Sunday, November 27, 2011


’संजीवन समाधी’
२३ नोव्हेंबर, कार्तिक वद्य त्रयोदशीला, सातशे पंधरावा समाधी सोहळा संपन्न झाला. श्रीमद्भग्वद्गीतेच्या अठरा अध्यायांतल्या संस्कृत सातशे श्लोकांचं सार, सर्वसामान्यजनांसाठी, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांतादि लेण्यांनी समृद्ध, प्राकृतातल्या नऊ हजार, सालंकृत ओव्यांमधे सांगीतल्यावर, शेवटी ज्ञानोब्बामाउलीनं, प्रसादाचं मागणं केल...कुणाकडे ? पंढरपुरच्या, इंद्रायणी काठी, पुंडलिकानं फेकलेल्या विटेवर, कटीवरी हात ठेवून उभा ठाकलेल्या, सगुण साकाररूप विठ्ठलाकडे ? नाही... तर विश्वात्मकाकडे...
आणि हे मागणं फक्त नेवाशांतल्या लोकांसाठी होतं ? की फक्त आळंदीतल्या, की महाराष्ट्रांतल्या किंवा भारतांतल्या लोकांसाठी होत ? नाही. ज्ञानदेवांनी मागणं केल ते या केवळ पृथ्वीवरच्याचं नव्हे तर विश्वांतल्या प्रत्येक ’भूतमात्रा’साठी... भू म्हणजे उत्पन्न होणे..जन्म घेणे...
’हे विश्वरूप, निसर्गरूप, पंचमहाभूतरूप, अनंत, अरूप, अनाकलनीया...प्रसाद दे...सर्व भूत-प्राणिमात्रांसाठी...’
कारण, , निसर्गांतल्या कांही विषिष्ट गुणधर्म असलेल्या घटकांपासूनच जीव निर्मिती होते...आणि असे घटक, ह्या पृथ्वीनामक ग्रहावर उपलब्ध असल्यामुळेंच केवळ, इथं जीवसृष्टी आहे या वैज्ञानिक सत्याच पूर्ण आकलन ज्ञानदेवांना होतं. श्रद्धावान अशिक्षित समाजाला विश्वास वाटावा आणि त्यांना आपलं म्हणंणं पटवून देता याव यासाठीच फक्त त्यांनी ’विठ्ठल’ नामधारी, त्यांचा ’देव’सुद्धा स्विकारला, आळवला. मोठी माणसं जशी आपल्या लहानग्यांच्या भातुकलींतला काल्पनिक स्वयंपाक, त्याचं कौतुक करीत अगदी ’चवीचवी’नं खातांत...त्याला आनंद व्हावा, बरं वाटावं आणि मग पुढे त्यानं आपल ऐकावं यासाठी ? तसच कांहींसं...
काय मागितलं आहे पसायदानांत ?
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥
जनसामान्यांना भगवान युगंधरविरचित गीतेंतल्या तत्वज्ञानाची ओळख करून देण्याच्या विशिष्ट हेतूने सुरू केलेल्या किंवा तू  मजकडून करवून घेत असलेल्या साहित्यनिर्मिती प्रक्रियेंत मी जे योगदान, एखाद्या यज्ञांत आहुती दिल्याप्रमाणं दिलं आहे, ते गोड मानून घे, आणि मला प्रसाद दे
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे
दुष्टांची कुकर्मांची ओढ कमी होवून, सत्कर्मांची गोडी वाढू दे...विंचवाच्या नांगीतलं विष नाहीस होवू दे... विंचवाच्या ’नांगी’पेक्षा माणसाच्या ’मनांगी’चा विखार  कित्येक पटीन धोकादायक असतो...निर्दालन वाईटपणाच होवू दे...जिण्यातला चांगुलपणा वृद्धिंगत होवू दे...
दुरितांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥
पापाचा अंधार नाहीसा होवून, स्वधर्माचा सूर्यप्रकाश ओसंडू दे...इथं ज्ञानदेवांना ’धर्म म्हनजे ’संप्रदाय’ अभिप्रेत नाहीच मुळी...धर्म म्हणजे जसं...आईनं मुलांवर प्रम कराव, वडिलांनी त्यांचं पालन-पोषण कराव, शिक्षकांनी शिकवावं, शेतकर्‍यानं पिकवावं... माणूस म्हणून जन्मल्यावर ’माणुसकी’ हाच धर्म...तसा हा प्रत्येकाचा ’स्वधर्म’ जर प्रत्येकानं पाळला तर फक्त पुण्यच साचत जाईल. पापाला जागाच उरणार नाही...
मला जे मिळालं नाही त्याची मला खंत नाही, पण तुला जे मिळाल त्याचा मला आनंद आहे अशी भावना जेंव्हा परस्परांमधे निर्माण होईल तेंव्हा जीवांचं खरंखुरं ’मैत्र’...मित्रत्व, स्नेहभाव, एकात्मभाव, तादात्म्य निर्माण होईल...
वानगीदाखल उदाहरण...सचिनन शतक केलं किंवा अगदी सुंदर फटका जरी मारला तरी प्रत्येक भारतीयाच्याच नव्हे तर जगांतल्या प्रत्येक चाहत्याच्या हृदयांत आनंदाचा उचंबळ येतो...ते ’मैत्र’ अभिप्रेत असावं माउलींना......
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भू मंडळी । भेट तू भूता ॥
सर्वांच्या कल्याणाची अखंड कामना, इच्छा, अपेक्षा मनांत ठेवून जे’ईश्वर’ आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवणार्‍यां जनसमुदायाचा सागर विश्वभर उसळो...
प्रत्यक्षांत, विचार करून पाहा...आपण जे नाहीस होणार आहे, लय पावणार आहे, अस्तास जाणार आहे, म्हणजेच जे ’नश्वर आहे त्याच्या मागे धावत असतो...म्हणजेच आपण, ’नश्वर’निष्ठ असतो ’इश्वर’निष्ठ नसतो
चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचितामणींचे गांव । बोलते जे अर्णव । पियुषाचे ॥
मनांत नुसती कल्पना केली तरी प्रत्यक्ष देईल अशी ख्याती असलेला ’कल्पवृक्ष’, एक नाही, तर त्यांचे ’चला’ म्हणजे चालणारे स्थलांतरपात्र समूह, बगीचे, आणि चिंता,काळजी,भयमुक्ती देणारी हितचितक ’रत्न’, ज्यांचा शब्द म्हणजे, रंजल्या-गांजल्या जीवांचं शांतवन करणारं अमृतच जणू
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । जे सर्वाहि सदा सज्जन । सोयरे होतु ॥
ज्यांच अस्तित्व चांदण्यासारखं शीतल, निर्व्याज, निरपेक्ष आणि निष्कलंक आहे, जे शक्ति-आरोग्यवर्धक असून क्लेशदायी नाहीत, जे नेहमीच ऋजु, सौम्य, आल्हाददायक आहेत अश्या सुहृदांचा, आप्तांचा सहवास लाभू दे...
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । दृष्टादृष्ट विजये । होवावेजी ॥
अक्षर-साहित्यांत कार्यरत असलेल्या, ग्रंथ लेखन वाचन कथन यावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उपजीविका करणार्‍या अभ्यासकांचं कल्याण होवो...
किबहुना सर्व सुखी । पूर्ण होवोनि तिन्ही लोकी । भजीजो आदिपुरुखी । अखंडित ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दान पसावो । येणेवरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
अविरतपणे त्या ’आदि-अनंत-रूपा’चं स्मरण करीत, कर्म करणार्‍यांना हा प्रसाद मिळाला तर मी समाधान पावेन...
तसं पाहिलं तर, पसायदानातल्या कुठल्याही ओवींतला एक चरण जरी प्रत्यक्षांत आला तरी सर्व-सहज-साध्य होईल. पण ज्ञानदेवांनी, द्विरुक्तीच नाही तर विविधांगी पुनरुक्ती करीत हे ’लोककल्याणार्थ’ दान मागितल आहे...
अखेरीस, ज्या प्राचार्य राम शेवाळकरांनी ’पसायदानां’तलं हे सर्व ’गूज’ (’गूढ’ ?) उलगडलं, त्यांचं स्मरण अपरिहार्य आहे...
*****

No comments:

Post a Comment