Thursday, September 22, 2011

’सुगी’


दरसाल, हरमोसमाप्रमाणे, कृषिभूषण, शेतीनिष्ठ वगैरे पुरस्कारांची घोषणा, वृत्त-वाहिन्यांवरून व्हायला लागली ! नाई म्हणताम्हणता बरा पाऊस झालाय्‌...बळिराजाच्या मनासारखा...हां, आता कुठं ’उन्नीस-बीस’ व्हायचच, पण कारभारणीच्या मनांत ’बत्ताशे’, ’लाडू’ वगैरे नक्कीच फुटत असणार...मग तिनं, का नाइ म्हणावं...

पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान,
वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान
दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर,
गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर
सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी,
पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी
कधीपासुन टोपपदरी घ्याव म्हणतेय्‌ मी,
बैलजोडी आणत्याल नवी तवा बरूबर जाइन मी बी,
लेक लई हुश्शार माझि, तिला कराय्‌चि आहे डॉक्टर, खंबीर वाश्यांच्या घर, पोरं चढविल झळाळ त्यावर

Monday, September 19, 2011

’लता’ जीवेत्‌ ‍शरद:शतम्‌

 ’लता’ जीवेत्‌ शरद: शतम्‌
संस्कृत, मराठी अक्षर-साहित्यातल्या. अगदी पुराणकालीन भगवद्‌ गीतेपासून ते बाराव्या शतकातल्या भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीपासून ते अर्वाचीन काळांतल्या साहित्यामधल्या सोनसळी शब्दकळांना, कंठातल्या ज्वालाफुलांमधून तावून सुलाखून पार करीत, झळाळी देत, उजळत, रसिकांच्या तृषार्त श्रवणेंद्रियांना सामोरा जातोय, गेली जवळपास पांच तपं, एक अद्वितीय, नादब्रह्मातल्या प्रत्येक श्रुतीचा मापदंड असलेला ’लता’चा स्वर. खर्जा पासून, मंद्र, तार आणि कधीकधी अतितारापर्यंत, जवळपास सव्वादोन सप्तक, ’सहज-प्रवाही’, शंखनादाची गभीरता, ललनेच्या कांकणांच्या नादातलं आश्वासन, मुग्धेच्या पैंजणांतल्या किणकिणीची निरागसता, शयनेषु रंभा’ नायकिणीच्या चांळांच्या ठसक्यातलं शृंगारिक आवाहन,  मंदिरातल्या घंटानादाच पावित्र्य, रणांगणातल्या असिधारेचं ओज आणि स्फुल्लिंग, अशी विविधरंगांची, घाटांची लेणी ’एकसमयावच्छेदेकरून’ मिरवणारा ’लता’चा स्वर...कितीकिती, कुणीकुणी आणि कायकाय लिहावं, बोलावं...सगळ सगळ अपुरच पडणार..स्वर-शब्द-भावांपलीकडलं आहे हे सगळ...अवकाशाला ओंजळीत धरण्याच्या व्यर्थ प्रयत्नांसारखं...या विशेषणांना सोदाहरण सिद्ध करायच म्हटल तर अगणित ग्रंथ अपुरे पडतील आणि ’दशांगुळे उरला’ अशी अवस्था होईल...
’अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।’
सार्थ झाला हा चरण, जेंव्हा त्या’अक्षरा’ना आंजारत-गोंजारत, कुरवाळलं, ’लता’च्या स्वरांनी...
सागराची गाजेशी, मेघांत कडाडल्या विजेशी,, मनमोहन मेघश्यामाच्या ओठांवर विसावलेल्या अलगुजाशी, युगानुयुगाचं नातं सिद्ध करणारा ’लता’चा स्वर...
लता, आम्ही तुझ्या युगांत जगतो आहोत हे आम्हा सगळ्यांच किती महद्भाग्य आहे, हे तुला कस कळावं ?
        नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे
               अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद
        सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ?
        देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं,
              गाईच्या डोळ्यांतलं आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं
       जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ?
गीतेच्या अध्यायांतला, ज्ञानदेवांच्या विराण्यातला किंवा हरिपाठाच्या किंवा तुकयाच्या अभंगातला, संस्कृत, प्राकृत, मराठी मधाळ शब्द, असो किंवा गालिब, राजा मेहेंदी अलि खान, मीर तकी मीर, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, शैलेन्द्र, कैफी आझमी यांच्या शायरीतला ’सुरे’च्या कैफांत दडलेला ऊर्दू शब्द असो किंवा मीरा-सूर-कबीर ते पंडित नरेंन्द्र शर्मा यांच्या भजन-दोह्यांतला सगुण, मधुरा-भक्तीतं भिजलेला शब्द असो,
’लता’चा स्वर त्यातल्या अभिप्रेत ध्वन्याथ, व्यंग्यार्थ, दृष्टांत, श्लेष, रूपक या शुष्क व्याकरणी संज्ञांच्याही पलीकडचं कांहीतरी सांगून जातो...
कारण, ’लता’च गाण म्हणजे नुसतं गाणं नसत...
             शब्द-स्वर-भावांपलीकडचं ते एक ’सांगण’ असतं
कथेतली व्यथा, व्यथेतली आर्तता, कवितेतली प्रीती, त्यांतली उत्कट अनुभूती यांना, जाई, जुई, हिरवा, कवठी, सोनचाफा, चंदनाच्या मंद सुगंधाचं देण असतं...
अहो ! नुसतं ’शिवकल्याण राजा’ ऐकलं तरी कोण कोण भेटत आपल्याला ’लता’च्या स्वरांतून ?
समर्थ रामदासांपासून, कवि भूषण, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमागज, ते अगदी कविवर्य शंकर वैद्यांपर्यंत, ’मर्‍हाठी’ काव्यप्रतिभेचे समस्त मानदंड...
’गुणि बाळ असा..’, ’वेडांत दौडले वीर मराठे सात...’, ’निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु...’
कायकाय म्हणून आठवावं ? हे तो...    
हे सप्तसुरांचे हृदय आणि माहेर,
 ’मॉं’ सरस्वतीच्या वीणेचा शृंघार,
गोपाला हाती वेणु आर्तशी मंद्र,
श्रीहरिच्या शंखातील खर्ज गंभीर
ही शिवतेजाची लखलखती असिलता,
ही उमा-रमेच्या हृदयी वत्सल गाथा,
ही विनायकाच्या शब्दामधले ओज,
अन्‌ अग्रज कविच्या उर्मीमधली वीज
ही ग्रीष्मानंतर श्रावणसर, गारवा,
अन्‌ गाभार्‍यांतिल मंद तुपाचादिवा,
हा स्थीरस्वर स्वरनिधीत दीपस्तंभ,
हा नादमंथनोत्तरी दिव्यश्रुतिकुंभ,
हा मांगल्याचा पावनक्षम गंगौघ,
हा प्रेम, विरह अन्‌ करुणेचा आवेग,
हा ज्ञानेशाच्या ओवीचा परिमळू,
हा तुकयाचा अन्‌ अभंग अक्षय बोलू,
अवतरली मीरा पुनश्च अवनीवरी,
रघुरायकृपेने समर्थ ही वैखरी
*******
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com
www,targetpointblank.blogspot


Tuesday, September 6, 2011

अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव... ’अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’


अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...
तुझ्या पूजनांत । आनंद सोहळा । भाव मनी भोळा । वसे सदा ॥
दहाच दीसांत । लावलासी लळा । गौरीच्या वेल्हाळा । विघ्नहरा ॥
जातांना माघारी । वळून रे पाही । भिजू पाहे बाही । आसवांनी ॥
हातावरी तुझ्या । दह्याची कवडी । देताना भाबडी । भांबावती ॥
ओसरता कल्लोळ । उरे मागे गाज । अस्तित्वाचा षड्ज । रेंगाळतो ॥
शुभसूचक उक्ती । बाहूंमधे शक्ती । हृदयांतरि भक्ती । सर्वदा दे बा ॥
’कृतीविणा नाही । भक्तीला बा अर्थ’। शिकवण सार्थ । देई सर्वां ॥
विरह-अष्टक । स्वीकारा गणेशा । करा दशदिशा । निरामय ॥’

अर्थपूर्ण-अथर्वशीर्ष पठण’
देखिला ना कधी म्यां देव । परि अनुभवला भक्तिभाव ।
दुर्दम्य निश्चय असंभव ।  सहस्रावधि ललनांचा ॥
निश्चयाच्या महामेरू । सकल कुटुंबाच्या आधारू ।
हृदयी वत्सल शरीरी चारु । माता, भगिनी गौरी या ॥
गणेशा आधी उच्चार, गौरी । सर्वज्ञात चराचरी ।
नरास भारी पडते नारी । यशस्विते ! अनुभवा... ॥
गणपति-अथर्वशीर्ष पठणाचा घोष करीत रात्रभर चालत पहाटेपहाटे ’श्रीं’च्या चरणी सेवेसाठी, मंदिरांत ’समूर्त, सगुण’रूपा समोर रुजू होण्याचे, आदल्या दिवशीचे मनसुबे,, श्रावण सरतासरता त्याच्या विरहांत, कोसळणार्‍या, भादव्यातल्या धुंवाधारांनी, अक्षरश: ’वाहून’ गेल्यावर सुद्धा , स्त्री-सुलभ हिरमुसलेपणा त्यजून, जवळ जवळ बारासहस्र पुण्यपत्तनस्थ ’गौरी’ सकाळी प्रार्थनास्थळी पोहोच्ल्या ! त्यांनी ’एकसमयावच्छेदेकरून’ अथर्वशीर्षाचा पठण-घोष संपन्न केला. बालिकांपासून, वृद्धांपर्यंत, सर्व जाति-पंथांच्या पलीक्डे जावून, हा उपक्रम निर्विघ्नपणे. निर्वेध पार पडला.
घोषाची महती आणि कीर्ती किती ? पूर्वी युद्धांत, योद्ध्यांना स्फुरण देण्यासाठा, घोष पथक ज्यांत शंख, तुतारी, शिंगे यासारखी उच्च-ध्वनिकंपनसंख्या असलेली फुंकवाद्य तर खर्ज-गंभीर नादाची पण दूरवर ऐकू येणार्‍या नगारे, पडघम, ढोल, ताशे अशा चर्मवाद्यांचा समावेश असायचा आजसुद्धा आप्ल्या सैन्यदलांची घोषपथक ख्यातकीर्त आहेत.. इतकच काय तर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी, होलिवुड‌ निर्मिती, ’अ क्लोज्‌ एन्‌काउंटर्‌ ऑफ्‌ दी थर्ड काइंड्‌’ या इंग्रजी चित्रपटांत सुद्धा, परग्रहावरील ’जीवां’ना आवाहन करण्यासाठी, जगांतल्या विविध देशांत धर्मगुरू, साधू, सामान्यजन ’घोष’च करतांना दाखविले आहेत. कसला घोष माहीत आहे ? अवकाशाचा, स्वयंभू अनाहत अनुनाद ॐकाराचा..’द लॉंगेस्ट्‌ डे, चित्रपट सुरू होतांना ऐकू येतात, नगार्‍यावर वाजवलेले तीन र्‍ह्स्व आणि एक दीर्घ आवाज, म्हणजे ’थ्री लॉंग्‌ अन्द वन्‌ शॉर्ट्‌’...मोर्स्‌कोड्‌ मधे ’व्ही’ अक्षरासाठी पर्याय, अर्थात ’व्हिक्टरी’साठी, मित्रराष्ट्रांच्या फौजांनी केलेलं ’नॉर्‌मंडी बीच्‌ इन्व्हेजन्‌’, ’व्ही’ फॉर्‌ व्हिक्टरी ! संधी मिळाली तर चित्रपट जरूर बघा हे चित्रपट !
सर्वसामान्यांची तळमळ, त्यांच्या व्यथा व्यक्त करण्याच्या पद्धतीततला हा सकारात्मक बदल, जाळपोळ, दंगली, हिंसाचारापासून दूर नेणारा, खरोखरच कौतुकास्पद ! इप्सित साध्यासाठी साधन, हे अहिंसात्मक असूं शकतं हे या महिलांना कुठल्या प्रशिक्षणवर्गांत जावून शिकावं लागलं नाही कधी ! अर्थात ऐहिक सुविधांमधे वृद्धी असल्या उपक्रमांमुळ होईल किवा नाही याची माझ्या, ’अंधश्रद्धाविरोधी’ मनाला खात्री नाही...अहं, होणार नाहीच, याची नि:शंकपणे मी ग्वाही देतो ! पण या सर्व माउलींनी गणपतिअथर्वशीर्षाच्या, अगदी फलश्रुतीसह, केलेल्या या पारायणामुळं, त्यांच्या पाल्यांचे श्ब्दोच्चार सु्धारण, शब्दसंपदा वृद्धिंगत होणं..उदाहरणार्थ:
कर्ता, धर्ता, हर्ता, वक्ता, दाता, धाता ही विशेषण...अवपश्चात्तात म्हणजे पश्चिम पासून पूर्व, उत्तर, दक्षिण, उर्ध्व आणि अधर...वरची आणि खालची दिशा... यासह दशदिशा वगैरे अनेक शब्द...
कुठल्याही निश्चयाबाबत, दृढ ’श्रद्धे’बाबत, पाठांतराबाबत...ज्याची आजकाल वानवा आहे... बालकांची विद्यार्थ्यांची, आस्था जागृत झाली तरी निर्गुण निराकार वगैरे ’बाप्पा’ पावले म्हणायला हरकत नाही... अर्थात ’मराठी’चागलं येत म्हणून अर्थार्जनांत वृद्धी होण्याच भाग्य, ’मर्‍हाठी’ तरुणांना कधी लाभणारं आणि लाभणार का ? हा प्रष्ण सुटणार कधी...असो...
गेले दहा दिवस, समाजमनांत ’उत्सव-सौदामिनि-संचार’ करणारी ही ऊर्जामूर्ती, आज तिच्या ’मूलस्थानी’ जळांत, पृथेंत एकरूप होत मिसळून जाणार...
म्हणून हा अक्षर-निरोपाचा शब्दोत्सव...