Friday, March 30, 2012

’पेटी’ ! साधक ? बाधक ?

’पेटी’ ! साधक ? बाधक ? महाराष्ट्रांतल्या बहुतेक शाळांच्या वार्षिक परीक्षा आज संपतील आणि पुढचा जवळजवळ दीड महिना, मुलं हुंदडायला मोकळी होतील. बरं निकालाचा ’ताण’ वगैरे, आपल्यालासुद्धा आपल्या लहानपणी कधी जाणवला नाही, कारण ’ती’ जबाबदारी मुलांनी सोइस्कररित्या पालकांवर सोपवायची असते. त्यांतून आठवीपर्यंत ’वर ढकला’ या शासनाच्या ’अजब’ धोरणा मुळं, वयवर्ष चौदा पर्यंतची ’निष्पाप’ वगैरे बालक आणखी ’बिनधास्त’. या सुटीच्या काळांत, मुलं खुल्या मैदानांत खेळायला बाहेर पडणार की घरांत, ’पेटी’ समोर...मग ती ’चित्रवाणी’ची असो वा ’संगणकाची’ असो...तासनतास बसणार ? पूर्वी, ’ती’ नव्हती तेंव्हा काय परिस्थिती असायची ? विचार करतां, सुचलेलं हे मुक्त चितन...पण मुक्तछंदात नाही तर ’छंदोबद्ध’ अवतरली भवती हिरवाई सळसळती किलबिलती द्विजगण, पिंपळ-आम्रावरती जित्रांप हंबरे दावणीस गोठ्यांत मोहरते तुळशी शिपणिच्या थेंबांत पिंगळा-वासुदेवाची नित वर्दळ अर्थपूर्ण शब्द अन्‌ स्वरमय आर्त सकाळ जात्याची घरघर रेशिमगाठी ओव्या येतांच जाग, मनकलिका खुलवुन जाव्या करतलास पहिले नमन, इतर मग कामे धनवृद्धीसाठी प्रज्ञा घडवि सुकर्मे मोकळा श्वास, स्वच्छंद स्वच्छ आभाळी गुलमोहर हसतो अबाल-वृद्ध कपोली विटिदांडू, सुरपारंब्या, बहुविध खेळ करमणूक आणिक व्यायामाचा मेळ नेतृत्व, चपलता, गनीम तंत्रे सारी साम, दाम, दंड भेदाहुन असती भारी घेवून अंकलिपि पंतोजी शाळेंत अज्ञानावर करिती भाषा, गणीत मात बारा बलुत्यांचा खाउ क्षुधाशांतीला ना जात-पातिचा अडसर कधिही आला वसुबारस, पोळा, नारळि-पुनव, वटाची नागाची पंचिम, लग्ने अन्‌ तुळशीची कणग्या साळीच्या शिगोशीग माहेरी उंबर्‍यांत लवंडे माप वधू सासरी त्याकाळी होते पतंग भवरे कंचे कल्पनाजगत फुलविण्यास निवडक वेचे प्रहसने, पहेल्या इतिहासांतिल कथा शास्त्रीय सुगम संगीत पुराणे गाथा फडताळे खुंट्या, चंची छपरि पलंग घंगाळे, न्हाणित वज्रटिकेचा संग पागोटे शेला पैठणि आणिक लुगडी ठाशीव नारि अन्‌ उमदे बाप्ये गडी ना निशिद्ध असते तिथि कुठलिही तशी अवसेच्या रात्री लक्ष दीप आकाशी सरितेच्या काळ्या साडीवर खडि जणू तम, तेज..कुणाची मात कुणावर म्हणू राउळी कीर्तने, गोधळ, भारुड भजने मैदानि दणकती शाहीरांची कवने गण गवळणि करिती प्रौढांना बेजार लावणी नऊवारींत खुले शृंगार ओसरी परस ओटा सोपा नी कोठी दीडींतुन अखंड ये-जा.. वर्दळ मोठी तिन्हिसांजा उजळे सांजवात देव्हारा परवचा, श्लोक, आर्यांचा शब्दपिसारा आजीच्या स्मृति-बासनांतील ही रत्ने समृद्ध करुन जगण्या.. संस्कारिति मने निद्रेस पाळणा झोपाळा वा झोळी तुम्हि-आम्ही खेळलो खांबखांब खांबोळी याहुन असते कां संस्कृती हो वेगळी ? भवताल स्थळी, काष्ठी पाषाणी जळी हे चित्र नसे हो तसे फारचे दूर असतील उलटली तपे फारतर चार ही स्थिती आतांशा बघतां... ना राहिली थोरांच्या ठाई चित्रवाणि ठाकली हे सर्व आज त्या पेटीमध्ये असते कळ दाबतांच पाहिजे तेच अवतरते हा बदल खरोखर तारक अथवा मारक ? प्रज्ञेच्या निकषांवर स्तर, साधक-बाधक बहुरंगि जगाचे आपुल्या हाती द्वार पाहण्या वापरू विवेक सारासार ना समजा सर्व नवे असते टाकाऊ मंथन बदलांचे ! वृथा कशाला बाऊ ? वाहिन्या, मालिका बहुविध अंगी सकस माहिती, ज्ञान रंजनास गवाक्ष खास लैंगिकता, हिंसा कधी कुणा ना टळली फाडा बुरखे, डोकवा आंत ! वखवखली माणूस अखेरी हिंस्रांतुन उत्क्रांत श्वापदे मनाच्या तमगर्भांतच स्थित बालक तर करते थोरांचे अनुकरण ’साजिरे’ तयांना दावू या, आचरण अन्यथा नसे परिणामी गर्ता दूर ’चावण्या कान’ मातेचा शिशु तत्पर तमघोर सागरी क्षणैक तेजोरेखा ’जगणे’ म्हणजे मरणांतिल निमिष अनोखा ठेवून स्मृतींचे स्वर्ण, सहस्रक सरले ’विश्वातिल क्षुद्र कणास’ नाहि जाणवले माध्यमे ओढती विश्वाला जणु आंत तरि त्वचा, नासिका, जिव्हा कां अतृप्त ? कुणि जाणावे ? हे उद्यांच होइल साध्य प्रत्येक यत्न लक्षाचा भेदे मध्य सार्‍यांचे या प्रतिबिंब दिसे ’पेटीं’त ’पेटी’ ना समजा अडसर प्रगत पथांत ज्ञानाच्या कक्षा नका सिमित करु आतां ध्वनि, चित्र माध्यमे संगणकाची सत्ता पाहूद्या. शिकुद्या जाणिव होइल तीक्ष्ण ऐकुद्या, हसूद्या.. तवान होतिल मनं मज आशा एकच कुणि न विचारिल प्रष्ण ’संस्कृती लया गेली ?’... व्यर्थ विधान

Thursday, March 22, 2012

’फुलां’चा दिवस...

’फुलां’चा दिवस... आज एक एप्रिल...इंग्रजाळलेल्या आपल्या मराठी बांधवांसाठी April Fools' Day वगैरे.. या सर्वसाधारण दिवसाला ’तसं’ कां म्हणतांत या विषयी अनेक संदर्भ संगणकावरील ’महाजाला’वर पाहायला मिळतांत पण आज विचार करतांना मला वाटलं, आपला भारतीयांचं नवं संवत्सर...शालिवाहन शक...सुरू होणारा ’पाडवा’...चैत्र शुद्ध प्रतिपदा...या एक एप्रिलच्याच आसपास असतो...गुढ्या उभारल्या जातांत.. ऊर्जास्रोत दर्शक, पिवळ्या रंगाच्या विविध छटा घेवून झेंडूची टवटवींत ताजी ’फुलं’ ढिगार्‍यांनी, प्रवेशद्वारांवर तोरणरूपानं, गुढीवर मालारूपानं आरूढ होण्यासाठी तरारत आतुर झालेली असतांत...मग या दिवसाला ’Fools' Day ..मूर्खांचा दिवस असं अशुभ, अभद्र नांव कां द्यायचं बॉ ? आपण एक एप्रिलला मराठींत, महाराष्ट्रांत...खरंतर संपूर्ण भारतांतच ’फ़ुलां’चा दिवस म्हणून संबोधून, साजरा ’गोजिरा’ कां करू नये ? काय गंमत आहे पाहा.. दोन भाषांतले साधारणत: समौच्चारी शब्द, उकाराचा ’दीर्घ’ र्‍हस्व’ झाल्याबरोबर कसे एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहातांत चैत्र म्हणजे नवोन्मेषाचा, वसंत ऋतूचा, नवी कवळीक ल्यालेल्या वृक्ष-वल्लरींच्या पुष्पोत्सवाचा महिना...निसर्गानं रानावनांत जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी आपल्या करामतीनं, विविधरंगांची उधळण करीत आरंभलेल्या ’चित्रोत्सवा’ची सुरुवात.. हिवाळ्यांतल्या धुक्याची चादर आणि पानगळीमुळं झाकला गेलेला जलाशयांचा पृष्ठभाग, हलकेच वाहू लागणार्‍या उबदार झुळुकांनी दूर होतांत आणि जळीं प्रतिबिंबतांत, स्वच्छ निळीशार आभाळं ! वृक्षांच्या पर्णहीनं शुष्क शाखा, नव्या पालवीच्या तजेलदार हिर्वाईच्या कांकणांनी सजायला लागतांत... दूरवर कुठेतरी आकाशांत एखादा कृष्ण-भुरा मेघ, स्व्त:च्या हृदय’द्रावक’तेची चाहूल देत रेंगाळायला लागतो..उत्तरायणात मग्न, तप्त भास्कराच्या तडाख्यानं एखादा ’पाषाण’ तडकून त्यांत एखादं वार्‍यावर स्वार झालेल बीज रुजतं, अंकुरतं आणि कांही दिवसांनी रानफुलाच्या रूपानं हलाडुलायला लागतं... आणि मग सुरू होते प्रतीक्षा...मोगरा, जाई-जुई...वहाव्याच्या हलक्यापिवळ्या रंगांच्या घोसांची...पळस फुलांची...निळ्या, जांभळ्या, लालभडक गुलमोहोराची...वृक्षांच्या सालीआडुन वाहात येवून शुष्क होताहोता अतीव विभोरक्षम उग्र सुगंधाची... १९३७ मधे प्रदर्शित झालेला चित्रपट ’कुंकू’ त्यातलं कै शांतारामजी आठवल्यांचं, ’भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावीत सकस रूप आगळे वसंत वनांत, जनांत हासे, सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे गातांत संगीत सृष्टीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट’ हे, चैत्रापासून श्रावणमासाच्या अखेरीपर्यंत, सृष्टींतल्या समग्र बदलांचा परामर्श घेणारं गीत आठवा.. शक्य झाल्यास पाहा...यू ट्यूब्‌वर आहे संगणकाच्या ’महाजाला’वर या एप्रिल ’फुलां’ची इतकी विस्तृत आणि सविस्तर माहिती मिळते की हे सगळं ज्ञान संकलित करून गरजूंच्या झॊळींत विनामूल्य , निरपेक्ष भावानं अर्पण करणार्‍यांच कौतुक कराव तेवढं थोडच होईल.. पण एक बाब खटकली... म्हणजे जरा रागच आला...कुठलाही प्रांतवाद, भाषावाद बाजूला ठेवून सुद्धा प्रकर्षानं जाणवलं की या सर्व इंग्रजी माहितींत विविध पुष्पवृक्षांची, पुष्पांची शास्त्रीये आणि त्यांच बरोबर, लौकिकार्थानं रूढ नावं देतांना, गुजराथी, बंगाली, मल्याळी, तेलुगू, कानडी, हिंदी अगदी ऊर्दूतलीसुद्धा रूढं नावं नमूद करतांना मराठीचा मात्र विसर, ही सूची सादर करणार्‍यांना कां बरं पडावा ? हा त्यांचा मराठीद्वेष की आपला अतिसहिष्णूपणा, निष्काळजीपणा आणि आपलं भाषा संवर्धन, संरक्षणाकडे एकूणंच दुर्लक्ष ? मुद्दछोटा नाहीये.. याबाबत विचारणा व्हायला हवी...नाहीतर.. गोविंदाग्रजांच्या ’महाराष्ट्र गीतातल्या, ’नाजुक देशा, कोमल देशा,फुलांच्याहि देशा’च्या आधीची ’राकट देशा. कणखर देशा, दगडांच्या देशा’ची आठवण ’महाजाला’वरच्या सूचीकर्त्यांना आणि ’मराठी..मराठी’ म्हणत ’असेल हरी तर देइल खाटल्यावरी’ प्रवृत्तीच्या, निद्रिस्त मानसिकतेच्या, दरवर्षी संमेलनांत उर बडवत गळा काढणार्‍यांना करून द्यायला लागेल.. ***** अरुण काकतकर.

Monday, March 19, 2012

शत शतक भास्कर..

शत शतक भास्कर.. ’विजयपताका शत शतकांच्या झळ्कती अंबरी गुढि, मायमराठी उभारी...’ अप्राप्य...केवळ अप्राप्य..! जगांतल्या कुठल्याही देशांतल्या, कुठल्याही क्रिकेटपटूला अप्राप्य...निदान पुढची,,, किती वर्ष म्हणावं ?...माहीत नाही, पण अप्राप्य असा हा पराक्रम, माझ्या माय मराठीच्या, वाघिणीच्या, दुधाची साय खाल्लेल्या एका जिगरबाजानं, मनाची एकाग्रता ढळू न देतां, मधून मधून परकीयांच्याचं(पॉंटिंग्‌, ग्रेग्‌ चॅपेल्‌) नव्हे तर, स्वकीयांच्या (कपिलदेव निखंज, बिशनसिंह बेदी..) सुद्धा अशुभ, अभद्र टीकेची यत्किंचित पर्वा न करतां, निश्चयानं, निग्रहानं घडविला हा इतिहास ! याचि देही, याचि डोळा याचि श्रवणेंद्रियांद्वारा याचि युगी याचि जगी, भोगिल्या आनंदधारा याचसाठी सकळे, केला अट्टाहास, स्वप्नांचा आभास, झाला खरा शंभराव्या वेळी बॅट्‌ आणि हेल्मेट्‌ उंचावत आकाशाकडे पाहून, त्यानं आभार मानले, शंभराव्या वेळी जगातले अब्जावधी प्रेक्षक श्रोते, प्राण कंठाशी आणून स्तब्ध उभे राहिले शंभराव्या वेळी जगांतलं प्रत्येक बालक, घामेजल्या तळव्याची, वळलेली, हवेंत धरलेली मूठ वेगानं खाली आणत उद्गारलं, ’Yes..Yes..' शंभराव्या वेळी तो निर्मिक देखिल स्तंभित झाला, स्वत:च जन्माला घातलेल्या, या अतुलनीय, आश्चर्यकारक, अद्भुत प्राणिमात्राकडे पाहून आणि...शंभराव्या वेळी सगळं जग हर्षविभोर होत्सातं, नाचू-गाऊ लागलं...’सच्चिन..सच्चिन...’...’आला रे आला..सच्चिन आला...आला रे..’ कारण, ज्यावर आयुष्यभर प्रेम केलं, त्या क्रिकेटचाच फक्त ध्यास त्यानं लहानपणी घेतला, तो त्यानं आजवर सोडलेला नाही, ’स्वप्न बघा आणि प्रयत्न करीत राहा, सातत्यानं...ती कधीतरी सत्यांत उतरतांतच, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवानं सांगतोय्‌..’ सचिन सांगत होता एका वाहिनीवरील एका मुलाखती दरम्यान. या सार्‍या यशासाठी तो वडिलांचे...प्रा. रमेश तेंडुलकरांचे विशेष आभार मानतो.... ’बोर्ग्‌चा शांतपणा, पीट्‌ सॅंप्रस्‌चा चिवटपणा मला आवडतोच...पण माझा अत्यंत आवडता टेनिस खेळाडू म्हणजे, मॅकॅन्रो...’ सांगत होता सचिन एका उत्तरादरम्यान. खरतर मॅक~न्रोमधला आक्रसताळेपणापासून सचिन अनेक योजनं दूर होता... आहे.. नेहमीच ! मी त्याला फक्त एकदांच सहकारी खेळाडूशी चढ्या आवाजांत बोलतांना आणि एकदाच चेंडू ग्राउंड्‌वर आपटतांना पाहिला आहे. किती संयम, किती शांतपणा नि परिपक्वता...मला नाही वाटतं कुठल्याही प्रशिक्षणानं ती साध्य होते इतक्या प्रमाणांत...तो तुमचा ’स्व भाव’ असावा लागतो जन्मत: ! ’प्रत्येक येणारा नवा बॉल्‌ हा नवी खेळी ऐनवेळी खेळायला लावनारा असतो. त्या वेळी तुम्ही आधी किती शतकं, अर्धशतकं केली आहेत त्यांची ’पुण्याई’ उपयोगाची नसते, तर तुमच्या कार्य करीत राहाण्याच्या अनुभवानं तुमच्यांत निर्माण झालेली परिपक्वताच तुमच्या मदतीला असते फक्त..’ किती मोलाचा संदेश आणि किती सहजपणे दिलेला...अगदी रोजच्या जगण्याच्या मैदानावरसुद्धा कायम ध्यानांत ठेवावा असा... हे असं बोलायला, संतबिंत असायला लागत नाही तर ’संभवामि युगेयुगे..’ असंच यांच अस्तित्व असतं आणि ते आपल्या अगदी नजिकच्या परिसरांत वावरतं असत हे, आपलं भाग्य असतं... ’मी देव नाहीये...I'm no GOD...’ हे म्हणतांना त्याचा निखळपणा, निरागसपणा, आणि प्रामाणिकपणा मनाला स्पर्शून गेला... तू देव नसशील कदाचित, पण , कांही वर्षांपूर्वी, श्रीलंकेत झालेल्या विश्वकरंडकादरम्यान, तुझा एक झेल सोडल्यानंतर, वासीम अक्रम नावाच्या महान गोलंदाजानं, ’अबे तू किसका कॅच्‌ छोडा है मालूम है तुझे ?’ हे काढलेले उद्गार किंवा , शेन वॉर्न्‌ सारख्या, फलंदाजांच्या कर्दनकाळानं, शारजाच्या सामन्यानंतर, ’Sometimes I dream of Sachin...perspire heavily, get drenched and wakeup with my heart beating hard...' ही दिलेली प्रांजळ आणि दिलखुलास दादवजा कबुली, हे सगळं कशाचं लक्षण आहे ? शतपैलूंची हिरकणी । आनंद सर्वत्र, वनिभुवनी । क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी ? ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधार-स्वरांची भाषा । पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥ त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र । ’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥ ध्यास हा, ना आभास । स्वप्न नाहि, निखळ सत्यास । शत शतकांच्या पराक्रमास । कवळिले, सहजपणे ॥ म्हणून, त्र्वार वंदनासाठी आमचे हात जुळलेत आज.. यापरता कुठला ’गुढी पाडवा’ ’सण मोठा असूं शकतो ?..

Monday, March 5, 2012

’भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’


’भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले’
आशाताईंच्या भावविभोर स्वरांत भिजलेल्या या ओळी कुठून तरी, दूरवरून कानावर पडतांत आणि वरवर पाहाता ’आत्ममग्न’ वाटणारा, डोळे मिटून स्वत:शीच मंदस्मित करीत हलकेच मान डोलणारा कविवर्य सुरेश भटांचा चेहेरा आठवतो, त्यांची ’शब्दोत्सवा’पेक्षा ’भावोत्सव’ साजरा करणारी प्रत्येक मैफल आठवते...
’माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी’ म्हणणार्‍या एका तेजस्वी भाव-भास्कराला अस्तास जाऊन, पाहाता पाहाता नऊ वर्ष सरली ...! त्यांच्या प्रसिद्ध ’रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा’ या कवितेंतली...गझलमधली नव्हे...ही पंक्ती, त्यांच्या दुर्दम्य आत्मविश्वास, आत्मभानाची साक्ष देते. ’रंगुनी रंगात...’ ही रचना गझल नाही, हे स्वत: भटांनीच मला सांगितलं, जेंव्हा मी त्यांच्याकडे, ती ’गझल’ म्हणून एका कार्यक्रमांत वापरायची अनुमती घ्यायला गेलो होतो तेंव्हा. ’गझल चा प्रत्येक ’शेर’ वेगवेगळा आशय साकारतो, ते ’अंतरे’ किंवा ’कडवी’ नसतांत, त्यांना एक-सूत्रबद्धता नसते... केवळ रदीफ आणि काफियाचं तंत्र जमवलं म्हणजे ’गझल’ साकारली असं होत नाही’, भट सांगत होते. मग त्यांनी स्वत: मला त्यांच्या त्यावेळी नुकत्याचं प्रकाशित झालेल्या, ’सप्तरंग’ या नवीन काव्य संग्रहांतली ’वृतानं’ आणि ’वृत्तीन’सुद्धा परिपूर्ण अशी ’गझल’ निवडून दिली... शब्द आहेत..
’लागले डोळे तुझे माझ्याकडे,
अन्‌ इथे मी मोजतो माझे तडे’
भटांच्या लेखणींतून उतरलेली,
’आज गोकुळांत रंग खेळतो हरी..
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’
ही होरी कुठे, किंवा
’दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले
थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले
वेशीपाशी उदास, हांक तुझी भेटली,
अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली,’
ही विरहिणी कुठे आणि
’उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून या उशीवरी टिपूर चांदणे पडे’
ही मिलनोत्सुक प्रेमपात्राची लाडिक मागणी, किंवा
’उष:काल होताहोता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली’, किंवा,
’गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे,
मधल्या, मानसिक षंढत्वग्रस्त, निष्क्रीय समाजाची अवस्था बघून केलेल्या या उद्वेगजन्य मागण्या कुठे..
केवढी विविधता, आढळते सुरेशजींच्या रचनांमधे ! भट आपल्या कविता स्वत: स्वरांकित करून गात असत आणि त्या ऐकतांना त्यांतला रांगडा प्रामाणिकपणा, हृदयांतून उसळणारी चीड, संताप, तर कधी आल्‌वार भावोत्कटता यांचा विलक्षण प्रत्यय यायचा...त्यामुळं भटांची कविता ही वाचण्यापेक्षा ती ऐकण आणि विशेषत: ती त्यांच्याच कडून ’गाइली’गेलेली ऐकणं, हा एक अवर्णनीय अनुभव असायचा.
’साय मी खातो मराठीच्या दुधाची,
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला’’
या त्यांच्या रचनेंतला दुसरा चरण, सुरेशजी उच्च रवांत, ज्या पोटतिडकीनं म्हणत, ती पोटतिडीक, अनेक उत्तमोत्तम गीत स्वरांकित केलेल्या, त्या प्रथितयश संगीतकाराच्या जाणकार हृदयांत जागली-पोचली-जोपासली होती किंवा कसे मला ठावूक नाही. पण
’लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’
या ’माय-मराठी अभिमान गीताला’ स्वरांत गुंफतांना, भटांना अभिप्रेत असलेली ’पोटतिडीक’ कुठेतरी कमी प्डली असं आपलं माझं मत आहे. शब्दांमधल्या ’अध्याहृता’ पेक्षा सुरावटीच्या प्रेमांत अडकले बहुधा महोदय..असो..
म्हणून, द्विरुक्तीचा आक्षेप स्वीकारून परत परत म्हणतो की भटसाहेबांच्या रचना जर त्यांच्याच कडून ’ऐकायला’ मिळत नसतील तर त्या ’वाचाव्या’ किंवा, हृदयनाथांसारख्या, त्या आशयांत आकंठ बुडलेल्या संगीतकारानं स्वरबद्ध केलेल्या आणि श्यक्यतो त्यांनी स्वत: सादर करतांना ऐकायला हव्यांत...
*****

’विश्व म्हणींचं...’


||श्री॥
’अक्षरे’(दिनांक ०४-०३-१२)..’उत्सव’ पुरवणीसाठी मजकूर...  (संजयजी डहाळे कृपया)
’विश्व म्हणींचं...’
पिढ्यान्‌पिढ्या, शतकानुशतक, रोजच्या जगण्या-बोलण्यांतून मंडळी संवाद साधत, विविध भावना व्यक्त करतांना, कांहीतरी ’म्हणता म्हणता’ नकळत ’म्हणीं’ची भर, वाक्य-कोशांत टाकीत आहेत..भाषा समृद्धी आणि संवर्धनार्थ !
सहज म्हणून आठवायला गेल तर तुम्हालाही आढळेल की आपल्या रोजच्या वापरांतल्या कितीतरी म्हाणींत जगण्याचे संकेत, सत्यता, अगदी ठासून भरले आहेत.
या ’म्हणी’ कधीकधी यमकयुक्त पंक्ती उदाहरणार्थ ’ज्याच करायला जावं भलं, तो म्हणतो आपलंचं खर’, किंवा,  ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ किंवा ’बैल गेला नि झोपा केला’, तर कधी नुसत्याच ’गद्य’..उदाहरणार्थ ’स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..’, ’नाचता येईना अंगण वाकडे’, ’वरातीमागून घोड..’
संगणकावर, माहितीचं महाजाल चाळताचाळता एक छान Site दृष्टोत्पत्तीस आली. अभ्यासक दीपक शिन्दे यांनी या म्हणींच्या संदर्भांत खूप मौल्यवान माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवलाय्‌ या Siteद्वारे.
माहिती देतांनाची पूर्वपीठिका सांगतांना ते लिहितांत, ’म्हणी वाचून जमाना झाला असं वाटत असेल ना ? मला तर तसं वाटतं.. चौथीला – त्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात वाचलेल्या आणि रट्टा मारलेल्या काही म्हणी आजही आठवताहेत. गावी गेलो की त्यातल्याच काही विसरलेल्या म्हणींचा वापर ऐकायला मिळतो. बर्‍याचवेळा ते माझ्यासाठी ’टोमणे’ असतात. उदाहरण द्यायचं तर ’पालथ्या घड्यावर पाणी’ म्हणजे मला कितीही वेळा एखादी गोष्ट सांगितली तरी मी ती ऐकेनच असं नाही! असो. महाजालावरुन जमा केलेल्या काही नव्या - काही जुन्या म्हणी खाली देतोय. एखादी विसरली तर तुम्ही ’प्रतिक्रियेत’ लिहा!’
शिंदे महोदयांनी, नाही म्हणताम्हणता ’म्हणीं’चा खजिनाच आपल्या पुढं ओतलाय... अगदी ’अ’ पासून ’ज्ञ’ पर्यंत आद्यक्षर असलेल्या म्हणी या खजिन्यांत तुम्हाला भेटतील.
वाचायला सुरुवात केलींत तर करमणूक तर होईलंच पण अंतर्मुख पण व्हायला होईल. कारण प्रत्येक म्हण ही आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रसंगाच्या, व्यक्तीच्या, घटनेच्या, स्वभाव वैशिष्ट्य/वैचित्र्य यांच्या स्वरूपांत रोज भेटतेय, प्रत्यय, प्रतीती, अनुभव देते हे लक्षांत येईल. कारण कधीकधी या म्हणी आपण अगदी सहज, बोलता-सांगतां-विवादतांना आणि विशेषत: भांडतांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून वापरलेल्या असतांत... अगदी नकळत. पण भाषा समृद्धी आणि संवर्धनाचं हे केवढ मोठं दालन आहे हे आपण कधी ध्यानांतच घेत नाही...
या म्हणींचा उद्गम काय ? या प्रष्णाचं उत्तर शोधतांना आणखी कांही अनुत्तरित प्रष्ण सुचतांत..
’पाण्या’ला ’पाणी’ कां म्हणतांत ? ’तो माझ्या दारावरून गेला’ म्हणजे ’वरून’ ’उडत गेला कां ? वगैरे...
दीपकजींनी दिलेल्या म्हणींच्या सूचीपैकी ’अं’ आद्याक्षराच्या कांही म्हणी, वानगी दाखल बघूया, की ज्या सहसा अपरिचित..निदान मला तरी..आहेत !
अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.
अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
( टुणी’ म्हणजे बहुधा पोत उचलतांना लावतांना खुपसतांत तो आणकुचीदार आकडा)
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
अकिती आणि सणाची निचिती.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
अघळ पघळ अन घाल गोंधळ.
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
(यातल्या ’अठरा विश्वे’ची खरी फोड एकदा शंनांनी...शं.ना. नवरे...सांगितली ती अशी..
’अठरा विसावे’ म्हणजे अठरा गुणिले वीस म्हणजे तीनशे साठ दिवस म्हणजे वर्षभर जिथं ’गरिबी, विपन्नावस्था’ नांदतेय्‌ असं दारिद्र्य)
अडली गाय खाते काय.(किंवा ’काय बी खाय, न खाउन करते काय ?)
अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अती केला अनं मसनात गेला.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
अती राग ? मग भीक माग !
अशी ही यादी अजून खूप मोठी आहे. खरचं वाचण्याची इच्छा असली तर ’महाजाला’वर उपलब्ध आहे..
सगळ्या ’म्हणी वाचून शेवटी तुम्हीच म्हणाल..
’अती झालं अऩ हसू आलं...’