Friday, December 26, 2014

।।भासबोध।। १९३ ते २००

मेंदू बुध्दीचा जन्मदाता । बुध्दि देते तर्कशुध्दता । हृदयिच्या भावाचा संगम होता । शब्द, भाषा समृध्द ।। १९३ जैसी असेल कर्मरीती । तैसीच येते प्रचिती । अध्यात्म, भक्ती, मोक्ष, गती । केवळ कल्पनाविश्व ।। १९४ कांहीच न देतो हरी । बैसल्या जीवा खाटल्यावरी । अर्जुनासहि तो वदे 'कर्म करी' । तेंव्हाचि कथा सुफल ।। १९५ पाहुनी अभेद्य श्रध्दा । पांपणींत ओथंबल्या जलदा । आतुर निवारण्या आपदा । भाबड्या भक्तांच्या ।। १९६ कोणी जोडिती हस्तक । कोणी घासतो चरणी मस्तक । 'त्याचे' आडते, मध्यस्थ, हस्तक । सावज घेरण्या टपलेले ।। १९७ ।। दास-वाणी ।। गरळ आणि अमृत जाले । परी आपपण नाही गेलें । साक्षत्वे आत्म्यास पाहिलें । पाहिजे तैसें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०८/१९ साप किंवा नागाचे जहाल विष म्हणजे गरळ. कोणत्याही आजारातून निश्चित बाहेर काढणारे संजीवन द्रव्य अमृत. दोन्हींमधे जलतत्व आहे ते एकच आहे. त्याच प्रमाणे दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमधे सुद्धा आत्मतत्व एकच असते. हे समजले की आपली वर्तणुक सर्वांशीच चांगली आपुलकीची राहते. पैठणाधीश 'धर्मकर्मठांची । गरळफेक पचवुनी चूळ अमृताची । गीता उकलत, ओवी ज्ञानोब्बांची । सालंकृत झाली ।। १९८ हलाहलाच्या हालाग्नींत । जनसामान्य होते पोळत । भावार्थदीपे त्यांना शमवित । कर्मधर्म सांगे ज्ञाना ।। १९९ ऐसा कोणी अवतरेल ?। तमारि दीपस्तंभ होईल ?। लांडग्यांना सहजी वारील ?। शंका सद्यकाली ।। २००

Wednesday, December 24, 2014

।।भासबोध।। १७६ ते १९२

ऐन दुपारचे तळपते ऊन । सर्व जीव सावली धरून । तरुवराचे हे योगदान । लक्षण सुकृताचे ।। १७६ वस्तींत माजतो दंगाधोपा । कसले सूड प्रसवती पापा । आधार माणुसकीचा खोपा । सदन निधर्मी सुकृताचे ।। १७७ लयापूर्वी जैसी स्थिती । तयापूर्वी होण्या उत्पत्ती । निसर्गाकडे कोणती ऊर्जा, शक्ती । जाणिले कोणी ।। १७८ मग कोणते द्ष्कृत्य । वा मानावे सुकृत । होईल लयाशिवाय स्थितं । उत्पत्ती जगती ?।। १७९ आपण सगळे क्षुद्र जीव । शोधीत बसतो कार्यकारणभाव । आकळेना त्यांसि देत सुटतो नांव । सुकीर्त वा दुष्कीर्त ।। १८० तळहाती प्रारंभी फोड । कष्टकरी करती तडजोड । घट्टे होता त्याचे, बिमोड । होतो वेदनेचा ।। १८१ सवयीने सारे सुसह्य, सोपे । प्रारंभी मन थरकापे । मंथर नंतर आपोआपे । लागतो निवळू ।। १८२ ।। दास-वाणी ।। ज्ञान विवेकें मिथ्या जाले । परंतु अवघेचि नाही टाकिलें । तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०७/१८ साधना करता करता साधक ब्रह्मस्थितीला पोहोचला सत्य असत्याचा विवेक प्राप्त होऊन संपूर्ण दृष्य जग हे मिथ्या आहे असे ज्ञान त्याला झाले. म्हणून काय त्याने खाणे पिणे, उठणे बसणे आणि शरीराची नित्यकर्मे सोडून दिली काय ? तसे जर नसेल आता मला ज्ञान झालय, भजनाची मला गरज उरली नाही असे तू म्हणू शकतोस का रे बाबा ? ज्ञानोत्तर भक्तीचे महत्व समर्थ सगुणभजन समासात सांगतात. शब्द असावे सार्थ सुगंधी । संगीत अन् मोदाची नांदी । हृदयस्थ शांतीस योग्य संधी । भजनांत ।। १८३ भजन करावे स्वान्त:सुखाय । सुखांत रुजते ज्ञान निरामय । क्षणात आनंदाचा ठाय । सहजचि नकळता ।। १८४ ज्ञानांकुर रुजवुनी अंतरी । कोंभांच्या वाढल्या तरुवरी । मधुर फळे लगडणारी । चाखावी येथेचि जाणा ।। १८५ पिंडास कावळा शिवे । टोच मारण्या चोंच शिवशिवे । आनंदविभोर, कृतज्ञ भावे । नाचती आप्तजन ।। १८६ जेथे नाहीच कावळा । तेथे ठेवा पिंडगोळा । दर्भाचा मग मार्ग मोकळा । करोनि देई किरवंत ।। १८७ गुलाले माखिला पिंड । मनुष्यासही क्षुधाशमनखंड । रित्यापोटी जेंव्ह ब्रह्मांड । भुकेल्या लागे जाणवू ।। १८८ घाटावरि ठेविती पिंड । तटावर अनावर आसवे अखंड । ताटावर तेराव्यास किरवंत कर्मठ । ओठ शिवोनी नि:शब्द ।। १८९ 'उरकले कां रे बाबा ?'। पुसती जिवंत आज्ज्या-आजोबा । घेती वेदना, दु:ख ताबा । अस्तुरि, कच्च्याबच्च्यांचा ।। १९० सर्वांगावर सुरकुत्या । अपचनाने अतिसार, वांत्या । 'जा दूर, येउ नको अंत्या' । श्वास लोभी आरडे ।। १९१ कोण्या उद्देश्ये लिखाण ?। जागवण्या अंधश्रध्द जन । त्याकरिता आवश्यक प्रकाशन । लोकार्पणार्थ ।। १९२

Monday, December 22, 2014

।।भासबोध।। १६२ ते १७५

मी उन्हांत राहिन चालत । काटे जरि तळपायांत । तळपाया असिधाराव्रत । एकचि यशस्वितांना ।। १६२ ।। दास-वाणी ।। देखणे दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें । इतुकेच ज्ञान तें पामरें । अंतरली भगवंता ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२९ दिखाऊ श्रीमंती, डामडोल, भपकेबाज सत्संग आणि कानमंत्र देण्याचे भव्य सार्वजनिक कार्यक्रम इतकेच ज्ञान असणारे भोंदू गुरू असतील तर गरीब बिचारे अज्ञानी शिष्य भगवंताला कधी भेटू शकतील का ? सद्यकाली ऐशीच करणी । अंधश्रध्दांचे जाल फेकोनी । 'व्यावसायिक' बडवे होवुनी । गरीब भोळे हेरिती ।। १६३ कैसे सावध करावे ?। कोठले पाठ यांना द्यावे ?। पाठ 'अशांची' भाग पाडावे । सोडण्या ! आकळेना ।। १६४ जैसी श्वापदे कराल जंगली । तैशी सत्ता शर्यतींत धावली । परस्परांवर चिखलफेक केली । यथेच्छ ! जनसामान्य फासावर ।। १६५ कुणास नाही कसली क्षिती । सामोरे आलेले 'भक्ष' भोगिती । नासले-सडलेले करिती । 'लोकार्पण' ।। १६६ ।। दास-वाणी ।। अधर्मास स्वधर्मे लुटिले । कुकर्मासि सत्कर्में झुगटिले । लाटूंन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०९/४८ समर्थांच्या या संग्रामशूर साधकाने अखंड स्वधर्मपालन करून अधर्म नेस्तनाबूत केलाय. सत्कर्मांचेच आचरण करून वाईट कृत्यांना झुगारून दिलय. विचारपूर्वक आचरणाने अविचारांना हाकलून देऊन वाटेला लावलय. साधकलक्षण समासात समर्थांनी साधकाच्या समाजातील वर्तणुकीची पथ्ये सांगितली आहेत. नेमाने खुरपिता तण । निश्चित वाढेल उत्पादन ? । मशागतीची तेवढीच जाण । कृषिवला हवी ।। १६७ अबालवृध्द वाऱ्यावरी । नाहक मारती शस्त्रधारी । विकृत मानसिकतेवरी । उपायो कोणता ?।। १६८ अहिंसा उपाय हिंसेवरी ?। निष्पाप जीवां मारेकरी । सर्वत्र युगानुगे अवनीवरी । खंडिती हा इतिहास ।। १६९ 'दया' शब्द त्यांना वर्ज । कितीही करा विनंत्या-अर्ज । संपदा, सत्तेचा लोभ, माज । दुष्कृत्या ठरते कारण ।। १७० सत्कृत्य शब्द फसवा । परस्पर विरोधी भावा । गोवत्स कधि, कधि छावा । गोंडस, तरि भिन्न वृत्ती ।। १७१ विषवल्ली रुजविणे । तुलसिवृंदावन लावणे । क्रिया एक परि भिन्न असणे । परिणाम ! स्वाभाविक ।। १७२ दुष्कृत्यांची जाणा महती । निवारण्या सुकृतांची माहिती । ज्यांना मान्यता लौकिकार्थी । अभावे त्यांच्या कैची ? ।। १७३ कोठलाही प्रस्तर कठोर । फोडितो वेगवान जळप्रहार । पेटता वडवानळ रौद्र । जळ शीतळ शमविते ।। १७४ परंतु जळ प्रळयवेळी । निसर्गाची अमोघ खेळी । प्रस्तरी वा वडवानळी । निराकरण्या ना सक्षम ।। १७५

Wednesday, December 17, 2014

।।भासबोध।। १३८ ते १६१

अभ्यासले म्हणे संत । सहिष्णुता तरी अंतरांत । कांही केल्या ना रुजत । पीठासनाधिष्टांच्या ।। १३८ कांही जात्याच देखणे । भरडती जात्यांत दाणे । भारुडादि लोकसाहित्य लेणे । संशोधिती निष्ठेने ।। १३९ संतोपदेशांची अमृतजळे । नासविती माजविति शेवाळे । ते तर अंगभूत बुळबुळे । भाबडे भोळे धडपडती ।। १४० कांही साहित्य'दुर्वास' । परस्परांचा करिती दुस्वास । घरकुल जरि साहित्य'सहवास' । 'वांदरे' स्थितं ।। १४१ फोडित बसती काव्यकोडी । मोडीत निरर्थ, भरती ग्रंथकावडी । तोडींत लौकिक,हिरवी माडी । चढती ! 'समीक्षण्या' कलाकृती ।। १४२ सदा स्मरावे विहित कर्म । आप्तस्वकीय रक्षण धर्म । जगराहाटीचे हे वर्म । कुठल्या 'नामे' साधते ।। १४३ 'नाम' घेता कोण अवतरतला ?। सांसारिक कर्तव्या उभा ठाकला ?। संकटसमयी खरेच धावला ?। कधी, कसा दाखवा बा ।। १४४ अमुक-तमुक म्हणे केले 'त्याने' । कोणी टिपिले 'त्याला' नजरेने ?। आनंद-वेदना, सुख-दु:खाने । भारिले मनुष्ये पळ स्व'कर्मे ।। १४५ चिमणी चिल्ली घरट्यांत । पक्षिणी घास इवल्या चोचींत । भरवुनी, पोसुनि पंख बलवंत । आभाळमायेस वाहते ।। १४६ जन्मती रोज असंख्य जीव । जीवापाड चुकवीत घाव । अवकाळिचे निष्ठुर डाव । माय सहजी परतवे ।। १४७ मादी स्वाभाविक जरि वत्सल । रिपुदमना परि कराल, कळिकाळ । विशेषत: रक्षण प्रतिपाळ । करण्या पोटच्या चिमुकल्यांचा ।। १४८ ।। दास-वाणी ।। आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोध येणे । ऐसीं नव्हेत की लक्षणे । सख्यभक्तीची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/२१ जरा मनासारखी गोष्ट घडली नाही तर देवाला आमचे चांगले पाहावले नाही म्हणायचे आणि रागारागाने दैनंदिन पूजाअर्चा सुद्धा सोडून द्यायची. हे लक्षण सख्यभक्तीचे बिलकुल नाही. न मागताही तो देतोच हे सुदाम्याच्या निरपेक्ष सख्यभक्तीवरून समजून घ्यावे. जो तो जाणितो स्वकर्माने । सुख-दु:ख भोगणे-निवारणे । वृथा कां द्यावी भूषणे-दूषणे । अन्य कुणा ?।। १४९ सख्य, मैत्र राखते वैर दूर । वोलांडुनि मोद-क्रोध अपार । वोसंडुनि जाय प्रेमभरे अंतर । सवंगड्यांचे ।। १५० द्वापारयुगी मैत्रीच न्यारी । सद्यकाली माजले कलिधारी । लांगूलचालन दारोदारी । करिती 'दामा'साठी ।। १५१ ।। दास-वाणी ।। पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्यें जगदीश । नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ती नवमी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०९/२४ पंचमहाभूतांमधे आकाशतत्व सर्वांत सूक्ष्म म्हणून सर्वव्यापक आहे. देवदेवतांच्या अनेक रूपांमधे जगदीश्वर जसा सर्वश्रेष्ठ त्याचप्रमाणे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन इत्यादी नऊ प्रकारच्या भक्तींमधे नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन ही सर्वोच्च मानावी. भक्तिमार्गाचा कलशाध्याय म्हणजे स्वत:चे संपूर्ण समर्पण.सायोज्यमुक्ती ही आत्मनिवेदनाची फलश्रुती. स्वगतासि नाहीच वेळ । क्षुधातृषा व्यापिती हरेक पळ । अन्यथा चिंतांचा जाळ । मूलतत्वे भिनली श्वासांत ।। १५२ कुणाची, कशास भक्ती ? । कधी, कुठे मिळेल शाश्वती ? । जंजाळ, जाळी, अवमान, अनिती । भीती भारते अंतर ।। १५३ पंचतत्वांची नसते करणी । निसर्ग नसतो सुखद:खा कारणी । सावरी वा काटेरी सजवितो लेणी । आपणची जाणा ।। १५४ अवकाश अथवा रुधिर कण । सर्वसमान अवघे योजन । फिरणे, पण केंन्दस्थानि कोण ?। आकळेना ।। १५५ ऐसी कोठली अवजड 'ज्ञान'मोळी । डोईवरी ? ज्यामुळे खांद्यावर झोळी । 'भीक्षांदेहि' देती दारोदारी हाळी । कष्टकरी जनांच्या ।। १५६ ।। दास-वाणी ।। सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजें वाया । पदार्थज्ञान ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०६/०६ अध्यात्मिक प्रवासात देहाच्या चार अवस्था मानल्या जातात. जागृती - जागेपण स्वप्न - झोपेतील जागेपण सुषुप्ती - गाढ झोप तुर्या - समाधी अवस्था, योगनिद्रेमधे आहे परंतु पूर्ण जागा. काहीजण तुर्येलाच ब्रह्मज्ञान मानतात, परंतु जाणे ब्रह्म जाणे माया ती तुर्या . त्यामुळे तुर्यावस्था मधेच राहते. अपूर्ण म्हणून ती निव्वळ भौतिक, पदार्थज्ञान. तुर्येच्याही पलीकडे जे आहे ते विमलब्रह्म. शुद्धज्ञानसमासात समर्थ साधकाचा क्रमविकास सांगताहेत. आम्हासि ठावकी एकचि अवस्था । तिला विविध नामे संबोधिता । कर्मधर्म संभवतो विशेषत: । तारून नेण्या 'पैल'तिरी ।। १५७ मनात कुजवुनि भोग, निद्रा । जागृतावस्थेंत 'ढोंगी' मुद्रा । दिवास्वप्नांत शोधिती अभद्रा । बहुतेक 'साधु' सद्यकाळी ।। १५८ अनेक मंचिले म्या विद्वत्जन। तयांनी मथिले तत्वज्ञान । परि सामान्य जनता जनार्दन । वंचितचि राहिला भाबडा ।। १५९ लाल दिव्यांच्या आधी गाड्या । मुखशुध्दीस खाकरा, खाजा, रेवड्या । सत्कर्मांच्या उठविण्या वावड्या । कार्यकर्ते सज्ज सदा ।। १६० पंचाधीक दशकांवरती शतकोटी । किड्या, मुंग्यासम जन राबती । त्यांच्या कल्याणासाठी । काय बा केले ?।। १६१

Tuesday, December 9, 2014

।।भासबोध।। १२६ ते १३७

कन्या, पुत्राच्या यशाची गाज । घुमत राहावी दाही दिशांत रोज । होण्यास धन्य माय तांतास काज । या परते कोणते ?।। १२६ डंका तिन्हीलोकी वाजावा । सत्कार, सन्मान उचित व्हावा । गुरु, जनलोकांनी वाखाणावा । ऐसा असावा पराक्रम ।। १२७ संसार करणे, फुलविणे । गृहस्थधर्म यथोचित सांभाळणे । प्रेमादर, सौजन्य अखंड बाळगणे । हेचि आमुचे 'अध्यात्म' ।। १२८ वेद, पोथ्यां, पुराण, ग्रंथ । कांहीही विवादले आपसांत । रुजा घालीत संत महंत । वृथा करोत कालापव्यय ।। १२९ अखेर त्यांची होते कोंडी । सोडविता तृष्णा-क्षुधेची कोडी । मनीचा गुंता भाग पाडी । कुकर्मांचे अवसरण्या मार्ग ।। १३० वृथा जिवाची घालमेल । अंतरांत मंथनी कल्लोळ । व्यर्थ कष्टकऱ्यांचा जाय वेळ । 'अध्यात्म' कोडी उलगडता ।। १३१ विनाकारणे उगा ओवी । लिहिली जाते माझ्या करवी । तर्क-बुध्दीने घुसळुन रवी । अर्थ नवनीत जमविण्या ।। १३२ ।। दास-वाणी ।। भक्तांस देवाचें ध्यान । देवावाचून नेणे अन्न । कळावंतांचें जे मन । तें कळाकार जालें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/३० खरा देवभक्त कीर्तनकार फक्त देवाचे सगुण सावळे सुंदर रूप समोर उभेच आहे या भावामधे कीर्तन करतो त्यामुळे त्याला परमेश्वराशिवाय अन्य काहीही मनात येतच नाही. एखादा कलाकार कितीही उत्कृष्ठ असला तरी आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण हाच त्याच्या भजनाचाही हेतू असतो. परिणामी तो हरिकलाकार ठरतो, हरिकथाकार नाही. कलाकारी, निसर्गाचे देणे । निष्ठेने सादर करणे । जनसामान्यांचे रंजन करणे । कीर्तन म्हणा ।। १३३ असे नित्यनेमे मनापासून । करितो जो 'कीर्तन' । सर्वसामान्यांच्या अंतरी लीन । होतसे सहजची ।। १३४ यालाच म्हणावे 'भक्ती' ?। सकारात्मक ऊर्जा, शक्ती । प्रसन्न जो करितो चित्तवृत्ती । अहेतुक, नकळत सहसा ।। १३५ ।। दास-वाणी ।। ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग । ईश्वराचें केलें जग । मोडितां उरेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०४/२८ तोंडातला घास तोंडातच घालावा लागतो. नाकात घालून चालत नाही. ज्या इंद्रियाचा जो भोग आहे तोच त्याला द्यावा लागतो. ईश्वराने सृष्टी निर्माण करताना घालून दिलेले नियम आपल्या लहरीनुसार, आसक्तीला अनुकूल असे बदलायला लागलो तर जीवन शिल्लकच राहणार नाही. निसर्गविरोधी करती कृती । त्यांस म्हणती विकृती । तोडुन-फाडुन ऐशा अपप्रवृत्ती । जाळा वा गाडा खोलवरी ।। १३६ बाह्यरूप देतो निसर्ग । अंतरंग घडवी संस्कारजग । बोलाक्षरांचे विविधरंग । साकारति इंद्रधनू ।। १३७

Friday, December 5, 2014

।।।भासबोध।। १०७ ते १२५

स्वरुधिराक्षरें म्हणे निषेध । अंधश्रध्दा निवारण्या औषध । शिकले सवरले वैद्य, विरोध । न करता, करिती मूर्खपणा ।।१०७ ।। दास-वाणी ।। पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ । गुण नस्तां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१५ कुत्रा, गाय, बैल, पाळीव पक्षी यांना ईश्वरी कृपेने काही विशेष गुण, उपयुक्तता प्राप्त असल्याने मालक त्यांचे पालनपोषण, कोडकौतुक करतात. त्याच दैवी कृपेने मनुष्याला तर कितीतरी अधिक गुण मिळतात. परंतु सद् गुणांची जोपासना केली नाही तर मानवी देह लाभून सुद्धा आयुष्य हलाखीत वाया जाते. गुणरूप दशकात समर्थ जाणत्याची लक्षणे सांगताहेत. मनुष्य कधि सामान्यप्राणी । दावी कधि श्वापदांची करणी । माया, ममता, वात्सल्य, आर्त विनवणी । गाउलीच्या मात्र नेत्री न चुके ।। १०८ मनुष्य कधि मृदु लाघवी । कधि करि हिंसा पाशवी । 'उत्क्रांती' ही कोण्या कारणे म्हणावी । सांगा बरे ।। १०९ केवळ क्षुधा कारणे व्याघ्र । वा अन्य श्वापदे गति वाढवुनि शिघ्र । नरडीचा घोट घेण्यांत व्यग्र । निसर्गत: होती ।। ११० परंतु मनुष्य अकारणे । विकृतिचि लेवूनि पांघरुण् । अश्रापास ताडणे, फाडणे । यांत मानिती धन्यता ।। १११ भेटल्याविना नाहि जवळीक ।पेटल्याविना नाही शृंगारपावक । सुटल्याविणा ना चिमुटभर राख । जीवमात्रांची ।। ११२ म्हणोनि जाणा सारखेपण । वृत्ती, कृतींतले गुणावगुण । श्वास-उत्छ्वास नि प्राण । मित्र सर्व जीवितांचे ।। ११३ खावटी, उकड्या, सडके धान्य । ओंजळींत घेउन जनसामान्य । नाइलाजे करिती मान्य । म्हणती 'उपकार' सत्तेचे ।। ११४ म्हणे भुकटी सुग्रास । नरड्यांतून उतरण्या सायास । पोटभरीचा नुसता आभास । दीन, हीन, गरिबांना ।। ११५ गाडीवर लाल दिवा । मुखशुध्दीस सुका मेवा । आपोआप संपदेच्या पेवा । येतसे बाळसे ।। ११६ करदाते प्रामाणिक । कायम खिशांस यांच्या भोकं । बेजार, त्रस्त मागिती भीक । चार घांस शिजविण्या ।। ११७ खुर्च्यांवरी 'तयार' दांभिक । ढोंगी, गुंड वा संघनायक । अंन्तर्बाह्य 'निर्लज्ज' सेवक । भोगा फळे स्वकर्माची ।। ११८ भांडती, तंडती, ओकती गरळ । 'मासे' पकडण्या फेकिती गळ । ओठांत सवंग 'अभंगां'चे जाल । अबाल-वृध्दा फसविण्या ।। ११९ लाल, पिवळा, निळा, हिरवा । मधे, विरलेला किंचित भगवा । ऐशा विचित्र रंगधनुच्या गांवा । नशिबी आपुल्या वास्तव्य ।। १२० ।। दास-वाणी ।। दुश्चीतपणासवें आळस । आळसे निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/३५ मन एकाग्र नसणे म्हणजे दुश्चीत. कामात लक्ष लागत नाही म्हणून आळस येतो. काम पूर्ण झाले नसले तरी झोप येते, ही विलासी निद्रा. या सतत येत राहिलेल्या झोपेमुळे आयुष्याचा नाश होतो. ते निष्फळ वाया जाते. दुश्चीतनिरूपण समासात समर्थ अपयशाची कारणे सांगताहेत. नीज म्हणे, 'माझ्या बाळा ! कुशीत घेते, ये लडिवाळा' !। कर्माचा निश्चित घोटाळा । ऐकाल तर होईलची ।। १२१ एकाग्रता, निष्ठा, असोशी । जोडींत राहावी कर्मांसी । जैसे बीज रुजता तरुवरासी । समाधनानंद ! मिळेचि तैसा ।। १२२ ।। दास-वाणी ।। श्रवणापरीस मनन सार । मनने कळे सारासार । निजध्यासें साक्षात्कार । नि:संग वस्तु ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०१/४१ धर्मग्रंथांचे वाचन, निरूपण, कीर्तन स्वत: ऐकणे तसेच करणे हे श्रवण. ऐकलेल्याची किंवा बोलायची सतत उजळणी हे मनन. सार म्हणजे योग्य म्हणून ग्राहय. असार हे अयोग्य म्हणून त्याज्य. मनननामुळे सारासार विचार पक्का होतो. तोच कायमस्वरूपी आचरणात आणला की निजध्यास झाला. अखंड ब्रह्मचिंतनाची फलश्रुती म्हणून होतो तो आत्मसाक्षात्कार. वाचावे, ऐकावे, बोलावे । ज्ञानेंद्रियांचे भान राखावे । निसर्गाशी कृतज्ञ राहावे । सदासर्वदा ।। १२३ या कृतींद्वारा ज्ञानवृध्दी । आपोआप जीवन समृध्दी । सकारात्मकता सहज साधी । लाभते खचितची ।। १२४ अक्षरबीज आपोआप । रुजते मनांत खोलवर खूप । अंकुरता धारिते वृक्षरूप । सिध्द फुलण्या, फळण्यास ।। १२५

Tuesday, December 2, 2014

।।भासबोध।। नवा अध्याय ८६ ते १०६

।। दास-वाणी ।। ज्येष्ठ बंधू बाप माये । त्यांची वचने न साहे । सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०६/२६ ज्यांच्या छत्राखाली आपण वाढलो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण फुललो, किंबहुना आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे अशा वडिलबंधू, आई बाप यांच्याशी सुसंवाद तर दूरच साधे धड बोलणे सुद्धा आवडत नाही. ते बोलायला लागताच त्यांचा मान न ठेवता रागारागाने निघून जातो तो तमोगुणी मनुष्य. माय, तांत, बंधू, सखा । जाणा जीवाच्या तुकड्या सारखा । त्यांना जो होईल पारखा । गर्दींत सुध्दा एकाकी ।। ८६ विस्मरण, कृतघ्नपणाची नांदी । पांठ फिरवणे, लक्षण घरभेदी । निंदनीय वर्तन तयांप्रती । अक्षम्यचि होय ।। ८७ डोईवरी आभाळमाया । काळी आई, मखमल पाया । तैसेचि वागवावे आप्तस्वकीया । तेचि होय 'माणूस'पण ।। ८८ छकुल्यास ठेवोनि अर्धपोटी । कष्टकरी कवळ धारितों ओष्ठी । हा अविचार ? नाही ! जगराहाटी । कर्मासाठी शक्ती न मिळे अन्यथा ?।। ८९ म्हणोनि राखणे भाकरतुकडा । भोजनोत्तरी दिवसाअखेरी, पायंडा । सुसंस्कृत गृहिणी देती धडा । परंपरा 'अतिथी' साठी ।। ९० सातजणांत एक तीळ । वाटता, मिळे सुख सकळ । कोणताही कठिण काळ । सहज होई सुकर ।। ९१ मारितो कां भूल थापा ? अतिशहाणा हा कोणं बाप्पा ? आवरा, अटकाव करा या पापा ? आरडती आढ्य, संभावितं ।। ९२ 'धर्मास लावितो चूड । उतरवा याचे वेड । करण्यास परतफेड । हाणा, चोपा !' गोंगाटं !।। ९३ अध्यात्म मोक्ष, गती । हा स्वयंसिध्द मंदमती । कैसा जाणेल ? उपरती। यांस होईल ?।। ९४ गरम, नरम, विविध पराठे । थंडीमधे खावे, वाटे । 'नाम' 'देव' सगळे खोटे । घुमान घुमण्या लेखकूंना ।। ९५ उभे आयुष्य म्हणे संशोधनी । अध्यासनाधिष्ठित साहित्यिकांनी । परंतू सहिष्णुता आचरणी । बाणविण्यांत अपयशी ।। ९६ बालयोगी ज्ञानदेव । सांसारिक तुकोब्बा, नामदेव । न मिरविता संतभाव । झालेचि ना जनमान्य ?।। ९७ मग कां बरे सायास । मिरविण्या वृथा आभास । भाटांना ठेउन आसपास । 'उमेद' 'वार' करिति ढोंगी ।। ९८ धरा धरा काकतकर । मोजुनी मारा पैजार । शमविण्या सूडाची धार । वार करा नेमके ।। ९९ गति, मोक्षावरती करीत बसला वार । लागेल ऊर्ध्व, मग येइल भानावर ?। तेंव्हा तरि यांवे उचलायाला चार ? । सुखरूप दावण्या 'माहेरा'चे द्वार ।। १०० ।। दास-वाणी ।। लोकी भले म्हणायाकारणे । भल्यास लागते सोसणें । न सोसता भंडवाणे । सहजचि होये ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०२/१३ लोकांनी जर आपल्याविषयी चांगले बोलावे असे वाटत असेल तर कार्यकर्त्याला समाजाचे भले बुरे बोल सोसावेच लागतात. तरच कार्य पुढे जाते. आपण प्रत्युत्तरे, वादविवाद करत बसलो तर 'काय भांडकुदळ आहे हा माणूस' अस सहज ऐकून घ्यावे लागते. काळोख असतो ठाय । प्रकाश पावतो विलय । तेज शोधीत जाय । क्षितिजी भेटतो अंधार ।। १०१ मुकाट न राहता बोलावे । शब्दचि पाहिजे ऐसे नव्हे । कोठल्याहि ज्ञांनेंद्रियाद्वारे व्हावे । संभाषण ।। १०२ बरे, वाईट पाहावे तैसे । व्यक्तिसापेक्षच सहसा असे । भावांचे आयाम विविधसे । असावे संग्रही ।। १०३ अंधारच असतो सत्य नि स्थाई । प्रकाशा मावळतीची घाई । जन्म सांगाती घेउन येई । मृत्यू ! विश्वहि जाणा तैसेची ।। १०४ कोण जाणे. अंधाराचा ध्यास । कां न बरवा वाटें प्रकाश ?। हीच बहुधा ओलांडण्या वेस । घालमेल जीवाची ?।। १०५ पुत्र कमावितो पुण्याई । आज मजला कामा येई । व्यक्तण्यास साहाय्यभूत होई । नकळत पण निश्चित ।। १०६

Tuesday, November 25, 2014

।।भासबोध।। आजपासून नवा अध्याय: १ते ८५

।।भासबोध।। आजपासून नवा अध्याय: मनांत वसते येते ते स्वप्नी उमलते । संसार,व्यापार कारणे चिंता असते । या विचारांत असता सामान्यजनांते । ग्रासते निद्रा ।। १ कष्ट, संकट, वेदना । व्यापीत असतां आप्तजना । मुक्तीच्या पाहाणे स्वप्ना । जाणा महत्पाप ।। २ हवी हविशी जर वाटे मुक्ती । मुळांत कोण्याकारणे अवतरती ?। संसार मांडुनी हे अवनीवरती । कहार होती गिळावया ।। ३ पटकुर पसरावे पदपथी । 'त्याच्या' नांवे दया मागती । त्यत्तीस कोटींपैकी किती येती । ऐशा निष्क्रीय निलाज-या भेटावया ।। ४ ।। दास-वाणी ।। स्वप्नी बद्ध मुक्त जाला । तो जागृतीस नाहीं आला । कैचा कोण काये जाला । कांहीं कळेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०६/६२ मी आणि माझे नातलग, संपत्ती, व्यवसाय यात गुरफटलेला आणि त्यातच परमसुख मानून धडपडणारा म्हणजे बद्ध. हा बद्ध एके दिवशी गाढ झोपला अन् त्याला आपण ध्यानस्थ बसलोय असे स्वप्न पडले. जागा झाला आणि पुन्हा नेहमीचेच उद्योग सुरू केले. पारमार्थिक जागृतीचा पत्ताच नाही. अशा स्वप्नातील मुक्तीला काय अर्थ ? परमेश्वरापायी चित्त एकाग्र तो खरा मुक्त ! तैसे कोठलेही ज्ञान । शोषित गेले कण कण । तर्काने परस्परांशी सांधून । विषय आकळतो परिपूर्ण ।। ५ उदाहरण एकलव्याचे । वा गर्भस्थित अभिनन्यूचे । अंकुरल्या, जोपासल्या कोंभांचे । त्यांनी केले वटवृक्ष ।। ६ पाहाता, ऐकता चाणाक्षपणे । विश्लेषतां परिणाम, कार्यकारणे । समोर येतो सहजपणे । अन्वयार्थ ।। ७ म्हणोनि गुरु चराचर स्थीत । जेथून जावे तेथे संगत । वावरती ! राखोनि सावधचित्त । असावे आपण ।। ८ 'मुक्ती मुक्ती' सर्वदा आरडती । 'उक्ती उक्तीं' त्रिकाल संगाती । 'भक्ती भक्ती' कां न आग्रहिती । कर्मयोगाची हे ।। ९ पाठपुरावा पळण्याचा । कर्मनिष्ठेपासून ढळण्याचा । सर्वसंगपरित्यागाचा । उपदेश, सांगा, योग्य कां ?।। १० रणांगणी वा भवसागरी लढतां । कमकुवत शरीर, मने होता । सैन्य, प्रजा कामी येतां । सत्ता गाजविण्या कुणि नुरेल ।। ११ म्हणुनि राखावे समाजभान । 'मी' म्हणावे, 'सेवक प्रधान' !। ऐसेचि वदले असावे, 'जाण, । राजा' दास शिवबासी ।। १२ मग आपोआप स्वानिनिष्ठा । जागेल स्वादिल्या मिठा । उद्योगारोग्य, संपन्न पेठा । सजवितील नगरि-देशा ।। १३ न्हाऊ-माखू घातलेली घरी । धुळींत लोळति सडकेवरी । रक्त-मांस एकचि जरी । गोमट्यासि न्याय वेगळा कां ?।। १४ 'देव' तुमचा आंधळा । प्रसाद भक्षुनी निद्रिस्त गोळा । काणा करोनिही डोळा । न पाहे तिकडे ।। १५ दुर्दैवी, प्रतीक्षेंत, मूढ । कधी मिळेल सुवर्ण कु-हाड । वाकोनि पाहती आड । तोल जाता होति मुक्त ।। १६ गति मिळता गर्तेंत जाती । 'मोक्ष' लोभाने सर्वस्व त्यजती । उखळे पांढरी करिती। बुवा, बाबा, भोंदूंची ।। १७ जनावेगळा कसा राहील ?। भुकेला कंदमुळे खाईल ?। भिक्षेसाठी झोळी करेल । पुढ ! जनताजनार्दनीच ना ?।। १७ सेवा, साधना वा परिचार । अखेरीस माध्यम शरीर । पोसाण्या लागते अन्न आणि नीर । कोठ शिजवतील बाबा, साधू ।। १८ आपला खारीचा वाटा । गरजूंना देण्या, अनेक वाटा । संसार करोनि नेटका । सद्भावे अर्पिती जन ।। १९ भले राहा ब्रह्मचारी । अभ्यासूनि वेद चारी । सुविहित चालल्या संसारी । विचलित करु नका गृहस्था ।। २० निसर्गे दिधल् दान । दुर्लक्षुनि करू नका अवमान । सुलक्षणे, सुज्ञपणे अवलंबुन । जिवंतपणी वा मरणोत्तर ।। २२ नर नारी कां दोनचि स्थिती । योजने या कारणे कोणती । विचार कोणी केला ? किती ?। नि:संगासि प्रतिपादिता ।। २३ म्हणोनि योगी-भोगी आदि । जनतेचा खरा प्रतिनिधी । तोलत संपदा-आपदा 'आनंदी'। सांगतो, 'राहा सदा' !।। २४ माहीत असतां हे सर्व । कां सांगती, 'अध्यात्म' पर्व । गति-मुक्ति-मोक्षादिंचा संभव । भाबड्या अंतरी रुजविती ।। २५ म्हणोनि योगी-भोगी आदि । जनतेचा खरा प्रतिनिधी । तोलत संपदा-आपदा 'आनंदी'। सांगतो, 'राहा सदा' !।। २४ माहीत असतां हे सर्व । कां सांगती, 'अध्यात्म' पर्व । गति-मुक्ति-मोक्षादिंचा संभव । भाबड्या अंतरी रुजविती ।। २६ 'ते' तर त्यत्तिसकोटी । त्यातला उपकारक जगजेठी । निवडून, दीन दुबळ्यांसाठी । नेमस्तेल, तो महंत ।। २७ गरीबांस कसे कळावे ? पाणावल्या पांपणींतले गाळावे कि गिळावे । बहुधा दु:खचि ! सुख कसे मिळावे । काट्यांच्या वाटेंत ?।। २८ म्हणे 'ते' त्यत्तिसकोटी । वसंत असता उरी-पोटी । तरी क्षुधाशांतीसाठी । कपिला गोमाता रानोमाळ ।। २९ म्हणे 'शोध घ्या स्व अंतरी,। भेटतील तिथे 'दैवते' सारी !' । मग कशास करण्या वारी । प्रेरित वृथा करिति 'संत' ? ।। ३० कशास हवा महंत ? अंकुश घेवुनि जणु माहुत । अगम्य गति-मोक्षाप्रती जनमत । कोण्या कारणे रेटावया ? ।। ३१ तर्क बुध्दीच्या विश्लेषक कसोट्या । देणग्या निसर्गाच्या मोठ्या । ढोंगी, भोंदू संत 'माणसांच्या' । स्वार्थी हेतूंनी गाडल्या ।। ३२ संत-महंताना नकोच जाणकार । जनता राहिला जर भाबडी निरक्षर । तेंव्हाच झोळींत पडेल भरपूर । भिक्षा, दक्षिणा नि संपदा ।। ३३ चर्चा करणे कां बा व्यर्थ ? चिंतनास जर देईल दिशा नि अर्थ ! मौन धारण्या निरर्थ । जावेचि कां ?।। ३४ उंच डोगरी चढोनि जावे । बहुत आरडा ओरडावे । हवेतर हवेशी भांडावे । हर्षोल्हासित होत्साते ।। ३५ हर्षोल्हास, सुख वाटावे सर्वांशी । वेदना दु:ख राखावी आपुल्यापाशी । कोठे न्यायचे असते 'त्या' दिशी ।सांगा बरे ऐहिक ? ।। ३६ या विचारें थांबवू नका सुकर्म । काज जगण्याचे तेचि वर्म । करित राहिलांत निकामि धर्म । 'पूज्य' राहिल गांठीशी ।। ३७ तुमच्या अनाठइ 'धर्म'भावे । आळशी साधु भोंदू सेवतील 'खवे' । सागतील, 'असेचि करित राहावे । उभयतांच्या कल्याणार्थ ' ।। ३८ रक्षेने बरबटतील अंगे । नग्नदेही धावतील कुंमंडलु-त्रिशुळा संगे । शुध्द जळनिधीत करोनि दंगे । नासतील उत्सर्जिताने ।। ३९ 'पुरुषार्थ' शब्द कालबाह्य । सर्वक्षेत्रांत महिला सक्रिय । 'मानवार्थ' उपाधीचा अनुनय । करावा भविष्यी ! हे बरें ।। ४० पुरुष, तरिही व्यवहार निरर्थ । कुटुंबात अडचण, त्रास व्यर्थ। पेलण्या संसार रथ । असमर्थ, मोडके, जणु चाकं ।। ४१ असावे नेहमी मितभाषी । तसेच नेहमी मृदुस्पर्शी । मनांना गवसणी घालण्यासी । उपकारक सर्व हे ।। ४२ म्हणोनि वंदन ज्ञानोब्बांसी । लहानं जरि अचाट कर्तृत्वदर्शी । दशकोत्तरिषष्ठ वर्षी । घालावा शिवबासी मुजरा ।। ४३ ओवींत ना कठोर व्यंजन । रयतमनीची अपार जाण । संभवती क्वचितच युगांतुनं । ऐसे आदर्श योगी ।। ४४ हृदय आवेगे उचंबळे । पापणीकांठी नीर साकळे । जीवमात्र जगति सगळे । घेतांतच अनुभव ।। ४५ प्रेम, वात्सल्य, करुणा । परी काजांच्या नाना । परि पाहता परिणामा । असति मात्र एक ।। ४६ कुणा आंचती विरहज्वाळा । कुणा दुरावा क्षणिक साहेना । कोण्या मनी आनंद माईना । विविध स्वरुपी प्रकटे ।। ४७ हे लिहितसे मी जरी । निगळेल कुणी भवसागरी ?। दखल घेवोनि परोपरी । विचार अन्या सांगेल ?।। ४८ नाही !... नका म्हणू उपदेश । कृपा मागतो तुमच्यापास । जगण्यातल्या कडु-गोड अनुभवांस । मांडण्या धजलो तुम्हापुढे ।। ४९ मज नसे तो अधिकार । नाही अभ्यास चिंतनाची धार । परंतु चिंता हृदयी अपार । भाबड्या, अबालवृध्दांची ।। ५० कैसा करतील उपदेश । ज्वलामुखीच्या तोंडास । जन्मत:च दैवाने गरिबास । धरिले ! होरपळत, आक्रंदती ।। ५१ नका दवडू समय अकारण । पुनःपुन्हा तेचतेच करुन पठण । जगण्यास आवश्यक उदरभरण । योग्य ते साधेल कां ?।। ५२ संकल्पना भ्रामक, कालबाह्य । तात्विक चिंतनाचे आरण्यकाव्य । कर्म करिता नसते संभाव्य । 'फोल'पट अखेरिस ।। ५३ 'अर्थ' असे सद्यकाली परम । निरर्थ गाळणे, त्यासाठी घाम । मोक्ष, काम वा धर्म । मिळवावा,भोगावा 'अर्था'ने ।। ५४ दारिद्रयाशी ज्याचा संग । भले प्रस्तर सहजि करि भंग । लौकिकार्थे तेचि खरा अपंग । जगाने त्याने मरणांत ।। ५५ मार्गक्रमण्या केवळ 'अर्थ' हवा । अन्यथा, क्षुधा-तृषेशि केवळ 'हवा' । मारा, चोरा, वा कर्जाने मिळवा । कारण 'अर्थ' महा-परम ।। ५६ 'अर्था'नेचि साधते सगळे । भोळ्या-भाबड्यासि गिळण्या बगळे । शुभ्र पर लेवून कावळे । भवसागरी 'ध्यानस्थ' ।। ५७ 'अर्था'नेच प्राप्त होई महत्ता । 'अर्थ' कारणे कोसळती महासत्ता । 'अर्थ' देतो आव्हान ललना-जगतां । विचलित करण्या तर्क-बुध्दी ।। ५८ कैसा वर्णू आनंद । मन होइ विभोर स्वच्छंद । पडेल कोणतेही बिरुद । उणेच, ओवण्या शब्दांमाजी ।। ५९ चक्र, अंकुश, पद्म, शुंडेवरी । मोदक सेवुनि पोटभरी । किलकिल्या नजरेचि पांखर धरी । भक्तावरी सर्वदा ।। ६० शा र दा त्रैक्षरी तत्व । शाश्वती रक्षण दायित्व । देवोनि आप्तांसि ! पूर्णत्व । पावाल, समाधाने ! ।। ६१ कळकाच्या बनांत शारदा । ग्रथाचिये पानांत शारदा । उदयास्ताच्या कनकांत शारदा । सर्वदा खुणावते ।। ६२ दृष्टी मात्र तैसी पाहिजे । मग तर्कांतुनि अर्थ निपजे । आपोआप पडघम वाजे । स्वसंवर्धनाचा ।। ६३ कसला 'कुंभ' कोण जाणे । अमृतबिंदू 'सांडले' म्हणे । नग्न देहांची प्रदर्शने । साधण्या धावति साधू, बाबा ।। ६४ ऐसे भ्रामक, भाकड कारण । परिणामी,नद्या जलनिधींचे प्रदूषण । मैला भरल्या गंगेचे करिती पूजन ?। कधी होतिल बा शहाणे ?।। ६५ ।। दास-वाणी ।। मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०५/२१ निर्भयता, दानी प्रवृत्ती, इंद्रियजय, स्वाध्याय, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, मृदुता, दया, तेज, क्षमाशीलता हे सर्व गुण दैवी संपत्तीचे अलंकार मानले जातात. मोक्षप्राप्त संतांना हे दागिने शोभतातही. असे हे श्रीमंत संत असंख्य सामान्यजीवांना देहबोधावरून आत्मबोधावर आणून ठेवतात. 'आपणासारिखे करिती तत्काळ ' हेच पारमार्थिक राजेपण होय. कोण अभागी भाग्यवान झाले । कुठल्यास्थळी रंकांचे राव झाले । कोण्या संत-महंते घडवियले । दाखवाना बाप्पा ।। ६६ 'मरा मरा' म्हणत वाल्याने । ऋषीपद प्राप्तिले अनवधानाने । मागल्या द्वारे प्रवेश संपदेने । करणे ! मान्यता पावली परंपरा ।। ६७ प्रज्ञा वा धनवंत जगी । जे जाहले ते तर कर्मयोगी । अध्यात्म, गतिची 'मिरगी' । टाळिली !मांदियाळींत 'संतां'च्या ।। ६८ कालापव्यय अनाठाई । कधीच त्यांनी केला नाही । उजळल्या भवतिच्या दिशा दाही । तर्क, बुध्दी, श्रमाने ।। ६९ मृदु भावांचा मृद्निधी । साकारुन, वज्रलेप सर्वांगी । देऊन, म्हणती, 'वचने बोलकी' । काव्य-प्रस्तर फोडित बसा ।। ७० समज दृढ एक, दुर्बोधता । उकले-आकळेना तीच कविता । चर्चा-चर्वण, विरोध करिता । स्वानंद मिळवितो समीक्षक ।। ७१ गावे, सांगावे अगदी सहज । न आळविता अनवट 'भिन्न-षड्ज' । भारवाहक उपदेशांचे सावज । वृथा श्रोत्यां करो नये ।। ७२ रसिक अखेरच्या पंक्तीत । भेदरून मंचावरचे साठवित । श्रवण-दृष्टीद्वारे मनांत । शोधण्या येतो विरंगुळा ।। ७३ प्रथम पंक्ती विद्वान विश्लेषकांची । तदनंतर मूल्यधारी प्रवेशकांची । मागे फुलवाती वळणाऱ्यांची । गर्दी असते अधे-मधे ।। ७४ दुर्बोध ज्यांचा काव्य-स्रोत । सरस्वती सारिखा सदा गुप्त । दर्शना-स्नांनांस दुरापास्त । त्यांस म्हणती 'कविश्रेष्ठ' ।। ७५ सुबोध, साधे, सरळ नि सोपे । कां न लिहिती बाया नि बापे ?। कष्टेविणा कळेल आपोआपे । ते यांना वर्ज कां ?।। ७६ संवाद साधण्या बोलीभाषा । करण्या अंतरांत प्रवेशा । माहिती, वर्णने, नोंदी वितरण्या ग्रंथभाषा । ऐसी योजना असावी ।। ७७ लिहिले, बोलले ते पोहोचणे । लक्षित परिणाम साधणे । सायास त्याचसाठी करणे । क्रियेंतून अपेक्षित ।। ७८ ।। दास-वाणी ।। भरोन वैभवाचे भरीं । सद् गुरूची उपेक्षा करी । गुरूपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/१०/३४ प्राप्त वैभवाच्या जोरावर आपल्या सद् गुरूचीही उपेक्षा करतो. ज्या गुरूकृपेमुळे आपल्याला सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मिळाली ती गुरूपरंपरा लोकांना सांगण्यासही मुद्दाम टाळाटाळ करणारा शाहाणा असला तरी मूर्ख म्हणजेच पढतमूर्ख. ( समर्थांची ज्ञानगंगा ... www.samarthramdas400.in) गुरु तर गुरुच होय । मग कोठल्याही रूपे उभा ठाय । नि:शब्द, निरव देवोनिजाय । ज्ञानामृत क्षणोक्षणी ।। ७९ गुरूसम नाही सखा । जीव एक, दोन देहांत सारखा । एक बोले, दुजा देइ हाका । अखंडित ।। ८० गुरु, जगण्यांतला पालकचि होय । तापल्या गोरसावरची देई साय । मथुनि देइ जैसि यशोदामाय । नवनीत बाल'ब्रह्मांडा' ।। ८१ ।। दास-वाणी ।। वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटी । आशागुणे हिंपुटी । करी तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/२२ जे जे चमकदार, शानदार दृष्टीला पडेल ते मनाला आवडेल इथपर्यंत ठीक आहे. ते सर्व वैभव आपल्यालाच प्राप्त व्हावे ही इच्छा निर्माण होणे, त्याची सतत चुटपुट लागणे हे अयोग्य. नुसते मनोरथ सिद्धीस जात नाहीत त्यामुळे हिरमुसला होतो हे रजोगुणी स्वभावाचे लक्षण होय. (समर्थविचार ....... www.samarthramdas400.in) सद्यकाळी चळबुळ 'पक्षां'त । सत्तास्थाने ठेवेोनि 'लक्षां'त । किमान कांही कोटींत । संपदा वोरपण्या ।। ८२ चमक एकुटी काय करेल ? शंकाच असते किति टिकेल । परंतू फोलपण जाणतील । ऐसे बहुत विरळा ।। ८३ संपदा, सत्तेची धाकुली । भगिनी ! दाखवित वाकुली । अधिकारा पाठोपाठ गेली । रडत बसली निवृत्ती ।। ८४ जे 'त्याचे' ते कां वांछावे ? । मुखरस गळेतो अभिलाषावे । कर्ज, वा अपहार अवलंबावे । पात्रांत सामावण्या ?।। ८५

Saturday, November 1, 2014

।।भासबोध।। ३५१ ते ४०० (पुस्तकासाठी विश्राम)

।। दास-वाणी ।। लागता सद् गुरूवचनपंथे । जालें ब्रह्मांड पालथें । तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/५१ सद् गरूंनी एकदा मंत्र दिला, साधना सांगितली, त्या मार्गाला लागला की अगदी जगबुडी आली तरी ज्याची आपल्या गुरूवरील निष्ठा कणभरही कमी होत नाही तो सत् शिष्य. आत्यंतिक अडचणीतही जो साधना सोडत नाही किंवा बदलत नाही तो पैलतीर गाठतोच ! गुरु वागला यथार्थ । तरीच शिकवण सार्थ । शिष्य समाधानी परिपूर्त । मग होतो ।। ३५१ गुरु सद्यस्थित आगळे । फोल बोलांचे फेकीत जाळे । नको ते दावीत बळेबळे । नकळे कोठे नेतील ।। ३५२ न ठावे मज ब्रह्म । करित राहाता उचित कर्म । निरपेक्ष न राहाणे हेचि वर्म । गृहस्थाश्रमी जाणिले ।। ३५३ आकंठ लुटतो आनंद । भोव-यांचा करुन भेद । भव-सरितेंचा झुळझुळ नाद । ऐकतो ! हेचि का हो ब्रह्म ।। ३५४ नाही कोणी शिकवीत । अनुभवाची सारी करामत । ज्ञानेंद्रियांना ठेवोनि प्रवृत्त । अखंड अंतरी रुजवितो ।। ३५५ सद्भावनेस जागृत ठेवोनी । घडवीत राहातो जीवमात्र, प्राणी । सात्विक लक्षणि मधुरवाणी । अवलंबुनी अविरत ।। ३५६ तर्कबुध्दीचा दिवा । ज्ञानघृते तेववा । जे करितांत 'देवा'चा धावा । प्रतीक्षेंत अखंड राहोत ।। ३५७ सिध्द करिते रोज विज्ञान । अंधश्रध्देचे फोलपण । बंद डोळे आणि कान । गल्लाभरूं, परि 'संतां'चे ।। ३५८ अरे पाहा अवती-भवती । ठाई ठाई विज्ञानाची प्रचिती । करू नका आयुष्यांची माती । निष्फळ भजनी लावूनिया ।। ३५९ मंगलग्रह समृध्द लाल । मृद्-जळयोगे परिपूर्ण स्थलं । वसति योग्य म्हणे ठरेल । भविष्यांत कदाचित ।। ३६० प्रथम, द्वितीयाचे क्षेत्र । तृतीय प्रथमपदासि पात्र । चमत्कार नाही, गणितीय सूत्र । साधे, सरळ, सोपे ।। ३६१ एक येतो, एक जातो । रितेपणा भरून पावतो । सोबत्यांच्या प्रतीक्षेंत राहातो । तरी कां बा आपण ।। ३६२ एकलेपणाची वेदना । जन्म देई विविध प्रलोभनां । अपहार, आत्मघात मना । वारंवार मग खुणावतो ।। ३६३ सिध्द करा, जर खरे वाटे । की मी बोलतो खोटे । अनुभवांचे वेचीत काटे । पोहोचलो येथवरी ।। ३६४ ।। दास-वाणी ।। विवेके अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला । नि:संग योगी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०४/१२ सार असार किंवा नित्य अनित्य विवेक केल्यामुळे कुठल्याही वस्तु विषयी आकर्षण उरले नाही. विरक्ती मुळे व्यावहारिक गोष्टींशी फारकत घेतली. अंतर्बाह्य मोकळा झालेला हा नि:संग साधक योगी मानावा. ऐसा कैसा अतर्क्य निष्कर्ष । काढिती समर्थराम दास । नि:संग, विरक्त पळपुट्यास । म्हणती साधक योगी ?।। ३६५ शेजेवरी वर्षे इतुकी । कुठल्या 'योगे' भोगिली सखी । लुटावयास ना उरले बाकी । म्हणुनि पळे पाहा 'चोर' ।। ३६६ म्हणे हे आदर्श रामभक्त । नशीब, राम नाही सद्यकाळांत । धरुनी छाटी, कमंडलूस । असते दिले सुळावरी ।। ३६७ शोषितासि निराधार सोडे । त्या मातीवरी उभारी वाडे । त्यांच्या मनगटी सुवर्णकडे । चढवू पाहाती कां दास ।। ३६८ हे तर जाणा नारी अरि । संसारास म्हणती उघड्यावरी । न्हाणुल्या लेकी, सुना घरी । टाकुनि ! म्हणति 'व्हा साधक' ?।। ३६९ ।। दास-वाणी ।। जाणावें दुसर्याचें जीवीचें । हें ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०५/३४ समोरच्या माणसाच्या मनातील विचार त्याच क्षणी तो काही न बोलता ओळखणे याला मनकवडा म्हणतात. ही आश्चर्यकारक गोष्ट असल्याने तो फार मोठा ज्ञानी आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु हे सर्वश्रेष्ठ आत्मज्ञानाचे लक्षण नाही. पाहावें आपणासी आपण या नांव ज्ञान. स्वत्व तर जाणांवेचि प्रथम । तत्पश्चात इतरांचे अंतर्याम । जाणिवेशि तोलतां जाणीव । सुख-दु:खे प्रकर्षें भिडतील ।। ३७० ।। दास-वाणी ।। रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ । तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०३/४४ रथ किंवा कुठलेही वाहन वेगात धावत असताना दोन्ही बाजूची जमीन तितक्याच वेगाने उलट दिशेने मागेमागे सरकत आहे असा भास होतो. प्रत्यक्षात जमीन स्थिरच असते. भौतिक शास्त्रातील दृष्टांत वापरून समर्थ सांगताहेत की मायेमुळे अनेक रंग रूप आकारांत व्यक्त झालेला मुख्य देव आपल्याला दिसतो, भासतो परंतु त्याचे मूळ स्वरूप निर्गुण, निराकार असेच आहे. (सूक्ष्म आशंका निरूपण समास ज्ञानदशक. ) भूमी जर धावली उलट्या दिशेने । वेग रथाचा वाढेल दुपटीने । भौतिक सिध्दतो ऐशा लक्षणे । वैज्ञानिक सत्य ।। ३७१ कोठे सांगा दिसतो 'देव' । मूर्ती तर पाषाण संभव । 'त्या'च्या नावें उच्चरव । कोणत्या कारणे करावा ?।। ३७२ सुसंस्कृत, विकृत स्वभावता । माणसे विविध स्थळी भेटता । विशुध्द जोपासता वा नासता । कोठे असतो तुमचा 'देव' ?।। ३७३ आंता ऐका सांगणे । एकचि आहे मागणे । करोनि टाका आम्हास उणे । अध्यात्म, गति, मोक्षांतुनी ।। ३७४ आम्ही तर 'गति' प्राप्तं । जगता जगता मरणांत । मोक्ष आम्हा सदाचि परोक्ष । राहिला तर बरेचि ।। ३७५ असो थंडी, वारा, ऊन । स्वेदगंगेत आनंदे न्हाऊन । बांसगांव ठेवू बांधून । कुबट कद, सोवळी ।। ३७६ शिशिर, ग्रीष्म वा श्रावणसरी । सर्वत्र आम्हा आनंदाच्या परी । निर्ढावलेल्या कणखर शरीरी । झेलू, रिचवू, पचवू अखेरपर्यंत ।। ३७७ ।। दास-वाणी ।। तेजीं असे परि जळेना । पवनीं असे परी चळेना । गगनी असे परी कळेना । परब्रह्म तें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०४/३२ निर्गुण निराकार असलेले परब्रह्म हे सर्व चराचराला व्यापूनही शिल्लकच असते. तो ईश्वर अग्नीमधेही असतोच पण इंधनासारखा जळून संपत नाही. वायूमधेही अस्तित्वात असतो पण वावटळीबरोबर हलत नाही. तेच परब्रह्म आकाशात असते तरी जनसामान्यांना ते दिसत नाही. सिद्धपुरूषांना मात्र ते विमलब्रह्म ठायीठायी अनुभवास येते. काय पडले आकाशांतुनी ? 'सिध्द' ? हे तर अध्यात्माचे वाणी । आद्य निसर्गाची लेणी । संबोधिती 'परब्रह्म' ?।। ३७८ नसते ज़र एक पेशीय जीव । 'अध्यात्म' ठोकण्या उत्क्रांत मानव । जाहले असते संभव ?। सांगा बरे ।। ३७९ आतां तरी या भानावर । पंचमहाभूतांचा आविष्कार । क्षणोंक्षणि देतीं साक्षात्कार । वंदनीय खरे तेची ।। ३८० हडपोनि संचित, करोनि निर्धन । वृध्द माय-तांत हताश पराधीन । देतां,दयानिधींच्या भरवशां सोडून । ऐसे करंटे वर्णांने कैसे ।। ३८१ मजपाशी नाही लौकिक, धन । 'शब्द' केवळ उपजीविके साधन । त्या आधारे मन तवाव, प्रसन्न । ठेवू पाहातो ।। ३८२ जर कांही अधिक उणे । लिहिले गेले उद्वेगाने । त्यासाठी 'क्षमस्व' म्हणणे । आवश्यक अखेरीस ।। ३८३ नाही अधिक्षेप करणे, अंतरी । बल वापरुन कर्म घरी-दारी । नाही केले ! विश्वास धरी । मायबापा ! अन्यायगर्भी संताप ।। ३८४ सोड सोड ना माझ्या अक्षरबाळा । धड धड वाजतो पडघम आगळा । वेड-सूड, मूळ विकृतविकार ज्वाळा । बघ मजला बाहती ।। ३८५ मी संतापी, करंटा भोगलोलूप । मज सगळे पुण्य नि पाप । सारखेचि ! अनुष्ठान-जप-तप । नावडलेच निरंतर ।। ३८६ ।। दास-वाणी ।। उंचनीच नाही परी । राया रंका येकिच सरी । जाला पुरूष अथवा नारी । येकचि पद ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०२/२४ त्या मुख्य देवापाशी कुठलाही भेदभाव नाही. मग तो राजा असो वा भिकारी, स्त्री असो वा पुरूष सर्वजण एकाच समान पातळीवर येतात. प्रत्येकाला साधनेअंती येणारा आत्मानुभव सारखाच उत्कट असतो . मी लिहितो तो उपदेश ?। मलाच येउ लागला त्याचा वास । काय म्हणुनि 'सद्भावी' 'संतास' । 'पोकळ' मग म्या म्हणावे ।। ३८७ तरि निक्षून सागतो बाप्पा । ढोंगीपणा, भाकड, थापा । टाळा ! दावा निखळ रूपा । जैसे निसर्गे घडविले ।। ३८८ जीवजंतू वा उत्क्रांत मानव । स्थल काल भिन्न तरि एकच भाव। निसर्ग मर्यादेंत शोधणे ठाव । जगण्या !जोवर ना मरण ।। ३८९ जनकल्याण संतांचा श्वास । शब्द माझे, तर उत्सर्जित नि:श्वास । कदाचित बोधाचे भास । होइल ! परि फसूं नका !।। ३९० जर समान नर नारी । त्यजुनि संसार भोगोत्तरी । शोधाया मोक्ष-गति, द-या खोरी । सांगिती केवळ नरास कां ?।। ३९१ निसर्गे जखडिले नारीस । उच्चाटुनि 'मातृपदास' । श्वशुरगृही भोगत राहाते त्रास । परागंदा पती जरी ।। ३९२ ओवींत गुंफिता शब्दक्रमणा । नकळे कोठेनि मिळाली प्रेरणा । दासांच्या मार्गप्रदीप्तीविणा । बहुधा नसते झाले संभव ।। ३९३ आसने मर्यादित जरी । मात्र कामना अंतरी धरी । स्वप्नाळू बुभुक्षित चर्येवरी । भाव कांही मिटेना ।। ३९४ सर्व मण्यांची माळ एक । कुणि पोवळ्, पाचू वा मौत्तिक । सूत्रांतुनि ओघळणे स्वाभाविक । त्यांसा कैसे उमगेना ?।। ३९५ अंत येता नाही परतणे । प्रत्येक जीव अंतरि हे जाणे । 'वेळ' आली तरी झगडणे । आप्तां सांगे 'सोडू नका' ।। ३९६ सहज निवृत्ती कठिण फार । उसने अवसान करी जोर । 'बलवंत' आहे शरीर, अंतर । कथित राही परिवारा ।। ३९७ सनई, चौघडे, ढोल, ताशे । मर्तिक, विवाह वा बारसे । धनिकांघरी 'सोहळे' असे । होती ! सेवकां पर्वणी ।। ३९८ मी आरडतो कोणत्या काजे ?। कष्टकल्लोळांची वेदना गाजे । महानगरांत आयुष्य माझे । व्यतीत झाले ! म्हणोनी ?।। ३९९ शतके चार, अखंड प्रवास । मजसाठी कैसा महत्प्रयास । प्रेमभरे कवटाळा पामरास । उरी धरोनि, निरोप द्या ।। ४००

Sunday, October 19, 2014

।।भासबोध।। ३०८ ते ३५०

।। दास-वाणी ।। ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०५/३१ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जरी काही कारणाने षोडशोपचार यथासांग पूजाविधी करता आला नाही तरी त्याची खंत न बाळगता मानसपूजा सुरू करावी. परमेश्वर सर्वव्यापी सर्वसाक्षी असल्यामुळे आपण मनानेच कल्पना करून वाहिलेली पाने, फुले, फळे, गंध, अक्षता थेट त्याच्यापर्यंत पोहोचतातच. फक्त आपल्या मनात तो उत्कट अर्चनभक्तीचा भाव मात्र असावा. रामकृष्ण परमहंस कालीमातेची मानसपूजा नेहमीच करायचे. जर असशी सर्वव्यापी सर्वसाक्षी । उद्योग सोडोनि अबाल-वृध्दासी । मग वारी कां बा करविशी । फुका, कष्टप्रद ?।। ३०८ मनोमनी वेधतो आम्ही । सतर्क राहोनि दिशा दाही । उपजीविकेची साधने कांही । त्यासि संबोधा परमेश्वर ।। ३०९ प्रार्थना पूजेचे काय काज ? उदरभरणां घास रोज ?। आणि रात्री निवांत नीज ?। अट्टाहास त्याकारणेचि ना ?।। ३१० प्रांत:काळी छकुल्याचे हसू । वयस्कांचा सावरी स्पर्शू । अस्तुरिचा लाडिक कटाक्षू । लाभता सगळे पावते ।। ३११ क्षणोक्षणी पाठोपाठ । तिन्ही त्रिकाळ उपदेशाचे लोट । त्याने कां भरते पोटं । भस्मपट्टेधारींनो ।। ३१२ हातांत नाही घेत झोळी । वा पंचपात्र-पळी । कर्मोत्तरीच मिळते पोळी । आम्हासारख्यांना जगी ।। ३१३ कां दवडता उगा वाफ । म्हणतां 'वारितो आम्ही पाप !'। पडता पोळीवर अनासाय तूप । होता क्षणार्धांत अदृश्य ।। ३१४ जोडोनि दोन हस्तक । तुकवोनि एक मस्तक । समस्त आम्ही सांसारिक । विनम्र असतो सदा ।। ३१५ हे लिहीलं कोणीही, लिहावे । अंत:करण मथुनि व्यक्त व्हावे । धगधगते शब्द 'ओवीं'त जावे । मोकळणे हेतू ।। ३१६ ।। दास-वाणी ।। आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे । आपण त्रास घेता जीवें । देवहि त्रासे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०८/१३ त्या एका परमेश्वराशिवाय कोणीही संकटातून मला वाचवू शकणार नाही अशी ठाम श्रद्धा म्हणजे अनन्यभाव. तो असला की आपोआप योग्य तो मार्ग दिसतोच. आपल्या निष्ठा जर बदलत राहिल्या, अनन्यभाव ढळला तर आपल्याच देहात वास्तव्यात असणारा आत्मदेवही त्रासून जातो. आतून येणारे स्फुरण थांबते आणि कार्यही बिघडते. माहीत असोनि हे सारे । कां कष्टविती शरीरे । माय-बाप, अस्तुरी, पोरे । सुखवा ! 'देव' जाणा तिथेचं ।। ३१७ विचार आप्त-स्वकीयांचा प्रथम । विस्तारलेला कल्पद्रुम । देवोनि वात्सल्य-ममता प्रेम, । जोपासला जो आपणचि ।। ३१८ देव जर असला सर्व ठाई । आप्तांमधे तो कां नाही ?। सोडून पळण्याची घाई । भोगोत्तरि कां संतांना ?।। ३१९ ना मी रुजवू पाहातो विषवल्ली । माझी प्रामाणिक ही 'काका'वली । सद्भाव, निष्ठेने सरसावली । निर्मूलण्या अंधविश्वास ।। ३२० ।। दास-वाणी ।। शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहातां शब्द वेर्थ । शब्द सांगे तें येथार्थ । परी आपण मिथ्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/१०/१ ९ एखाद्या वस्तूचे वर्णन करण्यासाठी शब्द आवश्यकच असतात. त्या वर्णनातून वस्तू समजली की शब्दांचे महत्व संपले. शब्दांनी सांगितले ते यथार्थ असल्यामुळेच जरी आकलन झाले तरी निव्वळ शब्द हे मिथ्याच मानावे कारण त्या वस्तूवर्णनापुरतेच त्यांचे अस्तित्व होते. जिचे वर्णन शब्दांनी केले गेले ती मूळ वस्तूच सत्य मानावी. इथे वस्तू हा शब्द परब्रह्म या अर्थाने घेतल्यास उलगडा अधिक स्पष्ट होईल. डोळसांसाठी प्रतिमेचा ठसा । मेधा सहजचि रुजविते सहसा । श्रवणे वेधलेला शब्दार्थ योग्यसा । ताड़ून पाहते तर्काने ।। ३२१ केवळ प्रतिमा वा शब्द । वा वेगळा ठेवला अर्थ । जर तर्क ताडण्या असमर्थ । फोल ठरतो प्रयास ।। ३२२ भाषांमध्ये शब्द समानार्थी । उच्चार, लिपीरूपे विविध धारिती । प्रतिमेशि परि एकवटती । केवळ तर्कबळाने ।। ३२३ तर्काविना तथ्यहीन । भाषण, उच्चारण, लेखनं । असंबध्द, बेलगाम,बेभानं । केवळ जाणा 'नाद' तो ।। ३२४ ।। दास-वाणी ।। सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें । सारासारविचारें । संतसंगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०६/०६/५५ साधनेची सुरूवात मूर्ती, प्रतिक किंवा चिन्ह डोळयासमोर ठेऊन होते. चर्मचक्षू ते पाहू शकतात म्हणून मन एकाग्र होते. पुढे सद् गुरू, संतकृपेने ज्ञानचक्षू उघडले की साकार समोर नसले तरी निर्गुण परब्रह्मावर लक्ष केंद्रित होते. सार म्हणजे काय जपावे, असार म्हणजे काय टाकून द्यावे हा विचार पक्का होत जातो. देवशोधन दशकात मुख्य देव संतसंगानेच मिळतो हे सांगताहेत. डोळे मिटता विवंचना । समोर ठाकती संकटे नाना । त्या गर्दींत 'देव' गणां । स्थान कैसे लाभावे ?।। ३२५ अंतर्यामी विविधांच्या मूर्ति भिन्न । प्रेमिका, चंडिका, परिचारिका ! वयास अनुसरून । प्रत्यक्षावे कि भग्नावे स्वप्न । अवलंबे इप्सितावरी ।। ३२६ ।। दास-वाणी ।। भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी । केली देखोनि सीघ्र सोडी । तो सद् गुरू जाणावा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/११ भव म्हणजे संसार किंवा प्रपंच. गो म्हणजे गाय परब्रह्माचे प्रतीक. वत्स म्हणजे संसारात अडकलेला जीव. प्रपंचरूपी वाघाने मनुष्यावर उडी घालून त्याची परमेश्वरापासून केलेली ताटातूट जो थांबवतो आणि जीवब्रह्माचे ऐक्य पुन्हा प्रस्थापित करतो तो सद् गुरू ! थोडक्यात सामान्य प्रापंचिकाला जो परमार्थाची शाश्वत वाट दाखवतो तो सद् गुरू होय. कां करता बा ताटातुट । ब्रह्मभेटी साठी आटापिट । सुखदु:खांशी भव भेट । होता आम्ही समाधानी ।। ३२७ नका होवू कल्याणकारी । तोडून आम्हा विविधपरी । जिवाभावाच्या संसारी । पोरके करण्या सरसावू नका ।। ३२८ नका होवू कराल दैत्य । तुम्हा जरी 'ब्रह्म' सत्य । ना संसार, आप्त, अपत्य । म्हणोनि हेवा करू नका ।। ३२९ तरुणहो वेळच्या वेळी । भोगसुखे, मिळवा सगळी । काळ पळतो न देता हाळी । अन्यथा उरते विदग्धता ।। ३३० ग्रंथ वाचणे, अभ्यासणे । आशयांत न गुंतोनि जाणे । रुचेल, रुजेल ऐसे निवडणे । श्रेयस्कर ।। ३३१ निरुद्योग्यांशी अध्यात्म । भजनि लागा सोडोनि काम । नसल्या 'देव' 'मोक्षा'चा नित्यनेम । व्यसनांचे हे व्यपारी ।। ३३२ म्हणती ठेवा दक्षिणा । फळे-फुले मिष्टान्न आणा । मग दावीन चमत्कार नाना । ऐसे लोभी हे 'महाराज' ।। ३३३ सावध राहा ऐशांपासुनी । लाथाडा फोलपट त्याची वाणी । उधळा, जाळा काळी करणी । म्हणा, ' जा मोक्षाप्रती !' ।। ३३४ ।। दास-वाणी ।। जे जे रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी । पडली गळां ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०२/२४ शिष्याला जे आवडेल तेच गुरू करतो. त्याच्या लहरीप्रमाणे वागु देतो. शिष्य साफ चुकला तरी त्याला योग्य ती समज देण्याऐवजी त्याचीच मनधरणी करतो असा लाचार गुरू. आश्रमाचा खर्चच मुळी श्रीमंत शिष्य भागवत असतो ना . इलाज नाही कामनारूप पापिणी गळयात पडलेला हा भोंदू गुरू कोणाला मोक्ष मिळवून देणार कोण जाणे ? ऐसे माजले 'शिक्षण सम्राट' । भोवती गोडवे गाणारे भाट । गुणी, बुध्दिवंताने त्यांतुनी वाट । शोधावी कैसी ? सांगा बरें !।। ३३५ परीक्षा देती शिक्षकगण । सोडविती शिष्यांचे प्रष्ण । ऐसे 'आनंददायी' शिक्षण । म्हणे, 'प्रगती योग्य' साधेल ।। ३३६ कांही महाभाग 'सम्राट । स्वशिष्येशि लाविती पाट । यथेच्छ भोगोनि सोडिती मोकाट । अश्रू मुकाट ढाळावया ।। ३३७ सगळिच माजली बजबजपुरी । धन-संपत्ती वोपरून सत्ताधारी । तडस लागेस्तो मिष्टान्न-पुरी । म्हणती 'चाटा उत्सर्जित !' ।। ३३८ ।। दास-वाणी ।। तैसे आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें । येक वेळ उदंड जेविलें । तरीं सामग्री पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/११ साधना करता करता गुरूकृपेने परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान झाले तरी आत्मबोधावर स्थिर होण्यासाठी साधना सुरूच ठेवावी. साधनाक्रमही तोच असावा. बदल करू नये. कितीही तुडंब जेवलो तरी संध्याकाळ साठी जसा शिधा तयार ठेवावाच लागतो तसच ज्ञानोत्तर साधनेचे आहे. आता पुरे असे कधीच म्हणता येत नाही. 'पुरे पुरे आतां' नये म्हणू । नुरे नुरे होतं नाही ज्ञानाचा घनु । खरे खरे भेटतां शिष्यवरु । उचंबळे गुरुहृदय ।। ३३९ जैसे जिरते ज्ञानामृत । बौध्दिक कृती तीक्ष्ण होतं । नीर-क्षीर विवेके सुकृत । घडविते आपोआप ।। ३४० ।। दास-वाणी ।। सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०६/४९ जो दुश्चित्त नाही म्हणजेच अत्यंत सावध आहे, विशेष प्रयत्नांचे सातत्य ज्याच्यामधे भिनलय, चिंतन मनन करू शकणारी बुद्धी म्हणजे प्रज्ञा अंगभूतच आहे आणि परमेश्वराविषयी अपार श्रद्धा आहे तो सत् शिष्य ! अशा शिष्याला साधनेचे फार कष्ट पडत नाहीत किंवा पडले तरी ते बिलकुल जाणवत नाहीत. ।। दास-वाणी ।। तया स्वानमुखीं परमान्न । की मर्कटास सिंहासन । तैसें विषयाशक्तां ज्ञान । जिरेल कैचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०५/०३/६२ मेधा, प्रज्ञा, तर्कशक्ती । बुध्दीची आभूषणे असती । वर्धमान ती होता प्रगती । कृतिमधे दृश्यमान।। ३४१ विना योगे यांच्या होडी । भवसागरांत करते कोंडी । शीड, वल्ह्याविना नावाडी । हताश जैसा ।। ३४२ अरुणी वा एकलव्या । अदृश्य गुरु, देतो छाया । दक्षिणापेक्षा केवळ परीक्षाया । निष्ठा, साधना स्थिर मति ।। ३४३ कुत्र्याला पंचपक्वान्ने भरवली, माकडाला राजसिंहासनावर बसवला तर जो परिणाम होईल तीच गोष्ट एखाद्या दैनंदिन सुखविलासात लोळत असलेल्या शिष्याला आत्मज्ञान शिकवायला गेले तर होईल. अनधिकारी शिष्याला ब्रह्मज्ञान आवडणारही नाही अन् पचणारही नाही. श्वान, मर्कट, कुशिष्य जरी । मिष्टान्न, सुकृताची आंस धरी । स्वप्नांची आव्हाने त्यांच्या स्वीकारी । तोचि खरा गुरू ।। ३४४ जीव सगळे सारखेचि ना ? मग कां हेटाळता सर्वदा त्यांना ? प्रलोभना तुम्हि कधीच ना । शरण गेला ?।। ३४५ ब्रह्मचा-या विषयभोग । पंगूसि शारीर आवेग । अवकाशी उल्केशि पतनयोग । निसर्गदत्त, स्वाभाविक ।। ३४६ विकाराविना जीवमात्र । जगण्या असतो सत्पात्र ?। सत्प्रवृत्तीचा अवलंबुनी वेत्र । दुष्कृत्य वारी तो भला ।। ३४७ ओसाडावर फुलवी मळा । त्यां वंदावे कृषिवलां । खडक, तणास कधी न भ्याला । कार्यप्रवण एकाग्र ।। ३४८ 'हा असा, तो तसा' म्हणती । कार्यपरावृत्त सदैव होती । वृथा कालापव्यय करिती । जाणा तें बाष्कळ ।। ३४९ आखुनी वेळीच कार्यकक्षा । लाभार्थींच्या रास्त अपेक्षा । पूर्ततेसाठी करिति दुर्लक्षा । संकटांकडे ! कर्मयोगी खरे ।। ३५०

Thursday, October 9, 2014

।।भासबोध।। २५६ ते ३०७

।। दास-वाणी ।। रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०६/०१ एखाद्याचे रंग रूप उंची बांधा कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला हवे तसे बदलता येत नाहीत. सह ज म्हणजे जन्मत: जी ठेवण घेऊन मनुष्य येतो ती अपरिवर्तनीय असते. तरीही स्वत: प्रयत्नपूर्वक जे सद् गुण किंवा कौशल्य अंगी बाणवणे शक्य आहे त्यासाठी कष्ट केल्यास नैसर्गिक उणीवा भरून काढता येतील हे नक्की. चित्तवृत्ती स्वभाव । सहजची देतो अनुभव । प्रामाणिक वा अन्य डाव । मुद्रेवरी उमटतो ।। २५६ सरळ नासिका, नेत्री चमक अद्वितीय । शुभ्र दंतपंक्ती, सुबक ओष्ठद्वय । प्रमाणबद्ध श्रवणेंद्रिय । लक्षणे कां सुरूपाची ?।। २५७ वाणींत, स्पष्ट मृदु भाष्य । मुद्रेवरी स्मित हास्य । धारण करणे अवश्य । समाजांत जातांना ।। २५८ नासिका चाफेकळी असे । सावध नजरेंत मृग विलसे । ओष्ठद्वय ताज्या गुलाबासम भासे । कर्ण प्रमाणबध्द समांतर ।। २५९ हे सर्व काय कामाचे । जर मुद्रेवर दुर्भिक्ष हास्याचे ।नासिकेस वावडे सरळपणाचे । आणि जाळे आठ्यांचे कपाळी ।। २६० ।। दास-वाणी ।। विद्या नाही बुद्धी नाही । विवेक नाही साक्षेप नाही । कुशलता नाही व्याप नाहीं । म्हणोन प्राणी करंटा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०९/०४/१० शिकला नाही, तशी बुद्धीही झाली नाही त्यामुळे योग्य अयोग्य निवडण्याचा विवेक नाही. आळसामुळे प्रयत्नांचे सातत्य नाही. कौशल्य कधी अंगी बाणलेच नाही त्यामुळे कामाची व्याप्ती मर्यादित राहिली असा माणुस दरिद्रीच राहणार. जाणपणनिरूपण समासात समर्थ करंटलक्षण सांगताहेत. श्वापदेसुध्दा धरिती सावज । प्रस्तर जळबळे फुटता करि आवाज । तमगर्भी दीप्यमान होई वीज । प्रळयवेळी ।। २६१ हालेना डुलेना कांहीकेल्या । ऐसा बैल, सांगा तेल्या । काय कामाचा भल्या । भुईला भार नुसता ।। २६२ ।। दास-वाणी ।। वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये । विद्याभ्यास सोडूं नये । काहीं केल्या ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०२/०८ सभेमधे वक्ता बोलतोय.विषय छान मांडला जातोय. अशा वेळी आपण मध्येच त्याला अडवून शंका विचारू नये. त्याने आपले पांडित्य तर सिद्ध होणार नाहीच उलट एकाग्र झालेले श्रोते विचलीत होउन सभेचा बेरंग होईल. आपण स्वत:चा विद्याभ्यास करूनच आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधावीत हे उत्तम लक्षण ! शंकांचे निराकरण । करण्या ज्ञान संवर्धन । परंतु सकल निरुपण । श्रवणोत्तरी, करोनि घ्यावे ।। २६३ टोकण्या, गाठू नये टोक । नि:शब्द चिंतनाचा विवेक । अवलंबुनी, व्हावे विश्लेषक । आशया, विषयाचा ।। २६४ ।। दास-वाणी ।। करंटयास आळस आवडें । यत्न कदापि नावडे । त्याची वासना वावडे । अधर्मीं सदा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०३/०४ करंटा म्हणजे कर्मदरिद्री. तो आर्थिक दारिद्र्यात नसेलही कदाचित. परंतु आयुष्य कायम असमाधान अशांतीमधेच जाते. आळस म्हणजे काहीही करायचा कंटाळा. प्रयत्न कष्ट उद्योग याला आवडत नाहीत. याच्या इच्छा चमत्कारिक असल्याने इच्छापूर्तीचे मार्गही सरळ सात्विक नसतात. गैरमार्गानेच व्यवहाराकडे करंटयाचा कल असतो. विनाकष्ट संपदा प्राप्ती । एहिक सुखांची देई प्रचिती । परंतु अधोगतीची निश्चिती । नकळत हळुवार, जाणा ।। २६५ आळसाने वाढे मेद । पाठोपाठ बुध्दिभेद । अंती देह-अंतरिचा आक्रंद । आपोआप ।। २६६ ।। दास-वाणी ।। अंतर्निष्ठांची उंच कोटी । बाहेरमुद्य्रांची संगती खोटी । मूर्ख काये समजेल गोष्टी । शाहाणे जाणती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०५/१९ साधना करता करता मन अंतर्मुख केलेल्या व्यक्ती उच्च प्रतीच्या मानाव्यात. बहिर्मुखी मनाचे लोक खाणे पिणे, कपडे लत्ते यात मशगूल असल्याने त्यांची संगत प्रगती पथावर नेत नाही. ही गोष्ट शाहाणे जाणतात. मूर्ख आणि चंचळ समजू शकत नाहीत. म्हणोनि घ्यावा धांडोळा । स्वांतरीच्या नाना कळा । दर दिवसा एक तरि वेळा । पारखाव्या चिंतनी ।। २६७ विचार विकारांची दळे । स्व-तेज, वा तमोबळे । उन्नतीप्रति क्रमण सगळे । पाहतील ग्रासू ।। २६८ तरी अढळ ठेवावा विश्वास । फेडत शंक-कुशंकांचे पाश । आपुल्या विहित कर्मास । जात राहावे सामोरे ।। २६९ मी हा ऐसा उपदेश । साक्ष ठेवोनि वास्तवास । पुराणांतील आदर्शवादास । शब्दांकितो भेदण्या ।। २७० ।। दास-वाणी ।। मन दिसते मां धरावे । ज्याचें त्यानें आवरावें । आवरून विवेकें धरावें । अर्थांतरी ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/१७ सूक्ष्मदेहाचा एक भाग असलेले मन हे दिसत नाही, दाखवता येत नाही, धरून पकडता येत नाही. परंतु प्रत्येकाला स्वत:ला मात्र पूर्ण जाणीव असते की ते कुठे भरकटलय. ज्याने त्याने मनाच्या मुसक्या बांधाव्या, त्याला आवरावे आणि आत्मविवेकाने श्रवणाच्या अर्थाकडे लावावे. तर आणि तरच उन्नती आहे. अतर्क्य घटना, गर्दी, कल्लोळ । मन ठेवणे स्थिर निश्चल । कष्टप्रद ! तरि उत्तम फल । अनुभवावे ।। २७१ परिस्थितीजन्य अस्वस्थता । सुधारते वातावरण निवळता । कालौषधि एकमेव असतां । फोल सर्व उपाय ।। २७२ म्हणोनि दैवावरी भिस्त । ना ठेवतो आम्ही समस्त । कर्मधर्म राहतो साधत । अविरत ।। २७३ मग शरण आपोआप । संकटे येती टाकींत धाप । पदरांत देती माप । यशाचे, प्रयत्नांति ।। २७४ द्विशतकोत्तरी सप्तदशके । वर पंचम, लिखाण इतुके । फोलपटे नि 'जळ'मटांचे पुंजके । जणु, म्यां पामरे प्रसविले ।। २७५ कलानिधि, साहित्यिक नामी । नसतांना ! कोण्या अधिकारे मी । 'प्रतिबिंब ओवी' प्रबंध कर्मी । म्हणोनि जाणला जावा ?।। २७६ ।। दास-वाणी ।। मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें । उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १८/१०/११ एखादा जाणकार श्रोता पुष्कळ सभा, कीर्तने, निरूपणे वर्षानुवर्षे ऐकत असतो. यथावकाश त्याच्या ज्ञानात खूपच भर पडलेली असते. त्याला कुठलाच विषय नवीन वाटत नसल्याने तो सभेमधे वाक्यावाक्याला अडथळे आणतो. पांडित्य दाखविण्याच्या हव्यासात तो इतर श्रोत्यांचे श्रवण सुद्धा बिघडवतो. हा श्रोता ज्ञानी असला तरी अवलक्षणीच मानावा. बेभान वक्त्याची, अनावर । सहसा टाळिते नजर । म्हणोनि भले वाटू दे अडसर । लक्ष वेधण्या मधेमधे ।। मंच मिळतांच सुटतांत । विषयांतरी बरळतांत । त्यांना भानावर आणणे क्रमप्राप्त । होते नाइलाजे ।। २७७ वेदना, व्यथेचा आवाज । विरून जातो, गर्जता मत्त गाज । बहुधा असते जी विनाकाज । भाटांना सुखावण्या ।। २७८ गरिबांचा जो कैवारी । जो असतो परोपकारी । 'सत्ता'धा-सास त्रास भारी । सहसा होतसे ।। २७९ कार्यकारणभावाचे भानं । सहजचि जाती विस्मरुन । गांजल्या शंकांचे रानं । अडसर वाटे ऐशांना ।। २८० व्हा आक्रामक, प्रष्णकर्ते । शोधा वाचाळ निष्क्रिय नाकर्ते । विद्वान जरि म्हणविती ते । उत्तरदायित्व त्यांसि शिकवा ।। २८१ ।। दास-वाणी ।। बहुत साधनें पाहातां । श्रवणास न घडे साम्यता । श्रवणेंवीण तत्वता । कार्य न चले ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०८/२१ परमेश्वरापाशी पोहोचण्यासाठी जी नवविधा भक्ती सांगितली आहे तिची सुरूवात श्रवण आहे. ऐकणे ही पहिली पायरी अत्यावश्यकच. त्यानंतर मनन, चिंतन येते. मग मनात ज्ञान मुरायला लागते आणि शेवटी आचरणात येते. श्रवणाशिवाय पुढचे सर्व टप्पे अशक्य, त्यामुळे अन्य कोणतीही ज्ञानसाधने श्रवणापुढे कनिष्ठ होत. बहुधा स्वतःव्यतिरिक्त । इतरांचे संवाद, ध्वनिसंकेत । नावडणारेच बहुसंख्येंतं । आढळतांत सहसा ।। २८२ ऐकत जावे सर्व कांही । परंतु त्याची धरुन बाही । अवलंबून राहाणे बरे नाही । आधारास्तव कदापी ।। २८३ स्वमति, मंथनोत्तर विचार । स्वानुभव, जगण्यातिल अपार । संयम, विवेक सारासार । स्मरावा कृतिपूर्व ।। २८४ कां असले अक्षर-पांप । विधानार्थाना येई दर्प । की मज डसला सर्प । अगंकाराचा ?।। २८५ ।। दास-वाणी ।। मूर्ती नस्तां सगुण । श्रवणी बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१९ सगुण म्हणजे ज्याला रंग रूप आकार आहे असे मूर्त स्वरूप. कुठल्याही स्वरूपातल्या मूर्तिरूप देवता समोर नसतील तर आणि ऐकणारे श्रोते विद्वान अभ्यासू असतील कीर्तनकाराने अद्वैत शास्त्रांचे निरूपण जरूर करावे. 'अहम् ब्रह्मास्मि ' हा भाव समजण्यासाठी श्रोता जाणकारच हवा. ऐका एक सुरसा कथा । शब्दांनी सजली होती गाथा । ग्रंथ होता पुरेपूर सर्वथा । परंतु निरक्षरा काय त्याचे ?।। २८६ कोणे एकाने आणिले चित्र । उलगडू लागला आशयाचे गोत्र । निरक्षराने तेंव्हा मात्र । प्रतिबंधिले ।। २८७ कारण, समजणे सोपे । जाणवते आपोआपें । शब्देविण आशय छापे । सहजचि चित्र ।। २८८ विद्वान, ज्ञानियांच्या जगी । प्रगल्भांची मांदियाळी जंगी । अक्षरांचा उदोउदो जागोजागी । निरक्षरा अप्राप्य ।। २८९ शब्दसंभार ऐकताक्षणी । अर्थाची समूर्त लेणी । ऐसी असावी मांडणी । समग्र ग्रंथांची ।। २९० चित्रमयता सोपी नसे । अभावानेच प्रतिभेंत विलसे । सहजी अनुभवास न येतसे । पढत पांडित्यांत ।। २९१ श्रवणेंद्रियांची सजगता । उच्चारेच्छेची करिते पूर्तता । मेधा तर्कबळे विश्लेषिता । साकारते चित्र ।। २९२ ।। दास-वाणी ।। पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती । तेचि पढतमूर्ख ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०५/१० मंदिरामधे कीर्तन सुरू आहे. समोर राम, कृष्ण, शंकरादि कुठल्यातरी दैवताची सुंदर मनोहारी रमणीय मूर्ती आहे. श्रोते छान सगुणाच्या आख्यानासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी जर कीर्तनकाराने निर्गुण ब्रह्माचे निरूपण सुरू केले आणि परमेश्वराच्या सगुण रूपाचे खंडण सुरू केले तर तो ज्ञानी असला तरी मूर्खच ! पढतमूर्ख मानावा. कौतुक करावे पाथरवटाचे । काष्ठ-पाषाण-मृद् कसबकाराचे । अनुल्लेखे टाळण्या-याचे । उपटावे कान ।। २९३ समूर्त-सगुण-साकार ठाकले । जेंव्हा प्रस्तरें घाव सोसले । स्वेदगंगेंत चिंब झाले । छिन्नी-हातोडीसह हात ।। २९४ मूर्तीचे मंद स्मित । भरून वाहते काळजांत । ओघळते प्रेय अश्रुरूपांत । सांगा श्रेय कुणाचे ?।। २९५ ।। दास-वाणी ।। हरिनामे प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायणनामें पावन जाला । अजामेळ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०४/०३/१७ दैत्य, राक्षस कुळातला असुनही प्रल्हाद सतत नारायण नारायण असे नामस्मरण करायचा. त्याचे वडील हिरण्यकश्यपु. विष्णुच्या द्वेषापोटी स्वत:च्या मुलाला सुद्धा हर प्रयासाने ठार करण्याचे प्रयत्न केले. केवळ नामस्मरणामुळे प्रल्हादाचे रक्षण झाले. अत्यंत पापी नामद्वेष्टया अजामेळ नावाच्या ब्राह्मणाने रोगजर्जर अवस्थेत स्वत:च्या नारायण नावाच्या मुलाला आर्ततेने हाक मारली, विष्णुदेवांना नाही. तरी देखील अजामेळ वाचला आणि पुढे उत्तम गतीस पावला. अभावितपणे केलेला नामोच्चारही जर तारून नेतो, तर समजून उमजून निष्ठेने केलेले नामस्मरण कितीतरी अधिक फलदायी ठरेल. होय ना ? नाम घेत राहा बसून । कवळ मुखी येईल आपणहून । कृतिशीलतेस छेद देऊन । म्हणे 'मोक्ष' मिळतसे ।। २९६ हा कसला उपदेश ?। कां सुचला ऐशा 'संतास' ?। कर्मधर्माचा करण्या -हास । कसा बा सरसावला ?।। २९७ हा गीतासाराचा अवमान । आलस्यभावाला निमंत्रण । कर्मेच्छेचे निर्घृण वपन । या परते कोणते ?।। २९८ आवरा आवरा ऐशा नरा । सावरा सावरा सामान्यांच्या संसारा । भवरा भवरा, सुखसरितेच्या उदरा । अवजार कृतिनाशाचे जाणा ।। २९९ अध्यात्म,मोक्ष कल्पना भ्रामक । स्वेदगंगेंस आटविणारा पावक । भोंदू, संधिसाधूंची विकृत भूक । शमवेलही हा कदाचित ।। ३०० जरि असेल ज्ञानसमृध्दी । थोरांचीही चळते बुध्दी । भावुक जनता भोळी, साधी । बिचारी जाई भांबावुनी ।। ३०१ आवरा आवरा ऐशा नरा । विशेषत्वाने उत्साही शिष्यवरा । सदुपदेशाच्या विखारी अवतारा । जे जनमानसी रुजविती ।। ३०२ माहीत नाही कोणती । दासांची होती मन:स्थिती । केवळ नामस्मरणाची महती । सांगो धजले ।। ३०३ रूप आगळेचि सामोरे आज । काय घडले ? काय काज ?। दासांतरी अंकुरले बीज ?। कैसे नैराश्याचे ।। ३०४ हे शिवरायांचे गुरु । सकारात्मत्मकतेचे आधारु । बल-बुध्दी-वृध्दि निर्धारु । सदैव केला ।। ३०५ मागे शिष्यांचे कोंडाळे । 'गादी'वरी ज्यांचे डोळे । संस्थानाधिकार मधाचे पोळे । जिभल्या चाटित वेधिती ।। ३०६ मज नवल नेहमा वाटें । विश्वास ठेविती थोर मोठे । भाकडावरचे मुलामे खोटे । आकर्षिती त्यांसही ?।। ३०७

Friday, September 26, 2014

।।भासबोध।। २१३ ते २५५

।। दास-वाणी ।। हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होता साधनाचा । ठाव नाहीं ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध :२०/१०/२७ मायेच्या प्रभावाखाली जे जे दृष्य दिसते त्याचा कारणासकट उलगडा झालाय.पंचमहाभूतासह ज्या असंख्य तत्वांचे शरीर बनलय त्यांचे निराकरण झाले. ही सर्व तत्वे आणि दृष्य म्हणजे माझे खरे स्वरूप नाही. अखंड केलेल्या साधनेमुळे मी ब्रह्मस्वरूप आहे हे विमळज्ञान मला उमगलय. तेच मला साधायचे होते. साध्य सिद्ध झाल्यावर ज्या साधनेमुळे हे प्राप्त झाले ती साधना सुद्धा आपोआप संपुष्टात आली. समर्थ सिद्धपुरूषाची स्थिती वर्णन करताहेत जे साधकासाठी उद्दिष्ट असले पाहिजे. विज्ञानावर कुरघोडी । करू पाहाती 'संत' बेगडी । 'लागों अदृश्य ब्रह्माची गोडी !' । आग्रहती परोपरी ।। २१३ गतीसही आळा बसतो । विरोध जैसा बळावते । अशावेळी कास धरितो । विज्ञानाची, मानव ।। २१४ हेच जाणा उत्क्रांत रूप । बुरसटल्या विचारांचे आक्षेप । बुध्दीकसाने उजळुनी दीप । 'सत्य' दावे 'मानव' ।। २१५ ।। दास-वाणी ।। नट नाटय कळा कुसरी । नाना छंदे नृत्य करी । टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०२/२१ हे गणेशा तू एक कुशल नट आहेस. मोठया कौशल्याने तू अभिनयकला प्रगट करतोस. नृत्यकौशल्यातही असंख्य तालांवर तू सहजतेने थिरकत असतोस. टाळ, मृदुगांसारखी अनेक वाद्ये तुझ्या सभोवती आपोआप ताल धरतात कारण ताल ही तुझीच निर्मिती आहे. नृत्य करता करता त्या तालावर तूच हुंकार भरतोस जे नृत्याचे उपांग मानले जाते. गणेश स्तवन समासात नृत्यगणेशाचे समर्थांनी केलेले साक्षात वर्णन ! अहा विविध कलांच्या कळा । पहा आनंद भिडे आभाळा । मुद्रा,पदन्यास,अभिनय बळा । महिरप देती बहुुविधरूपे ।। २१६ विरळा असतो आनंद । सुखदायि पळांचा कंद । 'समाधान' पुष्पांतरि मकरंद । हितकर निरामय सर्वकाळ ।। २१७ बाप तोलतो चंद्र-भागिरथी-त्रिशुळा । माय वितरे परित्राण बळा । परशु-पाश-मोदक तुंदिला । सावरण्यांत पुत्र व्यग्र ।। २१८ सहज रिचविति हलाहल । विकृतींसाठी होती कळिकाळ । क्रूर-कृतघ्न्यां तम-डोहाचा तळ । पंचमहाभूते दाविती ।। २१९ तेचि जाणा तांडव । नृत्याचाचि क्रुध्द-भाव । आवर्षण, जळोद्रेक संभव । रूपे संहारक मूलतत्वांची ।। २२० नमस्कार, असे वरवरचा। अंतर्ध्वनि फुत्कराचा । जीव घुसनमटे सद्भावाचा । बहुधा मागे ।। २२१ नमस्कार, दर्शनी कळा । अंत:स्राव विखारी भळाळा । उसळती द्वेषाच्या ज्वाळा । असूयेपोटी ।। २२२ कशासाठी गूहा वा घळ ?। कफ़नों, छाटी वा जपमाळ । दाढ्यीमिशांचे जंजाळ । साधते काय ?!। २२३ वेदना हुंदक्यांची जननी । व्यक्तण्या अर्थपूर्ण ध्वनि । पड़ता जाणिवेच्या कानी । अवतरे ओवी ।। २२४ परिक्रमा, तीर्थाटन । कशास जप तप होमहवन । वास्तव विस्तवापासून । अखेरीस पळति कां ?।। २२५ खवळता क्षुधेचा हुताशन । खळगींत ग्रासाचे हवन । क्रमप्राप्त ! पहिला चरण । आकळेना अध्यात्मी ।। २२६ जनहो घालितो तुम्हा साकडे । निवडून बाजूस सारा खड़े । भोंदू, ढोंगियांचे वावडे । असो द्यावे अंतरी ।। २२७ करो नये अति कधी कांहीही । कल्पना सजग जरि झाल्या प्रवाही । सोडावी लागतेच कधीतरी बाही । निवतांना ज्योत मंद ।। सुचत जाते तैसे लिहितो । सांगा काय म्यां पाप करितो । ना अढी कशाची मनी धरितो । जुळवितांना अक्षरे ।। २२८ करुनी पहा ना संसार । सौख्यदायी ! जरि कष्ट फार । शुष्क शाखांवरी जैसा मोहोर । बहरतो पुनःपुन्हा ।। २२९ ।। दास-वाणी ।। नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदे वेदांत श्रृती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०१/०१/१५ हा ग्रंथ लिहिण्याआधी मी अनेक ग्रंथांची संमती म्हणजे अभ्यास केला आहे. चारही वेद, वेदांत म्हणजे उपनिषदे, श्रृतिग्रंथासहित सहाही शास्त्रे तर अभ्यासली आहेतच. याही पेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे अध्ययनातून स्वत:ला आलेली प्रचीती किंवा आत्मानुभवाचा वाटा दासबोधाच्या रचनेमधे फार मोठा आहे धडपडणे, पडणे, ठेचाळणे । परत उभारी धरोनि पळत राहाणे । हीच ग्रंथाची जिवंत पाने । आम्हांसाठी ।। २३० आत्मभान, प्रचिती क्षणोक्षणी । सुख, समाधान, दुखणीबाणी । जगण्याच्या वेदोपनिषिदांचे वैयाकरणी । अनुभवसिध्द आम्ही ।। २३१ श्रुती, दोन स्वरांमधे जैशा स्थित । रीती, संस्कारी तैशाचि असतांत । जिणे सरेतो संसारी, माय-तांत । गांती ! तकरारी विना ।। २३२ ।। दास-वाणी ।। माता पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगुण ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०२/०५/०९ फक्त स्वत:चे आई वडिल, बायको मुलगा, सुन मुलगी यांची जबाबदारी मानतो. त्यांच्यासाठी प्रचंड काबाडकष्ट करतो. माझ्याशिवाय यांचे कसे चालेल अशी धारणा मनात ठेवतो तो रजोगुण. सामाजिक जाणीवेचा अभाव अाणि स्वार्थप्रवण वृत्ती ही रजोगुणाची वैशिष्टये ! नाती जी जोडली स्वये । संगोपन कृतनिश्चये । करणे मन-वाचा-काये । सेवाभाव कां नसे ? ।।२३३ आधी भाकरी घरच्या ?। शक्ति-समयानुसार मग इतरांच्या । जागवाव्या जाणिवा सेवेच्या । याचि उपाये ।। २३४ घरी पोरे उपाशी । झोळी पसरे इतरांपाशी । समाजसेवेची बक्षिशी । कैसी द्यावी ऐशा नरा ?।। २३४ कुटुंबांत वाकडी तोंडे । इतरांसाठी चूल मांडे । कर्तव्याची बूज मोडे । सेवाभाव हा कैसा ? ।। २३५ धनिकांसी परोपकार । शोभून दिसतो अपार । ज्यांचे पोट हातावर । अशांस ते अशक्यप्राय ।। २३६ गरीबचि जाणतो व्यथा । भोगतो रोजचि वेदनांच्या कथा । अर्धा घास भुकेल्या भूता । सदय हृदये घालितो ।। २३७ आम्हा वर्जचि सत्वगुण। रक्ताच्या नात्यांची जाण । राखत अंतरी त्यांचे भान । जगतो अविरत नेटाने ।। २३८ टॅंह्यॅं टॅंह्यॅं रडे बालक । त्राही त्राही आरडे पालक । नाही कांही, परिचालक । म्हणे उपाय मजपाशी ।। २३९ म्हणोनि आंता 'उत्तष्ठित' । खडबडून 'जाग्रत' । सुवर्णमध्य साधत । सावरा स्वतःच संसारी ।। २४० अवकाशाला गवसणी । कल्पिली होती कधी कोणी ?। परंतु अथक प्रयत्नांनी । गवसली माझ्या हिंदुराष्ट्राला ।। २४१ गोपुरे, लोलकाकृती परिचयखुणा । परग्रहांच्या अवतरणोत्सुक अवकाशयाना । अचुकतेसाठी केली योजना । विज्ञाननिष्ठ तापसांनी ।। २४२ आर्य संस्कृती पावली उदया । पश्चिम क्षितिजी प्रस्थापित 'माया' । प्रचिनातिप्राचीन समया । तेवल्या ज्योती एकसमयावच्छेदी ।। २४३ कौतुकाने मंगळाच्या । प्रसन्न, भारली चित्ते नि वाचा । वैज्ञानिकांची वैश्विक झाली चर्चा । अभिनंदन करतांना ।। २४४ अशक्यप् वाटाव्या नजरांना । अशा वैशिष्टयपूर्ण प्रस्तररचना । शक्ति-बुध्दि अबलंबितांना । साधल्या तत्कालीन तंत्रज्ञांनी ।। २४५ तळाशी घुमट वर्तुळाकृती । मध्यांतुन ऊर्ध्वगामी निमुळती । प्रार्थना स्थळांच्या आकृती । विश्वभर ऐशा कां ?।। २४६ ऐशा रचनेस, म्हणते विज्ञान । घर्षणविरोध होतो किमान । जलचर, खे-चर, वसु-धन । मुखाशी पाहा निरखुनी ।। २४७ कुणी पारखे जवाहिर । कुणी अडगळितिल भंडार । क्षुधासमय नि आहार । काय वेगळा असे ।। २४८ जे मी लिहितो आहे आज । उद्या ठरेल व्यर्थ काज । कदाचित कसोट्या रोज । लागतील वेगवेगळ्या ।। २४९ जग बदलते क्षणोक्षणी । चर्चांतरी, अदान-प्रदानी । विचारवंत, विद्वान, ज्ञानी । टाकाऊ वा टिकाऊ, वदतील ।। २५० सूर्य जरी रोजचा तोच । वेगवेगळी असते आंच । प्रभात-माध्यान्ह-तिन्हीसांज । जैशा हुरहुर-सुख-वेदनाकारी ।। २५१ निंदतील वा वाखाणतील । रुचीनुसारे चघळ-निगळतील । कुरुवाळतील, ताडतील । सर्व मजला स्वीकार्य ।। २५२ ।। दास-वाणी ।। प्रपंची पाहिजे सुवर्ण । परमार्थी पाहिजे पंचीकर्ण । महावाक्याचे विवरण । करितां सुटे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०३/२९ देह आहे म्हणून प्रपंच आहे. प्रपंच आहे म्हणून व्यवहार आहे. व्यवहार आहे म्हणून सोने नाणे, पैसा अडका, जमीन जुमला यांना किंमत आहे. ते आवश्यकही आहे. देहात जो जीवात्मा राहातो त्याला मात्र पंचमहाभूते, अहम् ब्रह्मास्मि, तत्वमसि, सर्वं खलु इदम् ब्रह्म इत्यादी महावाक्यांच्या सखोल अभ्यासातून चिंतनातूनच मुक्ती मिळते. तेव्हा देह सांभाळण्यासाठी सोनेनाणे आणि आत्मिक उन्नती साठी अध्यात्म, दोन्ही आवश्यकच ! देहाचा सांभाळ । सदासर्वकाळ । करतांना उरतो कां वेळ । आध्यात्मासाठी ? ।। २५३ मागण्या विविध अनंत । स्वकीय-आप्तांच्या पुरविण्यांत । कष्टती जे अविरत । ते उन्नत पारमार्थिक ।। २५४ कर्तव्यच्युत पूर्ण होवून । फोलपणा मागे धावून । आणि अध्यात्मा कवटाळून । साधती काय ? २५५

Thursday, September 18, 2014

भासबोध १८४ ते २१२

।। दास-वाणी ।। संकल्प विकल्प तें चि मन । जेणेकरिता अनुमान । पुढें निश्चयो तो जाण । रूप बुद्धीचें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०८/०६ अंत:करणातील एक कप्पा म्हणजे मन.ते संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्प म्हणजे एक निश्चय. विकल्प म्हणजे त्याला पर्याय. मन निश्चित निर्णयाला कधी पोचत नाही. दोलायमान, अस्थिर, चंचलता ही मनाची वैशिष्टये. अनुमान म्हणजे तर्क. मनाचेच कार्य आहे ते. तो कुतर्कही असू शकतो. होय नाही, हे का ते , असे का तसे या गोधळातून मनाला बाहेर काढते ती बुद्धी. अंत:करणाचाच पुढचा कप्पा. ती निश्चयात्मक आणि निर्णायक असते. बुद्धीच्या ताब्यात मन असणे अत्यावश्यक. अंत:करण, मन, बुध्दी । त्रिस्तरीय विचारशुध्दी । अवलंबीतो तो बोधी । लौकिकार्थी, शहाणा ।। १८४ संकल्प, विकल्प मिशें । मन होई वेडेपिसे । बुध्दी, चातुर्याच्या पाशे । सोडवी गुंता ।। १८५ ।। दास-वाणी ।। शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गल्बला जाला । लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ११/०२/२३ शास्त्रग्रंथ म्हणजे धार्मिक रीतिरिवाज सांगणारी अधिकारी पुस्तके. अनेक पंथ संप्रदायांनी स्वत:च स्वतंत्र शास्त्रे निर्मिली. त्यांचा बाजार भरवला. सामान्य भक्तांना आकर्षित करण्यासाठी एकाच मुख्य देवाचे अनेक प्रकार निर्माण झाले. अमुक देवच नवसाला पावतो अशा हेतुपुरस्पर वावडया उठल्या. असहाय्य प्रापंचिक अडचणीनी पिचलेले लोक सकाम व्रतवैकल्ये हिरहिरीने करू लागले. धर्माचा मूळ शुद्ध निष्काम उपासनेचा विचार मागे पडला. पूजा, आरती, श्रध्दा असावी निरपेक्ष । जैसे मातेचे निगराणीकडे लक्ष । वृथा कर्मकांड टाळण्या दक्ष । असावे भक्तांनी ।। १८६ शास्त्रे केवळ मार्गदर्शी । प्रभाव जाणावा पूर्वलक्षी । अतिरेकी जपा-तपासी । दूर ठेवावे।। १८७ भूत, प्रेत, हडळ-संमंध सहवासांत । प्रतिष्ठापिले स्मशानी रघुरायास । ऐशा विरळा संतास । दंडवत माझे ।। १८८ दासें अभ्यासून चार्वाक । अलौकिक बुध्दि-विश्लेषक । कल्पना-विलास भ्रामक । लया नेण्या अवलंबिला ।। १८९ नीर-क्षीर विवेकचा मार्ग । चोखाळण्यांत विविध उपसर्ग । ध्यानी घेउन, ज्ञानाचा विसर्ग । दासे केला अखंड ।। १९० ।। दास-वाणी ।। आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १२/०१/०१ ज्ञानेंद्रिये, कर्मेंन्द्रिये, पंचविषय, पंचप्राण यांच्या द्वारे पंचमहाभूतिक देहाचे चालणारे दैनंदिन व्यापार म्हणजे प्रपंच होय. यात खाणे पिणे, उद्योग व्यापार, देहाच्या सर्व क्रिया उपभोग हे सगळेच आले. दिवसाच्या किंवा आयुष्याच्या पूर्वार्धात यांचा आस्वाद घेतल्यावर निदान उत्तरार्धात तरी नेटाने सतत पारमार्थिक चिंतन करत राहावे. विवेकी जनहो इथे आळस करू नका . पडल्या विवाह बेडीला । जडल्या मग दृढ प्रीतीला । सर्वदा अतुट नात्याला । राखावे निष्ठेने ।। १९१ केलींत वाटते चोरी ?। कबुली मग द्यावी खरी । सुखवाया पोरे, अस्तुरी । झगडावे अखंडित ।। १९२ आधी झाल्या ना आणा भाका ?। आंता आरडा न करा फुका । मुकाट वल्हवा नौका । भवसागरी ।। १९३ आधी केलांत बैल पोळा । आंता सावरा गोंधळा !। समजावले अनंतवेळा । दुर्लक्षिलेत कां बरे ?।। १९४ पण गंमत असते संसारी । सुखदु:खाच्या विविध परी । आनंद,वेदनांनी घेरले तरी । सामोरे जा नेटाने ।। १९५ ।। दास-वाणी ।। आपणास उपाधी मुळीच नाही । रुणानुबंधे मिळाले सर्वहि । आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जालें पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १९/०८/२७ उपाधी म्हणजे लावून घेतलेले काम. मुळातला जो शुद्ध 'मी' आहे तो ब्रह्मरूप असल्याने त्याला उपाधी नाहीच. मायेच्या प्रभावाने त्या जीवाला सर्व नातलग प्राप्त होतात. ही माणसे जीवनात येण्यासाठी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध कारणीभूत असतात.त्या सर्वांची उपाधी जीव या जन्मात लावून घेतो. त्यांच्या येण्याजाण्याने खंत आनंद दोन्ही वाटता कामा नये अशी साधकाची स्थिती असली पाहिजे. शिकवण निरूपण दशक , उपाधीलक्षण निरूपण समास. आप्त-स्वकीयांच्या अपेक्षा स्वाभाविक । शमवाया क्लृप्त्या अनेक । भले असा अनभिषिक्त साधक । नसे पर्याय शोधासी ।। १९६ उच्च-श्रेणी साधक । नाचि व्हावा नात्यांचा जनक । जैसा विश्वामित्र अव्हेर-नायक । भोगलोलुप ।। १९७ ऐशा नरें आरण्य । मानावा निवास धन्य । लौकिक जगणे समाज-मान्य । नाकारण् हितकर ।। १९८ एक गोष्ट मात्र खरी धरती राहिल आभारी न पडले जर संसारी नर-नारी समस्त ।। १९९ आध्यात्माची धरतिल कास भोगतील केवळ भक्तिभावास कामंधतेचे त्यजतिल पाश वाढवणार नाही प्रजा ।। २०० सद्यकाळाची गरज । मर्यादित राखणे निपज । जीवमात्रांचे अतिरिक्त बोज । साहेना पंचमहाभूता ।। २०१ म्हणून संकटे अनेकविध । जलधि-भूवर निसर्गक्रोध । सजिवांचा घेउन वेध । व्यक्त विश्वांत होतसे ।। २०२ आजकाल अपेक्षा अवास्तव । दक्षिणा शब्दचि असंभव । शिष्य-गुरू भेदभाव । मानणारे विरळाची ।। २०३ बीज रुजत नाही तो । फळाची प्रतीक्षा करितो । जुजबी 'ज्ञान' मिळता पळतो । शिष्य जाणा आजचा ।। २०४ 'मुद्रा' प्राप्ती प्रथम । मिळविणे मग 'प्रेम' । वळोनि पाहणे 'गुरुधाम' । ज़मावे कैसे शिष्यांना ?।। २०५ ।। दास-वाणी ।। कांही उपाधी करू नये । केली तरी धरू नये । धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०१/३० आपल्या हौसेखातर समाजसेवेचे ओढवून घेतलेले काम म्हणजे उपाधी. एक तर निभावण्याची ताकद नसेल तर ते कार्य सुरूच करू नये. सुरू केले तर त्या कार्याला चिकटुन बसू नये. मला संस्थेत पर्याय नाहीच हा भ्रम निर्माण होतो. संस्थेत अडकून न बसता योग्य वेळी समर्थ व्यक्तीकडे कार्यभार सोपवून आपण दुसरा प्रकल्प हाती घ्यावा हे उत्तम निस्पृहलक्षण होय ! अमरपट्टा घेवोनी येथे । कोण सांगा जगी जन्मते । 'वेळ' येतां सकळ जनांते । सामोरे जाणे क्रमप्राप्त ।। २०६ कार्य सुरूच राहाणे । हितकर ! जाणती संस्थापक 'शहाणे' । निरपेक्ष निष्ठांवंताचा धांडोळा घेणे । चतुरपणे करिति ते ।। २०७ नाहीतर 'गोपाऴकाला'। कार्याचा ! निश्चित ठरलेला । मग भवतिच्या कर्दमाला । धुणे होई दुरापास्त ।। २०८ नाहीतर शेवाळ माजते । साचल्याची दुर्गंधी येते । कार्यप्रवाहा खीळ बसते । लया जाती परिश्रम ।। २०९ ।। दास-वाणी ।। जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यात मिसळावा । राहराहों शोध घ्यावा । परांतरांचा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १५/०१/०४ महंताने प्रत्येक व्यक्तीच्या काळजाचा ठाव घ्यावा. त्याचा आणि आपला आत्मा एकच आहे हे समजून समाजामधे मिसळून जावे. दुसर्यांच्या अंत:करणाचा सतत शोध घेत एकरूप व्हावे तरच नियोजित साधना अन कार्य करवून घेता येते. आत्मवत परावे ते मानीत जावे । हे चातुर्यलक्षण समर्थ आत्मदशकात सांगताहेत. निसर्गांत नित्य रमावे । श्वासोच्छ्वास मोकळून टाकावे । वारा पाण्यासंगे खेळावे नाचावे । समर्पित व्हावे अग्नितत्वी ।। २१० निसर्ग अनुभवा पुरेपूर । कवडसे तरंगता जळावर । सप्तरंग प्रकटती लाटांवर । संधी एकाचि जन्मि, जाणा ।। २११ पुनर्जन्म थोतांड । चार्वाकाने केले बंड । अर्धज्ञानी कर्मठ धर्मंार्तंड । जरि आरडले संतापे ।। २१२

Tuesday, September 9, 2014

अनुभवसिध्द अल्पाक्षरी

अनुभवसिध्द अल्पाक्षरी १ हे मद्य नव्हे मस्तवाल अबलख वारू मोहास सांग या कुठल्यामार्गे वारू वारुणी घेतली म्हणुन न सोडिन ताळ कां करिल क्षमा मज स'माज'बुद्धी बाळ ? मी क्षुल्लक ! माझे नसलेपण अस्तीत्व कापूरआरती, कर्पूरा दिव्यत्व मृत्त्यू न झडकरी कां कवळे मज आता ? चालणार कुठवर क्षेमखुशाली कथा ? विसविशीत वाटा, काटे तळि दडलेले शिव सत्य नि सुंदर घायाळुन पडलेले पिउनी काळोखा होइन म्हणतो काळा घट बुडे,दीपकळि निवली ,समीप वेळा ही कसली गर्दी ? झुंडी धावत येती चिंतातुर नजरा,काय 'बरे' शोधित ? पांगले हळुहळु चेहरे हिरमुसलेले कुणी 'नामचीन' ? बेवारस कुत्रे मेले घट तुटती फुटती रिते, कधी भरलेले ज्यां त्यां नशिबी पण 'घट कुठला ?' ठरलेले कुणि सजवुनि भवती धरती त्याच्या फेरे फुंकीत माजविति कुणी धर्म-देव्हारे २ शब्दांच्या खेळ शब्दांच्या कट्ट्यावरती शब्दांचा रंगे फड शब्दांच्या रट्ट्यागणीक शब्दांची वाढे तेढ शब्दांना कळतो अर्थ अन् त्यांचे विभिन्न भाव शब्दांच्या रानामध्ये शब्दांचे वसते गांव शब्दांच्या भवती दरवळ नित शब्दऋतूंगंधांचा शब्दांचा वसंत, शिशिर असो वा वर्षा हेमंताचा ३ मरण ? लई महाग... सगळे हिशेब द्यावे लागतांत बंद करून खाती, टांक मोडून जावं लागतं, सोडून नातीगोती मोह, माया, द्वेष, मत्सर, ममता, प्रेम, लळा, नावं वेगळीवेगळी तरी खेळ खोटा सगळा भाता वर-खाली तोवर ’तेवर’ उधळायचे धकधक थांबली की मग फक्त ’लाकूडं’ उचलायचे पण या हिशेबांत राहून जातो मरण्याला आलेला खर्चं म्हणतील, ’कसं फेडायचं हे ? थोडं कां झालय्‌ घरचं ?’ कारण अहो.महागाईच्या तापल्या तव्यावरचं.. महागलय्‌ मरण सुद्धा, दमड्या लागत्यांत लई पड झड, रोग राई, हजार तोंडांची खाई तपासणी अन्‌ औशीधपाणी, देतय कोण फुकाट ? कद्रावलेले आप्त, पाहून मरनारा जातो मुकाट लहानग्यांन्ला वाढवायचं की म्हातार्यांना जगवाय्‌चं ? उलटुन पडतोय घास, पाणी तरी बळं भरवायचं.. उर्ध्व लागला तरी लावत्यांत नाकाड्यावर नळी इस्पितळाची भर करायला उभी दागदरांची फळी ’मुलग्याला यायला येळ लागल ? ठेवा शीतगृहांत’ माती झाली तरी सैल सोडावा लागतुया हात तिरडीचे बांबू नि निखार्याला कोळसा, नाई सस्त सुतळ बी आवळायला ’वासा’ आता नाही येणे जाणे, गात वरात निघते, भजनी नी टाळकरी का भौ फुकटांत येते ? चिरीमिरी द्यावी लागते, भेटायला ’पास्‌’ जगन्याला तर हायेच, पर मरनाला बी त्रास ? तूप साजुक किरवंत मागतोय्‌ ’धाडतो’ म्हनतोय्‌ ’स्वर्गांत’ डोरल्यांतल्या वाट्या बी हळूच घालतांत खिशांत सरणावर लाकुडफाटा अखेर लागतोचं जाळाया कवटी फुटेस्तोवर कोण असतो आंसवं ढाळाया ? द्या फेकून रानांत, विसरून सुरकुतलेले हात आजचं जिणं जगून घ्या, कशाला उद्याची बात ? कोल्ही कुत्री ’मातीमोल’ खाउन, देतिल तरी दुवा उरल्यासुरल्या तुकड्यांच मुंग्या करतिल रवा आत्मा म्हनं जातो वर आभाळांत वस्तीला तितं कुठं जागा हाई ? गर्दी आलिया भरतीला ! एखादी सकाळ उजाडते मळभ घेवुन मनांत प्रष्ण उठवतो काहूर, घुमतो स्वत:च्याच कानांत आयुष्य अंगावर येतय्‌ मित्रा ! संपायचं कधी रे सगळं ? आंतल्या आंत कोंडतोय जीव ,चावी गहाळ, बाहेर नुसतच टाळं जगण बरोबर घेऊन आलय, मरणाचा वसा , म्हणून भोगला हरेक क्षण, भरून घेतला पसा खोटं खोटं जगायला खरीखरी हवा नि श्वास नवी वस्त्र ? नको.. आतां ’को-याचाच ध्यास तिकाटण्यावर नको मडकं.. नको कर्मकांडं आलं तसच जाऊद्या गळक फुटकं भांड तुझी मदत काय मित्रा, या ’कार्यांत’ होणार आसवं गाळणारे सगळे माघारी घालवणार ? ******** ४ चहुकडे पसरलो क्षणार्धांत मी असा.. जळ-वायू-अवनी-तेज नि अवकाशसा मज नाडा, पाडा ताडा, फाडा झोडा.. मी आलो तैसा जाणारहि नागडा... मग जाळा अथवा खोलवरी मज गाडा, अवतरेन होवुन आभाळा एवढा.. कुठवरहि उभारा भिंती वा कुंपण... मी सरसर सुटेन बाणासम बेभान.. मी अमर, अवध्य नि पंचमहाभुतरूप.. मज मोजाया ना मिळेल तुम्हा माप.. ’मी असा, तसा..’ कधि नाही बोलत कांही मज संचाराया दिशा मोकळ्या दाहि.. स्मृति माझी कृपया ’ठासु’ नका पुतळ्यांत.. कावळे येउनी भरतिल मल-मुत्रांत.. आणि तशिही कुणाला ’आठवण’ असते हवी.. दरसाल गळे काढण्या क्लृप्ति हवि नवी.. कोणाला सांगा आठवतो ’इतिहास’ ’ते’ जोखड फेकुनि, म्हणति, ’ नको हा त्रास’... जन्माला यावे, करीत कार्य, मरावे.. कधि मनी कुणाच्या ’कीर्तीरूप’ नुरावे... ******** ५ पोट दलितांच्या अश्रूंनी, संपदेच्या शस्त्रांनी, नेत्यांच्या आश्वासन-पत्रांनी भरावं... पोट कशानही भरावं ! पोट अज्ञानाच्या तमानं, मजुरांच्या घामानं, अनितीच्या प्रेमानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट स्वप्नांतल्या मृगजळानं, लक्षभोजनांच्या गाळानं, भुकेपोटी येणार्या कळांनी भरावं... पोट कशानही भरावं ! पोट मंत्र्यांच्या हास्यानं, अधिकार्यांच्या दास्यानं, जनतेच्या सर्वनाशानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट वैमनस्याच्या आगीनं, सत्कर्माच्या रागानं, अपहृत चंदन, सागवानानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट अंधश्रद्धेच्या बळींनी, विस्थापितांच्या कपाळशूळानी, संधिसाधूंच्या पिकल्या पोळीनंभरावं... पोट कशानही भरावं ! पोट शासनाच्या सुस्तीनं, गांवगुंडांच्या मस्तीनं, शेत गिळणार्या वांझ गस्तीनं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट बलात्कारितेच्या असहाय धाव्यानं, भ्याड गनिमी काव्यानं, दुर्बल हताश काव्‌व्यानंभरावं... पोट कशानही भरावं ! पोट धर्माच्या मुखवट्यानं, हुंडाबळींच्या दुखवट्यानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट रोज मिळणार्या लाचेनं काळ्या पैशाच्या आचेनं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट महानगरांतल्या धुरानं, ’नेमेचि’ गिळणार्या पुरानं, सर्वभारल्या अतिरेकी अत्याचारानंभरावं... पोट कशानही भरावं ********* ६ न्हाउनी, उभे लाउनी येशि सुस्नात हाल करतेस, झटकुनी केस, वीज मगजांत नितळ कृश पोट, पन्हाळी पाठ, ओलसर ओठ निरि धरी छातिशी, वरी, कटीशी गाठ झाकता उभारी, वस्त्रे अपुरी अंगा, ही नार करी बेजार, थांबवा दंगा कांति सावळी, गालि अवखळी,खट्याळी खेळे चंचला नजर, करि ठार भाबडे भोळे विखारी रात्र, अनावर गात्र, तांब नजरेंत विरहाचि आग, काळजी, राग, हुर्दात.. ******* ७ एकाकि दूरवर निवांतशी वनराई, नि:शब्द शांतता भरली ठाईठाई तरुवरे वेढिला संथ जलाशय हासे, सलिलांत बिंबवित नभ, विहगांचे ठसे मग झुळुक एक अवखळशी गिरकी घेई, अलवार स्पर्श जळअंकी करुनी जाई नाच-या लहरि मग धावत कांठाकडे, शतकंठांचे जणु स्वरावलिस सांकडे.... ******* ८ ते दिवस जणू की होते पिंपळपानी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, ज्ञानी दृश्यमान हर क्षणी मज अप्रुप होते सगळे जणु की स्वर्ग समृद्ध जाहला नूतन जीवन सर्ग कधि सामान्यातच असामान्य प्रकटले कधि कुणी फाटका वैश्विक उक्ती बोले कधि प्रचिती येई बौधिक श्रीमंतीची कधि विद्वज्जड आढ्यता, कर्मकांडांची तो सुहासिनीचा केवळ आशीर्वाद आधारा स्मरुनी कृतज्ञ अन् कटिबद्ध राहील सदा जाण तिची.. माझा शब्द मनरंजन निर्मळ, विशुध्द.. आम्हा वेद जाउ दे पुढे, ज्यांना भरभरुनि मिळाले मी पाहत आहे मागे कितिजण उरले जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं बाकींची आलिमिळि गुपचिळीच राखेनं.. ******** ९ थोरांचे थेर थोरांचे का हो ’असे’ अखेरिस होते ? थेरांचे त्यांच्या अवडंबर माजते कुणि सनई त्यजुनी सुंद्री फुंकित बसतो अन्‌ मृदंग सारुन टिमकी बडवित गातो सूर्यास दावुनी ’पाठ’ उजळु जग पाही जलधीची सोडुन साथ. ओंजळित राही कपिलेस जखडुनी कुणी वराहा पुजितो रुप्प्याचे ढकलुनि पात्र करटि चाटितो कुणि अभिनय करतां खराच ठोसा देई किंवा कोणाला कवळुन ’बोसा’ घेई विस्मरुनि वास्तवा तसाच वाहवत जाई कां भुरळ घालते ’अतिरेका’ची घाई ? मग अश्रू ढाळित भीक दयेची मागे आढ्यता प्रतिष्ठा तोडुन सगळे धागे कुणि संस्कारी, कुणि साक्षात्कारी विभुती फासते अंगभर कुणी राख अन्‌ माती वर जाता माया, मोह खेचती खाली बदलते क्षणांतच देहाची अन्‌ बोली भक्तांच्या भावा, ’जोगी’ दाखवि धुनी मग चिलीम फुंकित हसतो सगळे लुटुनी वरकरणी निगर्वी, शांत नि भोळा, साधा, जरि हात जोडि.. तो असतो भाई, दादा उच्चपदस्थ कांही कमरेखाली ढिले वलयाला त्यांच्या असती जन भुललेले स्वग्रामी जाता, कुणी वीर वा नेता कांपतांत नवत्या पोरी न्हात्या-धुत्या कुणि नशा नसेंतच टोचुन घेई ’हस्ती’ कुणि मारझोड करि ’टाकुन’ बरीच ’जास्ती’ हे कृतघ्न ढकलिति शिडीस अगदी सहज, कां चढतो यांना यशश्वितेचा माज ? कुणि वनांत जाउन उगा मारे चिंकारा ’कायदा ? काय ? कोठला ?’ लाज ना जरा.. कुणि ’धुंद’ होतं वेगाने हाके वाहन पदपथावरिल ’गरीबां’ला देई मरण मग उजेडांत हा येता प्रकार सगळा, तर्जनी घालतो मुखांत ’साधा भोळा’ ’जनहितार्थ अर्जी ’ होते दाखल कोठे ’तो’ देई वकील लढण्या मोठेमोठे न्यायमंच बसतो, शोधित साक्षि पुरावे, ’तो’ निवांत हसतो ’बॉलीवुड’च्या गांवे कुणि करूं पाहातो दुष्कालावर ’विधी’ अन्‌ अनुदानाचा सहजच निगळे निधी की खुर्ची यांच्या जिभेस देई वेगा ? अन्‌ निलाजरे जन कां हो हसती ? सांगा ! कारणे सांगती जनवृद्धीची ’भारी’ ही वांती झाली इंदापुरिच्या द्वारी कुणि नेता कांही बाहीं सभेत बोले’ थोबाड विचकुनी ’चमचा-समूह’ डोले कुणि ’गुर्जी’ ओढी शिष्या शेजेवरती दावया धाक कुणि आहे अवतीभवती ? किंकाळि वेदना घुमते हवेंत, विरते.. दाबाया ’प्रकरण’ सज्ज यंत्रणा येथे तोफां-रणगाडे ’खोक्यातुन’ कुणि मागे कुणि निलाजरा अध्यक्ष ’लक्ष्य’ अन्‌ भोगे चाटण्या लोणि ना हुतात्म्यांस सोडिति ? पिंडांचे गोळे आधाशि हे, ओरपती ! गल्ली ते दिल्ली असेचं चालायाचे ? गर्तेच्या खाइत स्वत:स गाडायाचे ? ***** १० मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा, दान करुनी पार्थीव-नेत्र, द्या, मज मरणा, आयाम नवा श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करती रवा रवा आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी, विरहाला विसरुनी तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक, स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी’ शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी ********* ११ रमेश गोविंद वैद्य हा असाच मित्रा, राहिलं रेशिमबंध बकुळिच्या प्रमाणे खुलेलं वृद्धसुगंध देवून मालकी वार्धक्याचि फुलांना मग नवीन बीजां सांगू ‘फळा ! फुलाना !!’ हा मूलस्रोत मिळाला तुझ्याचं संगे जशि फुलता खुलता रुबाइ नकळत रंगे हा संगमर्मरी निवांत शब्द-निवारा, क्षण कसनुशिचे शोधतील मुकाट वारा ********** १२ जरि असला भगवा ’भेस’ । जटारूप बांधले केस । हिमालय हजारो कोस । दूर ! आम्हा ठावके ॥ जेंव्हा असू ज्या ज्या देशी । इमान राखू तिथल्या रीतिशी । प्रतिज्ञा मनोमनी ऐशी । केली असे ॥ इमारती मोठमोठ्या । लक्षवेधि मोहक पाट्या । चारचाकि नि दुचाकी छोट्या । जागोजागी भवताली ॥ कृतांतकटकामल ध्वजजरा । जडे जेंव्हा कोण्या नरा । त्यजण्यासि घरा दारा सहसा नसे धजावत ॥ शबनम एका बाहुवर । दुसरा घेइ छडीचा आधार । कालदर्शिका मनगटावर । भान देइ बदलाचे ॥ दाढी-मिशा स्वच्छ नि शुभ्र । तिच्या आड रुद्राक्ष शंभर । कांचामागे सचिंत नजर । संचित जणु वेदनेचे ? चित्त्याची झेप छातीवरी । जणू सांगते व्यथा भारी । तृष्णा, क्षुधा कोण वारी ? समस्त नर-नारी स्वमग्न ॥ निसर्गाचे लहरी चक्र । रक्षिण्या जराजर्जर गात्र । ’भात्यांत’ विराजमान ’छत्र’ । सज्ज असे सदैव ॥ जरी बावळा भाव दिसे । अंतरि कल्लोळ माजलासे । पालथि याने गांवकुसे । घातलि ’शांती’ शोधार्थ ॥ तपाची बदलली रूपे । नशा, व्यसन साधन सोपे । ’संधि’साधु, जनांमजि ’छुपे’ । माजले हो चहुकडे ॥ वास्तव्य असे कधिकाळी । त्यांचे दूर: एकांत स्थळी । जेथे न भेटे ’मांदियाळी । सामान्यांची ॥ प्रस्थान ठेविती हिमालया । कष्टविण्या पार्थीव काया । अध्यात्म-तत्वज्ञानाचा पाया । तपाचरणे शोधिती ॥ आज जागोजागी दिसती । सर्वदूर त्यांची वस्ती । हे कसले वत्स, वाल्मिकी, अगस्ती । फसवे ढोंगी लबाड ॥ जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज । पण समजे समाज । पक्षिराज त्यांना ॥ ********** १३ ’माहुत असतो मनांत’ छातीचा पिंजरा पुढं, कणा ’धनुष्मान’ कशासाठी एवढ बाबा उसन अवसान ? जमेल तसा जमेल तिय्हं अंग’कांठी’ वक्र चेहेरे पे पढो तो.. रोजी-रोटी की है फ़िक्र मिळल बाबा काम, जाउन चार घास खा खोटं फुगवुन उर, असं फशिवता येतं कां ? तशी तर जिगर, ताकद नसतांतच बाहूंत जिद्दीच्या हत्तीचा, मनांतच असतो माहूत काळजांत फुलतो अंगार..वार करायचा वेधून स्नायूंना मग आदेश जातो ’वरून’.. मगजा मधून वार्‍याच्या वेगानं फ़िरायला हवेंत हात, बोजड शरीर कस करेल शत्रूवर मात ? तूप-रोटी खाउन उद्या झालो लठ्ठमुठ्ठ आळस म्हणेल ’बेट्या, दाखव शत्रूला पाठ.. !’ आणि सगळ्या कसोट्या उत्तीर्ण झाल्यावर, निवडपत्र मिळून, सेनेंत दाखल झाल्यावर, शत्रु समोर आल्यावर, नायकान, हल्लाबोल’ चा आदेश दिल्यावर सुद्धा, मनांत कुठलीही दुविधा न आणता कार्यप्रवण होण्या आधी, हृदयस्थ हरी, ना म्हणतो, ’लढ जा !’ जोवरि अर्जून कोणता उचलिल ’गांडिव’ स्वकरी भगवंत म्हणे वसतो मनि प्रत्येकाच्या ’ते’ देइल आज्ञा खेचण्यास प्रत्यंच्या कुंभकर्ण, आणिक बकासूर हारले शक्तीपेक्षाही ’त्यां’ युक्तीने जिंकिले ******** १४ यांतल्या प्रत्येक ओळींत तुम्हाला नजीकच्या भूतकाळांत आपल्या आजूबाजूला घडलेल्या आणि आपली मन सुन्न करून टाकणा-या घटनांचे पडसाद दिसतील..मनांत साकळलेले प्रष्ण दिसतील.. सरणार कधी सण प्रभो तुझे रे, उतरणार ही नशा कधी चिरडु-चेंगरुनी मरणाची अन्, फिटेल कां हो हौस कधी देवदर्शनोत्तर अपघाती मृत्युभेट टळणार कधी.. साधुसंत बेगडी तयांच्या, बेडि करी पडणार कधी.. माणुस असुनी श्वापदवृत्ती, अंतरिची त्यजणार कधी.. तेलाने जगण्याच्या ज्योती निमालणे थांबेल कधी.. ********* १५ अनंत मी, अवध्य मी.. मज नाडा, पाडा ताडा, फाडा झोडा.. मी आलो तैसा जाणारहि नागडा... मग जाळा अथवा खोलवरी मज गाडा, अवतरेन होवुन आभाळा एवढा.. कुठवरहि उभारा भिंती वा कुंपण... मी सरसर सुटेन बाणासम बेभान.. मी अमर, अवध्य नि पंचमहाभुतरूप.. मज मोजाया ना मिळेल तुम्हा माप.. ’मी असा, तसा..’ कधि नाही बोलत कांही मज संचाराया दिशा मोकळ्या दाहि.. स्मृति माझी कृपया ’ठासु’ नका पुतळ्यांत.. कावळे येउनी भरतिल मल-मुत्रांत.. आणि तशिही कुणाला ’आठवण’ असते हवी.. दरसाल गळे काढण्या क्लृप्ति हवि नवी.. कोणाला सांगा आठवतो ’इतिहास’ ’ते’ जोखड फेकुनि, म्हणति, ’ नको हा त्रास’... जन्माला यावे, करीत कार्य, मरावे.. कधि मनी कुणाच्या ’कीर्तीरूप’ नुरावे... ********* १६ वल्ही धराया उभ्या वज्रमुष्टी क्षणार्थात जिंकेल हा सर्व सृष्टी घमेले जरी ’नांव’रूपास आले’ पैल गाठणे त्यांतुनी शक्य झाले प्रवाहा विरोधी शोधून मार्ग वक्र जगाचे सहजीच फिरवेल चक्र क्षिति वा न भीती न थकवा हातांना नावीक हा आदर्श बालकांना ***** १७ ’तव राहो नेहमिच ताठ कणा..’ रे अजून थोडे साहि तना, श्रमल्यावाचुन नाही प्राप्ती, दारिद्र्यांतुन नाही मुक्ती, जीवन परिघा नाही व्याप्ती नशिब घडव, घालून घणा... तिजवर सारे नेहमिच ’स्वार’, आजार ’तिला’ ? मग ’हे’ बेजार, टाकिति ’बोजा’ तुझ्या शिरावर, हा धनिकांचा रे ’चतुरपणा... तुला निरंतर स्मरेल रे ’ती, यंत्रांनाही असते रीती, सचेत करिती ’निर्जिव’ नाती, ’तिज’पाशि खरा ’माणूस’पणा पाहाणारे वाकून पाहती, ’बोजा’ला वचकून राहती, दयार्द्र कटाक्ष नाहि तुजप्रती’ तव राहो नेहमिच ताठ कणा... ********** १८ ’तुम्ही कोण ?’ म्हणून काय पुसता, नाही आम्ही कोणिही पोटासाठि अतर्क्य कर्म असले ’हट्‌ के’ करू कांहिही ’तुम्ही कोण ?’ म्हणून नजरा वळवू नका वाकड्या ’आम्हा’विण नेहमीच ठरतिल तुमच्या, धनराशी तोकड्या ’तुम्ही कोण ?’ म्हणोनि करु नका हर घडी ’बेदखल’ तुम्हा अमृत देवुनी पचवितो आम्हीच हो हलाहल आणि असली दृश्य पाहायची सवय नसलेल्या नजरांना, हे, त्यांच्या परिचित आश्चर्यांमधली भर वाटेल कदाचित ! पण म्हणतांत ना, ’मरता न क्या करतां ?’ मेरू पर्वत मुंगीनं गिळला, डोइवर चढली दोन-चाकी सागर सारा आटून गेला, घामांतच राहिलं मीठ ’बाकी’, उचलायाच होवी ही ’नखरेल नार’, जरि खायला कहार अन्‌ भुईला भार फुटक्या नांवेतलं पाणी उपशित, पार कराया होवी ना ओढाळ धार ? दुनियेला आनंद कदाचित, ’गिनीज्‌’मध्ये एक आणखी भर गोरगरिबाला काय हो त्याचं ? एका दिसाची सुटली भाकर ’चवल्या पायजेत ? तर कर बाबा ह्ये !’ म्हने मालक रामप्रहराले, ओझं जिण्याचं वागवित चालणं, किती दीस आमच्या नशिबाले ? तक्रार करणार कुणा कडे ? सरकारास्नि कुठला येळ सारे नेते येतिल लोळत, ’तेंव्हा’ मतांशि घालाया मेळ कुणाला पडलिये चिंता आमची ? हर आमआदमी भई है व्यस्त, पेट्यांच्या, खोक्यांच्या चळती मोजत, दादा भाई सदा नशेंत मस्त ******** १९ नका करू बंदबिंद आम्ही जगायचं कसं ? हातावरच्या पोटाल समजावावं कसं ? नका करू बंदबिंद कशी कमवायची रोटी ? तेल, मीठ कसं न्यायच कच्याबच्यांसाठी ? नका करू बंदबिंद, आम्हा ’बारा’ची भ्रान्त रक्ताचा घाम जरी, वृत्ती क्लान्त क्लान्त करू नका बंदबिंद, झालीत मढी आमची आधीच परवड आणि कुरतड चुकवीत मेलोय जगलेपणी कधीच ! मेलोय जगलेपणी कधीच ! ********* २० मातेश्वरी, परमेश्वरी, ज्ञानेश्वरी शुभदे, पांखर सदा सश्रद्ध या भक्तांवरी असु दे बघ आपदांची मोहळे, क्रुधश्वापदांची जणु दळे, संहार कर.. कर मोकळॆ, सान त्यांच्या आकांक्षा भवसागरी तरु दे तू प्रकाशाची वल्लरी, या तमप्रवाहा किनारी, पिडितांस जणु पंचाक्षरी, नाम जय जगदंब जप गंभीरसा घुमु दे शरणागतांना पाहुनी, करवीरग्रामी येउनी, झणि संकटा निर्दालुनी, ऊर्जांगिनी, बलदायिनी, तेजस्विनी दिसु दे ********* २१ निर्गुण निराकार, त्याला ना मान-अपमान.. वंदा वा निंदा, ’त्या’ला सर्व पोकळी समान... ’पोकळी’ला सुद्धा असतो परीघ, ती ’कशांत’तरी असते, शोध घेणारी ’बुद्धी’ मग सीमेवर जावून आपटून फुटते... तुमची माझी भावस्पंदनं, ’जगण्या’चा पुरावा एकमात्र, पूजाअर्चेची अवडंबरं माजवून, कशाला दमवायची गात्रं... ? पापणीलवण्या आधी घटित अघटित होतं इथं, लोपून जात आणि लगेच अष्टदिशांत उमटतं इकडून तिकडं क्षणांत आवाज, शब्दांची निमिषांत वैश्विक गाज, सगळी तंत्र-मंत्र-यंत्र, ’उत्क्रांत’ बुद्धीचेच केवळ साज... हात जोडतो, म्हणू नका, ही ’देवा’ची कृपाबिपा, डोळे उघडून कर्तृत्व जोखा नका लावू त्यांना झापा... बीजांत अंकुरतं पातं नि वर आपल्याच बळें उठतं, ज्याला जगायची उर्मी, त्याला हे अटळ असतं... खुणावणारं निळं आभाळ, बाळमुठीला काळी आई, कधीच कुठेच भवती नसते स्वप्नांची खोटी दुलई... ’जेता’ व्हायची विगिषा, यापरता आधार नसतो, आप्त, सखा, सुहृद, मित्र ... फक्त गंमत पाहात असतो..., फक्त गंमत पाहात असतो... *********** २२ माणुसकीच्या वारस आम्ही दुजाभाव नाहिसा करू नव्या जगाच्या, शांतियुगाच्या शिल्पकारका ! सार्थ ठरू. . अणुरेणूंची अमोघ शक्ती नभगोलांची असीम दीप्ती ज्ञानाचे लावून पाश आम्हि, विश्वकारणा साध्य करूं शास्त्र-कलांचा सुरम्य संगम आम्ही घडवू जगति, विहंगम, समृद्धीची धरुन कांस ’लोकराज्य स्वप्न आम्हि साकारू, उक्ति आमुची व्यर्थ ना ठरो भावबंधना ना ’मनु’ विसरो आदिशक्तिला स्मरुनी भवती उन्नत्तीचे बिज पेरू ********** २३ ’दोस्ती बिस्ती..’ येऽऽ दोऽऽस्ती, हम नहीं छोडेंगे फिसले भले पॉंव, साथ ना तोडेंगे पकडीवर आमच्या गड्या आहे तुझी भिस्त, बिनधास्त कर काम, ठरवू विश्वास तुझा रास्त आंत भले दिसेल तुला सगळच उलटं आहोत भक्कम बाहेर आम्ही काळिज ठेवुन सुलटं गंमत म्हणजे तीघांना एकदम एकच काम नको चिंता करू, नाही वेगळा मागणार दाम.. ********** २४ ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’ अरं काय ल्येका, काय तुझं चाललय काय ? असं काय आक्रित तिकड घडतं हाय ? नाय काढला फोटू तर फासावर जाशिला ? द्येवाला पायी घालतोस ? पाप कुठं फेडशिला ? ’असं पुन्हा दिसणार नाही’ म्हनतुयास निर्लज्जा ? मानूस नावाच्या श्वापदा तुला कुठली द्यावी सजा ? काय मानूस हैस की कोन ? ’गोंडस’ धराया पाय ? कोल्ही कुत्री सुद्धा तुला क्षमा करायची नाय दोन घडीचा डाव मांडून मोकळ होवू नका, जबाबदारी घ्या ! वर करूं नका काखा पायांत छान वाळे, कानटोपी डोईला ’कवळा’ कुठल्या भरवशानं तुला सोपिवला ? जस पेरशिला तस उगवल, माती-मायचा नियम हे सूत्र कोरून ठेव हृदयांत तुझ्या कायम ? असल्या अपेष्टांतनं जर झालाच उद्या मोठा, फोटो पाहून नक्की हानल डोस्कित तुज्या सोटा पाहिले असले बाप, आपल्याच शौकांत सदैव मश्गुल, काळीज, काळजी नाही, यांचा वंश ’काजळी-कुल’ ********* २५ ’आयडिया ची कल्पना’ मले शिरमंत व्हायचय्‌ माह्या बापा, करू कुठल्या मी सांगा की पापा.... हे ’हरघडी पैक्याचं यंत्र’ पर उघडाया ठावा नाई मंत्र कशा उघडाव्या म्हंतो मी झापा.... कष्ट करून घाम ढाळीला पाणी भुकेला, शीळा उशाला त्ये बी लुटत्यांत मारून थापा.... कसं ठेवांवं जपून त्यांना लांडगे भवतीचे करत्यांत दैना तुडवत ’दये’च्या मारत्यांत गप्पा.. .बाकी.. कसा वाटला हा माझा Make-over ? हां.. पडू नको.. सोताला सावर ! लई नाई आतां तुला फशिवनार गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... भाइर गुंडांची मोकाट टोळी करतिये कमावल्या धनाची होळी कसं यांना पुरुन आपन उरनार ?... डोळ्यांत टाकतंत मिरचीची पूडं सगळ्या आशेला लावत्यात चूडं कशा तरवारी म्यान यांच्या होनार ?... पायी नको घालू वहाणा अंगी बाणव भिकारी बाणा तुला ढुंकुन नाई ते बघनार... पाठी घेवून फाटकी गोणी अन्‌ नजरेंत करुण कहाणी पाहायाला त्यांना वेळ कसा गावणार ?... माज्या नजरेंत दिसतोय ना अंगार ? नाइ असातसा, नाई मी ’भंगार’ संधी मिळताच त्यांना मि हाननार... फाटकी विजार नी उसवला सदरा अन्‌ खंतावला उद्विग्न चेहेरा तुला जवळ करू नाहि पाहाणार... ’भाई’गिरीची पापणी आड नशा अन्‌ ओठावर ’दादा’च्या मिशा नाहि धुंदी यांची उतरनार... बघा चेहेरा माहां निरखुन पारखुन अभि बच्चनचं वाटतया कां Cartoon ? नको.. लचांड मागं उगा लागनार... असेच दिवस आलेत आता राजा, शिरिमंत ’दिसन्यां’त बी नाई राह्यली मजा सोन म्हणून पितळ सुद्धा लुटणार... म्हणून गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... . गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... ********** २६ कोण देव ? काय देव ? नसलेपण एक नि अभाव गंडेदोरेवाल्या बाबा बुवांची ’त्या’च्या नांवे कावकाव जन्म-मृत्यूमध्ये एका श्वासाचं अंतरं उत्पत्ती-स्थिती-विलय सारा शास्त्राचा प्रभावं... ******* २७ सुखांत करा वाटेकरी, दु:ख आपल्या गाठीच बरी सुखाचे तुषार आकाशांत, दु:खाचे कढ आतल्याआंत सुखाचे कण विरळ विरळ, दु:खाचे नेम अग्स्दी सरळ आनंद ! नित्य नवी नवलाई, यातनांची खाई कुरतडत खाई हर्षोल्हास, झुळुक, फुंकर, स्पर्श या सार्‍यांचेचं सुखकर जरा, वेदना, विरह, ज्वर, दु:खाचे तमगामी पर दु:खात पाहू सुखाची स्वप्न, थेंबा जशी आसुसतांत भेगाळली रानं ********** २८ ’व्यथा...’ मला बी वाइच होउद्या म्होरं, जायचय्‌ बघाया शिंगापुरं मोडा टाक, नी सांडा शाई, अशी संधी पुन्यांदा यायची नाई चार बुक नाई, लिवली तरी चालल, निवडून या मंग बगा चक्रच फिरल ’उंडण फिंडण मला नग नग, सिंगापुरच्या ’रातींचं’ पाह्यचय जग थोडाफार पैका खर्चिन खरं ! पर पाहनारचं बा म्या शिंगापुरं माग येक भामटा ’चला’ म्हनला ’भाऊ’, शिगणापुरला एकदा जावनच येऊ पोचलो तिथं, तर शनिदेव ’राऊ’, वाटलं भामट्याला गिळू कि खाऊ ’मर्‍हाठी’च्या कौतिकाचा वाजतोय ढोल, उंडणच्या आवताणाचा सांगावा फोल.. यांच्यापेक्षा थेट, ते ’राजकारणी’ बरं, आनत्यांत म्हनं हितं शांघाय,.शिंगापुरं **** २९ आषाढातला महाराष्ट्र... मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंगरानोमाळी ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग ओवी साधीभोळी दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’ प्रत्येक हृदयी ठाकला, वालला, भक्तीच्या भारानं पांडूरंग काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !! राऊळी फत्तर आहे माह्या बापा ,विठूराय शोध तुह्या मनी ।। जनी, नामा, गोरा, नरहरी, सावता लाविती ’कर’चं सत्कारणी ॥ ’विका भांडीकुंडी, भाकर घ्या हाती, पोराले शिकवा बापडे हो !’ डेबूजी सांगूनी गेला तरीही ही मानसं आंधळी असी कां हो ? ***** ३० ’शिवस्तुती’ शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, देशाची कणखर माती पवित्र झाली गड-दगडांच्यात्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला त्या हिमालयाचे शुभ्र बुरुज राखाया, यशवंत कीर्तिची नित्यच स्फुरते काया मायभू चरणीच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी योद्धा सरसावला या गनिमाच्या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, ठेचाया अतिरेक्यास सिद्ध प्रज्ज्वला ********** ३१ कसला मान-सम्मान नि कसला बाबा सत्कार साधाभोळा निरुपद्रवी तू केवळ मतदार जिणं वाहून चाल्लय घामांत, मरान काहून येईना तोडत्यांत लचके तुझे तरी 'त्यांचं' उदर भरं ना उत्तिष्ठ, जाग्रत, अन् प्राप्यवरान्निबोधितं वाहती गंगा हाई तोवर, हो 'उमेदवार' नि माग मतं निवडून 'त्याच्या' नांवामुळं येशीलही कदाचित उखळ पांढरं हुईलच, अन् कळल 'जगण्याची' बी रीत मग आलं मरान तरी सरकार धाडील इमान मागून मिळालं असतं राखून आयुष्यभर 'इमान' ? मातीमोल चामडीवर मोती उधळत्याल 'फोटू' नाइ नुस्ता, संमदी 'यात्राच' दावत्याल फुल नि दगूड फेकायला येतील शत्रू, मित्र फास घेऊन गेला असतास.. नसतं आलं कुत्रं मसाला आंत भरलेला नि थाटमाट सरकारी झाल्या ख़र्च वसुलीसाठी मग करदात्यांच्या खिशावर 'डल्लामारी' मग ? राहानार मतदार की व्हनार उमेदवार ? बघ, 'यात्रा' पाह्यल्यावर तरी हुतोय का पक्का इचार .... ********** ३२ हे सप्तसुरांचे हृदय आणि माहेर, ‘माँ’ सरस्वतीच्या वीणेचा शृंगार, गोपाला हाती वेणु आर्तशी मंद्र, श्रीहरिच्या शंखातील खर्ज गंभीर ही शिवतेजाची लखलखती असिलता, ही उमा-रमेच्या हृदयी वत्सल गाथा, ही विनायकाच्या शब्दांमधले ओज, अन् अग्रज कवीच्या उर्मीमधली वीज ही ग्रीष्मानंतर श्रावणसर, गारवा, अन् गाभार्यातील मंद तुपाचा दिवा, हा स्थिरस्वर स्वरनिधीत दीपस्तंभ, हा नादमंथनोत्तरी दिव्यश्रुतिकुंभ, हा मांगल्याचा पावनक्षम गंगौघ, हा प्रेम, विरह अन् करुणेचा आवेग, हा ज्ञानेशाच्या ओवीचा परिमळु, अवतरली मीरा पुनश्च अवनीवरी, रघुरायकृपेने समर्थ ही वैखरी **************** ३३ विरले सगळे सूर, तरीही उत्तर रात्र सुरेल स्वरावलींची तरिही हृदयी, तशीच ओलं उरेल असं म्हणावसं वाटतं... आमराईतून गातो कोकिळ, दडतो पानांआड आभाळाशी स्पर्धा करिती, हिरवे खेटुनी माड... राउळांतुनी घुमत नगारे, पवित्र घंटानाद टाळ मृदंगासवे आर्तशी सुरेल अभंग साद... लाल मातीची विरते सीमा पुळणिंत सागर साक्षी लाट किनारी खेळ खेळता रेखुन जाई नक्षी... मंगेशा अभिषेक कारणे अवतरली स्वरगंगा गाज गभिरशी जिंकून घेई रसिकाहृदयी जागा... टिपून आणिले अमृतकण, शोधून मंदिरे नाना भावस्वर गहिर्या रंगांचे विणून केल्या रचना... रती-विरक्ती अनुयायांवर केली माया, अशी गुरूची कृपा परिक्रमा घडविली स्वरांची, दावित अनंत रूपा... ज्ञानाच्या आसक्तीपोटी कसे लोटले जिणे माधुकरीचे घास रिचवुनी, कंठी रूजविले गाणे... कृतज्ञता जपली हृदयी जरी पैलतिरीची हाक दमड्यांचा ना विचार केला, भागविली स्वरभूक... राजाश्रय ना कधी मिळाला, खंत कधी ना केली जणू हलाहल पचवुनी सहजच अमृतवाणी सजली. विविध सजविले कवी स्वरांनी, वेधुनि भावार्थाला बाकीशब्दसम गंधाराच्या स्वयंभु प्रकटार्थाला... सय स्नेहाची नकळत करिते आर्द्र पापणी कांठ कृपा एक की पुत्राकरवी नितनूतन स्वर भेट.... ********** ३४ शतपैलूंची हिरकणी । आनंद सर्वत्र, वनिभुवनी । क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी? ज्ञानोबा, शिवबा लता नी आशा । घेऊन अक्षरासिधार-स्वरांची भाषा । पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकानुशतके अभिषेकिले ॥ ‘आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल? मनि शंका ॥ ध्यास हा, ना आभास । स्वप्न नाही, निखळ सत्यास । शत शतकांच्या पराक्रमास । कवळिले, सहजपणे ॥ ********* ३५ तेव्हा लग्न व्हायचं होतं, आता मला नातू आहे. नाव असणं आणि नाव होण या मधला ‘दूरदर्शन’ सेतू आहे. 16 मी.मी. ीर्शींशीीरश्र-ीशिारस ते ऊळसळींरश्र तळवशे पर्यंत स्थित्यंतर र्उीीं-ीळिलश, झर्रीीश-ीशश्रशरीश आणि आता छेप-श्रळपशरी कवि, साहित्यिक, वैज्ञानिक, वादक आणि गायक ‘दूरदर्शन’नं नावारूपाला आणलेले, रंगनायिका आणि नायक छोट्या ळवळेीं-लेु मधून, पोहोचलो घराघरात खिडकीमधून ‘जग’ रुजलं, तनांत मनांत आणि जनांत... आम्ही आपलं आजपर्यंत खेळलो उेिू-लेेज्ञ सवंग प्रसिद्धीच्या मागे लागण्याची मात्र, केली नाही चूक... भक्ती, सुहासिनी केळकर, दिवेकर आणि पारकर आठवणींच्या डोहांत डोकावताना, डोळ्यात साकळतो गहिवर... ‘चांगुणा’ नि कस्तुरबाची सासू झाली, काय होतय कळत नाही अती झालं त्याचं आता, हसू मात्र आवरत नाही... माहिती, ज्ञान, मनोरंजन असा आम्ही शिकलो क्रम पडलोय अडगळीत आता, म्हणतात, ‘याला झालाय भ्रम’ वाहिन्यांची ‘मातीमाय’ ‘दूरदर्शन’ वय चाळीस आमचा ‘पत्ता’? ‘कटत’ नाय तोवर, वरळी मुंबई ‘पंचवीस’ वरळी, मुंबई पंचवीस... ********** ३६ साधा लेंगा, कुडता, खांद्यावर शबनम पिशवी ‘नक्षत्रांची देणी’ ‘हा’ अनवट काव्य-शिल्पातून भेटवी सृजनाला नसें ठिकाण नी नांव, गांव या फ ‘आरती प्रभू’? अं हं! हा तर ‘आर्ताचा चिंतामणी’ जणू, वैशाखाक्षरांना श्रुतींचे डोहाळे लागावे ऐन श्रावणी अशी सोनसळी शब्दसंपदा, जपत जरतारी बासनांत अखंड ‘श्रीमंती’ जगला ‘हा’, चंद्रमौळी घरात जगण्याला अवेळी, झाकोळानं गाठलं काळाच्या तळ्यात, उलट उलट झाड, बुडत बुडत गेलं ********** ३७ मधुर-भाषिणी, सुहास्यवदना, प्रमुदितमुखधारिणी। चाणाक्षा, नितसुस्वरा, स्मितधरा, कल्पका, तरी धोरणी। कोरुन मानसि चित्र मी जपतसे, आजहि बहुआदरे। माहीत नाहीत ’देव’, तरीहि मजला दैवत हेची खरे ॥ ********* ३७ नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ? देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं, गाईच्या डोळ्यांत आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ? **** ३८ ’सचिन’ आज पराक्रम सोन्याच्या कोंदणी । चाहात्यांचा आनंद वनी भूवनी । क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधारा-स्वरांची भाषा । पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥ त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र । ’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥ *** ३९ ’समीक्षा’ जे जे होईल दृश्यमान । नीर-क्षीर विवेकाचे ठेवून भान । आशय-तंत्राचा सन्मान वा ताडन । करेन मी सदरामधे ॥ जे ज्या रूपी अवतरे । वर्णावे त्यासि ’गोमटे-गोरे’ । ऐसी अपेक्षा न ठेवणे  बरे । मजकडून, जाणिजे ॥ आम्ही, चित्रवाणी व्यावसायिक । ’दृश्यिकेस’ लावुनी अक्ष एक । कधिहि न होता अतिभावुक । आकृतीबंधास रेखितो ॥ चौकटीत विसावे आमुचे विश्व । त्रिमिति देती पृष्ठ-पार्श्व । त्यामधेच प्रकटते कर्तृत्व । ’पट’करी, दिग्दर्शकाचे ॥ परि यंत्राहुनि ज्येष्ठ तंत्र । त्याहूनही श्रेष्ठ गर्भित मंत्र । तोचि झिरपतो हृदया पर्यंत । ऐसी आम्हा शिकवण ।। ********** ४० जांणीव ध्वनी-स्पर्शाची का असते आम्हां पुरेशी ? वर्णने छान तुम्हि करता, मग वाटे नजर हवीशी जग ’सुंदर’ बघण्यासाठी, डोळ्यांची वाट ’पाहावी’, दृष्टीस ’यातना’ पडता, नजरेची भूक मिटावी... भ्रमनिरास झाला तर मग, त्यापरते दु:खच नाही डोळ्यांच्या खाचांमधल्या, अश्रूंनी भिजेल बाही... अश्रूंनी भिजेल बाही ********* ४१ सुगी पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान, वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर, गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी, पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी कधीपासुन टोपपदरी घ्याव म्हणतेय्‌ मी, बैलजोडी आणत्याल नवी तवा बरूबर जाइन मी बी, लेक लई हुश्शार माझि, तिला कराय्‌चि आहे डॉक्टर, खंबीर वाश्यांच्या घर, पोरं चढविल झळाळ त्यावर *********** ४२ ’You just wait' डोरलं बांधलं मला तवा व्हती म्या झोळींत बोहल्यावर म्हणे नेलं, मामानं हातावर झेलित इवल्याश्या भाळावर एवढा मोठा टिळा, कुड्याबुगड्या कानी नी गळ्यांत बोरमाळा टिळ्यावर मायेनं रेखली लाल चिरी ल्यायला दिला परकर नि पोलक भरजरी, जरा चालायला लागल्यावर पांगुळगाडा आला धरभर आन्‌ वावरांत माजा राबता सुरू जाला पर बैलगाडीची मज्जा काय औरच अस्ती बाबा ’हुर्रर्र हुर्रर्र सर्ज्या-मौज्या’ आरडत पळवायचे आबा परकराचा वरती, शिस्तित कांचाबीचा ,मारून हिंडत व्हती नंतर म्या, सायकलवर टांग टाकून, माय कवतीकानं म्हनं, ’गांवभर उंडारती’ भ्या वाटतं.. बघुन कुनाकडं बी हासती..’ म्या म्हनं, ’राजपुत्र येनार घोड्यावर, बसवुन माला फुड्यांत, शर्यत वार्‍याबरूबर, खरचं आला एक दिशी, मनांतला राजा संग बाइकबाई,म्हनं, ’करतू वावरांला ये-जा’ सवतापाठी, ’बस’ म्हन्ला, ’चल जत्रंला जाऊ, सवतीपाठी बसून म्ह्न्ले, ’बाई तुझी पाठ लई मऊ !’ पडली माझी पावल कधीच जिमिनीवर न्हाईत असा थाट बाई, कुनाला सोपनांत तरी म्हाईत ? फटफटीवर बसून आंता जाते कुटं बी थेट विमानसुद्धा उडवन बरं, You just wait.. ************ ४३ व्याघ्रावाहना जगदंबा, शारदा मोरावरी, महिषासुरारि महाकाली, त्रिशूळ शोभे करी अंबुजवासिनि लक्ष्मी, धनसंपदा नि समृद्धी खल दमना देइ धैर्य, शौर्य, स्थैर्य, बल, बुद्धी ********** ४४ ॥जगदंबा स्तुतिअष्टक॥ प्रकटता तेज । आदिशक्ती बीज । जागेपणी नीज । भेदू पाहे ॥ व्याकूळ व्याकूळ । गर्तेतला तळ । शक्तिसेवा फळ ।उद्धरेल ॥ सत्या, शुभा, सुंदरा । त्रिशुळाच्या तीन धारा । दर्शने देई धैर्या । रिपुदमना ॥ जगदंबा करवीरी । भवानीआई गड शिवनेरी । देवी सप्तसृंगी वणीच्या डोंगरी । झालीये अवतीर्ण ॥ संपदेचे आगार । ज्ञानसमृद्ध भांडार । सारे होतसे असार । मातेचरणी ॥ व्याघ्रारोहि सुंदरी । शस्त्रां धरुनी चारहि करी । दैत्य निर्दय, अविचारी । संहारितसे ॥ दाही दिशा भरूनि राही । पंचमहाभूतांचि माय होई । त्रिकालाबाधित निवारा देई । विश्वमाता ॥ हे ऐसे स्तुतिअष्टक । शाब्दी श्रद्धामूल सार्थक । सदा देवो सारासार विवेक । जगण्यासी ॥ **** ४५ ’दोन लावण्या’ चवल्या-पावल्यांचा केलाय मी वांधा रुपया रूपाचा कलदार बंदा... भाळ आभाळावर उगवतीचा शिलेदार..थंडावा रातिचा कां जळ नजरेवर ?.. डाळिंबि व्हटाची पहाट जणू हाकारं.. रंग-कांतिची पुनव उतरली, जनु चाफा बहरलाय औंदा.... नथं नाकांत थरथरे, तिरिप जशी माध्यान्ह..कानि कुडिबुगडी, सांज गुपितांचं कोंदन..मान कमळदेठ धाडि पांचव्याचं आवतान... केस मोकळे द्वाड, पसरले..झाकत्यांत अटकर बांधा... धडधडत्या वक्षी, दिठी काढुद्या नख्‌शी..मनगतांव माझ्या बसवा राघवपक्षी..अवघ्या मुशींत रिचवा बेगिन तुम्ही रसरशी... लुटा कवळ्या तरनाईचा चंदा... ( ही राम कदमांनी संगीतबद्ध करून, दूरदर्शनच्या कार्यक्रमांत, माधुरी सुतवणेनं गायली होती. ***** ४६ हाड फोडते थंडी तरिही, थोडक्यांत असते गोडी.. राया जरा सैल करा मिठि थॊडी.. कनगींत भरुनिया दाणं तुमी निवांत..गोविंदविडा घ्या,देते लावुनि ! पंत..मन चुळबुळते तरि ठेवा त्याला शांतं... वाकळ घेवू आंतुन, वरती पांघरुया घोंगडी... आडसालि उसाची होइल साखर आंता..चतईच्यां वाकितं, हिरकणं बसवुनि देता ?..नजरेचं माज्या कसबं तुमी जाणता.. धुंद सुखाच्या, भरून आनल्या तुम्हासाठी कावडी... गारटःआ असोनी, दमटपना कां वाटे ?..चोरटे स्पर्श शहार्‍याचे फुलविति कांटे..ठिणगीचा झाला वणवा, डोंगर पेटे...शमवायाला डोंब तुम्हि बरसा वळिवझडी... ***** ४७ शेकोटीचे दिवस साजणी, रोमांतुन हुडहुडी भरे.. कटू स्मृतींची पाने गळती, आनंदाची ऊब उरे. ****** ४८ ऋतूंची लावणी वैशाखी बघ धग गात्रांतुन, सवय लागली वाळ्याची.. शिशिरधुंद गंधित रात्रींतुन, निनादली सय चाळांची (चाळ्यांची ?) पदरावरचे राघू-मैना निपचित झाले काहुन आज ? धडधड पदराआड नि तेंव्हा, दडून बसण्या शोधी काज पदरपदर का भिजवुनि श्रावण, शमविल लाही अंगाची ? अधिर जिवाचे ऊष्ण उसासे, भिरभिरते कशि पहा दिठी सुगींत जरिकांठी जरि खुपली, तरी मधाची मऊ मिठी मावळतीला मळभ साजणा ! लवते पापणि डोळ्याची... नको दाउ भीती विरहाची, बेगिन येना आज घरा धगधगत्या स्पर्शांतुन उसळुन, थंडावा शिडकवी जरा प्रतिमा डबडबल्या भाळी, सय भिंग जडविल्या चोळीची.. ********** ४९ अवतरली भवती हिरवाई सळसळती किलबिलती द्विजगण, पिंपळ-आम्रावरती जित्रांप हंबरे दावणीस गोठ्यांत मोहरते तुळशी शिपणिच्या थेंबांत पिंगळा-वासुदेवाची नित वर्दळ अर्थपूर्ण शब्द अन्‌ स्वरमय आर्त सकाळ जात्याची घरघर रेशिमगाठी ओव्या येतांच जाग, मनकलिका खुलवुन जाव्या करतलास पहिले नमन, इतर मग कामे धनवृद्धीसाठी प्रज्ञा घडवि सुकर्मे मोकळा श्वास, स्वच्छंद स्वच्छ आभाळी गुलमोहर हसतो अबाल-वृद्ध कपोली विटिदांडू, सुरपारंब्या, बहुविध खेळ करमणूक आणिक व्यायामाचा मेळ नेतृत्व, चपलता, गनीम तंत्रे सारी साम, दाम, दंड भेदाहुन असती भारी घेवून अंकलिपि पंतोजी शाळेंत अज्ञानावर करिती भाषा, गणीत मात बारा बलुत्यांचा खाउ क्षुधाशांतीला ना जात-पातिचा अडसर कधिही आला वसुबारस, पोळा, नारळि-पुनव, वटाची नागाची पंचिम, लग्ने अन्‌ तुळशीची कणग्या साळीच्या शिगोशीग माहेरी उंबर्‍यांत लवंडे माप वधू सासरी त्याकाळी होते पतंग भवरे कंचे कल्पनाजगत फुलविण्यास निवडक वेचे प्रहसने, पहेल्या इतिहासांतिल कथा शास्त्रीय सुगम संगीत पुराणे गाथा फडताळे खुंट्या, चंची छपरि पलंग घंगाळे, न्हाणित वज्रटिकेचा संग पागोटे शेला पैठणि आणिक लुगडी ठाशीव नारि अन्‌ उमदे बाप्ये गडी ना निशिद्ध असते तिथि कुठलिही तशी अवसेच्या रात्री लक्ष दीप आकाशी सरितेच्या काळ्या साडीवर खडि जणू तम, तेज..कुणाची मात कुणावर म्हणू राउळी कीर्तने, गोधळ, भारुड भजने मैदानि दणकती शाहीरांची कवने गण गवळणि करिती प्रौढांना बेजार लावणी नऊवारींत खुले शृंगार ओसरी परस ओटा सोपा नी कोठी दीडींतुन अखंड ये-जा.. वर्दळ मोठी तिन्हिसांजा उजळे सांजवात देव्हारा परवचा, श्लोक, आर्यांचा शब्दपिसारा आजीच्या स्मृति-बासनांतील ही रत्ने समृद्ध करुन जगण्या.. संस्कारिति मने निद्रेस पाळणा झोपाळा वा झोळी तुम्हि-आम्ही खेळलो खांबखांब खांबोळी याहुन असते कां संस्कृती हो वेगळी ? भवताल स्थळी, काष्ठी पाषाणी जळी हे चित्र नसे हो तसे फारचे दूर असतील उलटली तपे फारतर चार ही स्थिती आतांशा बघतां... ना राहिली थोरांच्या ठाई चित्रवाणि ठाकली हे सर्व आज त्या पेटीमध्ये असते कळ दाबतांच पाहिजे तेच अवतरते हा बदल खरोखर तारक अथवा मारक ? प्रज्ञेच्या निकषांवर स्तर, साधक-बाधक बहुरंगि जगाचे आपुल्या हाती द्वार पाहण्या वापरू विवेक सारासार ना समजा सर्व नवे असते टाकाऊ मंथन बदलांचे ! वृथा कशाला बाऊ ? वाहिन्या, मालिका बहुविध अंगी सकस माहिती, ज्ञान रंजनास गवाक्ष खास लैंगिकता, हिंसा कधी कुणा ना टळली फाडा बुरखे, डोकवा आंत ! वखवखली माणूस अखेरी हिंस्रांतुन उत्क्रांत श्वापदे मनाच्या तमगर्भांतच स्थित बालक तर करते थोरांचे अनुकरण ’साजिरे’ तयांना दावू या, आचरण अन्यथा नसे परिणामी गर्ता दूर ’चावण्या कान’ मातेचा शिशु तत्पर तमघोर सागरी क्षणैक तेजोरेखा ’जगणे’ म्हणजे मरणांतिल निमिष अनोखा ठेवून स्मृतींचे स्वर्ण, सहस्रक सरले ’विश्वातिल क्षुद्र कणास’ नाहि जाणवले माध्यमे ओढती विश्वाला जणु आंत तरि त्वचा, नासिका, जिव्हा कां अतृप्त ? कुणि जाणावे ? हे उद्यांच होइल साध्य प्रत्येक यत्न लक्षाचा भेदे मध्य सार्‍यांचे या प्रतिबिंब दिसे ’पेटीं’त ’पेटी’ ना समजा अडसर प्रगत पथांत ज्ञानाच्या कक्षा नका सिमित करु आतां ध्वनि, चित्र माध्यमे संगणकाची सत्ता पाहूद्या. शिकुद्या जाणिव होइल तीक्ष्ण ऐकुद्या, हसूद्या.. तवान होतिल मनं मज आशा एकच कुणि न विचारिल प्रष्ण ’संस्कृती लया गेली ?’... व्यर्थ विधान ********* ५० शेळी जाते जिवानिशी... पाऊस कसला, भुरभुर नुस्ती, न्हाई पानी-दाना, मोडित काडुन आमाला बी, धनी फिरवत्यांत माना दलदल माजली, चारा न्हाई, पुडं भुकेची खाई दशा, हिची बी, अशीच दिस्तिया,’ ’बिच्चारी’ बाइक‌ बाई मैत्र जीविचे शोधू जाता, समोर आला नेत्र झडली, पिचली, खिळखिळलेली अन्‌ झिजलेली गात्र जाणू गेले दु:ख तिच, पाठीवर तिच्याच बसून विझूविझू पाहांत होती, ’आ’ अखेरचा वासून कोंबडी, कुत्री, मांजरी बकरी, का नसतो ’बाई’कला जीव ? अरं ’देवाच्या’ त्या काठीला ल्येका, जरा तरी भीव... मोडीत निघत्यांत मानसं थितं आमाला कुठला चारा ? कोनो भी देस, प्यारे ! इस हालात का नही चारा ********** ५१ रंग... लख्ख निळ्या आभाळभाळिचे, अवचित आल्या झाकोळीचे भानूच्या उदयास्तास्थळिचे, जळातळीच्या मासोळीचे, फुले,पांखरे, वृक्ष-वेलिचे. अद्भुत, सुरम्य रंग... दीपावलिचे अन्‌ होळीचे, सुबक रेखल्या रांगोळीचे, उचंबळाचे, नैराश्याचे, आसवलेले रंग... ********** ५२ गणनायक, सुखदायक, दुखवारक, बलसाधक मूषकावरी मूर्ती, शुभंकर तु विश्वकीर्ति तू दुर्वांकुरधारक, क्लेश,वेदनाहारक गणनायक.... सत्कर्माधार नित्य, दमन करी कृष्णकृत्य शक्ति-बुद्धि-गुणवर्धक, सांबसुता प्रतिपालक गणनायक... श्रद्धेला ’दृष्टी’ दे, ’कार्यप्रवण वृत्ती दे हो बापा, हो नायक, संकटांत पथदर्शक... गणनायक... ******** ५३ PASSAYADAAN...FREE ADAPTATION... GLOBAL PRAYER… O Supreme, Unseen, infinite, unknown.. Grace thou verbal, vocal, vibrant throne.. Bestow me with heavenly, transcendental cool Not more, only a blessing blissful.. Let hatred fade n’ affection flower N’ goodwill clouds hover and shower.. Content lamp glow and light Life n’ like take a flight.. Abundance overflow and death drown Cosmic aura crust the crown.. Fulfill the dreams with greedless need Beyond faith, creed, cast n’ apartheid.. Sanctity mingle with gentle folk No fear around ever choke.. Clear the air of all disgrace Let it reflect on every face.. Flora n’ fauna n’ fragrance upbeat Spark-in vigor, wit n’ grit.. Chirping birds, savage beast Live n’ let live with lust the least.. Speck less moon and soothing sun Delight human in the eternal run.. Joy to the brim, bubble the chime All be grateful to root n’ prime.. Yen for perception yearn a word’s worth ‘Caused a just n’ vocal dream-birth.. O state of minute, vacuum n’ space Part n’ full of every face.. May little dreams morph real n’ fill Of joy n’ cheer DNYAANAA lays a keel… Traslated by Arun Kakatkar. ******** ५४ ये ना बाबा पावसा, जीव वाटे जाईसा अंदाज ठरतो खोटा, उगा करत्यांत बोभाटा ये बाई सरी, मडके अर्धे तरी भरी सर भाव खाऊन, बसली कुठं जाऊन ? ******** ५५ प्रेमाला कसले मोलं, स्पर्शांला उजवा कौलं ही मधुभावाची भूल, निष्पाप वेलिवर फूल प्रेमांत नसे हव्यास, बरसतो जसा पाऊस निरपेक्ष देवुनी कांस, निष्पर्णा देई जोश प्रेमाने फुटति धुमारे, प्रेमांत नसति देव्हारे मागते प्रेम क्षण सारे, पात्र मात्र ठेवुनि कोरे प्रेमांत नसे कुरघोडी, सहजीवन असते गोडी शब्दांची भाषा थोडी, आवंतण नजरचं धाडी हे असे विश्व मायेचे, स्नेहाचे, अनुबंधांचे खोट्या नात्यांपलिकडचे, अन्‌ विशुद्ध आनंदाचे ***** ५६ हे शरीर केवळ बाह्यरूप, देखावा अंतरंी तरंगति रंग, करिती दावा जर मिळेल आम्हा शब्दांचे अंगडे पूर्णत्व साधण्या होउ मग वाटाडे हे शरीर म्हणजे श्वासाविरहित मढे रक्त, मांस अस्थीं, आवळले गाठोडे उमलतो प्राण मग जेंव्हा तुटते नाळ संपते कहाणी, तेंव्हा नेतों काळ हे शरीर म्हणजे भोगांसाठी वास्तू मनविरहित शरीर ? अडगळीतली वस्तू ! मी करेन यंव त्यंव, फुशारक्यांचा धनी घाबरे ! पैलघंटा पण पडता कानी हे शरीर म्हणजे आसक्ती, हव्यास ? मन 'नाहीं !' म्हणता उरते केवळ हौस कृतिवरी अखेरीस मनाचेच अधिपत्य दररोज, हरघडी करिते पौरोहित्य मज गोष्टी होत्या सांगायाच्या चार दरम्यान कुणीतरि मागुन केला वार जरि चेहरा नाही दिसला गर्दीमधुनी गारदी कोण ते कळले त्वेषावरुनी जन 'हो हो' म्हणती, वचने 'हसरी' देती पसरता पसा पण सैरावैरा पळती मज भीक नको, पण विकाउ नाही स्वत्व पाडून चेहरा बसेल जरि 'दातृत्व(?)' लावून पाट मी सजविन संसाराला डोरले चढवुनी अस्तुरि आणुन घराला भोगेन यथोचित होइन झटपट बाप लागेन इटूचरणास वारण्या पाप ही ऐशी कैसी वृत्ती संत महंती शिकवीत धर्म, विस्मरती सहजच नाती झटकून मोकळे होण्या यांना मुभा कुणि दिली ? करा पैजारें यांची शोभा ***** अनुभवसिध्द अल्पाक्षरी १ हे मद्य नव्हे मस्तवाल अबलख वारू मोहास सांग या कुठल्यामार्गे वारू वारुणी घेतली म्हणुन न सोडिन ताळ कां करिल क्षमा मज स'माज'बुद्धी बाळ ? मी क्षुल्लक ! माझे नसलेपण अस्तीत्व कापूरआरती, कर्पूरा दिव्यत्व मृत्त्यू न झडकरी कां कवळे मज आता ? चालणार कुठवर क्षेमखुशाली कथा ? विसविशीत वाटा, काटे तळि दडलेले शिव सत्य नि सुंदर घायाळुन पडलेले पिउनी काळोखा होइन म्हणतो काळा घट बुडे,दीपकळि निवली ,समीप वेळा ही कसली गर्दी ? झुंडी धावत येती चिंतातुर नजरा,काय 'बरे' शोधित ? पांगले हळुहळु चेहरे हिरमुसलेले कुणी 'नामचीन' ? बेवारस कुत्रे मेले घट तुटती फुटती रिते, कधी भरलेले ज्यां त्यां नशिबी पण 'घट कुठला ?' ठरलेले कुणि सजवुनि भवती धरती त्याच्या फेरे फुंकीत माजविति कुणी धर्म-देव्हारे २ शब्दांच्या खेळ शब्दांच्या कट्ट्यावरती शब्दांचा रंगे फड शब्दांच्या रट्ट्यागणीक शब्दांची वाढे तेढ शब्दांना कळतो अर्थ अन् त्यांचे विभिन्न भाव शब्दांच्या रानामध्ये शब्दांचे वसते गांव शब्दांच्या भवती दरवळ नित शब्दऋतूंगंधांचा शब्दांचा वसंत, शिशिर असो वा वर्षा हेमंताचा ३ मरण ? लई महाग... सगळे हिशेब द्यावे लागतांत बंद करून खाती, टांक मोडून जावं लागतं, सोडून नातीगोती मोह, माया, द्वेष, मत्सर, ममता, प्रेम, लळा, नावं वेगळीवेगळी तरी खेळ खोटा सगळा भाता वर-खाली तोवर ’तेवर’ उधळायचे धकधक थांबली की मग फक्त ’लाकूडं’ उचलायचे पण या हिशेबांत राहून जातो मरण्याला आलेला खर्चं म्हणतील, ’कसं फेडायचं हे ? थोडं कां झालय्‌ घरचं ?’ कारण अहो.महागाईच्या तापल्या तव्यावरचं.. महागलय्‌ मरण सुद्धा, दमड्या लागत्यांत लई पड झड, रोग राई, हजार तोंडांची खाई तपासणी अन्‌ औशीधपाणी, देतय कोण फुकाट ? कद्रावलेले आप्त, पाहून मरनारा जातो मुकाट लहानग्यांन्ला वाढवायचं की म्हातार्यांना जगवाय्‌चं ? उलटुन पडतोय घास, पाणी तरी बळं भरवायचं.. उर्ध्व लागला तरी लावत्यांत नाकाड्यावर नळी इस्पितळाची भर करायला उभी दागदरांची फळी ’मुलग्याला यायला येळ लागल ? ठेवा शीतगृहांत’ माती झाली तरी सैल सोडावा लागतुया हात तिरडीचे बांबू नि निखार्याला कोळसा, नाई सस्त सुतळ बी आवळायला ’वासा’ आता नाही येणे जाणे, गात वरात निघते, भजनी नी टाळकरी का भौ फुकटांत येते ? चिरीमिरी द्यावी लागते, भेटायला ’पास्‌’ जगन्याला तर हायेच, पर मरनाला बी त्रास ? तूप साजुक किरवंत मागतोय्‌ ’धाडतो’ म्हनतोय्‌ ’स्वर्गांत’ डोरल्यांतल्या वाट्या बी हळूच घालतांत खिशांत सरणावर लाकुडफाटा अखेर लागतोचं जाळाया कवटी फुटेस्तोवर कोण असतो आंसवं ढाळाया ? द्या फेकून रानांत, विसरून सुरकुतलेले हात आजचं जिणं जगून घ्या, कशाला उद्याची बात ? कोल्ही कुत्री ’मातीमोल’ खाउन, देतिल तरी दुवा उरल्यासुरल्या तुकड्यांच मुंग्या करतिल रवा आत्मा म्हनं जातो वर आभाळांत वस्तीला तितं कुठं जागा हाई ? गर्दी आलिया भरतीला ! एखादी सकाळ उजाडते मळभ घेवुन मनांत प्रष्ण उठवतो काहूर, घुमतो स्वत:च्याच कानांत आयुष्य अंगावर येतय्‌ मित्रा ! संपायचं कधी रे सगळं ? आंतल्या आंत कोंडतोय जीव ,चावी गहाळ, बाहेर नुसतच टाळं जगण बरोबर घेऊन आलय, मरणाचा वसा , म्हणून भोगला हरेक क्षण, भरून घेतला पसा खोटं खोटं जगायला खरीखरी हवा नि श्वास नवी वस्त्र ? नको.. आतां ’को-याचाच ध्यास तिकाटण्यावर नको मडकं.. नको कर्मकांडं आलं तसच जाऊद्या गळक फुटकं भांड तुझी मदत काय मित्रा, या ’कार्यांत’ होणार आसवं गाळणारे सगळे माघारी घालवणार ? ******** ४ चहुकडे पसरलो क्षणार्धांत मी असा.. जळ-वायू-अवनी-तेज नि अवकाशसा मज नाडा, पाडा ताडा, फाडा झोडा.. मी आलो तैसा जाणारहि नागडा... मग जाळा अथवा खोलवरी मज गाडा, अवतरेन होवुन आभाळा एवढा.. कुठवरहि उभारा भिंती वा कुंपण... मी सरसर सुटेन बाणासम बेभान.. मी अमर, अवध्य नि पंचमहाभुतरूप.. मज मोजाया ना मिळेल तुम्हा माप.. ’मी असा, तसा..’ कधि नाही बोलत कांही मज संचाराया दिशा मोकळ्या दाहि.. स्मृति माझी कृपया ’ठासु’ नका पुतळ्यांत.. कावळे येउनी भरतिल मल-मुत्रांत.. आणि तशिही कुणाला ’आठवण’ असते हवी.. दरसाल गळे काढण्या क्लृप्ति हवि नवी.. कोणाला सांगा आठवतो ’इतिहास’ ’ते’ जोखड फेकुनि, म्हणति, ’ नको हा त्रास’... जन्माला यावे, करीत कार्य, मरावे.. कधि मनी कुणाच्या ’कीर्तीरूप’ नुरावे... ******** ५ पोट दलितांच्या अश्रूंनी, संपदेच्या शस्त्रांनी, नेत्यांच्या आश्वासन-पत्रांनी भरावं... पोट कशानही भरावं ! प पोट अज्ञानाच्या तमानं, मजुरांच्या घामानं, अनितीच्या प्रेमानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट स्वप्नांतल्या मृगजळानं, लक्षभोजनांच्या गाळानं, भुकेपोटी येणार्या कळांनी भरावं... पोट कशानही भरावं ! पोट मंत्र्यांच्या हास्यानं, अधिकार्यांच्या दास्यानं, जनतेच्या सर्वनाशानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट वैमनस्याच्या आगीनं, सत्कर्माच्या रागानं, अपहृत चंदन, सागवानानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट अंधश्रद्धेच्या बळींनी, विस्थापितांच्या कपाळशूळानी, संधिसाधूंच्या पिकल्या पोळीनंभरावं... पोट कशानही भरावं ! पोट शासनाच्या सुस्तीनं, गांवगुंडांच्या मस्तीनं, शेत गिळणार्या वांझ गस्तीनं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट बलात्कारितेच्या असहाय धाव्यानं, भ्याड गनिमी काव्यानं, दुर्बल हताश काव्‌व्यानंभरावं... पोट कशानही भरावं ! पोट धर्माच्या मुखवट्यानं, हुंडाबळींच्या दुखवट्यानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट रोज मिळणार्या लाचेनं काळ्या पैशाच्या आचेनं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट महानगरांतल्या धुरानं, ’नेमेचि’ गिळणार्या पुरानं, सर्वभारल्या अतिरेकी अत्याचारानंभरावं... पोट कशानही भरावं पोट चार घंट्यांची ग्लानी देणार्‍या ठर्यानं, रेससाठी पोसलेल्या घोड्यांच्या खरा-यानं, झोपड्यांवर कोसळणार्‍या दगडी भिंतीपल्याडच्या, गगनचुंबी इमारतींतून येणार्‍या सुगंधी फवार्‍यानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट शिवीगाळीच्या, द्वेषात्वेषाच्या कर्दमानं, गावगुंडांनी दिलेल्या दमानं, मतपेटीनं निरसनं केलेल्या भ्रमानं भरावं... पोट कशानही भरावं ! पोट ’जाहीर’ संपत्तीच्या आंकड्यांनी, दगडी देवाला घातलेल्या साकड्यांनी, एकमेकांचे पाय ओढणार्‍या खेकड्यांनी भरावं... पोट कशानही भरावं ! पोट पोपटानं ओढलेल्या पाकिटांतल्या भाकितानं, तथाकथित हितचिंतकांनी टाकलेल्या कातेनं, विझू विझू पाहाणार्‍या जगण्याच्या ज्योतीनं भरावं... पोट कशानही भरावं ! ********* ६ न्हाउनी, उभे लाउनी येशि सुस्नात हाल करतेस, झटकुनी केस, वीज मगजांत नितळ कृश पोट, पन्हाळी पाठ, ओलसर ओठ निरि धरी छातिशी, वरी, कटीशी गाठ झाकता उभारी, वस्त्रे अपुरी अंगा, ही नार करी बेजार, थांबवा दंगा कांति सावळी, गालि अवखळी,खट्याळी खेळे चंचला नजर, करि ठार भाबडे भोळे विखारी रात्र, अनावर गात्र, तांब नजरेंत विरहाचि आग, काळजी, राग, हुर्दात.. ******* ७ एकाकि दूरवर निवांतशी वनराई, नि:शब्द शांतता भरली ठाईठाई तरुवरे वेढिला संथ जलाशय हासे, सलिलांत बिंबवित नभ, विहगांचे ठसे मग झुळुक एक अवखळशी गिरकी घेई, अलवार स्पर्श जळअंकी करुनी जाई नाच-या लहरि मग धावत कांठाकडे, शतकंठांचे जणु स्वरावलिस सांकडे.... ******* ८ ते दिवस जणू की होते पिंपळपानी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, ज्ञानी दृश्यमान हर क्षणी मज अप्रुप होते सगळे जणु की स्वर्ग समृद्ध जाहला नूतन जीवन सर्ग कधि सामान्यातच असामान्य प्रकटले कधि कुणी फाटका वैश्विक उक्ती बोले कधि प्रचिती येई बौधिक श्रीमंतीची कधि विद्वज्जड आढ्यता, कर्मकांडांची तो सुहासिनीचा केवळ आशीर्वाद आधारा स्मरुनी कृतज्ञ अन् कटिबद्ध राहील सदा जाण तिची.. माझा शब्द मनरंजन निर्मळ, विशुध्द.. आम्हा वेद जाउ दे पुढे, ज्यांना भरभरुनि मिळाले मी पाहत आहे मागे कितिजण उरले जे सच्चे साथी त्यां सोबत चालेनं बाकींची आलिमिळि गुपचिळीच राखेनं.. ******** ९ थोरांचे थेर थोरांचे का हो ’असे’ अखेरिस होते ? थेरांचे त्यांच्या अवडंबर माजते कुणि सनई त्यजुनी सुंद्री फुंकित बसतो अन्‌ मृदंग सारुन टिमकी बडवित गातो सूर्यास दावुनी ’पाठ’ उजळु जग पाही जलधीची सोडुन साथ. ओंजळित राही कपिलेस जखडुनी कुणी वराहा पुजितो रुप्प्याचे ढकलुनि पात्र करटि चाटितो कुणि अभिनय करतां खराच ठोसा देई किंवा कोणाला कवळुन ’बोसा’ घेई विस्मरुनि वास्तवा तसाच वाहवत जाई कां भुरळ घालते ’अतिरेका’ची घाई ? मग अश्रू ढाळित भीक दयेची मागे आढ्यता प्रतिष्ठा तोडुन सगळे धागे कुणि संस्कारी, कुणि साक्षात्कारी विभुती फासते अंगभर कुणी राख अन्‌ माती वर जाता माया, मोह खेचती खाली बदलते क्षणांतच देहाची अन्‌ बोली भक्तांच्या भावा, ’जोगी’ दाखवि धुनी मग चिलीम फुंकित हसतो सगळे लुटुनी वरकरणी निगर्वी, शांत नि भोळा, साधा, जरि हात जोडि.. तो असतो भाई, दादा उच्चपदस्थ कांही कमरेखाली ढिले वलयाला त्यांच्या असती जन भुललेले स्वग्रामी जाता, कुणी वीर वा नेता कांपतांत नवत्या पोरी न्हात्या-धुत्या कुणि नशा नसेंतच टोचुन घेई ’हस्ती’ कुणि मारझोड करि ’टाकुन’ बरीच ’जास्ती’ हे कृतघ्न ढकलिति शिडीस अगदी सहज, कां चढतो यांना यशश्वितेचा माज ? कुणि वनांत जाउन उगा मारे चिंकारा ’कायदा ? काय ? कोठला ?’ लाज ना जरा.. कुणि ’धुंद’ होतं वेगाने हाके वाहन पदपथावरिल ’गरीबां’ला देई मरण मग उजेडांत हा येता प्रकार सगळा, तर्जनी घालतो मुखांत ’साधा भोळा’ ’जनहितार्थ अर्जी ’ होते दाखल कोठे ’तो’ देई वकील लढण्या मोठेमोठे न्यायमंच बसतो, शोधित साक्षि पुरावे, ’तो’ निवांत हसतो ’बॉलीवुड’च्या गांवे कुणि करूं पाहातो दुष्कालावर ’विधी’ अन्‌ अनुदानाचा सहजच निगळे निधी की खुर्ची यांच्या जिभेस देई वेगा ? अन्‌ निलाजरे जन कां हो हसती ? सांगा ! कारणे सांगती जनवृद्धीची ’भारी’ ही वांती झाली इंदापुरिच्या द्वारी कुणि नेता कांही बाहीं सभेत बोले’ थोबाड विचकुनी ’चमचा-समूह’ डोले कुणि ’गुर्जी’ ओढी शिष्या शेजेवरती दावया धाक कुणि आहे अवतीभवती ? किंकाळि वेदना घुमते हवेंत, विरते.. दाबाया ’प्रकरण’ सज्ज यंत्रणा येथे तोफां-रणगाडे ’खोक्यातुन’ कुणि मागे कुणि निलाजरा अध्यक्ष ’लक्ष्य’ अन्‌ भोगे चाटण्या लोणि ना हुतात्म्यांस सोडिति ? पिंडांचे गोळे आधाशि हे, ओरपती ! गल्ली ते दिल्ली असेचं चालायाचे ? गर्तेच्या खाइत स्वत:स गाडायाचे ? ***** १० मी गेल्यावर, नको पिंड वा, नको तेरवा, नको दिवा, दान करुनी पार्थीव-नेत्र, द्या, मज मरणा, आयाम नवा श्वास जोवरी नियमित चाले, हाव गाठते परिसीमा निर्जिव माती उरे शेवटी, मुंग्या करती रवा रवा आठवणींचे नाते असते अधिक करोनी अश्रूंशी, विरहाला विसरुनी तुम्ही घ्या, मुक्त, मोकळी स्वच्छ हवा येइल जेंव्हा आठव तेंव्हा गीत छानसे ऐका एक, स्वरांस जडले आर्त खरे, अन्‌ स्वर म्हणजेच खरा धावा मजपाठी पापांचे पाढे जनहो वाचा नेमाने नका चढवु शब्दांची बेगडि तद्दन खोटी आभुषणे माणुस म्हणुनी जगलो सार्‍या विकार, व्यसनांबरोबरी कोण हरीच्या लाले ठेविलि तीर्थाची मागे झारी ? मनात शिरता आले तर सगळे दिसतिल बरबटलेले ’गरळ ओकले नाहि’ म्हणा, स्मरुनी सगळे गोरे-काळे ! संधि मिळेतो साधू असती सज्जन, संत नि संन्यासी म्हणविती जरि नि:संग तरी ’मायेची’ कैसी ’पैदासी’ शिव्या-शाप कोणा कधि चुकले, देण्याला वा घेण्याला सुसाट सुटती ’ताप’स सगळे बोला भिडवित बोलाला क्वचितच ज्ञानोब्बा अवतरतो ज्ञानी, योगी अवनिवरी विरळा असंभवासम वसतो युगंधराच्या हृदयांतरी ********* ११ रमेश गोविंद वैद्य हा असाच मित्रा, राहिलं रेशिमबंध बकुळिच्या प्रमाणे खुलेलं वृद्धसुगंध देवून मालकी वार्धक्याचि फुलांना मग नवीन बीजां सांगू ‘फळा ! फुलाना !!’ हा मूलस्रोत मिळाला तुझ्याचं संगे जशि फुलता खुलता रुबाइ नकळत रंगे हा संगमर्मरी निवांत शब्द-निवारा, क्षण कसनुशिचे शोधतील मुकाट वारा ********** १२ जरि असला भगवा ’भेस’ । जटारूप बांधले केस । हिमालय हजारो कोस । दूर ! आम्हा ठावके ॥ जेंव्हा असू ज्या ज्या देशी । इमान राखू तिथल्या रीतिशी । प्रतिज्ञा मनोमनी ऐशी । केली असे ॥ इमारती मोठमोठ्या । लक्षवेधि मोहक पाट्या । चारचाकि नि दुचाकी छोट्या । जागोजागी भवताली ॥ कृतांतकटकामल ध्वजजरा । जडे जेंव्हा कोण्या नरा । त्यजण्यासि घरा दारा सहसा नसे धजावत ॥ शबनम एका बाहुवर । दुसरा घेइ छडीचा आधार । कालदर्शिका मनगटावर । भान देइ बदलाचे ॥ दाढी-मिशा स्वच्छ नि शुभ्र । तिच्या आड रुद्राक्ष शंभर । कांचामागे सचिंत नजर । संचित जणु वेदनेचे ? चित्त्याची झेप छातीवरी । जणू सांगते व्यथा भारी । तृष्णा, क्षुधा कोण वारी ? समस्त नर-नारी स्वमग्न ॥ निसर्गाचे लहरी चक्र । रक्षिण्या जराजर्जर गात्र । ’भात्यांत’ विराजमान ’छत्र’ । सज्ज असे सदैव ॥ जरी बावळा भाव दिसे । अंतरि कल्लोळ माजलासे । पालथि याने गांवकुसे । घातलि ’शांती’ शोधार्थ ॥ तपाची बदलली रूपे । नशा, व्यसन साधन सोपे । ’संधि’साधु, जनांमजि ’छुपे’ । माजले हो चहुकडे ॥ वास्तव्य असे कधिकाळी । त्यांचे दूर: एकांत स्थळी । जेथे न भेटे ’मांदियाळी । सामान्यांची ॥ प्रस्थान ठेविती हिमालया । कष्टविण्या पार्थीव काया । अध्यात्म-तत्वज्ञानाचा पाया । तपाचरणे शोधिती ॥ आज जागोजागी दिसती । सर्वदूर त्यांची वस्ती । हे कसले वत्स, वाल्मिकी, अगस्ती । फसवे ढोंगी लबाड ॥ जेथे न येई हंसराज । तेथे बगळ्यांचीच गाज । पण समजे समाज । पक्षिराज त्यांना ॥ ********** १३ ’माहुत असतो मनांत’ छातीचा पिंजरा पुढं, कणा ’धनुष्मान’ कशासाठी एवढ बाबा उसन अवसान ? जमेल तसा जमेल तिय्हं अंग’कांठी’ वक्र चेहेरे पे पढो तो.. रोजी-रोटी की है फ़िक्र मिळल बाबा काम, जाउन चार घास खा खोटं फुगवुन उर, असं फशिवता येतं कां ? तशी तर जिगर, ताकद नसतांतच बाहूंत जिद्दीच्या हत्तीचा, मनांतच असतो माहूत काळजांत फुलतो अंगार..वार करायचा वेधून स्नायूंना मग आदेश जातो ’वरून’.. मगजा मधून वार्‍याच्या वेगानं फ़िरायला हवेंत हात, बोजड शरीर कस करेल शत्रूवर मात ? तूप-रोटी खाउन उद्या झालो लठ्ठमुठ्ठ आळस म्हणेल ’बेट्या, दाखव शत्रूला पाठ.. !’ आणि सगळ्या कसोट्या उत्तीर्ण झाल्यावर, निवडपत्र मिळून, सेनेंत दाखल झाल्यावर, शत्रु समोर आल्यावर, नायकान, हल्लाबोल’ चा आदेश दिल्यावर सुद्धा, मनांत कुठलीही दुविधा न आणता कार्यप्रवण होण्या आधी, हृदयस्थ हरी, ना म्हणतो, ’लढ जा !’ जोवरि अर्जून कोणता उचलिल ’गांडिव’ स्वकरी भगवंत म्हणे वसतो मनि प्रत्येकाच्या ’ते’ देइल आज्ञा खेचण्यास प्रत्यंच्या कुंभकर्ण, आणिक बकासूर हारले शक्तीपेक्षाही ’त्यां’ युक्तीने जिंकिले ******** १४ यांतल्या प्रत्येक ओळींत तुम्हाला नजीकच्या भूतकाळांत आपल्या आजूबाजूला घडलेल्या आणि आपली मन सुन्न करून टाकणा-या घटनांचे पडसाद दिसतील..मनांत साकळलेले प्रष्ण दिसतील.. सरणार कधी सण प्रभो तुझे रे, उतरणार ही नशा कधी चिरडु-चेंगरुनी मरणाची अन्, फिटेल कां हो हौस कधी देवदर्शनोत्तर अपघाती मृत्युभेट टळणार कधी.. साधुसंत बेगडी तयांच्या, बेडि करी पडणार कधी.. माणुस असुनी श्वापदवृत्ती, अंतरिची त्यजणार कधी.. तेलाने जगण्याच्या ज्योती निमालणे थांबेल कधी.. ********* १५ अनंत मी, अवध्य मी.. मज नाडा, पाडा ताडा, फाडा झोडा.. मी आलो तैसा जाणारहि नागडा... मग जाळा अथवा खोलवरी मज गाडा, अवतरेन होवुन आभाळा एवढा.. कुठवरहि उभारा भिंती वा कुंपण... मी सरसर सुटेन बाणासम बेभान.. मी अमर, अवध्य नि पंचमहाभुतरूप.. मज मोजाया ना मिळेल तुम्हा माप.. ’मी असा, तसा..’ कधि नाही बोलत कांही मज संचाराया दिशा मोकळ्या दाहि.. स्मृति माझी कृपया ’ठासु’ नका पुतळ्यांत.. कावळे येउनी भरतिल मल-मुत्रांत.. आणि तशिही कुणाला ’आठवण’ असते हवी.. दरसाल गळे काढण्या क्लृप्ति हवि नवी.. कोणाला सांगा आठवतो ’इतिहास’ ’ते’ जोखड फेकुनि, म्हणति, ’ नको हा त्रास’... जन्माला यावे, करीत कार्य, मरावे.. कधि मनी कुणाच्या ’कीर्तीरूप’ नुरावे... ********* १६ वल्ही धराया उभ्या वज्रमुष्टी क्षणार्थात जिंकेल हा सर्व सृष्टी घमेले जरी ’नांव’रूपास आले’ पैल गाठणे त्यांतुनी शक्य झाले प्रवाहा विरोधी शोधून मार्ग वक्र जगाचे सहजीच फिरवेल चक्र क्षिति वा न भीती न थकवा हातांना नावीक हा आदर्श बालकांना ***** १७ ’तव राहो नेहमिच ताठ कणा..’ रे अजून थोडे साहि तना, श्रमल्यावाचुन नाही प्राप्ती, दारिद्र्यांतुन नाही मुक्ती, जीवन परिघा नाही व्याप्ती नशिब घडव, घालून घणा... तिजवर सारे नेहमिच ’स्वार’, आजार ’तिला’ ? मग ’हे’ बेजार, टाकिति ’बोजा’ तुझ्या शिरावर, हा धनिकांचा रे ’चतुरपणा... तुला निरंतर स्मरेल रे ’ती, यंत्रांनाही असते रीती, सचेत करिती ’निर्जिव’ नाती, ’तिज’पाशि खरा ’माणूस’पणा पाहाणारे वाकून पाहती, ’बोजा’ला वचकून राहती, दयार्द्र कटाक्ष नाहि तुजप्रती’ तव राहो नेहमिच ताठ कणा... ********** १८ ’तुम्ही कोण ?’ म्हणून काय पुसता, नाही आम्ही कोणिही पोटासाठि अतर्क्य कर्म असले ’हट्‌ के’ करू कांहिही ’तुम्ही कोण ?’ म्हणून नजरा वळवू नका वाकड्या ’आम्हा’विण नेहमीच ठरतिल तुमच्या, धनराशी तोकड्या ’तुम्ही कोण ?’ म्हणोनि करु नका हर घडी ’बेदखल’ तुम्हा अमृत देवुनी पचवितो आम्हीच हो हलाहल आणि असली दृश्य पाहायची सवय नसलेल्या नजरांना, हे, त्यांच्या परिचित आश्चर्यांमधली भर वाटेल कदाचित ! पण म्हणतांत ना, ’मरता न क्या करतां ?’ मेरू पर्वत मुंगीनं गिळला, डोइवर चढली दोन-चाकी सागर सारा आटून गेला, घामांतच राहिलं मीठ ’बाकी’, उचलायाच होवी ही ’नखरेल नार’, जरि खायला कहार अन्‌ भुईला भार फुटक्या नांवेतलं पाणी उपशित, पार कराया होवी ना ओढाळ धार ? दुनियेला आनंद कदाचित, ’गिनीज्‌’मध्ये एक आणखी भर गोरगरिबाला काय हो त्याचं ? एका दिसाची सुटली भाकर ’चवल्या पायजेत ? तर कर बाबा ह्ये !’ म्हने मालक रामप्रहराले, ओझं जिण्याचं वागवित चालणं, किती दीस आमच्या नशिबाले ? तक्रार करणार कुणा कडे ? सरकारास्नि कुठला येळ सारे नेते येतिल लोळत, ’तेंव्हा’ मतांशि घालाया मेळ कुणाला पडलिये चिंता आमची ? हर आमआदमी भई है व्यस्त, पेट्यांच्या, खोक्यांच्या चळती मोजत, दादा भाई सदा नशेंत मस्त ******** १९ नका करू बंदबिंद आम्ही जगायचं कसं ? हातावरच्या पोटाल समजावावं कसं ? नका करू बंदबिंद कशी कमवायची रोटी ? तेल, मीठ कसं न्यायच कच्याबच्यांसाठी ? नका करू बंदबिंद, आम्हा ’बारा’ची भ्रान्त रक्ताचा घाम जरी, वृत्ती क्लान्त क्लान्त करू नका बंदबिंद, झालीत मढी आमची आधीच परवड आणि कुरतड चुकवीत मेलोय जगलेपणी कधीच ! मेलोय जगलेपणी कधीच ! ********* २० मातेश्वरी, परमेश्वरी, ज्ञानेश्वरी शुभदे, पांखर सदा सश्रद्ध या भक्तांवरी असु दे बघ आपदांची मोहळे, क्रुधश्वापदांची जणु दळे, संहार कर.. कर मोकळॆ, सान त्यांच्या आकांक्षा भवसागरी तरु दे तू प्रकाशाची वल्लरी, या तमप्रवाहा किनारी, पिडितांस जणु पंचाक्षरी, नाम जय जगदंब जप गंभीरसा घुमु दे शरणागतांना पाहुनी, करवीरग्रामी येउनी, झणि संकटा निर्दालुनी, ऊर्जांगिनी, बलदायिनी, तेजस्विनी दिसु दे ********* २१ निर्गुण निराकार, त्याला ना मान-अपमान.. वंदा वा निंदा, ’त्या’ला सर्व पोकळी समान... ’पोकळी’ला सुद्धा असतो परीघ, ती ’कशांत’तरी असते, शोध घेणारी ’बुद्धी’ मग सीमेवर जावून आपटून फुटते... तुमची माझी भावस्पंदनं, ’जगण्या’चा पुरावा एकमात्र, पूजाअर्चेची अवडंबरं माजवून, कशाला दमवायची गात्रं... ? पापणीलवण्या आधी घटित अघटित होतं इथं, लोपून जात आणि लगेच अष्टदिशांत उमटतं इकडून तिकडं क्षणांत आवाज, शब्दांची निमिषांत वैश्विक गाज, सगळी तंत्र-मंत्र-यंत्र, ’उत्क्रांत’ बुद्धीचेच केवळ साज... हात जोडतो, म्हणू नका, ही ’देवा’ची कृपाबिपा, डोळे उघडून कर्तृत्व जोखा नका लावू त्यांना झापा... बीजांत अंकुरतं पातं नि वर आपल्याच बळें उठतं, ज्याला जगायची उर्मी, त्याला हे अटळ असतं... खुणावणारं निळं आभाळ, बाळमुठीला काळी आई, कधीच कुठेच भवती नसते स्वप्नांची खोटी दुलई... ’जेता’ व्हायची विगिषा, यापरता आधार नसतो, आप्त, सखा, सुहृद, मित्र ... फक्त गंमत पाहात असतो..., फक्त गंमत पाहात असतो... *********** २२ माणुसकीच्या वारस आम्ही दुजाभाव नाहिसा करू नव्या जगाच्या, शांतियुगाच्या शिल्पकारका ! सार्थ ठरू. . अणुरेणूंची अमोघ शक्ती नभगोलांची असीम दीप्ती ज्ञानाचे लावून पाश आम्हि, विश्वकारणा साध्य करूं शास्त्र-कलांचा सुरम्य संगम आम्ही घडवू जगति, विहंगम, समृद्धीची धरुन कांस ’लोकराज्य स्वप्न आम्हि साकारू, उक्ति आमुची व्यर्थ ना ठरो भावबंधना ना ’मनु’ विसरो आदिशक्तिला स्मरुनी भवती उन्नत्तीचे बिज पेरू ********** २३ ’दोस्ती बिस्ती..’ येऽऽ दोऽऽस्ती, हम नहीं छोडेंगे फिसले भले पॉंव, साथ ना तोडेंगे पकडीवर आमच्या गड्या आहे तुझी भिस्त, बिनधास्त कर काम, ठरवू विश्वास तुझा रास्त आंत भले दिसेल तुला सगळच उलटं आहोत भक्कम बाहेर आम्ही काळिज ठेवुन सुलटं गंमत म्हणजे तीघांना एकदम एकच काम नको चिंता करू, नाही वेगळा मागणार दाम.. ********** २४ ’कुंपणच शेत खायला लागल तर मग.. ????????’ अरं काय ल्येका, काय तुझं चाललय काय ? असं काय आक्रित तिकड घडतं हाय ? नाय काढला फोटू तर फासावर जाशिला ? द्येवाला पायी घालतोस ? पाप कुठं फेडशिला ? ’असं पुन्हा दिसणार नाही’ म्हनतुयास निर्लज्जा ? मानूस नावाच्या श्वापदा तुला कुठली द्यावी सजा ? काय मानूस हैस की कोन ? ’गोंडस’ धराया पाय ? कोल्ही कुत्री सुद्धा तुला क्षमा करायची नाय दोन घडीचा डाव मांडून मोकळ होवू नका, जबाबदारी घ्या ! वर करूं नका काखा पायांत छान वाळे, कानटोपी डोईला ’कवळा’ कुठल्या भरवशानं तुला सोपिवला ? जस पेरशिला तस उगवल, माती-मायचा नियम हे सूत्र कोरून ठेव हृदयांत तुझ्या कायम ? असल्या अपेष्टांतनं जर झालाच उद्या मोठा, फोटो पाहून नक्की हानल डोस्कित तुज्या सोटा पाहिले असले बाप, आपल्याच शौकांत सदैव मश्गुल, काळीज, काळजी नाही, यांचा वंश ’काजळी-कुल’ ********* २५ ’आयडिया ची कल्पना’ मले शिरमंत व्हायचय्‌ माह्या बापा, करू कुठल्या मी सांगा की पापा.... हे ’हरघडी पैक्याचं यंत्र’ पर उघडाया ठावा नाई मंत्र कशा उघडाव्या म्हंतो मी झापा.... कष्ट करून घाम ढाळीला पाणी भुकेला, शीळा उशाला त्ये बी लुटत्यांत मारून थापा.... कसं ठेवांवं जपून त्यांना लांडगे भवतीचे करत्यांत दैना तुडवत ’दये’च्या मारत्यांत गप्पा.. .बाकी.. कसा वाटला हा माझा Make-over ? हां.. पडू नको.. सोताला सावर ! लई नाई आतां तुला फशिवनार गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... भाइर गुंडांची मोकाट टोळी करतिये कमावल्या धनाची होळी कसं यांना पुरुन आपन उरनार ?... डोळ्यांत टाकतंत मिरचीची पूडं सगळ्या आशेला लावत्यात चूडं कशा तरवारी म्यान यांच्या होनार ?... पायी नको घालू वहाणा अंगी बाणव भिकारी बाणा तुला ढुंकुन नाई ते बघनार... पाठी घेवून फाटकी गोणी अन्‌ नजरेंत करुण कहाणी पाहायाला त्यांना वेळ कसा गावणार ?... माज्या नजरेंत दिसतोय ना अंगार ? नाइ असातसा, नाई मी ’भंगार’ संधी मिळताच त्यांना मि हाननार... फाटकी विजार नी उसवला सदरा अन्‌ खंतावला उद्विग्न चेहेरा तुला जवळ करू नाहि पाहाणार... ’भाई’गिरीची पापणी आड नशा अन्‌ ओठावर ’दादा’च्या मिशा नाहि धुंदी यांची उतरनार... बघा चेहेरा माहां निरखुन पारखुन अभि बच्चनचं वाटतया कां Cartoon ? नको.. लचांड मागं उगा लागनार... असेच दिवस आलेत आता राजा, शिरिमंत ’दिसन्यां’त बी नाई राह्यली मजा सोन म्हणून पितळ सुद्धा लुटणार... म्हणून गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... . गोष्टी युक्तीच्या चार आज सांगनार... ********** २६ कोण देव ? काय देव ? नसलेपण एक नि अभाव गंडेदोरेवाल्या बाबा बुवांची ’त्या’च्या नांवे कावकाव जन्म-मृत्यूमध्ये एका श्वासाचं अंतरं उत्पत्ती-स्थिती-विलय सारा शास्त्राचा प्रभावं... ******* २७ सुखांत करा वाटेकरी, दु:ख आपल्या गाठीच बरी सुखाचे तुषार आकाशांत, दु:खाचे कढ आतल्याआंत सुखाचे कण विरळ विरळ, दु:खाचे नेम अग्स्दी सरळ आनंद ! नित्य नवी नवलाई, यातनांची खाई कुरतडत खाई हर्षोल्हास, झुळुक, फुंकर, स्पर्श या सार्‍यांचेचं सुखकर जरा, वेदना, विरह, ज्वर, दु:खाचे तमगामी पर दु:खात पाहू सुखाची स्वप्न, थेंबा जशी आसुसतांत भेगाळली रानं ********** २८ ’व्यथा...’ मला बी वाइच होउद्या म्होरं, जायचय्‌ बघाया शिंगापुरं मोडा टाक, नी सांडा शाई, अशी संधी पुन्यांदा यायची नाई चार बुक नाई, लिवली तरी चालल, निवडून या मंग बगा चक्रच फिरल ’उंडण फिंडण मला नग नग, सिंगापुरच्या ’रातींचं’ पाह्यचय जग थोडाफार पैका खर्चिन खरं ! पर पाहनारचं बा म्या शिंगापुरं माग येक भामटा ’चला’ म्हनला ’भाऊ’, शिगणापुरला एकदा जावनच येऊ पोचलो तिथं, तर शनिदेव ’राऊ’, वाटलं भामट्याला गिळू कि खाऊ ’मर्‍हाठी’च्या कौतिकाचा वाजतोय ढोल, उंडणच्या आवताणाचा सांगावा फोल.. यांच्यापेक्षा थेट, ते ’राजकारणी’ बरं, आनत्यांत म्हनं हितं शांघाय,.शिंगापुरं **** २९ आषाढातला महाराष्ट्र... मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंगरानोमाळी ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग ओवी साधीभोळी दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’ प्रत्येक हृदयी ठाकला, वालला, भक्तीच्या भारानं पांडूरंग काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !! राऊळी फत्तर आहे माह्या बापा ,विठूराय शोध तुह्या मनी ।। जनी, नामा, गोरा, नरहरी, सावता लाविती ’कर’चं सत्कारणी ॥ ’विका भांडीकुंडी, भाकर घ्या हाती, पोराले शिकवा बापडे हो !’ डेबूजी सांगूनी गेला तरीही ही मानसं आंधळी असी कां हो ? ***** ३० ’शिवस्तुती’ शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, देशाची कणखर माती पवित्र झाली गड-दगडांच्यात्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला त्या हिमालयाचे शुभ्र बुरुज राखाया, यशवंत कीर्तिची नित्यच स्फुरते काया मायभू चरणीच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी योद्धा सरसावला या गनिमाच्या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, ठेचाया अतिरेक्यास सिद्ध प्रज्ज्वला ********** ३१ कसला मान-सम्मान नि कसला बाबा सत्कार साधाभोळा निरुपद्रवी तू केवळ मतदार जिणं वाहून चाल्लय घामांत, मरान काहून येईना तोडत्यांत लचके तुझे तरी 'त्यांचं' उदर भरं ना उत्तिष्ठ, जाग्रत, अन् प्राप्यवरान्निबोधितं वाहती गंगा हाई तोवर, हो 'उमेदवार' नि माग मतं निवडून 'त्याच्या' नांवामुळं येशीलही कदाचित उखळ पांढरं हुईलच, अन् कळल 'जगण्याची' बी रीत मग आलं मरान तरी सरकार धाडील इमान मागून मिळालं असतं राखून आयुष्यभर 'इमान' ? मातीमोल चामडीवर मोती उधळत्याल 'फोटू' नाइ नुस्ता, संमदी 'यात्राच' दावत्याल फुल नि दगूड फेकायला येतील शत्रू, मित्र फास घेऊन गेला असतास.. नसतं आलं कुत्रं मसाला आंत भरलेला नि थाटमाट सरकारी झाल्या ख़र्च वसुलीसाठी मग करदात्यांच्या खिशावर 'डल्लामारी' मग ? राहानार मतदार की व्हनार उमेदवार ? बघ, 'यात्रा' पाह्यल्यावर तरी हुतोय का पक्का इचार .... ********** ३२ हे सप्तसुरांचे हृदय आणि माहेर, ‘माँ’ सरस्वतीच्या वीणेचा शृंगार, गोपाला हाती वेणु आर्तशी मंद्र, श्रीहरिच्या शंखातील खर्ज गंभीर ही शिवतेजाची लखलखती असिलता, ही उमा-रमेच्या हृदयी वत्सल गाथा, ही विनायकाच्या शब्दांमधले ओज, अन् अग्रज कवीच्या उर्मीमधली वीज ही ग्रीष्मानंतर श्रावणसर, गारवा, अन् गाभार्यातील मंद तुपाचा दिवा, हा स्थिरस्वर स्वरनिधीत दीपस्तंभ, हा नादमंथनोत्तरी दिव्यश्रुतिकुंभ, हा मांगल्याचा पावनक्षम गंगौघ, हा प्रेम, विरह अन् करुणेचा आवेग, हा ज्ञानेशाच्या ओवीचा परिमळु, अवतरली मीरा पुनश्च अवनीवरी, रघुरायकृपेने समर्थ ही वैखरी **************** ३३ विरले सगळे सूर, तरीही उत्तर रात्र सुरेल स्वरावलींची तरिही हृदयी, तशीच ओलं उरेल असं म्हणावसं वाटतं... आमराईतून गातो कोकिळ, दडतो पानांआड आभाळाशी स्पर्धा करिती, हिरवे खेटुनी माड... राउळांतुनी घुमत नगारे, पवित्र घंटानाद टाळ मृदंगासवे आर्तशी सुरेल अभंग साद... लाल मातीची विरते सीमा पुळणिंत सागर साक्षी लाट किनारी खेळ खेळता रेखुन जाई नक्षी... मंगेशा अभिषेक कारणे अवतरली स्वरगंगा गाज गभिरशी जिंकून घेई रसिकाहृदयी जागा... टिपून आणिले अमृतकण, शोधून मंदिरे नाना भावस्वर गहिर्या रंगांचे विणून केल्या रचना... रती-विरक्ती अनुयायांवर केली माया, अशी गुरूची कृपा परिक्रमा घडविली स्वरांची, दावित अनंत रूपा... ज्ञानाच्या आसक्तीपोटी कसे लोटले जिणे माधुकरीचे घास रिचवुनी, कंठी रूजविले गाणे... कृतज्ञता जपली हृदयी जरी पैलतिरीची हाक दमड्यांचा ना विचार केला, भागविली स्वरभूक... राजाश्रय ना कधी मिळाला, खंत कधी ना केली जणू हलाहल पचवुनी सहजच अमृतवाणी सजली. विविध सजविले कवी स्वरांनी, वेधुनि भावार्थाला बाकीशब्दसम गंधाराच्या स्वयंभु प्रकटार्थाला... सय स्नेहाची नकळत करिते आर्द्र पापणी कांठ कृपा एक की पुत्राकरवी नितनूतन स्वर भेट.... ********** ३४ शतपैलूंची हिरकणी । आनंद सर्वत्र, वनिभुवनी । क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी? ज्ञानोबा, शिवबा लता नी आशा । घेऊन अक्षरासिधार-स्वरांची भाषा । पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकानुशतके अभिषेकिले ॥ ‘आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल? मनि शंका ॥ ध्यास हा, ना आभास । स्वप्न नाही, निखळ सत्यास । शत शतकांच्या पराक्रमास । कवळिले, सहजपणे ॥ ********* ३५ तेव्हा लग्न व्हायचं होतं, आता मला नातू आहे. नाव असणं आणि नाव होण या मधला ‘दूरदर्शन’ सेतू आहे. 16 मी.मी. ीर्शींशीीरश्र-ीशिारस ते ऊळसळींरश्र तळवशे पर्यंत स्थित्यंतर र्उीीं-ीळिलश, झर्रीीश-ीशश्रशरीश आणि आता छेप-श्रळपशरी कवि, साहित्यिक, वैज्ञानिक, वादक आणि गायक ‘दूरदर्शन’नं नावारूपाला आणलेले, रंगनायिका आणि नायक छोट्या ळवळेीं-लेु मधून, पोहोचलो घराघरात खिडकीमधून ‘जग’ रुजलं, तनांत मनांत आणि जनांत... आम्ही आपलं आजपर्यंत खेळलो उेिू-लेेज्ञ सवंग प्रसिद्धीच्या मागे लागण्याची मात्र, केली नाही चूक... भक्ती, सुहासिनी केळकर, दिवेकर आणि पारकर आठवणींच्या डोहांत डोकावताना, डोळ्यात साकळतो गहिवर... ‘चांगुणा’ नि कस्तुरबाची सासू झाली, काय होतय कळत नाही अती झालं त्याचं आता, हसू मात्र आवरत नाही... माहिती, ज्ञान, मनोरंजन असा आम्ही शिकलो क्रम पडलोय अडगळीत आता, म्हणतात, ‘याला झालाय भ्रम’ वाहिन्यांची ‘मातीमाय’ ‘दूरदर्शन’ वय चाळीस आमचा ‘पत्ता’? ‘कटत’ नाय तोवर, वरळी मुंबई ‘पंचवीस’ वरळी, मुंबई पंचवीस... ********** ३६ साधा लेंगा, कुडता, खांद्यावर शबनम पिशवी ‘नक्षत्रांची देणी’ ‘हा’ अनवट काव्य-शिल्पातून भेटवी सृजनाला नसें ठिकाण नी नांव, गांव या फ ‘आरती प्रभू’? अं हं! हा तर ‘आर्ताचा चिंतामणी’ जणू, वैशाखाक्षरांना श्रुतींचे डोहाळे लागावे ऐन श्रावणी अशी सोनसळी शब्दसंपदा, जपत जरतारी बासनांत अखंड ‘श्रीमंती’ जगला ‘हा’, चंद्रमौळी घरात जगण्याला अवेळी, झाकोळानं गाठलं काळाच्या तळ्यात, उलट उलट झाड, बुडत बुडत गेलं ********** ३७ मधुर-भाषिणी, सुहास्यवदना, प्रमुदितमुखधारिणी। चाणाक्षा, नितसुस्वरा, स्मितधरा, कल्पका, तरी धोरणी। कोरुन मानसि चित्र मी जपतसे, आजहि बहुआदरे। माहीत नाहीत ’देव’, तरीहि मजला दैवत हेची खरे ॥ ********* ३७ नगाधि, सागर, तारे, वारे, निर्मळ निर्झर झुळझुळणारे अथांग अवकाशाचा अनाहत अनुनाद, मायेंत भिजलेली वत्सल साद सुख-दु:खाना तुझ्या गाण्याचाच थांग ! कसं सगळं विसरू सांग ? देवबीव झूठ सगळं, असेल तुझ्याच स्वरांच हे नांव वेगळं, गाईच्या डोळ्यांत आर्त भेटतं, गाणं तुझं जेंव्हा काळजांत दांटतं जगण्याला रोज तुझ्या भूपाळीची ’बांग !.कसं आम्ही विसरावं सांग ? **** ३८ ’सचिन’ आज पराक्रम सोन्याच्या कोंदणी । चाहात्यांचा आनंद वनी भूवनी । क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधारा-स्वरांची भाषा । पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥ त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र । ’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥ *** ३९ ’समीक्षा’ जे जे होईल दृश्यमान । नीर-क्षीर विवेकाचे ठेवून भान । आशय-तंत्राचा सन्मान वा ताडन । करेन मी सदरामधे ॥ जे ज्या रूपी अवतरे । वर्णावे त्यासि ’गोमटे-गोरे’ । ऐसी अपेक्षा न ठेवणे  बरे । मजकडून, जाणिजे ॥ आम्ही, चित्रवाणी व्यावसायिक । ’दृश्यिकेस’ लावुनी अक्ष एक । कधिहि न होता अतिभावुक । आकृतीबंधास रेखितो ॥ चौकटीत विसावे आमुचे विश्व । त्रिमिति देती पृष्ठ-पार्श्व । त्यामधेच प्रकटते कर्तृत्व । ’पट’करी, दिग्दर्शकाचे ॥ परि यंत्राहुनि ज्येष्ठ तंत्र । त्याहूनही श्रेष्ठ गर्भित मंत्र । तोचि झिरपतो हृदया पर्यंत । ऐसी आम्हा शिकवण ।। ********** ४० जांणीव ध्वनी-स्पर्शाची का असते आम्हां पुरेशी ? वर्णने छान तुम्हि करता, मग वाटे नजर हवीशी जग ’सुंदर’ बघण्यासाठी, डोळ्यांची वाट ’पाहावी’, दृष्टीस ’यातना’ पडता, नजरेची भूक मिटावी... भ्रमनिरास झाला तर मग, त्यापरते दु:खच नाही डोळ्यांच्या खाचांमधल्या, अश्रूंनी भिजेल बाही... अश्रूंनी भिजेल बाही ********* ४१ सुगी पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान, वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर, गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर सणासुदीची बाजारहाट, घोळाय्‌ला लगलिया मनी, पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी कधीपासुन टोपपदरी घ्याव म्हणतेय्‌ मी, बैलजोडी आणत्याल नवी तवा बरूबर जाइन मी बी, लेक लई हुश्शार माझि, तिला कराय्‌चि आहे डॉक्टर, खंबीर वाश्यांच्या घर, पोरं चढविल झळाळ त्यावर *********** ४२ ’You just wait' डोरलं बांधलं मला तवा व्हती म्या झोळींत बोहल्यावर म्हणे नेलं, मामानं हातावर झेलित इवल्याश्या भाळावर एवढा मोठा टिळा, कुड्याबुगड्या कानी नी गळ्यांत बोरमाळा टिळ्यावर मायेनं रेखली लाल चिरी ल्यायला दिला परकर नि पोलक भरजरी, जरा चालायला लागल्यावर पांगुळगाडा आला धरभर आन्‌ वावरांत माजा राबता सुरू जाला पर बैलगाडीची मज्जा काय औरच अस्ती बाबा ’हुर्रर्र हुर्रर्र सर्ज्या-मौज्या’ आरडत पळवायचे आबा परकराचा वरती, शिस्तित कांचाबीचा ,मारून हिंडत व्हती नंतर म्या, सायकलवर टांग टाकून, माय कवतीकानं म्हनं, ’गांवभर उंडारती’ भ्या वाटतं.. बघुन कुनाकडं बी हासती..’ म्या म्हनं, ’राजपुत्र येनार घोड्यावर, बसवुन माला फुड्यांत, शर्यत वार्‍याबरूबर, खरचं आला एक दिशी, मनांतला राजा संग बाइकबाई,म्हनं, ’करतू वावरांला ये-जा’ सवतापाठी, ’बस’ म्हन्ला, ’चल जत्रंला जाऊ, सवतीपाठी बसून म्ह्न्ले, ’बाई तुझी पाठ लई मऊ !’ पडली माझी पावल कधीच जिमिनीवर न्हाईत असा थाट बाई, कुनाला सोपनांत तरी म्हाईत ? फटफटीवर बसून आंता जाते कुटं बी थेट विमानसुद्धा उडवन बरं, You just wait.. ************ ४३ व्याघ्रावाहना जगदंबा, शारदा मोरावरी, महिषासुरारि महाकाली, त्रिशूळ शोभे करी अंबुजवासिनि लक्ष्मी, धनसंपदा नि समृद्धी खल दमना देइ धैर्य, शौर्य, स्थैर्य, बल, बुद्धी ********** ४४ ॥जगदंबा स्तुतिअष्टक॥ प्रकटता तेज । आदिशक्ती बीज । जागेपणी नीज । भेदू पाहे ॥ व्याकूळ व्याकूळ । गर्तेतला तळ । शक्तिसेवा फळ ।उद्धरेल ॥ सत्या, शुभा, सुंदरा । त्रिशुळाच्या तीन धारा । दर्शने देई धैर्या । रिपुदमना ॥ जगदंबा करवीरी । भवानीआई गड शिवनेरी । देवी सप्तसृंगी वणीच्या डोंगरी । झालीये अवतीर्ण ॥ संपदेचे आगार । ज्ञानसमृद्ध भांडार । सारे होतसे असार । मातेचरणी ॥ व्याघ्रारोहि सुंदरी । शस्त्रां धरुनी चारहि करी । दैत्य निर्दय, अविचारी । संहारितसे ॥ दाही दिशा भरूनि राही । पंचमहाभूतांचि माय होई । त्रिकालाबाधित निवारा देई । विश्वमाता ॥ हे ऐसे स्तुतिअष्टक । शाब्दी श्रद्धामूल सार्थक । सदा देवो सारासार विवेक । जगण्यासी ॥ **** ४५ ’दोन लावण्या’ चवल्या-पावल्यांचा केलाय मी वांधा रुपया रूपाचा कलदार बंदा... भाळ आभाळावर उगवतीचा शिलेदार..थंडावा रातिचा कां जळ नजरेवर ?.. डाळिंबि व्हटाची पहाट जणू हाकारं.. रंग-कांतिची पुनव उतरली, जनु चाफा बहरलाय औंदा.... नथं नाकांत थरथरे, तिरिप जशी माध्यान्ह..कानि कुडिबुगडी, सांज गुपितांचं कोंदन..मान कमळदेठ धाडि पांचव्याचं आवतान... केस मोकळे द्वाड, पसरले..झाकत्यांत अटकर बांधा... धडधडत्या वक्षी, दिठी काढुद्या नख्‌शी..मनगतांव माझ्या बसवा राघवपक्षी..अवघ्या मुशींत रिचवा बेगिन तुम्ही रसरशी... लुटा कवळ्या तरनाईचा चंदा... ( ही राम कदमांनी संगीतबद्ध करून, दूरदर्शनच्या कार्यक्रमांत, माधुरी सुतवणेनं गायली होती. ***** ४६ हाड फोडते थंडी तरिही, थोडक्यांत असते गोडी.. राया जरा सैल करा मिठि थॊडी.. कनगींत भरुनिया दाणं तुमी निवांत..गोविंदविडा घ्या,देते लावुनि ! पंत..मन चुळबुळते तरि ठेवा त्याला शांतं... वाकळ घेवू आंतुन, वरती पांघरुया घोंगडी... आडसालि उसाची होइल साखर आंता..चतईच्यां वाकितं, हिरकणं बसवुनि देता ?..नजरेचं माज्या कसबं तुमी जाणता.. धुंद सुखाच्या, भरून आनल्या तुम्हासाठी कावडी... गारटःआ असोनी, दमटपना कां वाटे ?..चोरटे स्पर्श शहार्‍याचे फुलविति कांटे..ठिणगीचा झाला वणवा, डोंगर पेटे...शमवायाला डोंब तुम्हि बरसा वळिवझडी... ***** ४७ शेकोटीचे दिवस साजणी, रोमांतुन हुडहुडी भरे.. कटू स्मृतींची पाने गळती, आनंदाची ऊब उरे. ****** ४८ ऋतूंची लावणी वैशाखी बघ धग गात्रांतुन, सवय लागली वाळ्याची.. शिशिरधुंद गंधित रात्रींतुन, निनादली सय चाळांची (चाळ्यांची ?) पदरावरचे राघू-मैना निपचित झाले काहुन आज ? धडधड पदराआड नि तेंव्हा, दडून बसण्या शोधी काज पदरपदर का भिजवुनि श्रावण, शमविल लाही अंगाची ? अधिर जिवाचे ऊष्ण उसासे, भिरभिरते कशि पहा दिठी सुगींत जरिकांठी जरि खुपली, तरी मधाची मऊ मिठी मावळतीला मळभ साजणा ! लवते पापणि डोळ्याची... नको दाउ भीती विरहाची, बेगिन येना आज घरा धगधगत्या स्पर्शांतुन उसळुन, थंडावा शिडकवी जरा प्रतिमा डबडबल्या भाळी, सय भिंग जडविल्या चोळीची.. ********** ४९ अवतरली भवती हिरवाई सळसळती किलबिलती द्विजगण, पिंपळ-आम्रावरती जित्रांप हंबरे दावणीस गोठ्यांत मोहरते तुळशी शिपणिच्या थेंबांत पिंगळा-वासुदेवाची नित वर्दळ अर्थपूर्ण शब्द अन्‌ स्वरमय आर्त सकाळ जात्याची घरघर रेशिमगाठी ओव्या येतांच जाग, मनकलिका खुलवुन जाव्या करतलास पहिले नमन, इतर मग कामे धनवृद्धीसाठी प्रज्ञा घडवि सुकर्मे मोकळा श्वास, स्वच्छंद स्वच्छ आभाळी गुलमोहर हसतो अबाल-वृद्ध कपोली विटिदांडू, सुरपारंब्या, बहुविध खेळ करमणूक आणिक व्यायामाचा मेळ नेतृत्व, चपलता, गनीम तंत्रे सारी साम, दाम, दंड भेदाहुन असती भारी घेवून अंकलिपि पंतोजी शाळेंत अज्ञानावर करिती भाषा, गणीत मात बारा बलुत्यांचा खाउ क्षुधाशांतीला ना जात-पातिचा अडसर कधिही आला वसुबारस, पोळा, नारळि-पुनव, वटाची नागाची पंचिम, लग्ने अन्‌ तुळशीची कणग्या साळीच्या शिगोशीग माहेरी उंबर्‍यांत लवंडे माप वधू सासरी त्याकाळी होते पतंग भवरे कंचे कल्पनाजगत फुलविण्यास निवडक वेचे प्रहसने, पहेल्या इतिहासांतिल कथा शास्त्रीय सुगम संगीत पुराणे गाथा फडताळे खुंट्या, चंची छपरि पलंग घंगाळे, न्हाणित वज्रटिकेचा संग पागोटे शेला पैठणि आणिक लुगडी ठाशीव नारि अन्‌ उमदे बाप्ये गडी ना निशिद्ध असते तिथि कुठलिही तशी अवसेच्या रात्री लक्ष दीप आकाशी सरितेच्या काळ्या साडीवर खडि जणू तम, तेज..कुणाची मात कुणावर म्हणू राउळी कीर्तने, गोधळ, भारुड भजने मैदानि दणकती शाहीरांची कवने गण गवळणि करिती प्रौढांना बेजार लावणी नऊवारींत खुले शृंगार ओसरी परस ओटा सोपा नी कोठी दीडींतुन अखंड ये-जा.. वर्दळ मोठी तिन्हिसांजा उजळे सांजवात देव्हारा परवचा, श्लोक, आर्यांचा शब्दपिसारा आजीच्या स्मृति-बासनांतील ही रत्ने समृद्ध करुन जगण्या.. संस्कारिति मने निद्रेस पाळणा झोपाळा वा झोळी तुम्हि-आम्ही खेळलो खांबखांब खांबोळी याहुन असते कां संस्कृती हो वेगळी ? भवताल स्थळी, काष्ठी पाषाणी जळी हे चित्र नसे हो तसे फारचे दूर असतील उलटली तपे फारतर चार ही स्थिती आतांशा बघतां... ना राहिली थोरांच्या ठाई चित्रवाणि ठाकली हे सर्व आज त्या पेटीमध्ये असते कळ दाबतांच पाहिजे तेच अवतरते हा बदल खरोखर तारक अथवा मारक ? प्रज्ञेच्या निकषांवर स्तर, साधक-बाधक बहुरंगि जगाचे आपुल्या हाती द्वार पाहण्या वापरू विवेक सारासार ना समजा सर्व नवे असते टाकाऊ मंथन बदलांचे ! वृथा कशाला बाऊ ? वाहिन्या, मालिका बहुविध अंगी सकस माहिती, ज्ञान रंजनास गवाक्ष खास लैंगिकता, हिंसा कधी कुणा ना टळली फाडा बुरखे, डोकवा आंत ! वखवखली माणूस अखेरी हिंस्रांतुन उत्क्रांत श्वापदे मनाच्या तमगर्भांतच स्थित बालक तर करते थोरांचे अनुकरण ’साजिरे’ तयांना दावू या, आचरण अन्यथा नसे परिणामी गर्ता दूर ’चावण्या कान’ मातेचा शिशु तत्पर तमघोर सागरी क्षणैक तेजोरेखा ’जगणे’ म्हणजे मरणांतिल निमिष अनोखा ठेवून स्मृतींचे स्वर्ण, सहस्रक सरले ’विश्वातिल क्षुद्र कणास’ नाहि जाणवले माध्यमे ओढती विश्वाला जणु आंत तरि त्वचा, नासिका, जिव्हा कां अतृप्त ? कुणि जाणावे ? हे उद्यांच होइल साध्य प्रत्येक यत्न लक्षाचा भेदे मध्य सार्‍यांचे या प्रतिबिंब दिसे ’पेटीं’त ’पेटी’ ना समजा अडसर प्रगत पथांत ज्ञानाच्या कक्षा नका सिमित करु आतां ध्वनि, चित्र माध्यमे संगणकाची सत्ता पाहूद्या. शिकुद्या जाणिव होइल तीक्ष्ण ऐकुद्या, हसूद्या.. तवान होतिल मनं मज आशा एकच कुणि न विचारिल प्रष्ण ’संस्कृती लया गेली ?’... व्यर्थ विधान ********* ५० शेळी जाते जिवानिशी... पाऊस कसला, भुरभुर नुस्ती, न्हाई पानी-दाना, मोडित काडुन आमाला बी, धनी फिरवत्यांत माना दलदल माजली, चारा न्हाई, पुडं भुकेची खाई दशा, हिची बी, अशीच दिस्तिया,’ ’बिच्चारी’ बाइक‌ बाई मैत्र जीविचे शोधू जाता, समोर आला नेत्र झडली, पिचली, खिळखिळलेली अन्‌ झिजलेली गात्र जाणू गेले दु:ख तिच, पाठीवर तिच्याच बसून विझूविझू पाहांत होती, ’आ’ अखेरचा वासून कोंबडी, कुत्री, मांजरी बकरी, का नसतो ’बाई’कला जीव ? अरं ’देवाच्या’ त्या काठीला ल्येका, जरा तरी भीव... मोडीत निघत्यांत मानसं थितं आमाला कुठला चारा ? कोनो भी देस, प्यारे ! इस हालात का नही चारा ********** ५१ रंग... लख्ख निळ्या आभाळभाळिचे, अवचित आल्या झाकोळीचे भानूच्या उदयास्तास्थळिचे, जळातळीच्या मासोळीचे, फुले,पांखरे, वृक्ष-वेलिचे. अद्भुत, सुरम्य रंग... दीपावलिचे अन्‌ होळीचे, सुबक रेखल्या रांगोळीचे, उचंबळाचे, नैराश्याचे, आसवलेले रंग... ********** ५२ गणनायक, सुखदायक, दुखवारक, बलसाधक मूषकावरी मूर्ती, शुभंकर तु विश्वकीर्ति तू दुर्वांकुरधारक, क्लेश,वेदनाहारक गणनायक.... सत्कर्माधार नित्य, दमन करी कृष्णकृत्य शक्ति-बुद्धि-गुणवर्धक, सांबसुता प्रतिपालक गणनायक... श्रद्धेला ’दृष्टी’ दे, ’कार्यप्रवण वृत्ती दे हो बापा, हो नायक, संकटांत पथदर्शक... गणनायक... ******** ५३ PASSAYADAAN...FREE ADAPTATION... GLOBAL PRAYER… O Supreme, Unseen, infinite, unknown.. Grace thou verbal, vocal, vibrant throne.. Bestow me with heavenly, transcendental cool Not more, only a blessing blissful.. Let hatred fade n’ affection flower N’ goodwill clouds hover and shower.. Content lamp glow and light Life n’ like take a flight.. Abundance overflow and death drown Cosmic aura crust the crown.. Fulfill the dreams with greedless need Beyond faith, creed, cast n’ apartheid.. Sanctity mingle with gentle folk No fear around ever choke.. Clear the air of all disgrace Let it reflect on every face.. Flora n’ fauna n’ fragrance upbeat Spark-in vigor, wit n’ grit.. Chirping birds, savage beast Live n’ let live with lust the least.. Speck less moon and soothing sun Delight human in the eternal run.. Joy to the brim, bubble the chime All be grateful to root n’ prime.. Yen for perception yearn a word’s worth ‘Caused a just n’ vocal dream-birth.. O state of minute, vacuum n’ space Part n’ full of every face.. May little dreams morph real n’ fill Of joy n’ cheer DNYAANAA lays a keel… Traslated by Arun Kakatkar. ******** ५४ ये ना बाबा पावसा, जीव वाटे जाईसा अंदाज ठरतो खोटा, उगा करत्यांत बोभाटा ये बाई सरी, मडके अर्धे तरी भरी सर भाव खाऊन, बसली कुठं जाऊन ? ******** ५५ प्रेमाला कसले मोलं, स्पर्शांला उजवा कौलं ही मधुभावाची भूल, निष्पाप वेलिवर फूल प्रेमांत नसे हव्यास, बरसतो जसा पाऊस निरपेक्ष देवुनी कांस, निष्पर्णा देई जोश प्रेमाने फुटति धुमारे, प्रेमांत नसति देव्हारे मागते प्रेम क्षण सारे, पात्र मात्र ठेवुनि कोरे प्रेमांत नसे कुरघोडी, सहजीवन असते गोडी शब्दांची भाषा थोडी, आवंतण नजरचं धाडी हे असे विश्व मायेचे, स्नेहाचे, अनुबंधांचे खोट्या नात्यांपलिकडचे, अन्‌ विशुद्ध आनंदाचे ***** ५६ हे शरीर केवळ बाह्यरूप, देखावा अंतरंी तरंगति रंग, करिती दावा जर मिळेल आम्हा शब्दांचे अंगडे पूर्णत्व साधण्या होउ मग वाटाडे हे शरीर म्हणजे श्वासाविरहित मढे रक्त, मांस अस्थीं, आवळले गाठोडे उमलतो प्राण मग जेंव्हा तुटते नाळ संपते कहाणी, तेंव्हा नेतों काळ हे शरीर म्हणजे भोगांसाठी वास्तू मनविरहित शरीर ? अडगळीतली वस्तू ! मी करेन यंव त्यंव, फुशारक्यांचा धनी घाबरे ! पैलघंटा पण पडता कानी हे शरीर म्हणजे आसक्ती, हव्यास ? मन 'नाहीं !' म्हणता उरते केवळ हौस कृतिवरी अखेरीस मनाचेच अधिपत्य दररोज, हरघडी करिते पौरोहित्य मज गोष्टी होत्या सांगायाच्या चार दरम्यान कुणीतरि मागुन केला वार जरि चेहरा नाही दिसला गर्दीमधुनी गारदी कोण ते कळले त्वेषावरुनी जन 'हो हो' म्हणती, वचने 'हसरी' देती पसरता पसा पण सैरावैरा पळती मज भीक नको, पण विकाउ नाही स्वत्व पाडून चेहरा बसेल जरि 'दातृत्व(?)' लावून पाट मी सजविन संसाराला डोरले चढवुनी अस्तुरि आणुन घराला भोगेन यथोचित होइन झटपट बाप लागेन इटूचरणास वारण्या पाप ही ऐशी कैसी वृत्ती संत महंती शिकवीत धर्म, विस्मरती सहजच नाती झटकून मोकळे होण्या यांना मुभा कुणि दिली ? करा पैजारें यांची शोभा *********** ५७ सौदामिनिचा लखलख झटका मेघ नगारे धरती कोसळता अवनीवर श्रावण, आनंदाला भरती व्रण सारे भरून येती, दिठि-मिठींत पुरती मस्ती हिरवे शालू ल्याल्या ललनांकरी कांकणे किणकिणती कुणि गाते मीलन गाणी, कुणि शृंगारिक लावणी रेखित, मिरवित रांगोळ्यांची धरतीवरती लेणी भादवा देइ चाहूल, श्री, गौरिस माखु गुलाल ढोल-नगारे घु्मता नाचति थिरकत वृद्ध आबाल **** ५८ आषढाच्या विरही झरते, व्यथित श्रावणी बरसे आज आसुसले पण सोनेरी क्षण , खळींत गाली, लपली ’लाज’... पुसा तिला कारण हळुवार, नको रुसाया नाजुक नार अधिर बावरी, लाज लाजरी, मिलनसंधिची घुमते गाज डावी पांपणी लवते गं, विरहज्वर जाळी अंगं.. हुरहुरते कळ मयूरपंखी, काळिज ? धडधडता पखवाज सवतीशी स्पर्धा आज, योग अलिकडे हा रोज कोणता करू शृंगार-साज की भिडता मग येइल मौज ? ******** ५९ दिलाला झट्का नि जगन्याला फटका, काहुन देत्येस पोरी तुह्यापाई नाचक्की घरी नि दारी ॥ **** ६० दृश्यांना अदृश्यांची नित चौकटं, पण बालां-वृद्धां वाटे ’भरले ताटं’, जरि भासे ’याने भरेल भरपुर पोटं !’, परि मुळांत असते ’सात्विक’तेची खोटं ही अशी कांहिशी चित्रवाणि अलिकडे, अज्ञानि प्रेक्षकां भुरळ ’कली’ची पडे, अतिरेकि अतर्क्यां ’मालिकांत’ ’सांकडे’, कां यांना ना हो ’बरे’ कांहि सापडे ? वैरे, दुष्टावे, हेवे-दावे किती ? ’बाई’ला अविरत ’बाई’कडुनच भीती ? वात्सल्य, प्रेम, ममता, माया वा रीती, कां ना स्पर्शाव्या निर्मात्यांच्या चित्ती ? ’हावरट’ खाती हे ’टाळूवरचे लोणी’, जळत्या प्रेतांना वाली नसतो कोणी... ’अवधी’वर अमूल्य पडते ज्यांच्या पाणी, ’ भाबडे’ बिचारे प्रेक्षक, आया बहिणी, हे असेच कां अन्‌ किती काळ घडणारं ? ह्या नारी ऐशा अपमानित जगणारं ?, तुम्ही-आम्ही मिटूनी मने अशी बसणारं ? कोंबडे विकारी झाकलेचं राहाणार ? स्वैराचाराला या लावूया ’चाप’, ’वाहिन्या’ भले देवूद्या कितिही ’शाप’... ’आम्हास हवे ते , तसे दाखवू पाप’, या विषवल्लीचा हवा निघाया ’राप’ पण यासाठी मज पाठिंबा गरजेचा, आवाज, मूठ अन्‌ ’उद्विग्नित’ क्रोधाचा, जर असेल भरला घडा खरंचं पापांचा, माथी ’त्यांच्या’ मग मुकुट घालु काट्यांचा आठशे वाहिन्या वाहति दृश्ये,ध्वनी, सत्‌ असत्‌ विवेका भीक घालतो कुणी ? कुठली ’माय मराठी’ कुठली ’वाणी’, खेळविती ? छे छे लोळविती हे ’वाणी’ प्रतिभा-प्रतिमांची मोहक फुलपांखरें, चिमण, नि,गुंड्या, बंडू-नानू, टिपरे, आभाळमाय अन्‌ प्रपंच जैसी घरे, स्वच्छंदी वाहत होते ’तेंव्हा’ वारे छळवाद आतां, पात्रांचा, पाहाणार्‍यांचा, रक्तपात नि धुडगुस पडद्यावर गुंडांचा, भयप्रद नि अघोरी वृत्तांकित घटनांचा, सुळसुळाट अवघा अर्धावृत चाळ्यांचा आजही कधिकधि दृश्ये दिसती बरी, आनंदमयी, प्राण्यांच्या जगती वारी, वैज्ञानिक, साहित्यिक चर्चांच्या फेरी, निवडीस मात्र फिरवावि ’नजर’ चौफेरी नीर ? क्षीर ? ही निवड नसे अवघड, अप्रतिम, उच्चतम यांची अजुनी चाड, घडवा जरि केली विघ्नांनी पडझड , मनि नका बाळगू मुर्वत, भय वा भीड .... शब्दांतुन येइन नित्य तुम्हा भेटाया, तुमच्याच जाणुनी ’अव्यक्ता’ व्यक्ताया, मिळून सारे ऐकूया-बोलूया, यत्नांति उद्याची ’चित्र-वाणी’ बदलूया... ********* ६१ पडद्यामाजी काळे-गोरे । पात्रांमजी भले-बुरे । विकृत, विपरित यांचे होरे । जनसामान्या रिझविती (?) ॥ ’वृंदावनी’ एक तुळशी । निवडुंगाच्या भवती राशी । चित्रविचित्र सूडानिशी । चिरडू पाहती अविरत ॥ ऐशा एककल्ली कथा । फिरुन त्याचं, त्याचं व्यथा । वाहिन्या रोज मांडू पाहाता । कैसे संतोषावे आम्ही ? ’हं ! असो’....असा निश्वास । टाकुन होती सुजाण हताश । ’होतील कां पात्र शिक्षेस ?’ । मनांत करिती प्रतीक्षा ॥ *********** ६२ स्वैराचाराला या लावूया ’चाप’, ’वाहिन्या’ भले देवूद्या कितिही ’शाप’... ’आम्हास हवे ते , तसे दाखवू पाप’, या विषवल्लीचा हवा निघाया ’राप’ पण यासाठी मज पाठिंबा गरजेचा, आवाज, मूठ अन्‌ ’उद्विग्नित’ क्रोधाचा, जर असेल भरला घडा खरंचं पापांचा, माथी ’त्यांच्या’ मग मुकुट घालु काट्यांचा ******* ६३ अरे अभद्रा अमानुषी । कुठे फेडशील पापासी । व्यर्थ ताडूनि अंधासी । साधिलेस काय बा ? तुझा ’दृष्टीचा’ माज । ना साहेल समाज । तुझ्या निंदेची गाज । एव्हानां पसरली चहुकडे ॥ निष्ठुर कठोर जल्लाद । वर्दीमधला मदांध । निंषेधाचे पडसाद । मनी अबालवृद्धांच्या ॥ असा काय गुन्हा होता ? लाथा हाणल्या उठता बसता । सहप्रवासी एकही त्राता । ना धावला रक्षणार्थ ? ******** ६४ ’बंद’ करा बंद..!..! बंद ? कां ? तं म्हणे वाढलेत भाव मतांसाठी उगा कशास खाताय्‌ ’भाव’ जळलेल्या बसेस्‌ आणि दुकानांना कुलूप रिक्षा, खाजगी गाड्यांचं नुकसान खूप ज्याचा रोजगार ’बंद’ त्यानं जायचं कुठं ? पोटं सुटलेल्या नेत्यांचं लक्षणच खोटं ’उजेडांत’ राहाण्यासाठी यांचे लुटूपुटीचे मोर्चे ’चेहरे’ Breaking News मधे ? लगेच ’पद’ वरचे बाया-बापड्या, अबाल-वृद्धांचे कुत्रा खात नाही हाल ’पॉंच गुना मांगते हो ? यार थोडा करो खयाल... ’लठ्ठंभारतीं’ना चिंता कसली ? खाणं-’पीणं’ सगळ पक्षच बघतो मोबदल्यंत मग ’हा’, ’संप’, ’बंद’ करतो... इकडं रिक्षावाल्यांसोबत..तं तिकड मंत्र्याचा पदर आरं बाबा...तुझा ’आढावा’ घ्येत्यांत वाहिन्या ’रेग्यूलर्‌’ कुठं प्रधान मास्तर नि कुठे हे ढोंगी हिरवी मिर्ची ’पोकळ’, फोपशी’..म्हणतांत तिला भोंगी आण्णा..बाबा...जसा वारा तशी फिरवतांत पांठ समान्यांना कशी सुटावी ही अतर्क्य ’गांठ’ आता झाला ’बंद’, तर नाठाळांच्या माथी, तुकोबाचं नांव घेवून, हाना तुमी कांठी... ******* ६५ आषाढातला महाराष्ट्र... मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंग रानोमाळी ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग ओवी साधीभोळी दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’ पायी ना वहाण, डोईला शिरताण, भूक नी तहान हरपली पावलां चटके, झडांचे फटके, करितो ’तो’ नाटके वेळोवेळी भाकर घ्या हातांत, विका भांडीकुंडी, अक्षर बाराखडी लिवा, शिका ’डेबू’नं तिडिकीनं सांगीतल तुले, ऐक जरा ! ना तं माग भिका राऊळी फत्तर आहे माह्या बापा ,विठूराय शोध तुह्या मनी जनी, नामा, गोरा, नरहरी, सावता लाविती ’कर’चं सत्कारणी ॥ प्रत्येक हृदयी ठाकला, वाकला, भक्तीच्या भारानं पांडूरंग काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !! ******** ६६ देखिला ना कधी म्यां देव । परि अनुभवला भक्तिभाव । दुर्दम्य निश्चय असंभव । सहस्रावधि ललनांचा ॥ निश्चयाच्या महामेरू । सकल कुटुंबाच्या आधारू । हृदयी वत्सल शरीरी चारु । माता, भगिनी गौरी या ॥ गणेशा आधी उच्चार, गौरी । सर्वज्ञात चराचरी । नरास भारी पडते नारी । यशस्विते ! अनुभवा... ॥ ******** ६७ तुझ्या पूजनांत । आनंद सोहळा । भाव मनी भोळा । वसे सदा ॥ दहाच दीसांत । लावलासी लळा । गौरीच्या वेल्हाळा । विघ्नहरा ॥ जातांना माघारी । वळून रे पाही । भिजू पाहे बाही । आसवांनी ॥ हातावरी तुझ्या । दह्याची कवडी । देताना भाबडी । भांबावती ॥ ओसरता कल्लोळ । उरे मागे गाज । अस्तित्वाचा षड्ज । रेंगाळतो ॥ शुभसूचक उक्ती । बाहूंमधे शक्ती । हृदयांतरि भक्ती । सर्वदा दे बा ॥ ’कृतीविणा नाही । भक्तीला बा अर्थ’। शिकवण सार्थ । देई सर्वां ॥ विरह-अष्टक । स्वीकारा गणेशा । करा दशदिशा । निरामय ॥ ******** ६८ महात्मा ध्येयासक्ती दावित होती मार्ग, जरी खडतरं ’योग्या’मुखिचा शब्दच होता सकल-शिरोधार्य उडी घ्यावया क्रांतिवेदिवर, लोकशक्ती ठाकली रेट्याने सात्विक-क्रोधाच्या, ’मदांधता’ वाकली 'नेते' पुतळ्याचे पायी । ठेवोनी पुष्पचक्र । ’घोटाळ्यांचे’ दुष्टचक्र । संपेल कां ? निळ्या-लाल-पिवळ्या। रंगांचे हलाहल । सत्तेचे दलाल । त्यजतील का ? ऐसे कूट प्रष्ण । खदखदता मनांत । ’अहिंसक’ हात । राहील कां ? ****** ६९ एका हातांत खूप खाऊ, दुसर्‍या हातांत खेळणी, मगच सुरू करू आंम्ही अभ्यासाची बोलणी खेळांत आम्हाला लागूदे उद्याची चाहूल, शाळॆंत पुढे टाकू मग योग्य तेच पाऊल... अब्यास खूप केला की सगळं आपोआप मिळत, हे मात्र बरकां ! नक्कीच आम्हाला कळतं. म्हणून म्हणतो आम्हाला, दटावू नका सारखं, बालपणाच्या इंद्रधनुष्याला, करू नका पारखं... आई-बाबांची ससेहोलपट बघतोय रोज घरांत, माहीत आहे ! अशीच निघायची आहे उद्या, आमचीही ’वरात’. म्हणून म्हणतो थोडी माया मिसळा दुधावरच्या सायीत, नाईतर होतील ’यंत्र’ आमची ’हुश्शार’व्हायच्या घाईंत ******** ७० छोट्यांसाठी तीळ घेउन, साखरेंत घालून घोळायचा ’बोअर्‌’ त्यांना करायच नाही, हा दंडक पाळायचा... कंटाळ्याची चाहूल लागताच पळतील सगळे दूर, धोका मग एकच ! आकर्षक व्यसनांचा महापूर... म्हणून आपण सगळे, जबाबदारी ओळखूया,. हसण, खेळणं, बागडण यांतून ’शिकवणं’ शिकूया... जो करेल तोंड वाकडं, त्याला बोचतील काटे, हसत, खेळत शिकेल, त्याला साखरेचेच वाटे... परिसर अभ्यास, पक्षी-निरीक्षण कितीतरी विषय, रोजच्या समोरच्या आकारांत भूमितीचा आशय... म्हणून थोडी माया मिसळू दुधावरच्या सायींत, नाहीतर होतिल ’यंत्र’ ’त्यांची’ ’हुश्शार’ करायच्या घाईत..... ******** ७१ जे जे जगी या जन्मते, उमलून फुलते, बहरते कालापरत्वे शुष्क अन्‌ निष्पर्ण होवुन संपते... चुकले कुणां कां हे कधी, जरि होतसे परमावधी वय जाय पुढती हर क्षणी, ’लय’ साधतो बेसावधी, म्हणुनी कुणी कां थांबती, शिर धरुनी हाती बैसती, बेतून कार्य नि योजना, धरती असोशि नि, धावती ******** ७२ कसे तुवा बापा । सोडिले छकुल्याला । भुकेपोटी गेला । स्रोताठाई ॥ माउलीने त्यास । की रागे भरियेले ? धास्तावून भिडले । कपिलाईस ॥ भुकेजला बाळ । जरी नसे तान्हा । तरी शोधे पान्हा । वात्सल्याचा ॥ जणू देवकीनंदन । यशोदेचा कान्हा । गाउलीच्याही भाना । हरतसे ॥ गाउलीच्या डोळा । ममतेचे आंसू । माउलीसही हासूं । आवरेना ॥ ********* ७३ ’हरिणीचे पाडसं । व्याघ्रे धरियेले । मजलागी जाहले । तैसे देवा ॥’ हे चार चरण, संदर्भाधीन चित्र पाहाता.. ’गाउलीची कांस । तान्हे धरियेली । देखता दहिवरली । देवसभा ॥ लालसर ओठ । प्रपातला पान्हा । जणू शुष्क राना । हिरवा बहरं ॥ आतां मरणाला । करूनी निवृत्त । बासनी बंदिस्त । ठेवू आम्ही ॥’ *********** ७४ शब्दांची नसते मूर्ती शब्दांसी मनांत पूर्ती शब्दांच्या वर्षेनंतर शब्द रेंगाळत टपटपती शब्दांना नसते कीर्ती, शब्दां, म्हणुनच ना भीती, शब्द ओठि उमटे तेंव्हा शब्दांची कळती नाती **************** ७५ सुख द्विगुणित करिशी, खळाळत्या तानांनी रसिकांची, ’हृदया’ अमृतस्वरधारिणी दु:खावर घालिसि फुंकर मधु अल्‌वारं तापत्या झळा अडविण्या धरिसी पांखरं तुज रोज मिळो, आमुचा गे हरेक दिवस अस्तित्व ? आम्हासी, उगाच श्वास-प्रयास ! ********* ७६ माघारी पाहतां । सय दाटे कंठाशी । नवस बोले देवाशी । आजीबाई ॥ नवसा-सायासाचा, लाडा-कोडाचा, कवतिक भरल्या नजरेला जसा वंश हिरा ! अवतरण्या निश्चित । स्थान झाले वाई । झुळुझुळु कृष्णामाई । वाहे जिथे ॥ तालेवार पितामह । पंचक्रोशीत दरारा । पांचगणी, महाबळेश्वरा । आकार देई ॥ राजा सिंदखेडी । दूरदेशी बीज । विसावले पूर्वज । भुइंजग्रामी ॥ कथा हळूहळू । गुंफूनी ओवीत । प्रसंगी ओवीत । सुख, संघर्ष ॥ बैलगाड्या दारी । लागतसे रांग । पहाटेस जेंव्हा बांग । कानी पडे ॥ हेरूनी डोंगर । करून खरेदी । मोट मोठी बांधी । ओंडक्यांची ॥ संस्कार, शिक्षण । शाळेला ना भिंत । व्यवहार, गणित । रुजवले ॥ आठवणी येता । नवल आता वाटे । कैसे काटे कुटे । वारीयले ॥ वटवृक्षाचा पसारा । फांद्या आणि पारंब्यां । धाव घेती लोंब्या । भूईकडे ॥ मातीमाय भूई । लोंब्यांचा आधार । मूळापाशी पार । नेई त्यांना ॥ तैसेच कांहीसे । वंशामध्ये होई । आज्यापाशी जाई । नातवंड ॥ धनाच्या जोडीला । नसे जर बुद्धी । दुर्दशेचा ’कैदी’ । स्वाभावीक ॥ ********* ७७ काळजांत फुटतं, कंठात दाटतं, दहिवर साठतं, पापणी आड बेभान सुटतं, गगनाला भिडतं, जाऊन ठाकतं, मन गाण्यापल्याड... शब्द-स्वर-भावा पलीकडे, तुमच्या आमच्या कथा-व्यथा आभावानच त्यांचा ठाव घेतांत, कांही ’आवाज’ गातागाता... ******** ७८ रांगोळीचे रंग, रोषणाईचे अंग नक्षीमधल्या रेषा, देखाव्याची भाषा प्रकाश-झोतांचे विभ्रम, पणत्यांची चमचम हसणारे चेहेरे आणि उजेडाची दारे उजेडाची दारे... ********** ७९ माझ्या राजस बाळा... कल्याणार्थ, बाळा आहे संस्कार-दायिनी मी पांखर धरण्या तुजवर सदैव सौदामिनी मी... नंदलाल माझा तू, अवखळ अविट तुझे रूपं दही, दूध, लोण्याची तव वदनावरी छाप हरखते हरक्षणी, सांगु कशी, भारावुन मी... इवल्याश्या मुठींत तू मन माझे कां धरिशी ? हसुनी-रुसुनि क्षणोक्षणी इंद्रधनू उधळिशी किलबिल पडता कानी, हुरहुरते अंतरि मी आभाळिचा चांदवा, दिला तुला ऐन्यांत धावत अडखळले पडले, तुझ्यासाठि खेळांत माय-लेक अद्वैतच, कालातित आजन्मी... शिवरायाचे प्रधान अष्ट, दिशा अवधानी भारतभू पराक्रमी तेजोभास्कर जननी शूरांच्या कथा नित्य ऐकवीन तुजला मी... विसरु नको मातृभक्ति, गुरू-शिष्य परंपरा फलाहुनी कर्म श्रेष्ठ, हाचि मंत्र धरी खरा सत्य हेच गीतेच्या दडले अंतर्यामी... पावन माती अपुली, संत-श्रेठ ठाइठाइ कुणी गाती ओवि, भजन, कुणि देवा अंगाई वसा असा हृदयि ठेव कणव, करुणागामी आजीच्या मजुषेत कथा विविधरंगी या ये कुशींत ! आपण त्या ऐकूया, सांगूया गोळी देईन गोड बहुगुणि अन्‌ स्वर्णमर्मि उपनिषिदे, वेद, शास्त्र विश्वकीर्त मानांकित परदेशी जरि वसला, विसरु नका चाल-रीत शिकवा मज संगतिने संगणकही शिकेन मी माय-मराठी वाघिण, हे बाळा नित्य जाण बुद्धीला शक्तीला कवण म्हणे कमी कोण ? वारण्या तनास सिद्ध नेहमीच मातृभूमि ********** ८० ’दुसरीही बाजू’ आम्हि काय कुणाचे खातो रे । तो धनी आम्हाला देतो रे ॥ रंगला डाव पत्त्यांचा । ग्राहक जरि उभे बिचारे ॥ हा सुयोग्य जागी पडदा । ना दिसतो, कळतो त्यांना ॥ यत्किंचित संशय, शंका । ना भिडे भाबड्या मना ॥ समजतील ’अ’दृश्यांत । मी संगणकावर व्यस्त ॥ परि सदैव गुरफटलेली । निज सुखांसनि मी ’मस्त’ ॥ आम्हि ’निवडक’ नेहमी असतो । बेपर्वा, अन्‌ माजोरे ॥ जरि आम्हा कारणे होती । ’बदनाम’ इतरपरि सारे ॥ ********** ८१ पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन प्रसंगी भेदुन प्रवाहा, पैलतीरा भिडेन पाऊस सुखवी प्रेमीकांना , म्हणति ऐसे जरि जन ... लेउनी मग विरहसयि नक्राश्रु ढाळे तन-मन मांडतो जरि प्रपंचाचा डाव मोहाच्या क्षणी मोडुपाहे कधि कणा मग झुंजतां रात्रंदिनी संकटांना घेउनी पाठीवरी मी धावतो पापण्या ओलावल्या तरि हसूं ओठी धारितो अंदाज नाही पलिकडे मज, काय वाढुन ठेविले भाळरेखा रेखितांना निर्मिकाने योजिले अडथळ्यांच्या अभावी पण काय जगण्याची मजा ? निष्क्रीय, आळशि लोळणे ही धनिकपुत्रांची ’सजा’ रोजचीही जरि व्यथा, तरि वृथा कां आक्रोश मग ? वाट आपुली शोधतांना धडपडे सारे जग धडपडे सारे जग... ********* ८२ ’पोटासाठी काहीही’ पोटासाठी काहीही, ना मागे हटणार तसुभरही तळहाताला येत्यांत फोड, सगळी भुकेसाठी तडजोड मालक ’ते’ पन अस्तुरि मी, अन्‌ तान्ह्याची बी मी आई दोघांनाबी हुर्द दिलय, जीवापाड प्रेम केलय मनगटि माझ्या वज्रचुडा, डोइवर पदराचा पहारा खडा पिंजर रेखुन भाळावर, गाडी आणणार रुळावर कैकयि जगतेय युगायुगांत, समानतेची गीतं गात ******* ८३ कलालानं ’एकच प्याल्यांत’ दूध जरी वतल पियक्कडाला प्याल्यावर नशा झाली वाटल ********** ८४ ’तेजोगर्भा...’ फालतूचे विचार टाळा, ठेवा मोकळ मन चांगलच ऐका, बघा, बोला, सजग ठेवा तन मोकळी फुफुसं, प्राणवायू, आरोग्या हितकारी अखेरीस Winner ठरतो, खरा निसर्गोपचारी दिनक्रमाची सुरुवात जर अशी पंचकर्मांकित सुदृढतेच अन्‌ शरीराची सहज जडेल प्रीत शिस्तीला नाही पर्याय, वाटचाली साठी उद्याच्या राष्ट्राला तुमची गरज मोठी... ********** ८५ जाळा पोळा हाल करा तरि तेजोगर्भा आम्ही साम दाम दंड भेदुनी यश नेवू निजधामी पराक्रमाला आम्हा मोकळे गगन, हीच मर्यादा जन्मजात कौशल्यें वुहरू अणु-रेणूंतुन सुद्धा कुणी म्हणति जरि ’मुलगि झालि हो ! कां जगवावी हिला ?’ जळमट झटका, आणि विचारा ’जन्म तुला कुणि दिला ? आईच्या पोटांतच आम्ही बाळे सर्व समान ’बाळ’ असे ’मुलगी’, तर हाती गुणरत्नांची खाण रक्त सारखे सर्वांचे ? आणि श्रमाचा घाम ? बल, बुद्धी लावून ’पणा’, राहू शिखरावर ठाम पटविण्यास कां वेळ आम्हावर यावी ? हे दुर्दैव,, युगांयुगांतुन गाजवूनही गगनभेदि कर्तृत्व.. ********* ८६ मेरू पर्वत मुंगीनं गिळला, डोइवर चढली दोन-चाकी सागर सारा आटून गेला, घामांतच राहिलं मीठ ’बाकी’, उचलायाच होवी ही ’नखरेल नार’, जरि खायला कहार अन्‌ भुईला भार फुटक्या नांवेतलं पाणी उपशित, पार कराया होवी ना ओढाळ धार ? दुनियेला आनंद कदाचित, ’गिनीज्‌’मध्ये एक आणखी भर गोरगरिबाला काय हो त्याचं ? एका दिसाची सुटली भाकर ’चवल्या पायजेत ? तर कर बाबा ह्ये !’ म्हने मालक रामप्रहराले, ओझं जिण्याचं वागवित चालणं, किती दीस आमच्या नशिबाले ? तक्रार करणार कुणा कडे ? सरकारास्नि कुठला येळ सारे नेते येतिल लोळत, ’तेंव्हा’ मतांशि घालाया मेळ कुणाला पडलिये चिंता आमची ? हर आमआदमी भई है व्यस्त, पेट्यांच्या, खोक्यांच्या चळती मोजत, दादा भाई सदा नशेंत मस्त ********* ८७ नका करू बंदबिंद आम्ही जगायचं कसं ? हातावरच्या पोटाल समजावावं कसं ? नका करू बंदबिंद कशी कमवायची रोटी ? तेल, मीठ कसं न्यायच कच्याबच्यांसाठी ? नका करू बंदबिंद, आम्हा ’बारा’ची भ्रान्त रक्ताचा घाम जरी, वृत्ती क्लान्त क्लान्त करू नका बंदबिंद, झालीत मढी आमची आधीच परवड आणि कुरतड चुकवीत मेलोय जगलेपणी कधीच ! मेलोय जगलेपणी कधीच ! ********** ८८ त्यांना या कष्टकरी जिवाचं हे उत्तर तर नसेल ? ’तुम्ही कोण ?’ म्हणून काय पुसता, नाही आम्ही कोणिही पोटासाठि अतर्क्य कर्म असले ’हट्‌ के’ करू कांहिही ’तुम्ही कोण ?’ म्हणून नजरा वळवू नका वाकड्या ’आम्हा’विण नेहमीच ठरतिल तुमच्या, धनराशी तोकड्या ’तुम्ही कोण ?’ म्हणोनि करु नका हर घडी ’बेदखल’ तुम्हा अमृत देवुनी पचवितो आम्हीच हो हलाहल ******** ८९ निसर्गे नटली भूमी । नगाधि, पुळणीचा जलधी स्वामी । स्पष्ट, परखड बेलगामी । बोल जरि, ’हेला’वतो ॥ राष्ट्रप्रेमी मायंदळ । तरिहि उगवती फितुर पिसांळ । आश्वासक मेघांपोटी विध्वंसक विजेचे लोळ । निर्मिकाची करणी ॥ ऐशा अवनीवरी बेतले । विविधपरिच्या ’शाब्दिकां’चे मेळे । आनंदविभोर होवुनि कल्लोळे । कोकणवासी नाचले ॥ साहित्यिकांची मांदियाळी । हौशे- गौशे, जळी-स्थळी । जणू डुंबण्या कुंभमेळी । जमती तपांति ’संधि’साधू ॥ कुणी साहित्यिक मग संतापे । विखार भरले टीकास्त्र फेके । ’मानसन्माना’ सोकावले बोके । वस्त्रे फेडिती ’हीन’पणे ॥ कुणी म्हणे ’बोली’ बोला । ग्रंथभाषा चुलींत घाला । जिव्हेपासुन त्या ’हलाहला’ । दूर ठेवणे हितकारी ॥ सांगातांना विसरती ’बोली’ । कारण मनांत संशयांची ’जाळी’ । मम अभ्यासाची ’खोली’ । श्रोत्यां हृदयी ठसेल कां ? ’त्याने’ ’तीस’ मारिले । काय सांगा बरें केले ? । नरास अशा गौरविले’ । पुसती ’पत्रिकेवरी कशास ? ’ ’अ(?)धर्माची पेरिली बीजे । त्याच्या नांवे गाजे-वाजे । ग्रंथदिंडी कोणत्या काजे । सांगा बरें कांढिता ? घालण्या ऐशा अनेक वादा । सरसाविती आपापल्या गदा । अनुदान-मधुकरीसाठी सदा । झोळी मात्र फैलाविती ॥ ’औंदा’ मात्र कहर झाला । काय म्हणावे ’मूर्खपणाला’ ? । डोळसांसाठी ’ब्रेले’ला । म्हणती धरू वेठीस ॥ ’इंद्रियां’ची कार्ये विशिष्ट आहेत । बहुधा यांना नसावी माहित । कवणासंगे कवण ’जात’ । ’ज्ञाना’ पासुन शिका जरा ॥ भाषा मुद्रा-विभ्रमाची । दृष्टिहीनांस काय कामाची । परंतु ’यांच्या’ मूढमतिची । ’जाण’च कि हो ’अजाण’ ॥ *********** ९० ’माझा’नं पकडली ’नसं’। हवे तें देऊन प्रेक्षकांस । बघति बसुनी गंमत खास । T आर P वाढविती ॥ कडब्यावर वोतून तेल । पेटविती ’वादांचे मोहोळ । ओकावया लाविती गरळ । परस्परांवरी सदा ॥ अभिनेते समर्थ, आवाजी । पदार्पणी मारती बाजी । मंचावरी वा वादामाजी । तुल्यबळ कि हो हे साचे ॥ भूमिका उत्तमोत्तम अनंत । काहून राहिला बेटेहो भांडत ? ही कोठली अतर्क्य रीत ? पडद्या मागची ॥ एक वगळता बाकी तीघे । लोकप्रिय विविध प्रयोगे । मतभेदांचे गलिच्छ झगे । कां टांगिति लक्तरे वेशीवरी ॥ आजकाल पडलिये प्रथा । कलाकंडु शमनार्था । परदेशि कमावल्या घेउन ’अर्था’ । ऐरेगैरे अवतरती ॥ कुठे चर्चा, कुठे मोर्चा । बुजवीत कुठे आर्थिक खाचा । कवळाया रंगमंचा । क्लृप्त्या शोधिति परोपरी ॥ इथे सोकावले घारे भुरे । हेरण्या ऐसे ’श्रीमंत’ बकरे । ’नंबर मेरा लगेगा कब रे ?’ । चिंता डावलल्या मुद्रेवरी ॥ वलयांत मग प्रवेशू पाहती । कलागुणांची असतेच भ्रांती । ऐशा नर-नारींप्रति । का असावी अनुकंपा ? ॥ बोजड शब्दांची पखरण । नाट्यसंबंधी ’शून्य’ जाण । ऐसे कृष्णविवरी ’दीप’ कण । पाडतील कसा ’उज्जेड’॥ सविनय नियम भंग । मित्रा, केलास का ? खरेच सांग । स्पष्टिकरण सांगोपांग । अपेक्षिती विरोधक ॥ भावमुद्रा ऊर्मट । अंतरि परि स्पष्ट, सरळसोट । शशहृदयीचा भाव-भीत । वसे याच्या ठाई ॥ भाव फसवा, साधा भोळा । अंतरि परि नाना कळा । कोण गोरा कोण काळा । तुला कां मग नुमगावे ? बहुत झाले हातवारे । रात्र वैर्‍याची.. जाग रे ! कोण कैसे फिरविल वारे । जाण !..सावध रहा सदैव ॥ मोहन ? तापले तूप । करंजी करते सुरंगी-सुरुप । अतिसेवने पण जठरासि ताप । रसने घाला लगाम ॥ करंजिमधले सारण । परदेशि ’मुद्रां’चे कुरण । स्वाभाविक मोहास कारण । स्वकीयांसी ॥ मोहन खुसखुशी वाढविते । ’जास्त’ होता विरघळविते । पशंसा-स्तुति-कीर्तिते । रसिकां मनी निमिषार्धी ॥ एकदा कां गेली पतं । नाही परतुन अशी येतं । ह्याला धर, त्याला आपटं । उपाय ठरे फोलची ॥ कितिही आणा हेमंत-वसंत । केवळ भगव्याने न ठरे संत । असंगाशि संगत । भारीच पडे सहसा ॥ ऐसे गणंग केले गोळा । म्हणति आमुची बेरीज सोळा । मुद्रेवरि जरि भाव भोळा । आगळा परि अंतरंग ॥ कसली कुणास ठावे ’सीडी’ । अहवाल गुप्त साप-शिडी । बुडत्यास आधाराची काडी । असेल कां हो त्यांत ? चवथा अंक जरूर रंगवा । प्रत्येकासच हवा विसावा । मतभेदांचा हुताशनि पेटवा । गर्जा, ’वयं पंचाधिकम्‌ शतम्‌’ ॥ विफळ ऐशी अपूर्ण कथा । दोषारोप एकमेकांच्या माथा । न जाणति नाट्यरसिकांच्या व्यथा । मश्गुल आत्मकेंद्रित हे ॥ काय संमेलने परिषदा । अनुदाने लाटण्या-लुटण्याचा धंदा ? स’मस्ता’स धोबिपछाडा । घालुनि ’धुळवा’ रसिकहो ॥ ****** ९१ जैसी कोवळी कमल-पराग दळे । भ्रमर स्वच्छंदता अलवार कुचंबळे । केसर माखल्या पर्यावरण । गंगनि उधळे इंद्रधनू ।। दृष्टान्त रूपकादि अलंकार लेणी । मोकळून अर्थाचिया खाणी । उलगडती ज्ञानियाची वाणी । रसास्वादे ।। अनुभवामृताची ही गाथा । सकळ जनां लाभों सर्वथा । देहुडाचरणि टेकोनि माथा । श्रवण कारणे एकवटू ।। ******** ९२ आजचे जगणं जगून घे, उद्या दिसणार नाही कदाचित एक मात्र समजून घे, लगाव राहिलं नेहमीच, निश्चित जुळवीत रेशमी धागे बघ काळ धावता माग आतुरल्या दोन जिवांना, स्वप्नांतुन करतों जागे तुझ्या जगांततल्या रेशिमगांठी नक्त मला कधीही तुझ्या संगठित वाट सरांनी सरळ सोपि अन् साधी तुझ्या जगांतिल नको मला सखि श्रीमती अन् थाट स्नात बटांची ओली महिरप नक्षिल दिसु दे पाठ You are so soft tender moist and beautiful How can I keep away from this heavenly cool हे असे दुहराने क्षणभंगुर असतातं आपल्याचसाठि ते हास्यास्पद ठरतांत मम अधिक-या सहवासाचा तुजविण काय असे आनंद तव झळाळत्या अस्मानी मी अमावसेचा चाँद मी येइन कां कधितरी, तेजाच्या अवतीभवती अन् होइन कोण्या दिवशी तव प्रीतीचा सांगाती तुझ्या सहवासांत प्रत्येक क्षण नवा होतो म्हणूनच मला तो पुन्हापुन्हा हवा असतो भेटणे आपुले किती दिसांनी झाले व्याकूळ जीव जणु तृषार्त प्रीती प्याले आनंद वदनि मग रोम रोम उजळला रुसवा फुगवा बघ क्षणांत गे मावळला या सांजेच्या आठवणी अन् तुझीच फक्त उणीव नकोस दवडू वेळ साजणी वाढत जाइल हीव ए हट्टी तुज कशी सखे समजाऊ ना रात्रंदिवस तू अशी अनावर होऊ गेल्यावर मी मग हट्ट कुठे करशील ? पांपणिचा दहिवर कुठली बाहि टिपेल ? हे असेच कुठवर वहावयाचे राणी सप्तकांत कुठल्या आणि गायची गाणी स्वर विरले तरिही रेंगाळतील श्रुती आणि लाटांवरती आरुढ होतिल स्मृती जाउबाई जाउबाई किती मी नटू ? बघत्यांत माज्याकड ! त्यांना काय कुटू ? जाउबाई जाउबाई काल टाकली यांनी कात ! काय वाढू ? जिलबी, पुरणपोळी, भजी-भात ? जाउबाई जाउबाई धरा आता झाल ! उधळल्या घोड्याला ठोकायचाय नाल ! कानाखाली एक, ठेउन दिली काल, तरी मेला दुसरा पुढं करतुया गाल न्हातांना केसांना रिठ्ठा लाव, सुगंध बरोब्बर साधिल डाव ओल्या बटांतून निथळूदे पाणी पाठीवर चंद्रकोरींत मग हि-यांच्या खाणी केसांतून धूप आरपार जाईल उसवला जीव वरखाली होईल तुझ्या आवडी नीवडीचा मला त्रास होतो हवं तर मी दूर निघून जातो जुळणारा दुसरा कुणी मिळून जाइल तुला म्हणशील, 'आयतीच टळली बला !' रस्ता कांटेरी अन् झळांचा भरवसा प्रतीक्षा मेघांची नि कोरडा उसासा संथ निळे जळ स्वप्नी साकळते जागेपणी खारे खरे ओघळते चल विश्वास असला तर, चल वाट दिसली तर चल डोळे घट्ट मिटून, चल ओठांत हट्ट शिवून पटलं तर सूत, सुटलं तर भूत ******** ९२ स्वप्नांत दिसेल तुला राणीचा बाग तिथं मग भेटले एक म्हातारा वाघ घोर संकट ज़री त्याचं नांव, दांत आणि नखांचा पूर्ण अभाव अजून वेळ गेली नाही, अजून छान दिसतेय कुणाकुणाकडे बघून खोटं खोटं हसतेस भय कसलं तुला ? मी नाही तर दुसरा नकोसलेल्या हवं तेंव्हा विसरा ! खाजवून खरूज काढायची तुझी जुनी सवय आयुष्यांत तुला तरी दुसरं काय हवय ? हे नव वर्षांचे माझे सुरेल गाणे लावून जीव करु नको व्यर्थ बहाणे शब्दांनि करूया परस्परांवर वार स्नेहाचा असतो हाच काळ बेजार किस बाइ कीस, गाजर कीस होउदेत पोरं तुला पंचवीस तीस हसण्याचे केले साहस तू ग जेंव्हा होतूचा शेवट तसाच गोड रहावा माझे नि तुझे हा फरकच आंता नाही हाक ऐकता होइन हजर कधीही दु:ख येतांत आपोआप, सुखाची बंद दारावरच थाप याला टाळू कि त्याला पाळू करता करता लागते धाप कधी खंतावत तर कधी हसत हसत काढत बसायचे सरल्या क्षणांचे काप कधी ऊन कधी पाऊस, श्रावणांत अशी हरखून नको जाऊस उबदार उन्हाळा, मेघांची झाकोळी मनाच्या वळचणीला आशेची पाकोळी म्हणून म्हणतो असा धीर सोडू सूर्याला आपण ओढून वर काढ़ू तुझं प्रेम ऊर्दूवर, तुला मराठी कसं भावणार ? तापल्या दगड, काट्यांचा सुगंध दुरून कसा गावणार ? भावनेला नसते भाषा, ती शब्दांच्या पलीकडली ओळखली नाहीस ? हं ! सगळ्याची माती झाली तिकडं चांदणं शीतल, इकडं उन्हाच्या झळा इकडं विरहाचा दाह, तिकडं प्रीतीचा मळा तिकडं सकाळचं ऊन उबदार, रातीला इकडं अंधार फळा सोनेरी दुनियेच्या वाटेवर, विसरलीस उरांतल्या कळा सांग कां आवळलास हलाल करत माझा गळा ? दोन जीव प्रेमाची चाखत होते गोडी दारावर पडली थाप दुभंगली भुई थोडी माझ्यासाठी जिवाची ना केलीस तू पर्वा आठवत़य ! घडलय जसं कांही अगदी परवा परवा शब्द नाही फुटत, दाटलाय गळा पांपणी कांठावर थेंबांच्या माळा 'भेट तर दूरच, दोन शब्द बोल तरी' 'नाही नाही माझी तब्बेत नाही बरी' 'तुझ्या शिवाय माझा, वेळ कसा जाणार' 'पाहुणे आहेत घरी ! त्याना कोण वाढणार ?' 'ए प्लीज्, मेसेज पाठवणार ?' 'एकदा पाठवला नं ? रोज नाई जमणार !' तुला प्रेम ऊर्दूचं, मराठी कसं भावणार तापल्या दगड-काट्यांचा दर्प तुला असा दुरून कसा गावणार ? भावनेला नसते भाषा, ती शब्दांच्या पलीकडली ओळखली नाहीस ? हं ! सगळ्याची माती झाली तिकडं चांदणं शीतल, इकडं उन्हाच्या झळा इकडं विरहाचा दाह, तिकडं प्रीतीचा मळा तिकडं सकाळचं ऊन उबदार, रातीला इकडं अंधार फळा सोनेरी दुनियेच्या वाटेवर, विसरलीस उरांतल्या कळा सांग कां आवळलास हलाल करत माझा गळा ? रेशिमगांठी जपण्यासाठी, किती गोड़ हा हट्ट तुझा अशाच वेळी ओळी लिहिण्या, खरेच येतो मला मझा शब्दांच्या धारेचा एवढा होतो त्रास शब्दाच्याच शस्त्रानं तोडुन टाक पाश शब्दांच्या सुरेंत वाहून जाइल प्रीत शब्दांच्या सुरांत हरवून जाइल मीत तेजोनिधी भास्कर, गगनराज निरंतर ऊर्जा-स्रोताच् घर, जीवांसाठी... काळी आई साद देई, जननी तुडवोनि घेई खंत परि कधी नाही, वत्सलेसी.... वारा चहूकडे आसमंती, सुखद शीतल सांगाती श्वासोछ्वासाची गती, संयत करण्या... अवकाशस्थित अवघी विश्वे, बिंब-प्रतिबिंब सारे फसवे, आदी-अंत नाही ठावे, प्रगत मानवा.. जलस्पर्शाचा अवसर, अबालवृध्द आनंद विभोर, रानी मनी नाचति मोर, पिसारा फुलवुन..... ********* ९३ काँटोंसे ख़ून निकलता है फूलोंसेभी हम अब डरते है तुमने किया मायूस तब से ना ज़िक्र प्यार का करते है.... तुम्हें याद है किनारे पानीके हम बैठे लहर टहलते थे काग़ज़की कश्ती पानीमे हम छोड़के दोनों हँसते थे झोंकेंसे हवाके, दूर तलक जब कश्ती बिखरी जाती थी आँखोमे तुम्हारी डरावनी इक लहरसी दौड़ी आती थी हरदम हसती नजरोंमे तुम्हारी, जब दर्द का साया पाता था इक बूँद को लेके उँगलीपर होठोंपे प्यारसे रखता था... वो कहाँ गए ए दिन सजनी अजब किस्मका खेल है ये कश्मकश जिसकी पूँछें कैसा अधुरा मेल है ये... जब बादल ख़ूब बरसते थे, और भीगा मैं घर आता था हालात देखकर आँचल तुम्हारा मेरे सरपर गिरता था बाहोंमे सिमटकर दोनोंकी तब बातें ऐसी होती थी होठोंसे कुछभी कहें बिना, नज़रें सब समझा पाती थी उन बीते कलकी यांदोंसे दिल उलझा उलझा रहता है ये जिस फूल से हम डरते थे, मुरझा मुरझा लगता है ये... हमने भी सुनी है कहांनिया बिछड़े साथी भी मिलते है काँटोंसे सहारे फूल कईं दुनियामे अभीभी खिलतें है ******** ९४ हमने कईं ऐसे तूफ़ान सीनेपे हमारे झेलें है दरियाँकि उछलती लेहेरोंसे, हरदम हम भी खेलें है दुनिया चाहे मना करें, फिरभी तुम्हें आना होगा दीवार कड़ी होती है प्यारकि साथमे हमें अजमाना होगा ********* उनके आनेसे पेहेलेही, सजनी तुम्हें जाना होगा नफ़रत होती है ज़हरीली, ये भी तुमने जाना होगा... हल्कासा हवाका झोंका, ख़ुशियाँ साथ में लाता सही तूफ़ानके आनेसे पेहेले, होती कोई आहट नहीं आसान नहीं दीवार होना, गुलिस्ताँ सभी वीरान होगा... कँवल को छूनेसे पेहेले, भँवर को पूछाथा तुमने ? उस छलिये का प्यार तरीक़ा, देखा, जाना है हमने ! रखना प्यार छुपाकर कहीं, यही सबसे सुहाना होगा... ******* धूपमे हमराही मेरे, क़दम लड़खड़ाएँगे राहोमे हमदम मेरे, साया मेरा पाओगी नहाने बाद बहाने किसी, बैठोगी सरे-आइना गेसुंओसे तब मेहेक उठा, साया मेरा पाओगी मेहेंदी रचाके जब, बाँधोगी पैरोंमे पायल रुमझुम हल्की सी उनमें, साया मेरा पाओगी गजब कभी जाओगी गुलिस्ताँ, टेहेलने ख़ुशियाँ भरके खिलते-हसतें उन फूलों में, साया मेरा पाओगी सावन के महिने में, जब उमड़ घुमड छाएँगी घटा दिलमे हिलती कश्मकश मे साया मेरा पाओगी ****** मना कैसे करूं तुम्हे, गाती हूँ गीत रे होले होले आहिस्ता, कंहि खुल न जाए प्रीत रे मना कैसे करूं तुम्हे, दौडी चलीं आउं रे बाहोंमे पिघली पिघली, पागल हो जांउ रे ****** ९६ ज्यांच्या आयुष्यांत कांहीच घडत नाही त्यांना सगळच अवघड वाटतं अशांच्याच डेस्क्यां कांटेरी रोपटी लावायचं घाटतं गवसणी एकदा गवसण्याला म्हणाली 'दादा, माझा सूर हरवला़य !' गवसणे म्हणाले, 'ताई, तुझं अंतरंग छेड ! आपोआप परतून येईल तो !' ******** ९६ रंगांचा जयजयकार करा रंगांचा जयजयकार सूर्य, चंद्र, नदि, डोंगर, खोरे निसर्गपाठांतील अक्षरें सिंहगर्जना वा मधुकूजन घडवा साक्षात्कार आई बाबा ताई भाऊ ढवळ्या पवळ्या अन् मनिमाऊ कौशल्याने चितारण्याला व्हा आतां तैयार पारितोषिकासाठि बापुडे लढोंत; तुम्ही त्याहि पलिकडे रंगतरंगांचे शिडका मग चित्रांमधे तुषार रंगांचा जयजयकार करा रंगांचा जयजयकार ******* ९७ चांदण्यांचा चंदेरी भरतो मेळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा डोंरांच्या भिंतीमधे अन् झाडांचे खांब,ढगांचा फळा असतो केवढा मोठा, लांब छपराचा रंग कसा छानछान निळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा चांदोबा सांगतो सशाची गोष्ट, गोरा गोरा रंग अन् अंग धष्टपुष्ट गुंजांच्या डोळ्यांचा कापसाचा गोळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा खेळाच्या तासाला चांदण्या हसतांत, ढगांच्या मागे लपंडाव खेळतांत करतांत लुकलुक खट्याळ चाळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा ******** ९८ असा जीव मेटाकुटी, चिंता उरांत दाटते, लेकं न्हाणूली धाकटी डांव पोरांत मांडते असा जीव वाघावाणी आता म्हणे कुणा खाऊं, दाणा भरे कणसांत, हात नका त्याला लाऊ असा जीव कसनुसा वर रिकामे आभाळ, कोंभ अंकूरला, पाणी कसे देऊ मायंदळ असा जीव थोडाथोडा जात्यामधे भरडतो, दूर धाकला लाडाचा, वाटा शिवारी मागतो असा जीव येड्यावानी दीसरात तगमगे, धनी गेले दूरदेशी, सय फिरे आगेमागे असा जीव कासावीस, जशी ढळे तीन्हीसांज, धूळवाट पुढे, रामनामाचीच झांज असा जीव चट्टामट्टा काळ मांजरं करील, नको मना आढी धरू, काय बांधून नोशील ******** ९९ शब्दांच्या रेघांमध्ये, शब्दांचे विलग प्रवाह, शब्दांशी जवळीक साधुन, शब्दांचे प्रेमविवाह शब्दांचे बंधन सुटले, शब्दांचे बांधहि फुटले, शब्दांचे घरटे तुटले, शब्द आंत घुसमटलेले शब्दांच्या भिंतीआड, शब्दांचे अड़ती श्वास, शब्दांच्या संहाराचे, शब्दांना होती भास शब्दांच्या व्याकुळ वेळी, शब्दांना फूटते पान्हा, शब्दांना पाखर धरली, तरिहि शब्द पड़तों तान्हा शब्दांचे भरती मेळे, शब्दांना येती वेणा, शब्दांच्या सौंदर्याला, शब्दांचा डोळस काणा शब्दांची जहरी जाती, शब्दांच्या पिसती जाती, शब्दांना पिसता जाती, शब्दांची भिडती पाती शब्दांच्या कोशामध्ये, शब्दांना होती बाळे, शब्दांच्या गोषामध्ये, शब्दांची उठती मोहोळे ******** १०० नि:शब्द स्वराकाराचे कधी होते मधुरा गीत नि:शब्द स्वाहाकाराने कधि मुकतो जिवलग मीत नि:शब्द पोकळीमध्ये कधि वारा जहरी भरतों नि:शब्द मध्यरात्रीत कधि तारा निखळुन पडतो नि:शब्द अंतरंगांत कधि शब्दच उठवि तरंग नि:शब्द तपोभंगास कधि पेरती शब्द सुरुंग नि:शब्द चि-यांच्या गानी कधि व्याकुळ होते तान नि:शब्द तीर मारून वैराचे ढळते वसन ******* १०१ सुरांच्या नदीकांठी गाण्यांची गांव रे ग म प ध नि सारी मुलांची नांवं सात अधिक सात इथं बेरीज होते बारा कारण साधं, सा प चा एकच चेह्ेरा आमराईंत कोकिळाचा बारामाही कुहू वेळूवनी शीळ कोण घालत़य पाहू ढगांचा मृदंग वीज तानबाज दूरवरून ऐकू येते लाटांची गाज ॐकाराच्या कोंभाला नादाची पाती गाण्याच्या गांवांत जाउन करु गुंग मती सुरांच्या लाटांवर लयदार होड्या ग न प ध नी सा रे मारतांत उड्या ******* जोगिया आणि भैरवीमधला कुहूकार चढत्या सप्तकांत तांबड फुटायच्याव्ळचा पवित्र घंटानाद गोपुर अस्फुट... स्पष्टवत जाणारी, मंत्रघोष।।। कपबशांची किणकिण... आताशवाणी पाचकपात्राची शिट्टी, रडणी, ओरडणी, धुणी... जनरंजनी... उंच टाचा... टक् टक् टक्... जिन्यावर.. विरत जाणा-या... शांत शांत... दुरून एखादी, 'बाssssटली बाॅ़य', 'कांssssदे बटाट्टीsssय' अधीर वाहनांचा चित्कार... उनउनित दुपार... ं ं ं दमला भागला निश्वास, परतलेला सुखरूप... शुभंकर देवाला निरांजन, धूप... आणि हो... 'बुनियाद' अटळ 'सुख'णा-या दु:खाची कळ अंथरुणावर आडव, दिवसभराचं चंद्रबळे हे सारं नैमित्तिक, चक्रांकित, अळवावरच्या पाण्यासारखं सर्वभारल्या, लताच्या गाण्यासारखं... तुझी आठवण अव्याहत, अखंड उरांतल्या घडाळ्यासारखी... धिक अधिक धिक अधिक धिक अधिक ******** १०३ दिशादिशांना जळतो वन्ही, मायेचा गारवा अडे आधाराची धार बरसता, लख्ख श्रावणी ऊन पडे विषवल्लीचे फूल उमलते रंगछटांनी नटलेले कुबिजाच्या कुब्जेपोटी जणु रूप तान्हुले अवतरले उरी जागवा माया, चढवा बाळमुठीवर सोनकडे सह्यकड्याच्या मिठींत मोडे निंदेची द:सह्य कडा नजरेचा कटु विखार फोडे अभिमानाची नागफडा विकृतिच्या स्वप्नांना चारू संस्कारांचे आज खडे मुक्तीचा पूर्वांचल उजळे अंधाराची तिरिप डळे साकळलेली जळे बरसती हंसांना स्वच्छंद तळे भाग्योदयि सहभाग भाग द्या, सदयकरांना करा पुढे ******** १०४ चांदणी बोलली किणकिणल्या मधुघंटा चांदणी चालली शुभ्र खगांच्या लाटा चांदणी नाचली लक्ष मोर पर्जन्यी चांदणी क्रोधली भक्ष शोधतो अग्नी चांदणी उगली कांचनसंध्या क्लान्त चांदणी बिंबली जळांत प्रतिबींबांत चांदणी थबकली निमिषे झाली युगे चांदणी निमाली नजरे पुढती धुके चांदणी भेटली श्वासा उसंत नाही चादणी पेटली सर्वांगाची लाही चांदणी पाहते डसले अनंत नाग चांदणी व्यापते हृदयी सहस्र भाग चांदणी ओढते सजल घनांचा पदर चांदणी चुंबिते सलज्ज अधिरा अधर चांदणी बिलगली पिसे जडावी तशी चांदणी झोंबली पिसे जडावे तशी ******* १०५ वा-याच्या डोक्यांत हवा गेली तळ्यांतल्या बिंबानं ईर्ष्ा ल्याली ढवळलं पाणी हलली डोंगर रानं थरारली भेदरली पिंपळाचीही पानं झाकोळीला सापडला सूर कोंदला वारा तळ्यात बिंबाला काळोखाचा थारा सांडल्या मुसळधारा सप्तरंगी वाजलं सूप पुलाखालून दरम्यान वाह्यलं खूप खुदकले डोंगर रानातल्या रानांत वारा पारा पारा हरपल्या भानांत ******** १०६ ओठांच्या कमानीत मानी शब्दांचे बाण प्रेमाच्या लवलेशाचीही असते इथं वाण स्पर्षाच्या अंधुक धगींन उसने अवसान विरघळतं चेहे-याचं लटकं रूप कापरागत भरारतं आढेवेढे 'नाहीं' 'नको' क्वचित कधी फणकारा संपलं सारं ! वाटाय् लागत 'नव्हतीस तेंव्हाच होतो बरा' 'बराय! मग निघू?' म्हणतांच पांपणीकाठी तरारतो दहिवर अस्फुट, लाजरीच्या रोपांगत, ' नको ! मला सावर !' नजरभेट चुकवून, फसवून तीच परत टाळाटाळ उरांत उठणा-या लाटांची कां उगा आबाळ नजरभेट चुकली, फसलीस जीव थोडाथोडा निमित्ताला कारणच शोधतो नेहमीच मत्त केवडा ******** १०७ शेकोटीचे दिवस साजणी रोमांतुनी हुडहुडी भरे कटू स्मृतींची पाने जळतां आनंदाची ऊब उरे काय बिनसले सखे ? चेहरा अंमळ थोडा उदास गं सूर्याला पिउनी, धमनींतुन तेजाची उधळू आग झटकुनि स्थितिला ऊठ ज़रा, बघ स्थलांतरा पक्षी येती शिशिरामध्ये नेहमीच या दृढ होती रेशिमगांठी ******* १०८ निरोप घेऊन वळतांना तू किना-याला ओल ठेवून माघारणा-या लाटेसारखी दिसतेय न्हाऊन केस वाळवतांना तू पागोळींत अंग झटकून कोवळ्या उन्हांत डोलणा-या मउशार हिरवळीसारखी भासतेस शृंगाराच्या निसटत्या क्षणी तू सागरक्षितिजावर विसावलेल्या तांबूस चंद्रकोरीसारखी क्लान्त दिसतेय अनुरागाच्या दाहक झळींत तू उगलतीच्या, उन्मादक सूर्यस्नांत सतेज केळी सारखी भासतेस ******* १०९ सायंकाळी देवापाशी शुभंकरोती म्हणतांना भातुकलीचा खेळ मघाचा कसा मनांतुन जाईना बेबी आहे शिष्ठच भारी, आम्हावर करते शिरगोपीकर आणि बाहुला खेळायाला म्हणुनी खाऊ आणीना राजू छोटू मज आवडती, सांगिन मी ते कामहि करिती चट्टामट्टा परि करतांना फार घालिती धिंगाणा बाप्पा मला तुम्ही लहान ठेवा,बालपणी या असे गोडवा हात जोडते तुम्हापुढे मी श्लोक आता जरि आठवेना ********* ११० नांव, दांत आणि नखांचा पूर्ण अभाव अजून वेळ गेली नाही, अजून छान दिसतेय कुणाकुणाकडे बघून खोटं खोटं हसतेस भय कसलं तुला ? मी नाही तर दुसरा नकोसलेल्या हवं तेंव्हा विसरा ! खाजवून खरूज काढायची तुझी जुनी सवय आयुष्यांत तुला तरी दुसरं काय हवय ? हे नव वर्षांचे माझे सुरेल गाणे लावून जीव करु नको व्यर्थ बहाणे शब्दांनि करूया परस्परांवर वार स्नेहाचा असतो हाच काळ बेजार किस बाइ कीस, गाजर कीस होउदेत पोरं तुला पंचवीस तीस हसण्याचे केले साहस तू ग जेंव्हा होतूचा शेवट तसाच गोड रहावा माझे नि तुझे हा फरकच आंता नाही हाक ऐकता होइन हजर कधीही दु:ख येतांत आपोआप, सुखाची बंद दारावरच थाप याला टाळू कि त्याला पाळू करता करता लागते धाप कधी खंतावत तर कधी हसत हसत काढत बसायचे सरल्या क्षणांचे काप कधी ऊन कधी पाऊस, श्रावणांत अशी हरखून नको जाऊस उबदार उन्हाळा, मेघांची झाकोळी मनाच्या वळचणीला आशेची पाकोळी म्हणून म्हणतो असा धीर सोडू सूर्याला आपण ओढून वर काढ़ू ******** ९२ स्वप्नांत दिसेल तुला राणीचा बाग तिथं मग भेटले एक म्हातारा वाघ घोर संकट ज़री त्याचं नांव, दांत आणि नखांचा पूर्ण अभाव अजून वेळ गेली नाही, अजून छान दिसतेय कुणाकुणाकडे बघून खोटं खोटं हसतेस भय कसलं तुला ? मी नाही तर दुसरा नकोसलेल्या हवं तेंव्हा विसरा ! खाजवून खरूज काढायची तुझी जुनी सवय आयुष्यांत तुला तरी दुसरं काय हवय ? हे नव वर्षांचे माझे सुरेल गाणे लावून जीव करु नको व्यर्थ बहाणे शब्दांनि करूया परस्परांवर वार स्नेहाचा असतो हाच काळ बेजार किस बाइ कीस, गाजर कीस होउदेत पोरं तुला पंचवीस तीस हसण्याचे केले साहस तू ग जेंव्हा होतूचा शेवट तसाच गोड रहावा माझे नि तुझे हा फरकच आंता नाही हाक ऐकता होइन हजर कधीही दु:ख येतांत आपोआप, सुखाची बंद दारावरच थाप याला टाळू कि त्याला पाळू करता करता लागते धाप कधी खंतावत तर कधी हसत हसत काढत बसायचे सरल्या क्षणांचे काप कधी ऊन कधी पाऊस, श्रावणांत अशी हरखून नको जाऊस उबदार उन्हाळा, मेघांची झाकोळी मनाच्या वळचणीला आशेची पाकोळी म्हणून म्हणतो असा धीर सोडू सूर्याला आपण ओढून वर काढ़ू तुझं प्रेम ऊर्दूवर, तुला मराठी कसं भावणार ? तापल्या दगड, काट्यांचा सुगंध दुरून कसा गावणार ? भावनेला नसते भाषा, ती शब्दांच्या पलीकडली ओळखली नाहीस ? हं ! सगळ्याची माती झाली तिकडं चांदणं शीतल, इकडं उन्हाच्या झळा इकडं विरहाचा दाह, तिकडं प्रीतीचा मळा तिकडं सकाळचं ऊन उबदार, रातीला इकडं अंधार फळा सोनेरी दुनियेच्या वाटेवर, विसरलीस उरांतल्या कळा सांग कां आवळलास हलाल करत माझा गळा ? दोन जीव प्रेमाची चाखत होते गोडी दारावर पडली थाप दुभंगली भुई थोडी माझ्यासाठी जिवाची ना केलीस तू पर्वा आठवत़य ! घडलय जसं कांही अगदी परवा परवा शब्द नाही फुटत, दाटलाय गळा पांपणी कांठावर थेंबांच्या माळा 'भेट तर दूरच, दोन शब्द बोल तरी' 'नाही नाही माझी तब्बेत नाही बरी' 'तुझ्या शिवाय माझा, वेळ कसा जाणार' 'पाहुणे आहेत घरी ! त्याना कोण वाढणार ?' 'ए प्लीज्, मेसेज पाठवणार ?' 'एकदा पाठवला नं ? रोज नाई जमणार !' तुला प्रेम ऊर्दूचं, मराठी कसं भावणार तापल्या दगड-काट्यांचा दर्प तुला असा दुरून कसा गावणार ? भावनेला नसते भाषा, ती शब्दांच्या पलीकडली ओळखली नाहीस ? हं ! सगळ्याची माती झाली तिकडं चांदणं शीतल, इकडं उन्हाच्या झळा इकडं विरहाचा दाह, तिकडं प्रीतीचा मळा तिकडं सकाळचं ऊन उबदार, रातीला इकडं अंधार फळा सोनेरी दुनियेच्या वाटेवर, विसरलीस उरांतल्या कळा सांग कां आवळलास हलाल करत माझा गळा ? रेशिमगांठी जपण्यासाठी, किती गोड़ हा हट्ट तुझा अशाच वेळी ओळी लिहिण्या, खरेच येतो मला मझा शब्दांच्या धारेचा एवढा होतो त्रास शब्दाच्याच शस्त्रानं तोडुन टाक पाश शब्दांच्या सुरेंत वाहून जाइल प्रीत शब्दांच्या सुरांत हरवून जाइल मीत तेजोनिधी भास्कर, गगनराज निरंतर ऊर्जा-स्रोताच् घर, जीवांसाठी... काळी आई साद देई, जननी तुडवोनि घेई खंत परि कधी नाही, वत्सलेसी.... वारा चहूकडे आसमंती, सुखद शीतल सांगाती श्वासोछ्वासाची गती, संयत करण्या... अवकाशस्थित अवघी विश्वे, बिंब-प्रतिबिंब सारे फसवे, आदी-अंत नाही ठावे, प्रगत मानवा.. जलस्पर्शाचा अवसर, अबालवृध्द आनंद विभोर, रानी मनी नाचति मोर, पिसारा फुलवुन..... ********* ९३ काँटोंसे ख़ून निकलता है फूलोंसेभी हम अब डरते है तुमने किया मायूस तब से ना ज़िक्र प्यार का करते है.... तुम्हें याद है किनारे पानीके हम बैठे लहर टहलते थे काग़ज़की कश्ती पानीमे हम छोड़के दोनों हँसते थे झोंकेंसे हवाके, दूर तलक जब कश्ती बिखरी जाती थी आँखोमे तुम्हारी डरावनी इक लहरसी दौड़ी आती थी हरदम हसती नजरोंमे तुम्हारी, जब दर्द का साया पाता था इक बूँद को लेके उँगलीपर होठोंपे प्यारसे रखता था... वो कहाँ गए ए दिन सजनी अजब किस्मका खेल है ये कश्मकश जिसकी पूँछें कैसा अधुरा मेल है ये... जब बादल ख़ूब बरसते थे, और भीगा मैं घर आता था हालात देखकर आँचल तुम्हारा मेरे सरपर गिरता था बाहोंमे सिमटकर दोनोंकी तब बातें ऐसी होती थी होठोंसे कुछभी कहें बिना, नज़रें सब समझा पाती थी उन बीते कलकी यांदोंसे दिल उलझा उलझा रहता है ये जिस फूल से हम डरते थे, मुरझा मुरझा लगता है ये... हमने भी सुनी है कहांनिया बिछड़े साथी भी मिलते है काँटोंसे सहारे फूल कईं दुनियामे अभीभी खिलतें है ******** ९४ हमने कईं ऐसे तूफ़ान सीनेपे हमारे झेलें है दरियाँकि उछलती लेहेरोंसे, हरदम हम भी खेलें है दुनिया चाहे मना करें, फिरभी तुम्हें आना होगा दीवार कड़ी होती है प्यारकि साथमे हमें अजमाना होगा ********* उनके आनेसे पेहेलेही, सजनी तुम्हें जाना होगा नफ़रत होती है ज़हरीली, ये भी तुमने जाना होगा... हल्कासा हवाका झोंका, ख़ुशियाँ साथ में लाता सही तूफ़ानके आनेसे पेहेले, होती कोई आहट नहीं आसान नहीं दीवार होना, गुलिस्ताँ सभी वीरान होगा... कँवल को छूनेसे पेहेले, भँवर को पूछाथा तुमने ? उस छलिये का प्यार तरीक़ा, देखा, जाना है हमने ! रखना प्यार छुपाकर कहीं, यही सबसे सुहाना होगा... ******* धूपमे हमराही मेरे, क़दम लड़खड़ाएँगे राहोमे हमदम मेरे, साया मेरा पाओगी नहाने बाद बहाने किसी, बैठोगी सरे-आइना गेसुंओसे तब मेहेक उठा, साया मेरा पाओगी मेहेंदी रचाके जब, बाँधोगी पैरोंमे पायल रुमझुम हल्की सी उनमें, साया मेरा पाओगी गजब कभी जाओगी गुलिस्ताँ, टेहेलने ख़ुशियाँ भरके खिलते-हसतें उन फूलों में, साया मेरा पाओगी सावन के महिने में, जब उमड़ घुमड छाएँगी घटा दिलमे हिलती कश्मकश मे साया मेरा पाओगी ****** मना कैसे करूं तुम्हे, गाती हूँ गीत रे होले होले आहिस्ता, कंहि खुल न जाए प्रीत रे मना कैसे करूं तुम्हे, दौडी चलीं आउं रे बाहोंमे पिघली पिघली, पागल हो जांउ रे ****** ९६ ज्यांच्या आयुष्यांत कांहीच घडत नाही त्यांना सगळच अवघड वाटतं अशांच्याच डेस्क्यां कांटेरी रोपटी लावायचं घाटतं गवसणी एकदा गवसण्याला म्हणाली 'दादा, माझा सूर हरवला़य !' गवसणे म्हणाले, 'ताई, तुझं अंतरंग छेड ! आपोआप परतून येईल तो !' ******** ९६ रंगांचा जयजयकार करा रंगांचा जयजयकार सूर्य, चंद्र, नदि, डोंगर, खोरे निसर्गपाठांतील अक्षरें सिंहगर्जना वा मधुकूजन घडवा साक्षात्कार आई बाबा ताई भाऊ ढवळ्या पवळ्या अन् मनिमाऊ कौशल्याने चितारण्याला व्हा आतां तैयार पारितोषिकासाठि बापुडे लढोंत; तुम्ही त्याहि पलिकडे रंगतरंगांचे शिडका मग चित्रांमधे तुषार रंगांचा जयजयकार करा रंगांचा जयजयकार ******* ९७ चांदण्यांचा चंदेरी भरतो मेळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा डोंरांच्या भिंतीमधे अन् झाडांचे खांब,ढगांचा फळा असतो केवढा मोठा, लांब छपराचा रंग कसा छानछान निळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा चांदोबा सांगतो सशाची गोष्ट, गोरा गोरा रंग अन् अंग धष्टपुष्ट गुंजांच्या डोळ्यांचा कापसाचा गोळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा खेळाच्या तासाला चांदण्या हसतांत, ढगांच्या मागे लपंडाव खेळतांत करतांत लुकलुक खट्याळ चाळा, आभाळांत भरते बाप्पाची शाळा ******** ९८ असा जीव मेटाकुटी, चिंता उरांत दाटते, लेकं न्हाणूली धाकटी डांव पोरांत मांडते असा जीव वाघावाणी आता म्हणे कुणा खाऊं, दाणा भरे कणसांत, हात नका त्याला लाऊ असा जीव कसनुसा वर रिकामे आभाळ, कोंभ अंकूरला, पाणी कसे देऊ मायंदळ असा जीव थोडाथोडा जात्यामधे भरडतो, दूर धाकला लाडाचा, वाटा शिवारी मागतो असा जीव येड्यावानी दीसरात तगमगे, धनी गेले दूरदेशी, सय फिरे आगेमागे असा जीव कासावीस, जशी ढळे तीन्हीसांज, धूळवाट पुढे, रामनामाचीच झांज असा जीव चट्टामट्टा काळ मांजरं करील, नको मना आढी धरू, काय बांधून नोशील ******** ९९ शब्दांच्या रेघांमध्ये, शब्दांचे विलग प्रवाह, शब्दांशी जवळीक साधुन, शब्दांचे प्रेमविवाह शब्दांचे बंधन सुटले, शब्दांचे बांधहि फुटले, शब्दांचे घरटे तुटले, शब्द आंत घुसमटलेले शब्दांच्या भिंतीआड, शब्दांचे अड़ती श्वास, शब्दांच्या संहाराचे, शब्दांना होती भास शब्दांच्या व्याकुळ वेळी, शब्दांना फूटते पान्हा, शब्दांना पाखर धरली, तरिहि शब्द पड़तों तान्हा शब्दांचे भरती मेळे, शब्दांना येती वेणा, शब्दांच्या सौंदर्याला, शब्दांचा डोळस काणा शब्दांची जहरी जाती, शब्दांच्या पिसती जाती, शब्दांना पिसता जाती, शब्दांची भिडती पाती शब्दांच्या कोशामध्ये, शब्दांना होती बाळे, शब्दांच्या गोषामध्ये, शब्दांची उठती मोहोळे ******** १०० नि:शब्द स्वराकाराचे कधी होते मधुरा गीत नि:शब्द स्वाहाकाराने कधि मुकतो जिवलग मीत नि:शब्द पोकळीमध्ये कधि वारा जहरी भरतों नि:शब्द मध्यरात्रीत कधि तारा निखळुन पडतो नि:शब्द अंतरंगांत कधि शब्दच उठवि तरंग नि:शब्द तपोभंगास कधि पेरती शब्द सुरुंग नि:शब्द चि-यांच्या गानी कधि व्याकुळ होते तान नि:शब्द तीर मारून वैराचे ढळते वसन ******* १०१ सुरांच्या नदीकांठी गाण्यांची गांव रे ग म प ध नि सारी मुलांची नांवं सात अधिक सात इथं बेरीज होते बारा कारण साधं, सा प चा एकच चेह्ेरा आमराईंत कोकिळाचा बारामाही कुहू वेळूवनी शीळ कोण घालत़य पाहू ढगांचा मृदंग वीज तानबाज दूरवरून ऐकू येते लाटांची गाज ॐकाराच्या कोंभाला नादाची पाती गाण्याच्या गांवांत जाउन करु गुंग मती सुरांच्या लाटांवर लयदार होड्या ग न प ध नी सा रे मारतांत उड्या ******* जोगिया आणि भैरवीमधला कुहूकार चढत्या सप्तकांत तांबड फुटायच्याव्ळचा पवित्र घंटानाद गोपुर अस्फुट... स्पष्टवत जाणारी, मंत्रघोष।।। कपबशांची किणकिण... आताशवाणी पाचकपात्राची शिट्टी, रडणी, ओरडणी, धुणी... जनरंजनी... उंच टाचा... टक् टक् टक्... जिन्यावर.. विरत जाणा-या... शांत शांत... दुरून एखादी, 'बाssssटली बाॅ़य', 'कांssssदे बटाट्टीsssय' अधीर वाहनांचा चित्कार... उनउनित दुपार... ं ं ं दमला भागला निश्वास, परतलेला सुखरूप... शुभंकर देवाला निरांजन, धूप... आणि हो... 'बुनियाद' अटळ 'सुख'णा-या दु:खाची कळ अंथरुणावर आडव, दिवसभराचं चंद्रबळे हे सारं नैमित्तिक, चक्रांकित, अळवावरच्या पाण्यासारखं सर्वभारल्या, लताच्या गाण्यासारखं... तुझी आठवण अव्याहत, अखंड उरांतल्या घडाळ्यासारखी... धिक अधिक धिक अधिक धिक अधिक ******** १०३ दिशादिशांना जळतो वन्ही, मायेचा गारवा अडे आधाराची धार बरसता, लख्ख श्रावणी ऊन पडे विषवल्लीचे फूल उमलते रंगछटांनी नटलेले कुबिजाच्या कुब्जेपोटी जणु रूप तान्हुले अवतरले उरी जागवा माया, चढवा बाळमुठीवर सोनकडे सह्यकड्याच्या मिठींत मोडे निंदेची द:सह्य कडा नजरेचा कटु विखार फोडे अभिमानाची नागफडा विकृतिच्या स्वप्नांना चारू संस्कारांचे आज खडे मुक्तीचा पूर्वांचल उजळे अंधाराची तिरिप डळे साकळलेली जळे बरसती हंसांना स्वच्छंद तळे भाग्योदयि सहभाग भाग द्या, सदयकरांना करा पुढे ******** १०४ चांदणी बोलली किणकिणल्या मधुघंटा चांदणी चालली शुभ्र खगांच्या लाटा चांदणी नाचली लक्ष मोर पर्जन्यी चांदणी क्रोधली भक्ष शोधतो अग्नी चांदणी उगली कांचनसंध्या क्लान्त चांदणी बिंबली जळांत प्रतिबींबांत चांदणी थबकली निमिषे झाली युगे चांदणी निमाली नजरे पुढती धुके चांदणी भेटली श्वासा उसंत नाही चादणी पेटली सर्वांगाची लाही चांदणी पाहते डसले अनंत नाग चांदणी व्यापते हृदयी सहस्र भाग चांदणी ओढते सजल घनांचा पदर चांदणी चुंबिते सलज्ज अधिरा अधर चांदणी बिलगली पिसे जडावी तशी चांदणी झोंबली पिसे जडावे तशी ******* १०५ वा-याच्या डोक्यांत हवा गेली तळ्यांतल्या बिंबानं ईर्ष्ा ल्याली ढवळलं पाणी हलली डोंगर रानं थरारली भेदरली पिंपळाचीही पानं झाकोळीला सापडला सूर कोंदला वारा तळ्यात बिंबाला काळोखाचा थारा सांडल्या मुसळधारा सप्तरंगी वाजलं सूप पुलाखालून दरम्यान वाह्यलं खूप खुदकले डोंगर रानातल्या रानांत वारा पारा पारा हरपल्या भानांत ******** १०६ ओठांच्या कमानीत मानी शब्दांचे बाण प्रेमाच्या लवलेशाचीही असते इथं वाण स्पर्षाच्या अंधुक धगींन उसने अवसान विरघळतं चेहे-याचं लटकं रूप कापरागत भरारतं आढेवेढे 'नाहीं' 'नको' क्वचित कधी फणकारा संपलं सारं ! वाटाय् लागत 'नव्हतीस तेंव्हाच होतो बरा' 'बराय! मग निघू?' म्हणतांच पांपणीकाठी तरारतो दहिवर अस्फुट, लाजरीच्या रोपांगत, ' नको ! मला सावर !' नजरभेट चुकवून, फसवून तीच परत टाळाटाळ उरांत उठणा-या लाटांची कां उगा आबाळ नजरभेट चुकली, फसलीस जीव थोडाथोडा निमित्ताला कारणच शोधतो नेहमीच मत्त केवडा ******** १०७ शेकोटीचे दिवस साजणी रोमांतुनी हुडहुडी भरे कटू स्मृतींची पाने जळतां आनंदाची ऊब उरे काय बिनसले सखे ? चेहरा अंमळ थोडा उदास गं सूर्याला पिउनी, धमनींतुन तेजाची उधळू आग झटकुनि स्थितिला ऊठ ज़रा, बघ स्थलांतरा पक्षी येती शिशिरामध्ये नेहमीच या दृढ होती रेशिमगांठी ******* १०८ निरोप घेऊन वळतांना तू किना-याला ओल ठेवून माघारणा-या लाटेसारखी दिसतेय न्हाऊन केस वाळवतांना तू पागोळींत अंग झटकून कोवळ्या उन्हांत डोलणा-या मउशार हिरवळीसारखी भासतेस शृंगाराच्या निसटत्या क्षणी तू सागरक्षितिजावर विसावलेल्या तांबूस चंद्रकोरीसारखी क्लान्त दिसतेय अनुरागाच्या दाहक झळींत तू उगलतीच्या, उन्मादक सूर्यस्नांत सतेज केळी सारखी भासतेस ******* १०९ सायंकाळी देवापाशी शुभंकरोती म्हणतांना भातुकलीचा खेळ मघाचा कसा मनांतुन जाईना बेबी आहे शिष्ठच भारी, आम्हावर करते शिरगोपीकर आणि बाहुला खेळायाला म्हणुनी खाऊ आणीना राजू छोटू मज आवडती, सांगिन मी ते कामहि करिती चट्टामट्टा परि करतांना फार घालिती धिंगाणा बाप्पा मला तुम्ही लहान ठेवा,बालपणी या असे गोडवा हात जोडते तुम्हापुढे मी श्लोक आता जरि आठवेना ********* १०५ वा-याच्या डोक्यांत हवा गेली तळ्यांतल्या बिंबानं ईर्ष्ा ल्याली ढवळलं पाणी हलली डोंगर रानं थरारली भेदरली पिंपळाचीही पानं झाकोळीला सापडला सूर कोंदला वारा तळ्यात बिंबाला काळोखाचा थारा सांडल्या मुसळधारा सप्तरंगी वाजलं सूप पुलाखालून दरम्यान वाह्यलं खूप खुदकले डोंगर रानातल्या रानांत वारा पारा पारा हरपल्या भानांत ******** १०६ ओठांच्या कमानीत मानी शब्दांचे बाण प्रेमाच्या लवलेशाचीही असते इथं वाण स्पर्षाच्या अंधुक धगींन उसने अवसान विरघळतं चेहे-याचं लटकं रूप कापरागत भरारतं आढेवेढे 'नाहीं' 'नको' क्वचित कधी फणकारा संपलं सारं ! वाटाय् लागत 'नव्हतीस तेंव्हाच होतो बरा' 'बराय! मग निघू?' म्हणतांच पांपणीकाठी तरारतो दहिवर अस्फुट, लाजरीच्या रोपांगत, ' नको ! मला सावर !' नजरभेट चुकवून, फसवून तीच परत टाळाटाळ उरांत उठणा-या लाटांची कां उगा आबाळ नजरभेट चुकली, फसलीस जीव थोडाथोडा निमित्ताला कारणच शोधतो नेहमीच मत्त केवडा ******** १०७ शेकोटीचे दिवस साजणी रोमांतुनी हुडहुडी भरे कटू स्मृतींची पाने जळतां आनंदाची ऊब उरे काय बिनसले सखे ? चेहरा अंमळ थोडा उदास गं सूर्याला पिउनी, धमनींतुन तेजाची उधळू आग झटकुनि स्थितिला ऊठ ज़रा, बघ स्थलांतरा पक्षी येती शिशिरामध्ये नेहमीच या दृढ होती रेशिमगांठी ******* १०८ निरोप घेऊन वळतांना तू किना-याला ओल ठेवून माघारणा-या लाटेसारखी दिसतेय न्हाऊन केस वाळवतांना तू पागोळींत अंग झटकून कोवळ्या उन्हांत डोलणा-या मउशार हिरवळीसारखी भासतेस शृंगाराच्या निसटत्या क्षणी तू सागरक्षितिजावर विसावलेल्या तांबूस चंद्रकोरीसारखी क्लान्त दिसतेय अनुरागाच्या दाहक झळींत तू उगवतीच्या, उन्मादक सूर्यस्नांत सतेज केळी सारखी भासतेस ******* १०९ सायंकाळी देवापाशी शुभंकरोती म्हणतांना भातुकलीचा खेळ मघाचा कसा मनांतुन जाईना बेबी आहे शिष्ठच भारी, आम्हावर करते शिरगोपीकर आणि बाहुला खेळायाला म्हणुनी खाऊ आणीना राजू छोटू मज आवडती, सांगिन मी ते कामहि करिती चट्टामट्टा परि करतांना फार घालिती धिंगाणा बाप्पा मला तुम्ही लहान ठेवा,बालपणी या असे गोडवा हात जोडते तुम्हापुढे मी श्लोक आता जरि आठवेना ********* ११० वारियामाजी परिमळू । पाणियामाजी गंगाजळू । कळकामाजी सुरेल वेळू । तैसे आम्ही जाणिजे ।। वृक्षामाजी कल्पतरु । अश्वामाजी अबलख वारू । पर्वतीमाजी मलय नि मेरू तैसे आम्ही जाणिजे ।। भक्तीमाजी आर्जव प्रीतीमाजी मार्दव शक्तीमाजी वीरभाव तैसे आम्ही जाणिजे ।। वैखरीमाजी देववाणी देवतामाजी चक्रपाणि ललनांमाजी आदर्श गृहिणी तैसे आम्ही जाणिजे ।। झळाळीमाजी सुवर्ण शस्त्रांमाजी रामबाण औषधीमाजी अमृतकण तैसे आम्ही जाणिजे ।। वृत्तीमाजी सरळभावी उक्तीमाजी किंचित कवी रीतीमाजी अपार निगर्वी तैसे आम्ही जाणिजे ।। रूपामाजी अति सामान्य कोपामाजी सात्विक जाण दीपामाजी निरांजन तैसे आम्ही जाणिजे ।। दु:खामाजी सहनक्षम सुखामाजी आनंदधाम शोकामाजी नियत संयम तैसे आम्ही जाणिजे ।। गृहामाजी घरकुल विरहामाजी भक्त व्याकुळ कलहामाजी युक्त गोपाल तैसे आम्ही जाणिजे ।। पावकामाजी ऊर्जास्थल दाहकामाजी परित्राणा़ बल भाविकामाजी भक्तवत्सल तैसे आम्ही जाणिजे ।। ******* १११ चित्रपट संकलन, जणू नाज़ुक टाक्यांचा कशिदा, दिग्दर्शकाच्या प्रतिभेचा हिशेब असतो अगदी सरळ साधा साराच एखाद्या जिगसाॅ पझल् सारखा तुकडे जुळवायचा खेळ एम् जी, ओके निवडून घालायचा असतो सुंदर मेळ फाॅग्, जर्क्स्, कट् अवेज्, रिअॅक्शन्स्, अडचणींचे डोंगरच फार, ते सगळे पार करून रिळांना दाखवायचं असतं प्रोजेक्शन् रूमचं दार, प्रेक्षक, समीक्षक खूश, तर कलाकार, दिग्दर्शकाच्या पाठीवर थाप, संकलकाच्या पदरांत मात्र फक्त नि फक्त कष्टांचंच माप, तशांत दिग्दर्शक नवखा म्हणजे 'भीक नको पण कुतरा आवर ', कसली बोंबलायची क्रिएटिव्हिटी, टेकिंग बघून बरं वाटणं तर दूर अशा वेळी संकलकाच्या चिडचिडीला येतो पूर, त्यांतूनच मग जन्म घेतो एखादा दिग्दर्शकाचा राजा 'राजकपूर' ******* ११२ गात्रांस साद करुणेची, नेत्रांचे केले दान, चुकचकलि पाल शंकेची ! मी खरे राखियों भान ? वाटले 'मित्रों काय, तुम्ही पहला लेउन दृष्टी भ्मनिरास ना हो तुमचा, पाहून अमानुष सृष्टी आक्रोश रोजचा येथे वेशीवर टाहो फोडित भळभळते सोसुन घाव, जन बसतीअश्रू गाळित ओघळा घेउनी सज्ज दृक्श्राव्य वाहिन्या ओंगळ श्वासाविरहित चटक जिव्हांची देव्हारि तेरडा कर्दळ अपयशा घेउनी पदरी, पुण्यामुंबईत दिसतिल तुम्हां मृगजळा मागुनी धावत जळवंचित, तृषार्त आत्मा वेगानं हलती चित्रों, ना उसंत कोणालाही वाढती स्पंदने हृदयी, वाटते फुटतसे लाही राखाडी पर्वत रांग, हिरवाइ हरवुनी बसली धुरकट नि दमटआभाळ, मग वृष्टि सुखाती कसली * * * पण असे तरी जाणवले, का आम्ही पाहावे फक्त नवनवीन, दृष्टी घेउन, आनंदो न्हांतिल त्यांत गोबरों मुलांचा गाल, बैलांवर रंजित झूल उगवती, मावळाक्षितिजी, झुलतसा इंद्रधनु पूल रात्रीचे काळे अंबर, वर टिकल्या जणु जडलेल्या नजरेंत साठवुनी घेतां, धमन्या जरा स्फुरलेल्या पहा जळी, काष्ठींची, मासोळि, फुले, पाकोळी दृश्यांच्या परिपूर्तीने पावेल भरून पोकळी ******** ११३ सप्तकांतरि सप्तक । षड्जभिन्न जणु जनुक । स्वरसंचार श्रुतिधारक । दिला 'हृदया' 'दीना' ने ।। अनवट बंदिशि ऐशो ऐशा । जणु 'विदा' हिमतप्तशा । उचलून बासन पाशा । आत्मसात बहु केल्या ।। ज्ञानोब्बा तीर्थस्थानी असे । शिवबा स्फुल्लिंगांत विलसे । नामवंत कीर्तीवंत आदर्श ऐसे । नेमस्तले बालपणापासून ।। समर्थ, वैनतेय विनायक । राष्ट्रप्रेमाचे पावक । तेजोभूषण नायक । शोषिले, रुजविले अंत:करणी ।। गोविंदाग्रज, कुसुमाग्रज । शेळके कुलोत्पन्ना अग्रज । शब्दकळांचे विविध बाज । स्वरावले आकळुनी ।। शब्दार्णव मथिला जिज्ञासे । अर्थार्णव शोषिला अतिध्यासे । आपेगांवि, प्रतिष्ठानि, निवासे । प्रदक्षिली माउली, प्रेमभरे ।। भट, महानगर, गोडघाटे । स्वरावला शब्द गोड़ वाटे । आरती प्रभ्वादि कवि मोठे । गीतरूपी मांडले ।। मीरा, तुलसी, ज्ञानदेव । भक्तिरसपूर्ण भाव । रचनांचा घेता ठाव । सिध्दावस्था साधती ।। कल्पनांची स्पष्टपणे । योग्यतेची पूर्ण जाण । तरंगाचे नेमकं वज़न । कंठरवे प्कटविले ।। आनंदघनाचे दर्शन । रुध्दकंठी विसरून भान । भगिनिप्रेम श्रेष्ठ निधनानंतर । या परते सांगिजे ।। लगनी सजने सिध्द स्वर । धरुनी मायादराची पांखर । पवित्र दवबिंदुचा कापूर । जपून जाणिला संगोपिला ।। ख़र्च मंद्र तारांतही । गंभीर नर्मार्त स्वरप्रवाही । ऐसा गायक अनुभवला नाही । म्यां तरी बांपडे ।। सागर गाजेची गभीरता । वेणूनादि आर्तता । गायीच्या नेत्रिची व्यथा । एकवटली सृजनांत ।। ताना मुरक्या गमक पलटे । श्रवणांतहि अवघड वाटें । परि सच्चिदानंद भेंटें । अंतरि दाटे गिरिव्रज ।। हृदय मस्तका मधे गळा । भाव स्रोतांचा उगम आगळा । काव्यांतली स्पष्टकळा । आशयघने खुलविली ।। उत्रांत पेशींची पाळेमुळे । विकार-विचारांची दळे । श्री हरी शंख स्पर्शबळे । नियती नेई उन्नयना ।। कधी दैव चमत्कृती । दावी हर्षलाची व्याप्ति । असंभवाची येता प्रचिती । स्नेह निष्ठा ढळू नये ।। शब्द मौक्तिकांचे कोंदण । भावस्वरांनी ओथंबुनं । मृद्गंधाची ताजगी घेऊन । वर्षती पंच-दशकों ।। आतां थांबले पाहिजे । गुणावगुण वर्णिले जे जे । स्नेहाधिकारे जाणिजे । निखळ आणि प्रामाणिक ।। ******** ११४ शिक्षण कसले आनंददायी । शिक्षण बौध्दिक कष्टांची खाई । आळसावल्या निद्रेप्रत नेई । क्रीडावेळी बालका ।। शिक्षण म्हणे विद्यार्थी केंद्रित । उपदेश पण अघोषित । प्रौढी वा प्रलोभनांनी प्रवृत्त । शिक्षण म्हणे न्यावे ।। कळकळ तळमळ त्याग । शिक्षकाचा अविभाज्य भाग । प्रशिक्षणाने कां हा संयोग । होतसे सांगिजे ? जेथ विद्यार्थी ज्ञानार्जन तत्पर । माथ्यावर नसे छप्पर । गुरुजनांचा वापर । अन्य कामी होतसे ।। अधिका-यांच्या भेटीवेळी । शिक्षकगणांची स्वागतपाळी । नाश्ता चहा कोंबड्या केळी । घामेजुनि आणिती बापुडे ।। कसले कौतुक नि गौरव सोहळे । तोचतोचपणाचे लोभस जाळे । 'आ' वासुनी बिचारी बाळे । आश्वस्तती पळभरी ।। उरल्यांचे ऐसे हाल । गळफास वा हलाहल । थकली शरीरे फोल । अपयशा अर्पिती ।। सुजला सुफला भूमी । 'अर्थ' प्रवृत्त संस्थांची काय कमी । पदव्यांची गोंडस हमी । कोणालाही मिळतसे ।। शैक्षणिक साहित्य, सुविधा । गुरुजनांची मने द्विधा । वर म्हणावा की आपदा । सदा शंका खातसे ।। चित्रवाणी संगणक । पेट्या विषयवार अनेक । वापरतां मोडेल कां ? साशंक । मन होतसे क्षणोक्षणी ।। नेमणुका बदल्या निलंबने । 'बोलण्यां'ची विविध दालने । सर्वांतुन सर्वदा उणे । होतसे मात्र शिक्षणं ।। 'खुर्च्याधिकारांचा' हव्यास । बंगले, गाड्यांची मिजास । साक्षरतापूर्तिचा सुवास । कधिकाळी येइल कां ? असे निश्चित मात्र एक । नवी पिढी महा जागरुक । माध्यमांचे प्रयत्न नेक । याला असती कारण ।। युती असो वा कडबोळे । मतांच्या मधाचे पोळे । जरी डंख नांग्यांनी झाकोळे । सत्तालोलुप धुंडती ।। कधी मग माश्यांचा उद्रेक । 'गांधी' फोडांची आवक । 'ओल्या'संगे 'सुख'नाशक । धोका भविष्यगर्भांत ।। 'प्रबोधन' 'संक्रमण' शब्द भोळे । सहकर्म प्रलोभनबळे । सिंव्हासनांशी सगळे डोळे । नसे लवतही पांपणी ।। तरारले जरि तृषार्त कोंभ । वर विद्यावर्षणाचे मळभ । भांडवल करण्या चटावली जीभ । उपाय सांगा कोणतां ? तदर्थ समित्या, आदेश । मुक्त कुरणांचे प्रदेश । कार्यकत्परतेचा आभास । आंता सर्वा ठावका ।। हे तर भावनांचे वमन । न होय प्रष्णांचे शमन । केवळ शब्दांमाजी असे दम न । सत्य ह एकमेव ।। संस्था राष्ट्रभाषेंत संस्थान । परिपूर्ण असे हे नामाभीधान । एकाधिकारेच्छा मनोमन । 'महर्षारण्ये' माजली ।। ***** ११५ तव गाणे म्हणजे आम्हावरी पांखरं कधि श्रावणसर, कधि तव्यावरी भाकर तुज मिळो आमुचे ऊर्वरित आयुष्य पामरांस असते व्यर्थचि भूत, भविष्य तव गाणे म्हणजे विश्वार्ताचे भानं उरतसे व्यापुनी चराचरा तव तानं तिन्हि लोकां भेदून छेदुन युगायुगांना स्वरसाथ लाभुदे अखंड अशि रसिकांना तुज रोज़ मिळो आमचा जगण्याची दिवस आमचे जगण्याची ? लय , ठावकेच प्रत्येकांस श्वासांचे कोटी बळ मिळुदेत स्वरांना उधळुनी मुक्त कर स्वरमय सकल क्षणांना *** श्रवणेंद्रियांनी केले । इतुके उत्तम संस्कार । अन्य कोणे आळविले स्वर । रुजावे, रुचावे कैसे ।। ****** ११६ हे जुळणे तुटणे, विरह वेदना शाप कालौषधि त्यावर फुंकर आपोआप परि कधी सईंचा उन्माळे कल्लोळ अन् बरसु लागते डोळ्यांतुन आभाळ ** घे समजुन तू हा उत्कट भावावेग हृदयांत जळे 'आषाढ आर्तसा' मेघ कधि सांग बरसशिल श्रावणसरिसारखेी किति साहू विरहा? दयार्द्र होना सखी ******** हिरवी हिरवी रानं, तरारली शेतं, डोंगरमाथ्याला आर्द्र भुरा फेटा आषाढ-श्रावण धरिती रिंगण, हृदयी भेटीस उत्सुक लाटा **** श्रावणांत झरतिल सरीवर सरी पळत जाइल त्यांत एक अल्लड परी चींब चींब अंग नि ओलेकंच केस आजुबाजू हिरवागार स्वप्नांचा देश ***** आकाश तांबूस, डोळ्यांत पाऊस, मनही उदास, काहून आज ? कसा गेला वेळ ? दंशाचीच भूलं गंघात चाहूल, सईंची गाज ! ***** श्रावणांत सरी लाटांवर लाटा हळदिव्या किरणांना मिळतील वाटा ? उन-सावल्या ? आनंदाचा खेळ जसा गंधार, षड्ज-पंचमाचा मेळ गाभुळल्या सृष्टींत, मधाळल्या सुरांची शाल घ्या तृप्तावल्या मनानं, आनंदाचं झाड व्हा.... ****** ११७ गुरु चैतन्य भास्कर, गुरु शीतलता शशिधर गुरु वात्सल्याची धारा, गुरु आवेगाचा वारा गुरु त्रिकाल त्रिलोक स्वामी, गुरु प्रकाश अंतर्यामी गुरु आभाळ मुक्त पांखरा, गुरु ! आधार चराचरा ********* ११८ या ! आनंदाचे रोप रुजवा जोमाने सुष्मिता वदनांनी भरू परस्पर मने श्रवणांत निसर्गाची नटवी सजवी धरा कर्तृत्वाच्या ज्योती लावुन सजवू जरा नउवारी पैठणी, चोळी आरस्पानी नथ मोत्यांची अन् सुवर्णझुंबर कानी हातावर मेंदी नाजुक कशिदा जणू 'त्या'लाही सजवा, नको दिसाया 'गणू' संस्कृतिचे ठेवा भान, असा सावध शमिवरची काढ़ा शस्त्रे, व्हा कटिबद्ध 'तो'अथवा 'ती', ना भेद आज राहिला 'सहचर' संबोधे आसमंत उजळला मज ठाउक नाही देवाचे अस्तित्व 'माणूस'पणाचे मजला सख्य, ममत्व जन्माला घाली माणुस, जाळे तोची 'देना'चीं असते 'किमया' सांगा कैची कां अनुत्तरित हा प्रष्ण कधीचा पडला देईल कुणी कां उत्तर याचे मजला ? ********* ११९ नेमेचि येती निवडणुका । देता-घेता आणा भाका । टाहो फोडून घालिती हाँका । 'उमेद'वार' घालिती ।। भाद्रपदांत अतर्क्य साटी-लोटी । अश्विनांत आश्वासनांना भरती । जेत्यांचे अश्व मग उधळती । ऐसा यांचा नित्य नेम ।. आघाड्या-युत्यांचे फोल संकल्प । माध्यमांस बातम्या खूप । यज्ञांत या बंडखोरीचे तूप । अराजक चहूकडे ।। मतदार सामान्य गरीब । धरूनि आकांक्षांचे सुंभ । परि नेत्यांचे आसन-वालभ । कैसे यावा कळावे ।। आतां मात्र अती झाले । हताश अश्रूही सुकून गेले । मनांत , नजरेंत अंगार फुलले । सावधान 'पक्षां'नो ।। कोंडीत सापडली मुंगी । प्रस्तरासही ती लंघी । समूहाची शक्ती अपार अंतरंगी । जरि नसे बळ नसे बाहूंत ।। सुज्ञ सुजाण नेत्यांनो । तरुण तिकिटधारींनो । शिक्षित सुसंस्कारी जनांनो । मनाशी बांधा खुणगांठ ।। ओळखा काळाची पाउले । दिसती जे लटकलेले । तन-मन यांचे कुजलेले । राहा सजग सदैव ।। राष्ट्रपित्याची सरली जयंती । उरले निर्माल्य पुतळ्याभवती । ओवाळण्या आरत्या स्वत:भोवती । पळू नका निर्लज्जांनो ।। ****** १२० निवडणुकांची रणधुमाळी । साम दाम दंड भेदादि खेळी । मतदारांच्या मात्र कपाळी । वाट कांटेरी नित्याची ।। मतांसाठी रस्सिखेच । घालिती एकमेकां पेच । ओढण्या लाल दिव्याचा शिरपेच । उतावळे 'निवडक' ।। कोट्यवधींच्या लागती बोली । जरि विकासकामे रखडलेली । मरो जनता रडवेली । ऐसे हे मत्त-धुंद ।। कोणी घालिती गालिचे । बेबंद हिंडती राजकीय चांचे । कुणा घरी पाय कुणाचे । संभ्रमावस्था सगळ्यांची ।।