत.... त्यांच्या डोक्यांय फक्त अखंड भारत, असेतुहिमाचल, पश्चिमेला अफगाणिस्तान सीमेपासून ते पूर्वेला चीनच्या सीमेपर्यंत हिंदुस्थान हे एकच स्वप्न होतं. ’स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..’ असं न्यायालयाला ठणकावून ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ असा सवाल करणार्‍या पुरुषसिंव्हाचा सक्रीय पाठिबा आणि वरदहस्त या ’क्रांतिकारकांच्या’ माथ्यावर होता.
'सारख' वारकरी' वारकरी' म्हणून आरडाओरडा करणार्‍या आय्‌बीएन्‌लोकमतवाल्यानं हे लक्षांत ठेवायला हवं की, वारीला जातांना, पांडुरंगाच्या नावाच्या गजरापेक्षा वारकरी, त्याच्या महान भक्तांचा, ज्ञान्नोब्बामाऊली-तुकाराम असा घोष करीत चाललेले असतांत. तुकोब्बाराय तर ' भले तरी देवू कांसेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी' ... अशा, योग्य तिथे आक्रमक व्हा असा संदेश देणारे, शिवछत्रपतींचे गुरू समर्थ रामदासांच्या समविचारी होते. महात्मा गांधींना नथुराम गोडश्यांनी, आधी हात जोडून, आपल्या अमानुषत्वाची लाज वाटून, माणुसकीला नमस्कार करून घातलेली गोळी ही पिस्तुलातून सुटल्यानंतर, पस्तीस कोटी जाज्वल्य देशप्रेमी भारतीयांची हृदयं विदीर्ण करीत त्याच्या ठिकर्‍या उडवीत, चिंध्या करीत, सरदार वल्ल्भभाई पटेलांसारखे ’सच्चे’, स्वकीयांच्या हिताला आणि आत्माभिमानाला सर्वोच्च प्राथमिकता देणारे,  फाळणीविरोधी, धुरंधर राजकारणी नेते,  त्यांच्या 'अखंड भारत'प्राप्तीच्या, आसुसल्या भावनांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडवीत, बावन्नकोटी रुपयांच्या नोटांच्या चिधड्या उडवीत पुढच्या प्रवासाला निघाली होती. हे कुणी ध्यानांत घेतल तेंव्हा ? अहो निरुपद्रवी घाबरट मांजरीला जरी कोनाड्यांत गाठायचा प्रयत्न केला तर ती, 'आपण वाघाची मावशी आहोत' या विचारानं, शत्रूच्या नरड्याचा वेध घेते. मग ही तर माणसं...गांजलेली पिचलेली माणसं होती. फाळणी नंतरच्या सिंध, पंजाबमध्ल्या विस्थापित जनतेच्या, सर्व संसारासकत गांवं सोडून जातांनाची ससे-होलपत ज्यांनी पाहिली आहे त्यांच्याही अंगावर शहारे येतांत नुसत्या आठवणीनं. मग तो’ काळा अनुभव’ प्रत्यक्ष घेतलेल्यांच्या हृदयांतली भडस कशी कोण जाणू शहणार ? 'क्रांतिकारकांच्या आईबापांना काय हौस होती आपली मुलं होरपळींत ढकलायची ?  मग लचके तोडू पाहाणार्‍या पाकिस्तान चीनच्या सैनिकांना संरक्षण देवून, त्यांना गीतेचे पाठ ऐकवून, अहिंसेची ही ज्योत (?) अशीच तेवत ठेवा की ? आणि माझ्या सैनिक टाकळीच्या, प्रत्येक कुटुंबातल्या, सैन्यांत पाठविलेल्या एकेका तरुण मुलाला, 'चिन्यांना कंठस्नान का घातल ? पाकिस्तान्याला गोळी का घातली ?' म्हणून न्यायालयांत खटले चालवून फाशी ठोठवा...!  कसं ?
सध्या देशाची लोकसंख्या आहे फक्त पस्तीस कोटी  नेते आणि कार्यकर्ते मिळून. बाकी सगळे, किडामुंगी सारख एक नगण्य आयुष्य, निसर्गानं जन्माला घातलं म्हणून आंणि आत्महत्येचं धाडस नाही म्हणून बापडे जगत आहेत...रोज विविध दिशांतून ’थपडा’खात, त्या दूषित पाण्याच्या घोटाबरोबर गिळत...’थपडा’ कधी नेत्यांकडून तर कधी कार्यकर्त्यांकडून. कधी ’दगड’ देवाच्या ढॊंगी’ भक्त बाबा-बुवे-(संधी)साधू, जरीमरी काळी जादूवाल्यांकडून तर क्धी, रक्तानं स्वाक्षर्‍या करायला लावणार्‍या, तथाकथित ’अंधश्रद्धा निर्मूलन(?) वाल्यांकडून, तर कधी, ’पाळीव प्राणी भूतदये’ (तो पिसाळला तरी ?... गंमतच आहे !) च्या ’भुतानं पछाडलेल्यांकडून, कधी जमीन माफिया तर कधी तेल माफिया, वाळू माफिया तर कधी होळी ते ख्रिसमस, वर्षभर विविध (अ)धर्म महोत्सवाच्या नावाखाली ’चंदा; गोळा करीत हिडणारे, आणि त्यांतून ’आर्थिक उन्नती’ साधत मिळालेल घबाड ’वाटून खाणार्‍या उद्याचे तरुण-तडफदार युवकांकडून...’थपडा..थपडा..आणि थपडा’ फक्त..
अहिंसा-तत्वाचे अध्वर्यू महात्मा गांधींच नाव धेत अनावरण, उद्घाटनाच्या निमित्तानं, स्वत:ची (निर्‌)लज्जा तलवारी उपसत क्षणोक्षणी अनावर होवून अनावृत्त करणारे गल्लीकर ते दिल्लीकर रोज झळकताय्‌त वृत्तपत्रांत, विविध वाहिन्यांवर आणि माध्यमं कमावताय TRP वाढवून त्यांतून रग्गड पैसा...मला इथं बादल सरकारच्या ’जुलूस’ या नाटकाची तीव्रतेनं आठवण होते...संसदेत मिली भगत जरून, ’हंगामा’ करीत, कोट्य्वधी रुपये रोज पाण्यांत घालत दोनीहीकडच्या बाकांवरचे, मतपेटींतून (?) की ’खोक्यांतून ? निवडून(?) आलेले, आणि एक ’टर्म्‌’ पूर्ण व्हायच्या आतच, ’कौन बनेगा करोडपती’ पेक्षाही अधिक वेगानं, गब्बरसिंव्ह कोट्याधीश होणारे ५८४...’सब अलबेल है ! चलो ! हटो !, सब अलबेल है’ अशा बरळत आरोळ्या ठोकत हातांतली लाठी किंवा ak47 चालवत हिडताय‍त, ’सारे जहाँसे अच्छा’ असलेल्या या ’हिंदोस्तां’त ! कुठं जायच पंच्याऐंशीकोटी किडामुंग्यांनी ?
मग उजाडते एक दिवस ’फ्रेंच्‌ क्रांती’, हिट्‌लर्‌, गोअरिंग, हेस्‌, स(उ)द्दाम हुसैन, गडाफीच्या जातकुळींतल्यांना बिळांतून, गटाराच्या पाईपमधून बाहेर खेचून, कद्रावलेली, पिसाळलेली जनता, उंदरा-कुत्र्याच्या मौतेनं मारते...नाईलाजानं...मनांत बेगडी ’अहिंसा जपत...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

Sunday, November 27, 2011


’संजीवन समाधी’
२३ नोव्हेंबर, कार्तिक वद्य त्रयोदशीला, सातशे पंधरावा समाधी सोहळा संपन्न झाला. श्रीमद्भग्वद्गीतेच्या अठरा अध्यायांतल्या संस्कृत सातशे श्लोकांचं सार, सर्वसामान्यजनांसाठी, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांतादि लेण्यांनी समृद्ध, प्राकृतातल्या नऊ हजार, सालंकृत ओव्यांमधे सांगीतल्यावर, शेवटी ज्ञानोब्बामाउलीनं, प्रसादाचं मागणं केल...कुणाकडे ? पंढरपुरच्या, इंद्रायणी काठी, पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर, कटीवरी हात ठेवून उभा ठाकलेल्या, सगुण साकाररूप विठ्ठलाकडे ? नाही... तर विश्वात्मकाकडे...
आणि हे मागणं फक्त नेवाशांतल्या लोकांसाठी होतं ? की फक्त आळंदीतल्या, की महाराष्ट्रांतल्या किंवा भारतांतल्या लोकांसाठी होत ? नाही. ज्ञानदेवांनी मागणं केल ते या केवळ पृथ्वीवरच्याचं नव्हे तर विश्वांतल्या प्रत्येक ’भूतमात्रा’साठी... भू म्हणजे उत्पन्न होणे..जन्म घेणे...
’हे विश्वरूप, निसर्गरूप, पंचमहाभूतरूप, अनंत, अरूप, अनाकलनीया...प्रसाद दे...सर्व भूत-प्राणिमात्रांसाठी...’
कारण, , निसर्गांतल्या कांही विषिष्ट गुणधर्म असलेल्या घटकांपासूनच जीव निर्मिती होते...आणि असे घटक, ह्या पृथ्वीनामक ग्रहावर उपलब्ध असल्यामुळेंच केवळ, इथं जीवसृष्टी आहे या वैज्ञानिक सत्याच पूर्ण आकलन ज्ञानदेवांना होतं. श्रद्धावान अशिक्षित समाजाला विश्वास वाटावा आणि त्यांना आपलं म्हणंणं पटवून देता याव यासाठीच फक्त त्यांनी ’विठ्ठल’ नामधारी, त्यांचा ’देव’सुद्धा स्विकारला, आळवला. मोठी माणसं जशी आपल्या लहानग्यांच्या भातुकलींतला काल्पनिक स्वयंपाक, त्याचं कौतुक करीत अगदी ’चवीचवी’नं खातांत...त्याला आनंद व्हावा, बरं वाटावं आणि मग पुढे त्यानं आपल ऐकावं यासाठी ? तसच कांहींसं...
काय मागितलं आहे पसायदानांत ?
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥
जनसामान्यांना भगवान युगंधरविरचित गीतेंतल्या तत्वज्ञानाची ओळख करून देण्याच्या विशिष्ट हेतूने सुरू केलेल्या किंवा तू  मजकडून करवून घेत असलेल्या साहित्यनिर्मिती प्रक्रियेंत मी जे योगदान, एखाद्या यज्ञांत आहुती दिल्याप्रमाणं दिलं आहे, ते गोड मानून घे, आणि मला प्रसाद दे
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे
दुष्टांची कुकर्मांची ओढ कमी होवून, सत्कर्मांची गोडी वाढू दे...विंचवाच्या नांगीतलं विष नाहीस होवू दे... विंचवाच्या ’नांगी’पेक्षा माणसाच्या ’मनांगी’चा विखार  कित्येक पटीन धोकादायक असतो...निर्दालन वाईटपणाच होवू दे...जिण्यातला चांगुलपणा वृद्धिंगत होवू दे...
दुरितांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥
पापाचा अंधार नाहीसा होवून, स्वधर्माचा सूर्यप्रकाश ओसंडू दे...इथं ज्ञानदेवांना ’धर्म म्हनजे ’संप्रदाय’ अभिप्रेत नाहीच मुळी...धर्म म्हणजे जसं...आईनं मुलांवर प्रम कराव, वडिलांनी त्यांचं पालन-पोषण कराव, शिक्षकांनी शिकवावं, शेतकर्‍यानं पिकवावं... माणूस म्हणून जन्मल्यावर ’माणुसकी’ हाच धर्म...तसा हा प्रत्येकाचा ’स्वधर्म’ जर प्रत्येकानं पाळला तर फक्त पुण्यच साचत जाईल. पापाला जागाच उरणार नाही...
मला जे मिळालं नाही त्याची मला खंत नाही, पण तुला जे मिळाल त्याचा मला आनंद आहे अशी भावना जेंव्हा परस्परांमधे निर्माण होईल तेंव्हा जीवांचं खरंखुरं ’मैत्र’...मित्रत्व, स्नेहभाव, एकात्मभाव, तादात्म्य निर्माण होईल...
वानगीदाखल उदाहरण...सचिनन शतक केलं किंवा अगदी सुंदर फटका जरी मारला तरी प्रत्येक भारतीयाच्याच नव्हे तर जगांतल्या प्रत्येक चाहत्याच्या हृदयांत आनंदाचा उचंबळ येतो...ते ’मैत्र’ अभिप्रेत असावं माउलींना......
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भू मंडळी । भेट तू भूता ॥
सर्वांच्या कल्याणाची अखंड कामना, इच्छा, अपेक्षा मनांत ठेवून जे’ईश्वर’ आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवणार्‍यां जनसमुदायाचा सागर विश्वभर उसळो...
प्रत्यक्षांत, विचार करून पाहा...आपण जे नाहीस होणार आहे, लय पावणार आहे, अस्तास जाणार आहे, म्हणजेच जे ’नश्वर आहे त्याच्या मागे धावत असतो...म्हणजेच आपण, ’नश्वर’निष्ठ असतो ’इश्वर’निष्ठ नसतो
चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचितामणींचे गांव । बोलते जे अर्णव । पियुषाचे ॥
मनांत नुसती कल्पना केली तरी प्रत्यक्ष देईल अशी ख्याती असलेला ’कल्पवृक्ष’, एक नाही, तर त्यांचे ’चला’ म्हणजे चालणारे स्थलांतरपात्र समूह, बगीचे, आणि चिंता,काळजी,भयमुक्ती देणारी हितचितक ’रत्न’, ज्यांचा शब्द म्हणजे, रंजल्या-गांजल्या जीवांचं शांतवन करणारं अमृतच जणू
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । जे सर्वाहि सदा सज्जन । सोयरे होतु ॥
ज्यांच अस्तित्व चांदण्यासारखं शीतल, निर्व्याज, निरपेक्ष आणि निष्कलंक आहे, जे शक्ति-आरोग्यवर्धक असून क्लेशदायी नाहीत, जे नेहमीच ऋजु, सौम्य, आल्हाददायक आहेत अश्या सुहृदांचा, आप्तांचा सहवास लाभू दे...
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । दृष्टादृष्ट विजये । होवावेजी ॥
अक्षर-साहित्यांत कार्यरत असलेल्या, ग्रंथ लेखन वाचन कथन यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उपजीविका करणार्‍या अभ्यासकांचं कल्याण होवो...
किबहुना सर्व सुखी । पूर्ण होवोनि तिन्ही लोकी । भजीजो आदिपुरुखी । अखंडित ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दान पसावो । येणेवरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
अविरतपणे त्या ’आदि-अनंत-रूपा’चं स्मरण करीत, कर्म करणार्‍यांना हा प्रसाद मिळाला तर मी समाधान पावेन...
तसं पाहिलं तर, पसायदानातल्या कुठल्याही ओवींतला एक चरण जरी प्रत्यक्षांत आला तरी सर्व-सहज-साध्य होईल. पण ज्ञानदेवांनी, द्विरुक्तीच नाही तर विविधांगी पुनरुक्ती करीत हे ’लोककल्याणार्थ’ दान मागितल आहे...
अखेरीस, ज्या प्राचार्य राम शेवाळकरांनी ’पसायदानां’तलं हे सर्व ’गूज’ (’गूढ’ ?) उलगडलं, त्यांचं स्मरण अपरिहार्य आहे...
*****

Tuesday, November 22, 2011


’अक्षरे’
कविवर्य मंगेश पांडगांवकरांच्या संगीतिकेतल्या ,’शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ आणि’ माझे जीवन गाणे’ अशी दोन गीतं, तत्कालीन आकाशवाणीसाठी पु. ल. देशपांड्यांनी संगीतबद्ध केली आणि आपल्या खास शैलींत, मधली आलापी, गमकाच्या अंगानं करीत, गावून पंडित जितेन्द्र अभिषेकींनी ती अजरामर करून ठेवली. दोघांच स्मरण, ८ नोव्हेंबरला सगळ्या  साहित्य-संस्कृती-संगीत रसिकांनी केलं.  अनुक्रमे, जन्मदिन आणि पुण्यतिथी निमित्त. ’वैशाख वणवा’ चित्रपटांमधलं, रमेश देव आणि जयश्री गडकर यांच्यावर, पार्श्वगीत म्हणून चित्रित झालेलं, ’गोमु माहेरला जाते रे नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा’ हे सुद्धा ’बुवां’च्याच आवाजांतल, स्पष्ट श्ब्दोच्च्चारानं अर्थ अधोरेखित करीत म्हटलेलं, रुपेरी पडद्यावरचं त्यांचं, बहुतेक पहिलंच गीत. त्याच ’आकाशवाणी’ दिवसांतलं... ’आकाशवाणी’ साठी अभिषेकींनी, कविवर्य सुरेश भटांचं ’मेंदीच्या पानावर...’ हे गीत स्वरांकित करून उषा पंडित...देवकीची आई...कडून गाऊनही घेतलं होतं, हे अनेकांना माहीत नसेल. नंतर ’प्रथितयश’ झालेल्या अनेक कलाकारांची ’पहिली रोजी-रोटी’ देणार्‍या ’आकाशवाणी’तल्या दिवसांतचं !
नाट्यसंगीताला नवा रंग देत, बहराला आणणारे अभिषेकी वरकरणी अतीशय गंभीर पण मुळांत सर्वार्थानं खूप रसिक आणि मिश्किल व्यक्तिमत्व होतं. संस्कृत साहित्याचा चांगल्यापैकी अभ्यास. विशेषत: शब्दोच्चार, अगदी शास्त्रीय बंदिशी (रचना) मधले सुद्धा, स्पष्ट आणि अर्थवाही करण्यांचा त्यांचा कटाक्ष असे. कथालेखनाचा सुद्धा त्यांचा व्यासंग होता. राहाणी-वागणुकीतला साधेपणा इतका की संगीतसभा, महोत्सव यांसाठी प्रवासाला जातांना, बुवा नेहमी  साथीदारा आणि शिष्यांसह, रेल्वेंत एकाच श्रेणीच्या बोगींतून जात असत. सादरीकरणांतला प्रामाणिकपणा, शिस्त, गांभिर्य यांचा पगडा शिष्यमंडळींवर, साथीदारांवरपण आपोआपच  जाणवायचा. गाणं सुरू व्हायच्या आधी कमींतकमी अर्धातास ते बैठक घालून साथीदारांसह तयार असायचे. तानपुरे सुरांत लावून तयार असायचे. (पडदा उघडल्यावर, अर्धा-पाऊणतास तानपुर्‍यांशी झगडणारे, अगदी राष्ट्रीय कीर्तीचे प्रथितयश गायक आणि त्यांच्या ...फक्त...त्याच सवयी घेतलेले त्यांचे शिष्योत्तम मी इतके पाहोलेत, की नमनाला सुरुवात व्हायच्या आंतच श्रोत्यांच्या डोळ्यांतून घडाभर पाणी सांडलेलं असायचं, म्हणून हा खास उल्लेख). मफिली दरम्यान शिष्य़ांना मधे गायला भरपूर संधी देवून त्यांच्याकडून गायल्या गेलेल्या आलाप, बोलतांना, तानांना यथोचित दाद देण्यांत त्यांनी कधीच कंजूषपणा दाखविला नाही.
बुवांच्या नाट्यसंगीत संयोजनांतले महत्वाचे टप्पे म्हणजे, भावसंगीताला त्यांनी अत्यंत सहजतेनं नाट्यसंगीतांत सामावून घेतलं. त्यामुळं नाट्यसंगीताला एक नवा आयाम तर मिळालाच शिवाय नाटकांत ’आळवल्या’ जाणार्‍या अनिर्बंध ’गायकी’ला एकप्रकारची शिस्त मिळाली  ’मत्स्यंगंधा’ मधली, ’गर्द सभोती रान साजणी, मी तर चाफेकळी’, किंवा ’तव भास अंतरा झाला, मन रमता मोहना’ ही दोनच गाणी जरी आठवलीं तरी पटेल. शिवाय ’विकल मन आज झुरत असहाय’, ’कांटा रुते कुणाला’ अशी कितीतरी भावगीत आणली बुवांनी नाटकांत. ’लेकुरे उदंड झाली’ किंवा ’बिकट वाट वहिवाट’ मधली, पूर्वध्वनिमुद्रित वाद्यमेळा (Pre-recorded score) बरोबर, श्रीकांत मोघ्यांसारख्या समर्थ कलाकारानं सादर केलेली गाणी हा आणखी एक’ बुवांच्या प्रायोगिक संगीत -नियोजन-प्रक्रियेंतला महत्वाचा यशस्वी टप्पा. ’कट्यार काळजांत घुसली’ या नाटकांतल्या सर्व पदांचा, बुवानी गायलेला Track जर कुठे ऐकायला मिळाला तर अवश्य ऐका. मी ज्या काळांत हे नाटक बघितलं...शंकर घाणेकर ’राग-मालिका’ सादर करायचे त्या काळांत...त्यां काळांत, पडदा उघडण्या पूर्वी प्रेक्षक प्रेक्षागृहांत येत असतांना, हे ध्वनिमुद्रण लावलेलं मी अनेकदा ऐकलं आहे.  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ’ययाती आणि देवयानी’ मधलं, ’सर्वात्मका, सर्वेश्वरा’चं संगीत-नियोजन आणि गायन हे तर बुवांच्या, पक्क्या अध्यात्मिक बैठकीचं प्रत्यंतरच प्रत्येक वेळी देत असे, आणि त्याच रंगावृत्तीतलं,’ हे सुरांनो चंद्र व्हा’ हे त्यांच्या संगीत नियोजनाच्या शास्त्रीय बठकीच्या सखोलतेचं ! त्यांच्या, ’अबीर गुलाल, उधळीत रंग...’ सारख्या अनेक संतरचना,बरोबरच आधुनिक संत, कविवर्य ’बाकीबाब’ बोरकरांची, ’नाहि पुण्याची मोजणी, नाहि पापाची टोचणी’ किंवा अशोकजी परांजप्यांची ’कैवल्याच्या चादण्याला भूलला चकोर’  या रचनांमधली उत्कटता...कशी कोणी विसरणं श्यक्य आहे. तशीच बकीबाबांच्यांच ’कशि तुज समजावू सांग, का भामिनि धरिशी राग’ ह्या रचनेंतलं आर्जव, विनवणी...क्या बात है सर !!
’नको जन्म मरण आतां, नको येरझार
नको ऐहिकाचा आतां व्यर्थ बडिवार’
म्हणत, ९८ मधे, बुवा  फारच लवकर, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या अद्वितीय स्वरावलींपासून पोरक करून गेले, बाकीबाबांच्या पंक्तीत थॊडा बदल करून
’विरले सगळे सूर, तरीही उत्तर रात्र सुरेल
स्वरावलींची तरिही हृदयी, तशीच ओलं उरेलं’
असं म्हणावसं वाटतं...
आमराइतुन गातो कोकिळ, दडतो पानांआड
आभाळाशी स्पर्धा करिती, हिरवे खेटुनि माड...
राउळांतुनी घुमत नगारे, पवित्र घंटानाद
टाळमृदुंगासवे आर्तशी सुरेल अभंग साद...
लाल मातिची विरते सीमा पुळणिंत ! सागर साक्षी
लाट किनारी खेळ खेळता रेखुन जाई नक्षी...
मंगेशा अभिषेक कारणे अवतरली स्वरगंगा
गाज गभिरशी जिंकुन घेई रसिकाहृदयी जागा...
टिपुन आणिले अमृतकण, शोधून मंदिरे नाना
भावस्वर गहिर्‍या रंगांचे विणून केल्या रचना...
वरकरणी जरि असे मुनीश्वर अंतरि इंद्रधनू
रती-विरक्ती-शक्त्यासक्ती मयसभाच ही जणू...
अनुयायांवर केली माया, अशी गुरूची कृपा
परिक्रमा घडविली स्वरांची, दावित अनंत रूपा...
ज्ञानाच्या आसक्तीपोटी कसे लोटले जिणे
माधुकरीचे घास रिचवुनी, कंठि रुजविले गाणे...
कृतज्ञता जपली हृदयी जरि पैलतिरीची हांक
दमड्यांचा ना विचार केला, भागविली स्वरभूक...
राजाश्रय ना कधी मिळाला, खंत कधी ना केली
जणू हलाहल पचवुनि सहजच अमृतवाणी सजली...
विविध सजविले कवी स्वरांनी, वेधुनि भावार्थाला
बाकिशब्दसम गंधाराच्या स्वयंभु प्रकटार्थाला...
सय स्नेहाची नकळत करिते आर्द्र पापणी कांठ
कृपा एक की पुत्राकरवी नितनूतन स्वर भेट...
*****
अरुण काकतकर
24ak47@gmail.com
 

Wednesday, October 19, 2011

दृष्टिहीन दिवस किंवा श्वेतछडी...व्हाइट्‌केन्‌...दिवस...
१९३० मधे युरोपांत एका छायाचित्रकाराला अपघातानं दृष्टिहीनता आली. गर्दीत किंवा रस्त्यावर चालतांना त्याला अडचणीचं व्हायला लागल्यावर त्यानं एक काठी जवळ बाळगली. पण रस्त्याच्या काळ्या रंगांत काठी स्पष्ट दिसेना तेंव्हा त्यानं त्या काठीला पांढरा रंग दिला. आणि
व्हाइट्‌ केन्‌ किंवा श्वेतछडीचा जन्मझाला.
पण पहिल्या महायुद्धानंतर म्हणजे १९३१ नंतरच ह्या काठीचा खरा पसार, पचार झाला. १९६४ मधे दृष्टिहीनांसाठीच्या अमेरिकेतल्या राष्ट्रीय मंडळाच्या सुचनेवरून सेनेट्‌नं ६ ऑक्टोबर्‌ रोजी ठराव करून, तत्कालीन अध्यक्ष लिंडन्‌ बी, जॉन्सन्‌ यांना, या काठीला राष्ट्रीय मान्यता देण्याचे अधिकार दिले आणि १५ ऒक्टोबर्‌ हा जागतिक व्हाइट्‌ केन्‌ दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश अध्यक्षांनी काढला
ही श्वेतछडी आधार-काठी म्हणून वापरांत न आणता गर्दीत किंवा रस्त्यांत रहदारीमध्ये दृष्टिहीनांना वावरण सुकर व्हावं म्हणून सुविधा-स्वरूप वापरण्यांत येवू लागली. त्या श्वेत वर्णावर जर दोन आडव्या लाल रेषा असल्या तर ती व्यक्ती कर्णबधीर-दृष्टिहीन आहे असं मानण्यांत येवू लागलं.
काठीच्या तळाशी असलेला ३..४ इंचाचा लाल रंग कदाचित, ती पांढर्‍या पार्श्वबूमीवरही स्पष्टपणे दिसावी ह्या हेतूनं पुढे दिला गेला असावा.
अवकाशाचा स्थायीभाव कोणता ? अंधार की उजेड ? अर्थातच अंधार ! कारण प्रकाशाला, उजेडाला स्रोत आवश्यक असतो. अंधार असतोच सर्वत्र,,,सर्वदूर...प्रकाशाला सीमा, मोजमाप असत...पण अंधाराला ना सीमा, ना मोजमाप
आपण या जगांत अस्तित्वात यायच्या आधी पण अंधार... आणि आपलं अस्तित्व संपल्यावर पण अंधारच.
आपल्याला एखादी वस्तू दिसते म्हणजे काय ? तर त्या वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होवून आपल्या बुबुळांद्वारे आंत नेत्रपटलावर पडतो आणि नेत्रपटलातल्या संवेदन-वाहिका...नर्व्ह्ज्..तो संदेश मेंदूला देतांत...निमिषार्धात...आणि आपण ती वस्तू पाहातो
या जगांत अनेक प्राणिमात्र निसर्गानं, कांही तरी लौकिकार्थानं कमतरता असलेले जीव, जन्माला घातलेत आणि ते आपलं आयुष्य, सभोवतालांत, व्यवस्थित जगताहेत. उदाहरणार्थ, सर्पाला म्हणे श्रवणेंद्रिय नसते, मासा जळांत पोहोतांना तोंडावाटे पाणी घेउन कल्ल्यांतून बाहेर सोडतांना म्हणे त्यांतला प्राणवायू ग्रहण करतो. कासवी आपल्या पिलांना, आपल्या दृष्टीनं दूध पाजते असा दृष्टांत खुद्द संतश्रेष्ट ज्ञनेश्वरांनीच दिलाय. अगदी माणसांत सुद्धा, लौकिकार्थी हाती-पायी धड असूनसुद्धा, काळीज किंवा मन नसलेले नमुन्यांचा आपण क्षणोक्षणी अनुभव घेतोच की !
काहींना डोळे असतांत, घारे, भुरे, तपकिरी रंगाचे कधी भृंगाच्या काळ्याभोर अंगाचे. पण त्यांना नजर किंवा दृष्टी असेलच याची आपण खात्री देवू शकतो ? कान आहेत पण ते हलके नाहीत याची ग्वाही देवू शकतो ? नाक आहे पण ते फक्त सुगंधाचाचं वेध घ्रेईल असं छातीठोकपणे सांगू शकतो ?
बीदॊवेन्‌हा जागतिक कीर्तीच्या संगीतकार, त्याची सुप्रसिद्ध ९वी सिंफनी रचे पर्यंत, हळूहळू श्रवणक्षमता कमी होवून नंतर ठार बहिरा झाला होता पण त्या नंतरही त्यानं केलेल्या रचना तोडीस तोड आहेत.
हात नसतांना, पायांनी संवादिनी-वादन करणारे, उत्कृष्ट पदाक्षर असणारे, तोंडात ब्रश्‌धरून अप्रतिम रंगसंगती साधणारे कांही चित्रकारही आहेत. कांहीवेळा आपण डोळे उघडे ठेवून समोरचं पाहात नाहीच. मनांनंच दुसरं कांहीतरी पाहात असतो. तस हे आपले बांधव प्रज्ञाचक्षूंनी पाहात असतांत. त्यांत वकील आहेत. संगीतकार, गायक, वादक आहेत. नागपुरचे, प्रथितयश संगीतकार गायक, व्हायोलीने-वादक प्रभाकर धाकडे हे त्या पैकीच.
या आपल्या बांधवांसाठी मुबईतली स्नेहांकित हेlल्प्‌लाइन्‌ ही संस्था वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवीत असते. म्हणजे परीक्षार्थींना लेखनिक निळवून देणे, कविता लिखाणाच्या, वाचनाच्या, गाण्यांच्या स्पर्धांपासून ते अगदी दृष्टीहीन, संसारी गृहिणींच्या पाककला स्पर्धांपर्यंतचे हे उपक्रम त्यांना जगण्यातल्या, आणखी एक आगळा आनंद मिळवून देतांत.
दोन दिवसांनी सुरू होणार्‍या दीपोत्सवांत, या आपल्या सारख्याच, पण निसर्गानं नेत्रांतल्या दृष्टिज्यातीपासून वंचित ठेवलेल्या, संवेदनाक्षम मित्र-मैत्रिणींना सहभागी करून घेवून, नेत्रदानाचा संकल्प करून, दृष्टिहीनतेच्या नरकासुराचा नायनाट कण्याचं पहिलं पाऊल उचलूया...
त्यांना सुद्धा दाखवूया...
रांगोळीचे रंग, रोषणाईचे अंग
नक्षीमधल्या रेषा, देखाव्याची भाषा
प्रकाश-झोतांचे विभ्रम, पणत्यांची चमचम
हसणारे चेहेरे आणि उजेडाची दारे
                उजेडाची दारे...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

Thursday, September 22, 2011

’सुगी’


दरसाल, हरमोसमाप्रमाणे, कृषिभूषण, शेतीनिष्ठ वगैरे पुरस्कारांची घोषणा, वृत्त-वाहिन्यांवरून व्हायला लागली ! नाई म्हणताम्हणता बरा पाऊस झालाय्‌...बळिराजाच्या मनासारखा...हां, आता कुठं ’उन्नीस-बीस’ व्हायचच, पण कारभारणीच्या मनांत ’बत्ताशे’, ’लाडू’ वगैरे नक्कीच फुटत असणार...मग तिनं, का नाइ म्हणावं...

पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान,
वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान
दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर,
गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर
सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी,
पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी
कधीपासुन टोपपदरी घ्याव म्हणतेय्‌ मी,
बैलजोडी आणत्याल नवी तवा बरूबर जाइन मी बी,
लेक लई हुश्शार माझि, तिला कराय्‌चि आहे डॉक्टर, खंबीर वाश्यांच्या घर, पोरं चढविल झळाळ त्यावर

Monday, September 19, 2011

’लता’ जीवेत्‌ ‍शरद:शतम्‌

 ’लता’ जीवेत्‌ शरद: शतम्‌
संस्कृत, मराठी अक्षर-साहित्यातल्या. अगदी पुराणकालीन भगवद्‌ गीतेपासून ते बाराव्या शतकातल्या भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीपासून ते अर्वाचीन काळांतल्या साहित्यामधल्या सोनसळी शब्दकळांना, कंठातल्या ज्वालाफुलांमधून तावून सुलाखून पार करीत, झळाळी देत, उजळत, रसिकांच्या तृषार्त श्रवणेंद्रियांना सामोरा जातोय, गेली जवळपास पांच तपं, एक अद्वितीय, नादब्रह्मातल्या प्रत्येक श्रुतीचा मापदंड असलेला ’लता’चा स्वर. खर्जा पासून, मंद्र, तार आणि कधीकधी अतितारापर्यंत, जवळपास सव्वादोन सप्तक, ’सहज-प्रवाही’, शंखनादाची गभीरता, ललनेच्या कांकणांच्या नादातलं आश्वासन, मुग्धेच्या पैंजणांतल्या किणकिणीची निरागसता, शयनेषु रंभा’ नायकिणीच्या चांळांच्या ठसक्यातलं शृंगारिक आवाहन,  मंदिरातल्या घंटानादाच पावित्र्य, रणांगणातल्या असिधारेचं ओज आणि स्फुल्लिंग, अशी विविधरंगांची, घाटांची लेणी ’एकसमयावच्छेदेकरून’ मिरवणारा ’लता’चा स्वर...कितीकिती, कुणीकुणी आणि कायकाय लिहावं, बोलावं...सगळ सगळ अपुरच पडणार..स्वर-शब्द-भावांपलीकडलं आहे हे सगळ...अवकाशाला ओंजळीत धरण्याच्या व्यर्थ प्रयत्नांसारखं...या विशेषणांना सोदाहरण सिद्ध करायच म्हटल तर अगणित ग्रंथ अपुरे पडतील आणि ’दशांगुळे उरला’ अशी अवस्था होईल...
’अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।’
सार्थ झाला हा चरण, जेंव्हा त्या’अक्षरा’ना आंजारत-गोंजारत, कुरवाळलं, ’लता’च्या स्वरांनी...
सागराची गाजेशी, मेघांत कडाडल्या विजेशी,, मनमोहन मेघश्यामाच्या ओठांवर विसावलेल्या अलगुजाशी, युगानुयुगाचं नातं सिद्ध करणारा ’लता’चा स्वर...
लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांच किती महद्भाग्य आहे, हे तुला कस कळावं ?
        नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
               अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
        सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
        देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
              गाईच्या डोळ्यांतलं आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
       जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?
गीतेच्या अध्यायांतला, ज्ञानदेवांच्या विराण्यातला किंवा हरिपाठाच्या किंवा तुकयाच्या अभंगातला, संस्कृत, प्राकृत, मराठी मधाळ शब्द, असो किंवा गालिब, राजा मेहेंदी अलि खान, मीर तकी मीर, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, शैलेन्द्र, कैफी आझमी यांच्या शायरीतला ’सुरे’च्या कैफांत दडलेला ऊर्दू शब्द असो किंवा मीरा-सूर-कबीर ते पंडित नरेंन्द्र शर्मा यांच्या भजन-दोह्यांतला सगुण, मधुरा-भक्तीतं भिजलेला शब्द असो,
’लता’चा स्वर त्यातल्या अभिप्रेत ध्वन्याथ, व्यंग्यार्थ, दृष्टांत, श्लेष, रूपक या शुष्क व्याकरणी संज्ञांच्याही पलीकडचं कांहीतरी सांगून जातो...
कारण, ’लता’च गाण म्हणजे नुसतं गाणं नसत...
             शब्द-स्वर-भावांपलीकडचं ते एक ’सांगण’ असतं
कथेतली व्यथा, व्यथेतली आर्तता, कवितेतली प्रीती, त्यांतली उत्कट अनुभूती यांना, जाई, जुई, हिरवा, कवठी, सोनचाफा, चंदनाच्या मंद सुगंधाचं देण असतं...
अहो ! नुसतं ’शिवकल्याण राजा’ ऐकलं तरी कोण कोण भेटत आपल्याला ’लता’च्या स्वरांतून ?
समर्थ रामदासांपासून, कवि भूषण, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमागज, ते अगदी कविवर्य शंकर वैद्यांपर्यंत, ’मर्‍हाठी’ काव्यप्रतिभेचे समस्त मानदंड...
’गुणि बाळ असा..’, ’वेडांत दौडले वीर मराठे सात...’, ’निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु...’
कायकाय म्हणून आठवावं ? हे तो...    
हे सप्तसुरांचे हृदय आणि माहेर,
 ’मॉं’ सरस्वतीच्या वीणेचा शृंघार,
गोपाला हाती वेणु आर्तशी मंद्र,
श्रीहरिच्या शंखातील खर्ज गंभीर
ही शिवतेजाची लखलखती असिलता,
ही उमा-रमेच्या हृदयी वत्सल गाथा,
ही विनायकाच्या शब्दामधले ओज,
अन्‌ अग्रज कविच्या उर्मीमधली वीज
ही ग्रीष्मानंतर श्रावणसर, गारवा,
अन्‌ गाभार्‍यांतिल मंद तुपाचादिवा,
हा स्थीरस्वर स्वरनिधीत दीपस्तंभ,
हा नादमंथनोत्तरी दिव्यश्रुतिकुंभ,
हा मांगल्याचा पावनक्षम गंगौघ,
हा प्रेम, विरह अन्‌ करुणेचा आवेग,
हा ज्ञानेशाच्या ओवीचा परिमळू,
हा तुकयाचा अन्‌ अभंग अक्षय बोलू,
अवतरली मीरा पुनश्च अवनीवरी,
रघुरायकृपेने समर्थ ही वैखरी
*******
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com
www,targetpointblank.blogspot


Tuesday, September 6, 2011

अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव... ’अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’


अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...
तुझ्या पूजनांत । आनंद सोहळा । भाव मनी भोळा । वसे सदा ॥
दहाच दीसांत । लावलासी लळा । गौरीच्या वेल्हाळा । विघ्नहरा ॥
जातांना माघारी । वळून रे पाही । भिजू पाहे बाही । आसवांनी ॥
हातावरी तुझ्या । दह्याची कवडी । देताना भाबडी । भांबावती ॥
ओसरता कल्लोळ । उरे मागे गाज । अस्तित्वाचा षड्ज । रेंगाळतो ॥
शुभसूचक उक्ती । बाहूंमधे शक्ती । हृदयांतरि भक्ती । सर्वदा दे बा ॥
’कृतीविणा नाही । भक्तीला बा अर्थ’। शिकवण सार्थ । देई सर्वां ॥
विरह-अष्टक । स्वीकारा गणेशा । करा दशदिशा । निरामय ॥’

अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’
देखिला ना कधी म्यां देव । परि अनुभवला भक्तिभाव ।
दुर्दम्य निश्चय असंभव ।  सहस्रावधि ललनांचा ॥
निश्चयाच्या महामेरू । सकल कुटुंबाच्या आधारू ।
हृदयी वत्सल शरीरी चारु । माता, भगिनी गौरी या ॥
गणेशा आधी उच्चार, गौरी । सर्वज्ञात चराचरी ।
नरास भारी पडते नारी । यशस्विते ! अनुभवा... ॥
गणपति-अथर्वशीर्ष पठणाचा घोष करीत रात्रभर चालत पहाटेपहाटे ’श्रीं’च्या चरणी सेवेसाठी, मंदिरांत ’समूर्त, सगुण’रूपा समोर रुजू होण्याचे, आदल्या दिवशीचे मनसुबे,, श्रावण सरतासरता त्याच्या विरहांत, कोसळणार्‍या, भादव्यातल्या धुंवाधारांनी, अक्षरश: ’वाहून’ गेल्यावर सुद्धा , स्त्री-सुलभ हिरमुसलेपणा त्यजून, जवळ जवळ बारासहस्र पुण्यपत्तनस्थ ’गौरी’ सकाळी प्रार्थनास्थळी पोहोच्ल्या ! त्यांनी ’एकसमयावच्छेदेकरून’ अथर्वशीर्षाचा पठण-घोष संपन्न केला. बालिकांपासून, वृद्धांपर्यंत, सर्व जाति-पंथांच्या पलीक्डे जावून, हा उपक्रम निर्विघ्नपणे. निर्वेध पार पडला.
घोषाची महती आणि कीर्ती किती ? पूर्वी युद्धांत, योद्ध्यांना स्फुरण देण्यासाठा, घोष पथक ज्यांत शंख, तुतारी, शिंगे यासारखी उच्च-ध्वनिकंपनसंख्या असलेली फुंकवाद्य तर खर्ज-गंभीर नादाची पण दूरवर ऐकू येणार्‍या नगारे, पडघम, ढोल, ताशे अशा चर्मवाद्यांचा समावेश असायचा आजसुद्धा आप्ल्या सैन्यदलांची घोषपथक ख्यातकीर्त आहेत.. इतकच काय तर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी, होलिवुड‌ निर्मिती, ’अ क्लोज्‌ एन्‌काउंटर्‌ ऑफ्‌ दी थर्ड काइंड्‌’ या इंग्रजी चित्रपटांत सुद्धा, परग्रहावरील ’जीवां’ना आवाहन करण्यासाठी, जगांतल्या विविध देशांत धर्मगुरू, साधू, सामान्यजन ’घोष’च करतांना दाखविले आहेत. कसला घोष माहीत आहे ? अवकाशाचा, स्वयंभू अनाहत अनुनाद ॐकाराचा..’द लॉंगेस्ट्‌ डे, चित्रपट सुरू होतांना ऐकू येतात, नगार्‍यावर वाजवलेले तीन र्‍ह्स्व आणि एक दीर्घ आवाज, म्हणजे ’थ्री लॉंग्‌ अन्द वन्‌ शॉर्ट्‌’...मोर्स्‌कोड्‌ मधे ’व्ही’ अक्षरासाठी पर्याय, अर्थात ’व्हिक्टरी’साठी, मित्रराष्ट्रांच्या फौजांनी केलेलं ’नॉर्‌मंडी बीच्‌ इन्व्हेजन्‌’, ’व्ही’ फॉर्‌ व्हिक्टरी ! संधी मिळाली तर चित्रपट जरूर बघा हे चित्रपट !
सर्वसामान्यांची तळमळ, त्यांच्या व्यथा व्यक्त करण्याच्या पद्धतीततला हा सकारात्मक बदल, जाळपोळ, दंगली, हिंसाचारापासून दूर नेणारा, खरोखरच कौतुकास्पद ! इप्सित साध्यासाठी साधन, हे अहिंसात्मक असूं शकतं हे या महिलांना कुठल्या प्रशिक्षणवर्गांत जावून शिकावं लागलं नाही कधी ! अर्थात ऐहिक सुविधांमधे वृद्धी असल्या उपक्रमांमुळ होईल किवा नाही याची माझ्या, ’अंधश्रद्धाविरोधी’ मनाला खात्री नाही...अहं, होणार नाहीच, याची नि:शंकपणे मी ग्वाही देतो ! पण या सर्व माउलींनी गणपतिअथर्वशीर्षाच्या, अगदी फलश्रुतीसह, केलेल्या या पारायणामुळं, त्यांच्या पाल्यांचे श्ब्दोच्चार सु्धारण, शब्दसंपदा वृद्धिंगत होणं..उदाहरणार्थ:
कर्ता, धर्ता, हर्ता, वक्ता, दाता, धाता ही विशेषण...अवपश्चात्तात म्हणजे पश्चिम पासून पूर्व, उत्तर, दक्षिण, उर्ध्व आणि अधर...वरची आणि खालची दिशा... यासह दशदिशा वगैरे अनेक शब्द...
कुठल्याही निश्चयाबाबत, दृढ ’श्रद्धे’बाबत, पाठांतराबाबत...ज्याची आजकाल वानवा आहे... बालकांची विद्यार्थ्यांची, आस्था जागृत झाली तरी निर्गुण निराकार वगैरे ’बाप्पा’ पावले म्हणायला हरकत नाही... अर्थात ’मराठी’चागलं येत म्हणून अर्थार्जनांत वृद्धी होण्याच भाग्य, ’मर्‍हाठी’ तरुणांना कधी लाभणारं आणि लाभणार का ? हा प्रष्ण सुटणार कधी...असो...
गेले दहा दिवस, समाजमनांत ’उत्सव-सौदामिनि-संचार’ करणारी ही ऊर्जामूर्ती, आज तिच्या ’मूलस्थानी’ जळांत, पृथेंत एकरूप होत मिसळून जाणार...
म्हणून हा अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...




Friday, August 26, 2011

’लता’, सचिन’, ’अवयवदान’, ’अतर्क्य-था’


’लता’
लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांच किती महद्भाग्य आहे, हे तुला कस कळावं ?
        नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
               अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
        सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
        देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
              गाईच्या डोळ्यांत आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
       जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?
हे सगळं व्यक्त व्हायला मला कांही कुठल्या वाहिनीवरच्या कार्यक्रमाची गरज नाही !
****
’सचिन’
आज पराक्रम सोन्याच्या कोंदणी । चाहात्यांचा आनंद वनी भूवनी ।
क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी  ?
ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधारा-स्वरांची भाषा ।
पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥
त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र ।
’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥
***
’समीक्षा’
जे जे होईल दृश्यमान । नीर-क्षीर विवेकाचे ठेवून भान ।
आशय-तंत्राचा सन्मान वा ताडन । करेन मी सदरामधे ॥
जे ज्या रूपी अवतरे । वर्णावे त्यासि ’गोमटे-गोरे’ ।
ऐसी अपेक्षा न ठेवणे  बरे । मजकडून, जाणिजे ॥
आम्ही, चित्रवाणी व्यावसायिक । ’दृश्यिकेस’ लावुनी अक्ष एक ।
कधिहि न होता अतिभावुक । आकृतीबंधास रेखितो ॥
चौकटीत विसावे आमुचे विश्व । त्रिमिति देती पृष्ठ-पार्श्व ।
त्यामधेच प्रकटते कर्तृत्व । ’पट’करी, दिग्दर्शकाचे ॥
परि यंत्राहुनि ज्येष्ठ तंत्र । त्याहूनही श्रेष्ठ गर्भित मंत्र ।
तोचि झिरपतो हृदयापर्यंत । ऐसी आम्हा शिकवण ॥
****
’अवयवदान’
डॉ. लहान्यांनी, देशांतल्या दृष्टीहीनांची,  डोळ्यांची गरज आणि उपलब्ध दाते, यांच गणित कसं व्यस्त आहे, हे सांगितलं...पण ’डोळ्यांपेक्षा .’दृष्टी’ची गरज...डोळसांपैकी ९९% जनतेला विशेषत: राजकारणी, नेते, तथाकथित पुढार्‍यांना..कशी आहे हे सर्वज्ञात आहे. नाहीतर, माझी एक अम्ध मैत्रींण म्हणते त्या प्रमाणे,
          जांणीव ध्वनी-स्पर्शाची का असते आम्हां पुरेशी ?
          वर्णने छान तुम्हि करता, मग वाटे नजर हवीशी
          जग ’सुंदर’ बघण्यासाठी, डोळ्यांची वाट ’पाहावी’,
          दृष्टीस ’यातना’ पडता, नजरेची भूक मिटावी...
          भ्रमनिरास झाला तर मग, त्यापरते दु:खच नाही
          डोळ्यांच्या खाचांमधल्या, अश्रूंनी भिजेल बाही...
                              अश्रूंनी भिजेल बाही
****
’अतर्क्य-था’
विंदाच्या कवितेतल्या सारखं
परत परत तेच तेच , मालिकांमधले डाव..पेच
याला मार, त्याला ठेच, ’कथा’ (?), (मालिका लांबविण्यासाठी) चहूबाजूंनी खेच...
गरीब गाय काशी ,तिची अचानक झाली ’झांशी’ (म्हणजे ’झांसा’ देणारी)
टीआर्‌पी साठी बाबा, तुझी दिसतिया कासाविशी...
****

 



Thursday, August 25, 2011

’व्यथा’, ’आषाढ,, ’शिवस्तुती’


’व्यथा...’
मला बी वाइच होउद्या म्होरं, जायचय्‌ बघाया शिंगापुरं
मोडा टाक, नी सांडा शाई, अशी संधी पुन्यांदा यायची नाई
चार बुक नाई, लिवली तरी चालल, निवडून या मंग बगा चक्रच फिरल
’उंडण फिंडण मला नग नग, सिंगापुरच्या ’रातींचं’ पाह्यचय जग
थोडाफार पैका खर्चिन खरं ! पर पाहनारचं बा म्या शिंगापुरं
माग येक भामटा ’चला’ म्हनला ’भाऊ’, शिगणापुरला एकदा जावनच येऊ
पोचलो तिथं, तर शनिदेव ’राऊ’, वाटलं भामट्याला गिळू कि खाऊ
’मर्‍हाठी’च्या कौतिकाचा वाजतोय ढोल, उंडणच्या आवताणाचा सांगावा फोल..
यांच्यापेक्षा थेट, ते ’राजकारणी’ बरं, आनत्यांत म्हनं हितं शांघाय,.शिंगापुरं
****
आषाढातला महाराष्ट्र...
मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंगरानोमाळी
ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग ओवी साधीभोळी
दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी
थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’
प्रत्येक हृदयी ठाकला, वालला, भक्तीच्या भारानं पांडूरंग
काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !!
****
’शिवस्तुती’
शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, देशाची कणखर माती पवित्र झाली
गड-दगडांच्यात्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला
त्या हिमालयाचे शुभ्र बुरुज राखाया, यशवंत कीर्तिची नित्यच स्फुरते काया
मायभू चरणीच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी योद्धा सरसावला
या गनिमाच्या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले
ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, ठेचाया अतिरेक्यास सिद्ध प्रज्ज्वला  

Wednesday, August 24, 2011

दु:ख आपल्या गाठीच बरी


सुखांत करा वाटेकरी, दु:ख आपल्या गाठीच बरी
सुखाचे तुषार आकाशांत, दु:खाचे कढ आतल्याआंत
सुखाचे कण विरळ विरळ, दु:खाचे नेम अग्स्दी सरळ
आनंद ! नित्य नवी नवलाई, यातनांची खाई कुरतडत खाई
हर्षोल्हास, झुळुक, फुंकर, स्पर्श या सार्‍यांचेचं सुखकर
जरा, वेदना, विरह, ज्वर, दु:खाचे तमगामी पर
दु:खात पाहू सुखाची स्वप्न, थेंबा जशी आसुसली भेगाळली रानं

’तू नि मी’च खरे ! मधे ’तो’ नसलेलाच बरे !


’तू नि मी’च खरे ! मधे ’तो’ नसलेलाच बरे !
परवा, समोर राहाणार्‍या, ज्येष्ठ लोक-कलाकार गुलाबबाई संगमनेरकर, माझ्या घराच्या,थोड्याथोडक्या नाही तर सदुसष्ठ पायर्‍या चढून, घरी आल्या. कशासाठी...तर त्यांच्याकडच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाचं निमंत्रण देण्यासाठी ! परंपरेनं लाभलेली कलासमृद्धता स्वत:च्या मेहेनतीनं जोपासून, अनान्वित हाल-अपेष्टां सोसत, ’जगण्या’च्या सर्वच पातळ्यांवर अनुभवसमृद्ध झालेल्या या माउलीला हे सारं करायची काय गरज होती ?
बरं त्यांच्या मुलाकडे, रवीकडे माझा चलत्ध्वनिक्रमांक आहे. त्याचा माझ्याकडे आहे. दूरध्वनीवर किंवा ’संदेश’ देवून निमंत्रण देता आलं असतं ना . पण नाही. ह्या ज्येष्ठांना, सगळ्या गोष्टी रीतीप्रमाणं केल्याशिवाय चैन पडत नाही. तिथं मग कुठलीही तडजोड त्यांना चालत नाही.
मुळांत सत्यनारायणाची पूजाबीजा हा आजकाल खूपच वैयक्तिक श्रद्धेचा भाग उरला आहे असं माझं ठाम मत आहे. सगळ प्रामाणिकपणं निष्ठेनं, तळमळीनं करून सुद्धा अनेकांच्या पदरी अपयश येतं. आणि मग मंडळी ’पाहूया कांही होतो का चमत्कार, पूजाबीजा करून’ अंधश्राद्ध होतांत. त्यांत एखाद्याला ’कावळा बसायला...’ या म्हणीप्रमाणे, यश प्राप्ती होते नि मग ती बातमी कर्णोपकर्णी होवून, ’त्या’ दिशेने अविचारी धाव घेत सुटलेल्यांची संख्या वाढत जाते.
तुम्ही बारकाईन जर अपघातांच्या बातम्या वाचल्यांत, तर सहज लक्षांत येईल की देवदर्शनाला गाडीभर आप्तेष्ट, मित्रपरिवार वगैरे घेवून जातांना, किंवा परततांना हे अपघात विशेषत: चैत्रा महिन्यांत जत्रांच्या वेळी होतांत. कारण बेदरकार वागणूक, बेफाम वेग...सगळ, त्या मुळांत अस्तित्वातच नसलेल्या ’देव’ या भ्रामक संकल्पनेच्या भरवशानं करत असतांत ही मंडळी. ’देव तारी...’ ही म्हण बदलून ती आता ’ मणूसच मारी त्याला कोंण तारी ?’ अशी वापरली जायला हवी..
ज्ञानोब्बा, तुकोब्बा, गाडगेबाबा, बहिणाबाई पासून, मीरा कबीरा सूरदास अ‍ॅरिस्टॉटल्‌, सर्‌ बर्ट्रांड्‌ रसेल्‌पर्यंत सर्वांनी ’देव’ नावाच्या संकल्पनेच्या ’नसलेपणा’बद्दल किंवा असलाच तर तो आसपासच्या ’माणसां’तच ’हृदयस्थ असल्याची ग्वाही दिल्यानंतर सुद्धा, माणसं स्वत:च्या नाकर्तेपणाचं ’डस्ट्‌बिन्‌’ म्हणून ’देव’ किंवा ’दैव’ हे शब्द वापरत असतांत...
कोण देव ? काय देव ? नसलेपण एक नि अभाव
गंडेदोरेवाल्या बाबा बुवांची ’त्या’च्या नांवे कावकाव
जन्म-मृत्यूमध्ये एका श्वासाचं अंतरं
उत्पत्ती-स्थिती-विलय सारा शास्त्राचा प्रभावं...
काझ्या घरी माझा मुलगा सत्यनारायणाची पूजा करीत असतांना, मी आत संगणकावर, मनांतली ’खळबळ’ ठोकत’ बसलो होतो...
निर्गुण निराकार, त्याला ना मान-अपमान..
              वंदा वा निंदा, ’त्या’ला सर्व पोकळी समान...
’पोकळी’ला सुद्धा असतो परीघ, ती ’कशांत’तरी असते,
             शोध घेणारी ’बुद्धी’ मग सीमेवर जावून आपटून फुटते...
तुमची माझी भावस्पंदनं, ’जगण्या’चा पुरावा एकमात्र,
             पूजाअर्चेची अवडंबरं माजवून, कशाला दमवायची गात्रं... ?
पापणीलवण्या आधी घटित अघटित होतं इथं,
            लोपून जात आणि लगेच अष्टदिशांत उमटतं
इकडून तिकडं क्षणांत आवाज, शब्दांची निमिषांत वैश्विक गाज,
            सगळी तंत्र-मंत्र-यंत्र, ’उत्क्रांत’ बुद्धीचेच केवळ साज...
हात जोडतो, म्हणू नका, ही ’देवा’ची कृपाबिपा,
           डोळे उघडून कर्तृत्व जोखा नका लावू त्यांना झापा...
बीजांत अंकुरतं पातं नि वर आपल्याच बळें उठतं,
          ज्याला जगायची उर्मी, त्याला हे अटळ असतं...
खुणावणारं निळं आभाळ, बाळ मुठीला काळी आई,
         कधीच कुठेच भवती नसते स्वप्नांची खोटी दुलई...
’जेता’ व्हायची विगिषा, यापरता आधार नसतो,
        आप्त, सखा, सुहृद मित्र, फक्त गंमत पाहात असतो...
                           फक्त गंमत पाहात असतो...
अरुण काकतकर.

Monday, August 22, 2011

॥ॐ॥....अक्षर गणेश


॥ॐ॥....अक्षर गणेश
’ॐ नमोजि आद्या..’ अशी सुरुवात करून  ’भावार्थदीपिका’ या ग्रंथाच्या  पहिल्या ओवींत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर ’माउलीं’नी, ’जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’ला पहील नमन जरी  केलं असलं तरी त्यांना पहिल ’अक्षर’ उच्चाराव लागलं ते म्हणजे ’महाप्राण’ असं ज्याचं वर्णन करतांत तो ’ॐ’.
’ॐ’..’गणपती’..’गजानन’..जो ईश सर्वा गुणांचा’..त्याचंच .अ-क्षर’ म्हणजे ज्याला ’क्षर’ किंवा विलय नाही असं रूप..अबालवृद्धांच्या उत्साहाचा, आनंदाचा स्रोत,  न्हाऊन-माखून, चेहेर्‍यावर अवखळ वार्‍यानं येणार्‍या बटा मागं सारणार्‍या परकर्‍या बालिकेपासून, एकपेडी वेणी मोठ्या डौलानं, मानेच्या झटक्यानं मागे फेकत चालणारी युवती, किंवा सुस्नात भाळावर,पिंजर घेवून तिची चंद्रकोर रेखणारी प्रौढा आणि अगदी ’कृतांतकटकामलध्वजजरा’ म्हणजे अनुभवसमृद्धीनं श्वेतवर्ण झालेल्या केसांचा छोटासा आंबाडा घालणार्‍या आज्जीबाईंपर्यंत सगळ्यांना लगबगीनं स्वागताच्या तयारीला उद्युक्त करणारी ’चैतन्यमूर्ती’...’ॐ गं गणपतये नम:’ अशी प्रार्थना सहजस्फूर्त, ओठांवर आणणारी देवता...
’पंचपंच उष:काली’ अंगणात सडासंमर्जन करतांना, नंतर त्यावर सुबक नाजुक, ठिपक्यांची रांगोळी चितारून तींत रंग भरतांना, साग्रसंगीत पूजेची तयारी करतांना, सजावट आणि आरास करण्यासाठी फुलांच्या माळा ओवतांना, एकीकडे प्रसादासाठी उकडीच्या मोदकांची योजना करण्यांत गर्क , घरांतल्या स्त्रिया, तर केळी-कर्दळीचे खुंटे आणणे, ’पत्री’, आंब्याचा डहाळा, विड्याची पानं वगैरे आणण्यासाठी दुचाकीवर टांग मारत निघालेला पुरुषवर्ग...सगळ्यांच्याच मनांत हे ’वक्रतुंड महाकाय’ पण गोजिरवाणं रूपड, उर्जास्रोत होवून ’पायीच्या घागर्‍या’ रुणुझुणु वाजवीत नाचत असत.
’अ’कार चरण युगुल । ’उ’कार उदर विशाल । ’म’कार महामंडल । मस्तकाकारे ॥
मला या ’अक्षर’ गणेशांत नेहमीच जाणवत आलय की ’अ’कार म्हणजे स्थिती, ! भूमीवर, आपले दोनीही आंकडे नांगरा सारखे घट्ट रोवून ठोकलेली मांड. कुठल्याही कार्याला आवश्यक मजबूत पाया...’उ’कार, उदर, म्हणजे ऊर्जा स्रोत, सर्व ’गुणावगुणी’ घटकांना समर्थपणे पचवून, त्यांतल्या पोषक द्रव्यांना, रसांना कार्यसफलतेसाठी आवश्यक ’उर्जारूप’ देण्याच कार्य करंणारी यंत्रणा..आणि..’म’कार मस्तक म्हणजे, कार्यपूर्तीनंतरच्या निर्मितीला ’मंगल’दीप दाखवून ’सत्कारण’मार्ग दाखविण्यासाठी शरीरांतल्या उच्चतम स्तरावर निसर्गानं रचलेला ’नियंत्रक’, सुबुद्धीबीजावरण ! ’अ’कार किंवा ’उ’कार जेवढे मोकळे तेवढाच ’म’कार बंदिस्त...’अक्षरं’ नजरेसमोर आणा म्हणजे सहज ध्यानांत येईल...
गणनायक, सुखदायक, दुखवारक, बलसाधक
मूषकावरी मूर्ती, शुभंकर तु विश्वकीर्ति
तू दुर्वांकुरधारक,  क्लेश,वेदनाहारक
गणनायक....
सत्कर्माधार नित्य, दमन करी कृष्णकृत्य
शक्ति-बुद्धि-गुणवर्धक, सांबसुता प्रतिपालक
गणनायक...
श्रद्धेला ’दृष्टी’ दे, ’कार्यप्रवण वृत्ती दे
हो बापा, हो नायक, संकटांत पथदर्शक...
गणनायक...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com  

Sunday, August 21, 2011


कॉफी हाऊस्‌
’कॉफी हाउस‌, कॉफी हाउस‌..प्रत्येक टेबलावर वेगळा पाऊस’
शांताबाईं शेळक्याकडून, अश्याच कुठल्याशा गप्पांच्या मैफलीत ऐकलेला ’हायकू’...एक जपानी काव्य प्रकार ..
’हायकू’ म्हणजे क्मीत कमी शब्दांत, विश्वव्यापी आशयाचा साक्षात्कार देणार्‍या पंक्ती.
खरंच, ह्या नियमानं आपलं रोजचं जगण म्हणजे, विविधरंग घेवून येणार ’कॉफी हाउस्‌’च असतं की...
अगदी अंकुरण्यापासून, निर्वाणापर्यंत कितीतरी रंग...
सुख दु:खाचे, रागा लोभाचे, मानापमानाचे, हेव्यादाव्यांचे...
घडण्या बिघडण्याचे, मीलनाचे, ताटातुटीचे, प्रेमाचे, विरहाचे
बघणारे डोळे आणि आणि त्यामागची ’नजर’, आणि त्याही मागच्या मनाची, त्या विशिष्ट वेळची धारणा...’Mood' म्हणू हवंतर...
यावरचं ठरतं त्या रंगांच गडद किंवा फिकेपण...नाही का ?
लख्ख निळ्या आभाळभाळिचे, अवचित आल्या झाकोळीचे
भानूच्या उदयास्तास्थळिचे, जळातळीच्या मासोळीचे,
फुले,पांखरे, वृक्ष-वेलिचे. अद्भुत, सुरम्य रंग...
दीपावलिचे अन्‌ होळीचे, सुबक रेखल्या रांगोळीचे,
उचंबळाचे, नैराश्याचे, आसवलेले रंग...
तुमच्या माझ्यासारख्या, निसर्गानं पाहाण्याची संवेदना दान केलेल्या माणसांच ठीक आहे हो..
ह्या दृश्य ’रंगांच्या’, विविध ऋतूतल्या विविध ’रुपां’चा अनुभव घेवू शकतो आपण....
पण ज्यांच्या सगळ्या जाणिवा केवळ स्पर्श-रस-गंध-नाद या संवेदनांतच एकवटल्यांत, त्या आपल्या बांधवांचं काय ?
मी ’अंध’ हा शब्द मुद्दाम वापरत नाही...
कारण आपल्यापैकी प्रत्येक जण, आयुष्याच्या अनेक टप्प्यावर, अनेक क्षणी अगदी ’जाणतेपणी’सुद्धा, अंध-मूक-बधीर-संवेदनाहीन होतच असतो, या ना त्या कारणानं...
मग ’त्यांना’च फक्त ’दृष्टिहीन’ का म्हणायचं ?
आणि ज्यांना डोळे असतांत, त्यांना ’नजर’ किंवा ’दृष्टी’ असतेच असं कुठाय ?
आपण अनेकवेळा आपली मतं, धोरण, बाबींचा स्वत: अनुभव न घेता, त्या प्रत्यक्ष न पाहाता, ठरवीत असतोच ना...
’ते’.. सांगतांत म्हणून,.म्हणजे केवळ ऐकीव माहितीवर...बरोबर ?
मग माझ्या एका मैत्रीणीनं, ’मी टीव्हीचे कार्यक्रम बघते’, म्हटलं तर कुठे बिघडतं ?
’काय बघतेस गं परी तू ?’,
’पात्र एकमेकांशी बोलतांत ते ! ती घरांत हॉलमधे आहेत की स्वैपांकघरांत की बाहेर कुठे रस्त्यावर की ऑफिसमधे !
स्वत:शी की दुसर्‍या कोणाशी ! शब्दांनी न बोलतासुद्धा एकमेकाशी बोलतांत ती कधीकधी ! ते सऽऽगळ मी बधते अरुण ! आणि माझ्या बरोबर बघणार्‍यांचा आनंद, दु:ख, हसणं, हुंदके सगळ दिसत रे मला...’
शिवाय हिला, घरांतल्या, तिच्या खोलीच्या खिडकीशी हातांत, स्वत: केलेल्या वाफाळत्या कॉफीचा कप्‌ घेवून बाहेर ’बघतां’ना गडगडणारे ढग, कडाडणार्‍या विजा, श्रावण सरींतून मधेच येणारं आश्वासक ऊन...शाळेंतून परत आल्यावर दूधबीध पिऊन, ओठ फ्रॉकच्या बाहीनं पुसत, शेजारी, पैंजन वाजवत येणारी मिनी...मालकीण घरी आली म्हणून आनंदानं गाल चाटणारी, ’मिशू’...कमरेला लवलेला चांदी्च्या छल्ल्याच्या तालावर ठुमकत येवून, मिनीला हाक मा्रणारी तिची आई...सगळ दिसतं...
खिडकींतून, पावसांत खाली हुंदडणारी मुलं दिसतांत तिला,
एकदम वर आभाळाकडे बघत, ओरडत नाचायला सुरुवात करतांत ती...
’परी’पण वर ’बघते’...
आणि चक्क ’इंद्रधनुष्य’ दिसतं की हो तिला...
काय म्हणावं या पोरीला ? तिनं आम्हा, ’डोळस आहोत’ असा भ्रम असणार्‍यांना कधीचं, चारी मुंड्या चीत केलय जगण्याच्या मैदानांत
जगण्याच्या तिच्या ’कॉफी हाऊस्‌’मधल तिच ’टेबल्‌’, तिन बरोबर दरवाजा ’दिसेल’ अशा पद्धतीनं, ’अतिथिभिमुख’ निवडलय आणि खुर्चीचा कोन असा साधलाय की येणार्‍या जाणार्‍याचं, प्रसन्न मुद्रेनं स्वागत करताकरता ती, त्यांच्या भावविश्वांत हळूचं दाखल होवू शकेल...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com
हवे ’न्यायराया’। दयामरण आता..॥ 
’हरीणीचे पाडस। व्याघ्रे धरीयेले। मजलागी जाहले ।.तैसे देवा ॥’
बेसावध क्षणी, तीक्ष्ण नखांच्या शक्तिशाली पंजांच्या तडाख्यांत सापडून, क्रूर कराल हिंस्र दाढांमधे अडकलेल्या, मायेच्या मातृस्पर्शापासून तुटल्यामुळं, आणि येणार्‍या मृत्यूची चाहूल लागल्या मुळे आक्रोश करणार्‍या पाडसाचा शेवटचा श्वास, व्याघ्रानं संपवेपर्यंतची अवस्था आणि, 
जराजर्जर, दुर्धर-व्याधिजर्जर, अशा अवस्थेंत अंथरुणाला खिळून राहाव लागत असल्यामुळं, सतत
’आपण कुणावर तरी, आपल्या निरुपयोगी, निरर्थक जगण्याचं ओझं लादतो आहोत’ 
या जाणिवेनं पोखरल्या जाणार्‍या मनाच्या यातना सहन करणार्‍या व्यक्तीची अवस्था...सारखीच... 
’विझवून दीप सारे, मी चाललो निजाया
आता अशाश्वताची, उरली मुळी न माया’ 
असं, बाकीबाब आपल्या कवितेत म्हणतांत ते ठीक आहे हो... 
पण स्वत:च्या पावलांनी, समाधीस्थळीच्या गुहेंत चालत जावून, कृतींतून, 
’उरली मुळी न माया’ सिद्ध करणारा एखादाच सिद्धयोगी, संत...’संत ज्ञानेश्वर’...
तुमच्या आमच्यासारख्या, रोज जगता जगता दिवेबिवे न विझवता, मरणच भोगणार्‍या माणसाला शक्य आहे हे ? 
समजा मनांत आलं आणि कोणी प्रयत्न केलाच, तर ’आत्महत्येच्या प्रयत्नाच ’कलम’ लावून, फौजदारी होवून, कुटुंबियांपासून तोडून, 
सद्यस्थितीतल्या यातना कमी की काय म्हणून, तुरुंगात खडी फोडायला पाठवतील....एवढा, योगगुरू ’बाबा’...लाठीमाराच्या आणि तुरुंगवासाच्या भीतीनं, मैदान सोडून 
शिष्यिणीची वस्त्र परिधान करून पळाला...
अनेक रुग्ण, वृद्ध आज ’दयामरणासाठी न्यायालयाचे दरवाजा ठोठावताहेत...
’गुजारिश’ पाहिलात ? ऋतिक-ऐश्वर्याचा ? त्यांत,  महामुश्किलीने घरी आलेल्या’न्यायासनाला, ऋतिक एक छान प्रयोग करून दाखवतो...
सरकारी वकिलाला, एका पेटार्‍यांत बंद करून, दहा-बारा मिनिटांनी बाहेर काढतो, आणि विचारतो...
’कैसे रही ?’..’पसीना पसीना’ झालेला वकील आवाक झालेला असतो...
’चंद पलोंमे आपका ये हाल है,,, फिर, मेरे लिये ये ’जीनेकी’ उम्र कैद क्यूं ?’
फक्त हृदयाचं स्पंदन चालू आहे म्हणून ’जिवंत’ असा, वैद्यकीय ’शाप’ मिळालेल्या जीवांच काय ?
'Life-support' काढा असं जोपर्यंत आप्त सांगत नाहीत, तो पर्यंत डॉक्टर जमातीचापण नाइलाज असतो...
पण आजकाल. अशा रुग्णांना ’मृत्यू’ बहाल करण्याची दया दाखवून, 
त्या पार्थीवांतले अनेक उपयुक्त अवयव, गरजू रुग्णांना दान करण्याची तयारी दर्शविणार्‍या 
विज्ञानाभिमुख आप्तांची संख्या वाढतेय्‌ ! या परतं दुसर सार्थक त्या थांबलेल्या जिण्याचं काय असू शकतं ?
महाभारतांत, म्हणे भीष्मपितामह, इच्छामरणी होते. त्यामुळं,’धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रा’च्या रणांगणावर, शरपंजरी पडून सुद्धा ते, योगेश्वर कृष्णाच्या हातून शेवटचा वार व्हावा म्हणून, मोक्षदानासाठी करुणा भाकत राहिले...
आणि तो अश्वत्थामा, ’चिरंजीव’पणाचा शाप, कपाळावरच्या भळभळा वाहाणार्‍या, जखमेच्या रूपान घेवून, ’कुणीतरी तेल घाला रे!’ म्हणत, युगानुयुग हिंडतोय...
आपल्यासारख्या सर्वसामान्यांना, हे दोनीही परवडणारं नाही...
आपण आपली, ’दयामरणासाठी’, न्यायासनाची करुणा भाकायची...
कधी कणव येईल त्याला, याची वाट बघत... 
आणि ’जन्मोत्सवा’सारखा, ’मरण-सोहळा’सुद्धा ’साजिरा-गोजिरा व्हावा म्हणून...
आप्तेष्टांना सांगत राहायचं...              
मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा,
दान करुनी पार्थीव, नेत्र , द्या मज मरणा, आयाम नवा
श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा
निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करतिल रवा रवा
आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी,
विरहाला विसरून तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा
येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक,
स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा 
                       स्वर म्हणजेच खरा धावा 
अरुण काकतकर.
24ak47@gmail.comचित्रदर्शी केवळ मूळ’अक्षरे’...
जॉन्‌ स्टाइनबेक्‌.. नांव ऐकलय ? प्रसिद्ध लेखक..ग्रेप्स्‌ ऑफ्‌ राथ्‌, ईस्ट्‌ ऑफ्‌ ईडन्‌ वगैरे पुस्तकांचा लेखक..
माझा, आधी शाळेतला आणि नंतर दूरदर्शनमधला मित्र विनय धुमाळे... 
त्यानं मला चांगली पुस्तक वाचायला देवून, माझ्यावर जे कांही वैचारिक ’सुसंस्करण’ झांल वाचनांतून... 
त्यातला थोडाफार भार त्याकाळांत नक्कीच उचलला...
त्यातलच एक ’Grapes of Wrath'...
शंभर एक वर्षांपूर्वी, अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया प्रांतांतून, तिथले मूळ आदिवासी निग्रो Cotton-growers यांची हाकालपट्टी, अतिक्रमण करून गोर्‍यांनी सुरू केली...
का ? तर त्यांना तिथ सफरचंदांची शेती आणि डुकरांची पैदास करायची होती...
गरीब बिचार्‍या निग्रोंच्या त्या पीछेहाटीवर आधारित अशी ही अप्रतीम कादंबरी आहे...
हाताला लागली तर जरूर वाचा...भले वेळ लागला तरी चालेल, पण, मूळ इंग्रजी वाचा...
कारण...भाषांतरांत...’मूळ’ तत्व कुठेतरी हरवतं असं मला वाटतं...
उत्तम उदाहरण म्हणजे, ’एका कोळियाने’...
An oldman and the sea...' या अर्नेस्ट्‌ हेमिग्वेच्या, नोबेल्‌पुरस्कार विजेत्या, ’अक्षर’ शब्दाकृती मधल्या
युगानुयुग चाललेल्या, माणसाच्या अस्तित्वासाठीच्या झगड्याचा आणि एकुणातच... 
अवतीभवती सदासर्वकाळ घोंघावणार्‍या विनाशकारी वादळांशी, सृष्टीची चाललेली लढाई... 
हे वैश्विक सत्य...येईल कुठल्या भाषांतरांत ?
Rise and fall of third rische...मधला, गरिबीच्या धगींतून फुललेला सूडाचा अंगार, ज्यानं पुढं, दुसर महायुद्ध पेटवून, तीनचतुर्थांश जगाच्या सार्वभौमत्वाला चूड लावली त्यातल्या क्रोधगर्भ शब्दांच्या विखारी धारेचा अंत:प्रवाह, ’नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या ’भाषांतरांत कसा डोकावणार ?
Cocasiana chalk circle..चं ’अजब न्याय वर्तुळाचा’ झालं, ते कसंत्याला मी साक्षी होतो.
मी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या, ’अमृत नाट्य भारती’, या रंगभूमी प्रशिक्षण वर्गाला, ६८-६९ मधे मधून मधून जायचो. आणि, काय, बहुतेक तेंव्हाच, ’ब्रेश्त’ च्या ’कॉकेशिअन्‌ चॉ‍क्‌ सर्कल्‌’ च्या मराठी रूपांतराची,...’अजब न्याय वर्तुळाचा’च्या, मुंबई मराठी साहित्य संघातर्फे निर्मिती प्रक्रिया सुरू झाली होती. मी ’रूपांतर’ म्हटलं...’भषांतर’ नाही. कारण, जगांतल्या बहुतेक सर्व लोकभाषेंत परंपरेनं स्थित असलेल्या या लोककथेतला, न्याय’, ज्यावर ते नाटक आधारित होतं ते, आपल्या समृद्ध अनुभवानं आणि समर्थ लेखणीनं, मराठी मातीचा आणि ग्रामीण संस्कृतीचा सुगंधी उटण-लेप लावून, सजवल होतं, सुप्रसिद्ध कविवर्य-लेखक आणि नाटककार कै. चिंतामण त्र्यंबक खानोलकर’आरतीप्रभू, यांनी.
साधा लेंगा,कुडता, खांद्यावर शबनम पिशवी
’नक्षत्रांची देणी’ ’हा’, अनवट काव्य-शिल्पातून भेटवी
सृजनला नसें ठिकाण नी नांव, गांव
या फाटक्या माणसाच्या ह्रदयातच रंगला शब्दरत्नांचा डाव
’आरतीप्रभू’ ? अं हं ! हा तर ’आर्ताचा चिंतामणी’
जणू, वैशाखाक्षरांना श्रृतींचे डोहाळे, लागावे ऐन श्रावणी 
अशी सोनसळी शब्दकळा, जपत जरतारी बासनांत
अखंड ’श्रीमंती’ जगला ’हा’, चंद्रमौळी घरांत  
जगण्याला अवेळी, झाकोळानं गाठलं
काळाच्या तळ्यांत, उलट उलट झाड, बुडत बुडत गेलं
१९७७ मधे,,युवदर्शन’साठी, पहिला. ’गीतसंध्या’ मी केला त्यासुमारास, बहुतेक के ई एम्‌ मधल्या रुग्णशैयेतच, त्यांनी लिहिलेली कविता, ’दिशादिशांतूनं घुमत राहावा,......मनमोराचा गर्द पिसारा...सागर तीरी...थकले पाऊल, परत फिरावे...आणि सरावा प्रवास सारा...’ 
त्या कवितेच छान गाणं झालं एक...आणि आताचा सुप्रसिद्ध गायक, सुरेश...सुरेश वाडकरनं, त्याचं ’दूरदर्शन’वरच पहिलं गाणं, म्हणून ते गायलं....
त्याचं ध्वनिमुद्रण, अजून आहे माझ्याकडे . हो...आणि त्यला स्वरसाज चढव्ला होता विवेक लागूनं...हो हो आपला लाडका अभिनेता विवेक. थोड विषयांतर झालं हे पण.....
आई आहे शेतांत , मातृका, पडघवली, गारंबीचा बापू...येतीलही किंवा आलीही असतील अभारतीय भाषेंत...
पण सांस्कृतिक पार्श्वभूमी, स्थळांची, घरांची, माणसांची ? त्यांचं काय ?
'Fiddler on the roof...’बिकट वाट वहिवाट...’च्या रूपानं...तात्या माडगुळकरांनी रंगमंचावर आणलं, ते सुद्धा आपल्या मातींत मळवून-घोळवून... 
श्रीकान्त मोघे, जितेन्द्र अभिषेकी, दिलिप प्रभावळकर...सगळेच कलामंडळातले देदीप्यमान तारे संबंधित होते या अप्रतिम मंचानुभवाशी...
आणि आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाशी साधर्म्य अनुभवत, रोजच्या जगण्याशी Relate करत प्रेक्षवर्गही त्यांत समरसून जायचा हे मी स्वत: पाह्यलय्‌, अनुभवलय्‌ !
तेंव्हा..
भाषांतरे रस अंतरे । जैसी जळातळी पांखरे । 
चित्रदर्शी मूळ’अक्षरे’ । केवळ, जाणा ॥
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

 

Thursday, May 5, 2011

It's me...


Mahaalaxmee nimittaana...


बरं झालं कोल्हापुरच्या महालक्ष्मी-गाभारा-प्रवेशानिमित्तनं आंदोलन झालं आणि सगळ्या कालीमाता, चडिकाभगिनी महालक्ष्मीच्या गाभार्‍यांत पोहोचल्याही थेट. नंतर पूजार्‍यांनी, आत्मदहनाच्या वगैरे घोषणा-बीषणाही केल्या. काय तर म्हणे स्त्री रजस्वलावस्थेत ’अपवित्र’, ’अस्वच्छ’ असते. पूर्वीच्या काळी, दिवसरात्र घरसंसाराच्या जात्यांत भरडल्या जाणार्‍या आया-बहिणी-माउल्यांना, त्या अवस्थेत, हक्काची विश्रांती मिळावी म्हणून, कामापासून आणि विकृत पुरुषी ’कामेच्छे’पासून, दूर ठेवण्याच्या या ’कौटुंबिक-हितकारी’ योजनेचा उपयोग, धर्ममार्तंडांनी सोवळ्या-ओवळ्याच्या भ्रामक जोखडाखाली स्त्रियांना जुंपण्यासाठी केला. आता शारीर-स्वच्छतेबाबत उपलब्ध सुविधा आणि जागृती, सर्व वयोगटांतल्या स्त्री-पुरुषांपर्यंत, माध्यमांच्या कृपेमुळे, जरा जास्त प्रमाणांतच का होईना, पण पोहोचली आणि पटलीसुद्धा आहे. अशा वेळी, श्रद्धेयाच्या पार्थीवपुतळ्याजवळ जाण्याने कुठले आणि कसले ’ओवळेबिवळे’ होते ? रजस्वलावस्थेत स्त्रीदेहांतून कांही हानीकारक ’किरणोत्सर्ग’ वगैरे तर होत नाहीना ? आणि झालाच, तर ’सर्वशक्तिमान’ श्रद्धेय-मूर्तींवर त्यांचा कांहीच परिणाम होणार नाही ! पण त्रास होणार तो. अंधश्रद्धेनं विखारलेल्या मनांना, तथाकथित पूजारी जमातीला. संतांनी याविषयी कांही लिहिलय की नाही, मला माहीत नाही, पण तो काळ, वैज्ञानिक-कांतीच्या आधीचा होता. कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मुख्य पुजार्‍यांनी, जनमताचा रेटा आणि त्याची तीव्रता लक्षांत घेवून, नंतर सामोपचाराची भूमिकाही घेतली हे बरेच झाले. निसर्गानच निर्माण केलेल्या नर-नारीमधल्या नराला, वयांत आल्यावर स्खलनशील तर नारी दर महिन्याला रजस्वला होण्यामागे, निसर्गाचा, प्रजोत्पादनाचा निखळ हेतू असतो हे या धर्म मार्तंडांना कोण सांगणार आणि पटविणार. आणि पटवायच कशाला, एका ’आई’रूप नारीपोटीच ज्यांनी जन्म घेतला, त्यांना काय हे माहीत नाही ? उगाच ’वेड पांघरून पेडगांवला’ जाणाच्या या वृत्तीची आता लोकांना सवय झाली आहे.
असो...त्या निमित्तनं दोन राजकीय पक्षांना, काहीतरी विधायक केल्याच समाधानही मिळाल आणि कधीनव्हत ते चक्क मतदात्या जनतेला, विशेषत: महिलांना.. पण, त्यांचे हक्क मिळल्याच समाधान मिळालं. अशीच सगळी, ’पूजार्‍यां’च्या तावडीत सापेडलेली मंदिरं आणि श्रद्धेयं मुक्त झाली पाहिजेत.पंढरपुरच्या विठ्ठलमंदिरांत सुद्धा, दर्शनाला लेकी-सुनांसह येणार्‍या आया-बायांना, ज्या पद्धतीनं ’सुरक्षा’(?) रक्षक, अंगाला ’इथं-तिथं’ धरत, पांडुरंगा समोर ’आपटायला’ ओढतांत ते बघून चीड येते ती ’रक्षकां’ची नाही तर, हे सगळ बघत, थंडपणे उभ्या असणार्‍या, पार्थीवरूप ’देवा(?)’ची.
माझ्या एका परिचित बाईंनी प्रष्ण केला की, ’काय हो, देवीला वस्त्र-प्रावरणांनी सजवायला पुरुष काय म्हणून ? ही आमच्या स्त्री-देवतेची विटंबना आणि अघिक्षेप आंम्ही बायांनी का सहन करावा ? आधी गाभार्‍याच्या बाहेर काढा सगळ्या पुरुषांना ! तिथं आमचाच अधिकार चाल्ला पाहिजे.’ विचार केला तर तथ्य आहे यार मागणीमधे...अं ? तेंव्हा आता, सर्व स्त्री-देवतांच्या गाभार्‍यांमध्ये, ’स्त्री-सेवक-प्रतिष्ठापना’ करण्याचा विडा, या आंदोलनापासून आतापर्यंत ’वंचित’ राहिलेल्या कोणा राजकीयपक्षाला उचलायला हरकत नाही, नाही का ?
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

Puruliyaa Expose


’एका भीषण सत्याला(?) सामोरं जातांना...’
अर्णव...'टाईम्स्‌ नाऊ' वृत्तवाहिनीचाचा प्रतिनिधी,त्याच्या वृत्तवाहिनीवर, गेले दोन दिवस, दोन परदेशी नागरिकांशी बोलतो आहे. ते आहेत, पीटर्‌ ब्लीच्‌ हा ब्रिटिश्‌ आणि किम्‌ डेव्ही हा बहुधा डॅनिश नागरिक. भारतीय गुप्तहेरखातं रॉ(Research and Analysis Wing), ब्रिटन्‌च्या एम्‌आय्‌5 अणि एम्‌आय्‌6 या दोन गुप्तहेर यंत्रणांच एकमेकांतलं शत्रुत्व आणि कांही अंस्वस्थ भारतीय राजकारणी यांच्या तथाकथित कटांतून साकारलेलं एक ’महाकांडा’ संदर्भात हा संवाद आहे..
कराचींतून किम्‌ डेव्हीला शस्त्रांसह, अगदी अ‍ॅंटी-टॅंक्‌ तोफांसह, ( ब्लीचनं दिलेल्या उत्तरानुसारं,कारण काय त म्हणे, ’ पोलिस-स्टेशनं उडवायला उपयोगी पडतांत) Air-Cargo विमानांतून उड्डाण करण्यासाठी, एका खासदारान म्हणे संपर्क साधला. त्याला ती सर्व शस्त्रास्त्र, पश्चिम बंगालमधल्या, पुरुलिया जिल्ह्यांत ४८ तासाच्या आंत Airdropa करायची होती अन्यथा, त्याला ;कबूल’ झालेला मोबदला रद्द होवून,  ’सर्व दो्र तोडून टाकण्या्त येणार’ होते. त्याला उड्डण करणे सोपे व्हावे म्हणून, Airforceची राडार त्या रात्री स्विच्ड्‌ ऑफ्‌ ठेवण्यांत आली होती. या दोन परदेशी ’खबर्‍यांच म्हणणं खंरं मानायच ठरलं तर, प.बंगालमधलं मार्क्स्‌सिस्ट्‌ शासन, शस्त्रांकित उठाव करून पाडण्यासाठी तत्कालीन केंद्रशासनानं केलेला ’गर्हणीय’ उद्योग होता. लोकशाही तत्वाबरहुकूम, जनतेनं, लोकशाही तत्वानुसार निवडून दिलेल्या, राज्यघटनेंतल्या मार्गदर्शनपर अवतरणांच्या आधीन राहून प्रस्थापित केल्या गेलेल्या, कम्युनिस्ट शासनाकडून सर्वसामान्य गरीब जनतेवर होणारे अनन्वित अत्याचार, जुलुम-जबरदस्ती संपविण्यासाठी, जनतेलाच उठाव करायला उद्युक्त करून, अस्थीरता निर्माण झाल्यावर , राष्ट्रपतींना ’राष्ट्रपती राजवट आणायला भाग पाडण हा या कटाचा  मूळ उद्देश होता. २४ खासदारांच्या समूहान तसा प्रयत्नही केला पण तो व्यर्थ ठरल्यानं हा ’अघोरी’ उपाय योजला गेला. या असल्या उपायांची सुरुवात १९८८ मध्ये, त्रिपुरांतील रेबेल्‌ ग्रूप्स्‌ना शस्त्रास्त्र पुरवून उठावास उद्युक्त करून के्ली ह्ती केंद्रशासनानं. १९९० मधे हे गुप्त उद्योग ’विषय-पत्रिके’वरच घेतले गेले असं किम्‌ डेव्हीच म्हणणं आहे. १६ डिसेंबर ९५ आधी कित्येक महिने रॉ आणि एम्‌आय्‌५ यांना या ‘ऒपरेशन्‌’ची कल्पना होती म्हणे.
एखाद्या देशाच्या शासनानं आपल्याच एका प्रदेशांतल्या दोन विरुद्ध मत-प्रवाहांच्या जनसमूहांना एकमेकांविरुद्ध सशस्त्र उहाव करण्यासाठी प्रत्साहन द्याव, या इतकी लाजिरवाणी घटना अन्य कुठली असूच शकत नाही.अण्णांची ’भ्रष्टाचार-विरोधी’मोहीम, इतक्या अवाढव्य प्रमांणातल्या कृष्णकृत्यांना कसा आळ घालू शकणार. मतदात्या जनतेनं कुणावर आणि कां  विश्वास ठेवायचा ? नेत्यांसाठी, मतांची भीक मागत हिंडणार्‍या कार्यकर्त्यांना, आपल्या’नेत्या’ची मानवी मूल्य, अंतस्थ हेतू, काळ्या कर्तूतींची क्षमता याबद्दल कांहीच कल्पना नसते. असं कांही लोकशाही मूल्यांची उघडउघड पायमल्ली करणारं घडलं तर जाब विचारणार्‍या जनतेला, त्या बिचार्‍या तळागाळांतल्या कर्यकर्त्यांनी
काय उत्तर द्यायच ?
इतर एकाही वाहिनीनं या Expose’ची साधी दखलही न घेता, विल्यम‌-केट्‌्च्या शाही विवाह-सोहळ्याची तयारी, प्रत्यक्ष विवाह आदि, तुलनेनम कमी महत्वाण्च्या बातम्या पडद्यावर झळकवीत राहावं, हा खरंच माध्यमांच्या, तथाकथित ’सजगतेचा’ पराभव म्हणायचा कां ?
किम डेव्हीनं असाइनमेंट्‌ पारपाडल्यावर त्याच विमान, कोलकत्त्याच्या घावपट्टीवर उतरवून पुढील कांही महिने त्याला दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी अज्ञातवासांत, सुरक्षा पुरवून आसरा दिल्यानंतर, कांही महिन्यांनी, AK47ची सुरक्षा असलेल्या Dipomat's car मधून, सीमा ओलांडून, नेपाळला ’सुखरूप पाठवणी करणार्‍या खासदाराच नाव मात्र डेव्हीनं, ’I'll reveal that live'असं सांगत उघड करायचं टाळल.
एका ब्रिटिश खासदारनं ही बाब ब्रिट्न्‌च्या संसदेत उघड करून पीटर ब्लीच्‌ला सत्यकथन करायला, आणि तब्बल १६ वर्ष शासनानं सत्तेच्या खुर्चीखाली दाबलेलं हे, भारतीय जनतेला, त्सुनामी आणि भूकंपापेक्षा भीषण परिणाम दाखविणार, ’गलिच्छ सत्य’ चव्हाट्यावर आणायला भाग पाडलं. अमेरिकेचा या सर्व प्रकरणाशी संबंघ नसल्याची ग्वाही पीटरनं दिली. परकीय शक्ती, स्वकीयांशी हातमिळवणी करून, देशाच वाटोळ करायच्या मागे आहेत हे पाहून इतिहासांतील, सूर्याजी पिसाळसारख्या, आणि सिकंदराला मदत करणार्‍या सीमेवरील राजा अंभीसारख्या, अस्तनीतल्या निखार्‍यांची आठवण अटळ आहे.
हे प्रकरण TIMES NOW नं लावून धरलय. पहात राहिलांत तर त्यातलं गांभिर्य तुमच्या सहज ध्यानी येईल आणि धक्क बसेल.
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com