Tuesday, April 7, 2015
।।भक्तिबोध।। तुर्यावस्था।। भाग १ पर्यंत
दानाने माजती फुकटे। श्रीमंती वाढवू। कष्टेविण
मागील भागातल्या आशयाचा संदर्भ घेऊनच आजचा विचार मांडत आहे!
जेव्हा, भिक्षेकर्यांना उमगते की भाबडी जनता, दानाने मिळणार्या `पुण्या’च्या लोभाने, आपल्या `आशीर्वादा’साठी, झोळीत भिक्षा `पाडता’ यत.. म्हणजे इकडून भिक्षादान केले की तिक डे पुण्याच्या घडय़ात भर पडून आपण हळूहळू `पुण्यात्मा’ होणार या भ्रामक (अंध)श्रध्दापूर्वक भावाने हरखून जात…आणि परस्पर आपली `12′ चा वेळ भागवतायत, तेव्हा त्यांची कर्माबाबतची स्पृहाच नाहीशी होवून, त्या दृष्टीने कां होईना `निस्पृह’ होतात !
भिक्षेची झोळी रुंद ।
भोजन करी अनिर्बंध ।
दात्यापाठी बोल अर्वाच्य बेबंद ।
उच्चरिती ते भोंदू ।।69।।
निष्क्रिय आळशी गांजेकस ।
फासुनी रक्षा अंगास ।
तप्श्चर्येचा उभारती आभास ।
सावध ऐशांपासून ।।70।।
दानाने माजती फुकटे ।
कुरण आपले ऐसे वाटे ।
तुपाचे भरुन नेती लोटे ।
स्वगृही वोतावया ।।71।।
दानें माजविले ऐतखाऊ ।
मिळेल ते वोरपून घेऊ।
म्हणति `श्रीमंती’ वाढवू ।
कष्टेविण ।।73।।
भाबडय़ा `दानशूरांना’ हे कळत नाही की अशा `अपात्री’ दानाने ते अशा फुकटय़ांची जमांत वाढवून, कर्मपरावृत्तीला नकळत प्रोत्साहित देतायत ! ‘अरे, एवढा धडधाकट आहेस ! भिक्षा मागण्या ऐवजी काम माग की ! ते कर आणि पुरेपूर मोबदला घेऊन जा ! कष्टाने मिळवलेली भाकर जास्त ग्वाड लागते मांडय़ा ल्येकरा !’ असे कोणी अनुभवी वृध्दा, या ऐतखाऊंना कानपिचक्या देऊन कां त्यांच्या डोळ्यांत झणझणींत अंजन घालीत नाही ? अर्थांत, भीक मागणे आणि कवळ्या कच्च्याबच्च्याचेच अपहरण करून, त्यांना अपंग करून भीक मागायला लावणे हा जिथे आपल्या `महान भारत’ देशातला एक व्यवसाय आहे, तिथे ही अपेक्षा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. गरीबाला गरीबच ठेवण्याचा `उद्योग’ राजकारण्यांमध्ये जारी आहे, तसेच काहीसे हे ! नाही कां ?
अरुण काकतकर 9822021521…
जनसामान्य पोटार्थी व्यस्त । विविध उपद्रवाने त्रस्त ।
तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल पण श्रीकृष्ण आणि ज्ञानोब्बा माउली या वैश्विक अद्वितीय विद्वत्तामूतvची जन्मरास एकच म्हणजे वृषभ होती, असं मी कुठतरी कुणा तज्ञाकडून ऐकल्याचं स्मरतो !
वृषभ राशीचे वैशिष्ट्य म्हणजे आसक्ती आणि विरक्तींचा विलक्षण संगम! कृष्ण तर भोगी होता हे सर्वश्रुतच आहे, आणि तो योगेश्वर होता याला गीतेपेक्षा आणखी प्रमाण काय हवं? माउलींची विरक्ती वादातीत! तरीपण कधीतरी मांडे खायचा मोह झालांच की ! म्हणूनच `संभवामी युगेयुगे’ झाली तरी ती `मनुष्येच’ होती.
सत्व-रज-तमाचा योग्य मेळ ।
मन-शरीरासाठी सर्वकाळ ।
घालोनि करी प्रतिपाळ ।
तोचि गोपाळ योगि-भोगी।।74
ऐसा ठेवावा आदर्श ।
शिरोधार्य ज्याचा स्पर्श ।
पंचमहाभूत सदेह सदृश ।
अंतर्लहरी कल्लोळवी ।।75
तारे-वारे-धरा-तेज ।
जळाचे सुखद हितगुज ।
सत्य-शिव-सुंदराचे बीज । एकवटले ते ठाई ।।76
तरीसुध्दा, `साधु साधु’ म्हणत, भाबडे-भोळे आणि त्यांच्या भोवती, मोक्ष-गत्यादि मोहक मोहोळांचे जाळे विणायला उत्सुक ऐतखाऊं साधूंची पिलावळ हा या विश्वाला मिळालेला शाप म्हणावा लागेल !
`स्वखर्चानं या आणि मंदिर उभारणीसाठी कार्यसेवा करा हा नारा कांहीवर्षांपूर्वी घुमत होता, आठवतय! त्या नेत्यांना राष्ट्रउभारणीसाठी अधिक
प्रमाणांत कार्यसेवा करायला `भाविकां’ना उद्यपक्त करांवसं कां वाटलं नाही हे मला तरी कोडच आहे.
जनसामान्य पोटार्थी व्यस्त ।
विविध उपद्रवाने त्रस्त ।
श्रवणेंद्रिये राखिती निद्रिस्त ।
`असल्या’ हाका ऐकावया ।।77
काय म्हणोनि `कारसेवा’ ।
अन्य बसून सेविती मेवा ।
श्रेयाप्रती दावीत दावा ।
तथाकथित संत, ज्ञानी ।। 78
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-42
नात्यातले बंध टिकवण्याची जबाबदारी नवदाम्पत्यावर
संसार उधळतां वार्यावरी ।
तरिहि चित्त थार्यावरी ।
ठेवोनि, प्रयत्न परोपरी ।
करिती तें धैर्यशील ।।87
माय-बाप-अस्तुरी ।
पोरे-सोरे किनार्यावरी ।
सोडून उपदेशाच्या आहारी ।
जाय तो शतमूर्ख ।।88
इथं, कुसुमाग्रजांच्या, गाजलेल्या, `कणा’ या कवितेचा नायक आठवतो ! तो म्हणतो,
`मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवर हात ठेवून, सर फक्त लढ म्हणा’
पण हा संसार थाटतांना विचारपूर्वक नियोजन करांवं लागतं !
उतावळा गाठे बोहले ।
बाशिंग गुडघ्याला बांधिले ।
सजवे `तच्या’ कंठी डोरले ।
पाही स्वप्ने बेभानं ।।89
तरुणपणी शारीर इच्छापूर्तीसाठी विवाहोत्सुक होणं, समाजनीतीप्रमाणं अगदीच स्वाभाविक असतं. पण केल्या विवाहानं, नुसती दोन माणसंच पति-पत्नी नात्यानं जोडली जात नाहींत, तर दोन कुटुंब, त्यांच्या आप्तेष्टांसहित जोडली जावून, अतूट बंध निर्माण होतांत. मग हे बंध टिकवण्याची, दृढ करण्याची जबाबदारीही नवदांपत्यावर पडते. यालाचं म्हणतांत संसार ! मग पुढच्या काळांत, अध्यात्म वगैरे बाबींच्या मागं लागून संसार दुर्लक्षिणारा महत्पापी समजावा !
क्षणोक्षणी सावध राहाणे ।
हे आम्हा सामान्यांचे जिणे ।
दृश्यादृश्य शत्रूंशी दोन हात करणे ।
मार्गक्रमितो अहोरात्र ।।90
परंतू याची खंत ।
मनाशी नाही यत्किंचित ।
जिणे `तसले’ गुळगुळित ।
संघर्षाविणा ओशाळवाणे ।।91
अशा संघर्षांतून वाटचाल करणार्या `भल्या’ मंडळींना, अध्यात्मा’चं व्यसन लावून, त्यांना कळपांत ओढीला उत्सुक असणार्यांपासून सावधच असायला हवं!
अर्धपोटी उपदेश कैसा ।
रुचतो-पचतो न तो सहसा ।
पसरता जाणिवांचा पसा ।
अपेक्षा क्षुधाशांतिची ।।92
बाष्फवत् जिणे तुमचे-आमुचे ।
धरू पाहाता हाती न यायचे ।
कोणा नकळत विरून जायचे ।
जाणिवे पल्याड ।।93
अरुण काकतकर 9822021521…
भाकरीसाठी अखंड भय
आपापल्या श्रध्येयाच्या दर्शनार्थ, भाविक, भक्त ठिकठिकाणी, मंदिरांत प्रार्थनास्थळी, तीर्थक्षेत्री जात असतात. तिथे श्रध्येयाच्या प्रस्तराकृती समोर बहुधा डोळे मिटूनच कां उभे राहतात, हे मला एक कोडच आहे. खरेतर उघडय़ा डोळ्यांनी न्यहाळले तर पंढरपुरची विठ्ठलमूर्ती म्हणजे वात्सल्यमूर्ती. डोळ्यात अपार प्रेम, माया ओतप्रोत भरलेली, मूर्तिकाराने घडवली आहे हे ती `दृष्टी’ असणार्याच्या सहज लक्षांत येतं ! तशीच, श्रवणबेळगोळाची महावीराची भव्य, एक प्रस्तरचा डोंगर
फोडून घडविताना, त्या मूर्तिकाराच्या सर्जनशीलतेबरोबरच त्याच्या रचना ज्ञानाचेसुध्दा
कौतुक करावे तेवढे थोडेच असे वाटते !
पण लक्षांत कोण घेतो ?
कसबी निपुण मूर्तिकार ।
आभूषणे वस्रालंकार ।
सजविण्या प्रस्तर निराकार ।
कोरिती छिन्नि-हातोडय़ांनी ।। 107
त्यास ना धर्म, संप्रदाय ।
कारागिरी हेचि कार्य ।
भाकरीसाठी अखंड भय ।
टोचतसे उदरांत ।ऑ। 108
मी माझ्या एका ।ऑ।भक्तिबोध।ऑ। भागांत `रंगमहती’ वर्णन करणार्या कांही ओव्या लिहिल्या होत्या. माझे सुहृद सुधीर जोगळेकरांना मी त्या पूर्वावलोकनार्थ पाठविल्या. त्यांना त्या भावल्यामुळे, त्यांनी त्या, झी वाहिनीच्या एक माजी निवेदिका शिल्पा देशपांडे यांना पाठविल्या. त्या वाचून त्यांच्या मनांत उचंबळलेला’रंगोत्सव कल्लोळ’ (कल्लोळ म्हणजे बंगाली भाषेंत `लाट’) मला पाठविला तो ओवी रूपांतच. तो असा..
रंग ! रंगाचिये डोही
रंग ! एकला स्वतःही
रंग ! धरुन राहतांत बाही
अस्तित्वहेतु, शुभ्राची ।ऑ।
रंग! वेदनेचे गीत
रंग ! आराध्याचा हात
रंग ! प्रभु अंतरात
जणू वसे ।ऑ।
रंग ! निर्मळाची साद
रंग ! ईश्वरी संवाद
रंग ! परा सर्व भेदाभेद
मानवता जैसी ।ऑ।
अशी ज्योतीनं ज्योत उजळत राहिली तर,
ओवी चालत
राहील अविरत।
शब्द-भाव ओवीत स्वच्छंद।
कांटेकोर पाळीत निर्बंध ।
वैयाकरणींचे ।ऑ। 109
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-44
। केवळ भूल-थापांची खेळणी ।
गाजरासम निर्दय दाखविती ।।
भक्ती कुणाची कुणी करावी । उक्ती निवडक गौरवावी ।
मुक्ती कधि `मैत्री(?)’स द्यावी ।
अतर्क्य, अनाकलनीय सारेची ।ऑ।
काय अवस्था झाली आहे सामान्यजनांची ?
कोणावर श्रध्दा ठेवावी ?
कोणती जीवनशैली
भ्रष्ट म्हणून नाकारावी ?
कोणती साधी, सरळ, सोपी म्हणून स्वीकारावी ? प्रामाणिक, सुकृत आणि झुंडशाही, अत्याचार असा फरक कसा करावा हे त्याला कळेनासे झालेय ! संस्कृती आणि विकृती गळ्यांत
गळे घालून, स्वतःचे ध्वज,
निशाणं, परिचयचिन्ह मानावं मिरवायची सोडून, केवळ सत्ता-संपदेसाठी, स्वतःच्याच पायदळी तुडवायला धजू पाहातायत !
या बजबजपुरींत, दिशाहीन होऊन, भरकटतायत माणसं…
तत्वांशी फारकत घेणे ।
एकमेकांसि `समजुन’ घेणे ।
वेळप्रसंगी `वेल्हार’ही करणे ।
म्हणजेचि राजकरण भौ !।ऑ।
विधानगृहांत `हमरी-तुमरी’ ।
खुळ्या कार्यकर्त्यांत सुरामारी ।
हाकलली जाती मुकी `बिचारी’ ।
विरोधकांचे, गळे गळ्यांत ।ऑ।
राम नावांचा एक तत्त्वनिष्ठ राजा, ज्याचे मंदिर बांधण्यासाठी, `नेत्यां’नी अनेक कारसेवकांचे नाहक बळी देऊन, त्या बरबटलेल्या श्रेयाच्या जोरावर सत्ता मिळविली, तो या देशांत कधीकाळी होऊन गेला हा इतिहास की भाकडकथा ?
कधी उघडणार डोळे जनता ?।
कधी मिळणार महत्त्व मतां ?।
कधी आपदांतुनि मुक्तता ।
मिळणार ? ।ऑ।
`निर्लज्ज’ प्रतिष्ठित सिंव्हासनी ।
आपलीचि पापे, कर्मकहाणी ।
केवळ भूल-थापांची खेळणी ।
गाजरासम निर्दय दाखविती ।ऑ।
लोकहो ! निवड करतांना, शिजवलेल्या भाताबरोबर, कांही वेळानं क्षुधाशांतीसाठी ग्रास घेतांना, दाताखाली खडे, गार येणार नाही अशा प्रकारे सावध नजरेने, जे निवडायचे ते निवडा !
अन्यथा तो घास नुसता चिवडत बसावा लागेल…
मांजरासारखा प्राणीसुध्दा
पेचांत सांपडला तर थेट
समोरच्याच्या नरडय़ावर उडी
घेतो.. सुज्ञांस अधिक सांगणे
नलगे…
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-46
तोच `आदर्श’ ठरेल संसारी।
तैसीच माव राक्षेसांची ।
देवांसही वाटे साची ।
पंचवटिकेसि मृगाची ।
पाठी घेतली रामें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 06/08/27
तसेच राक्षसांनी घेतलेली मायावी रूपे प्रत्यक्ष श्रीरामांनाही खरी वाटून कांचनमृगरूपी मारिच राक्षसाचा पंचवटीमधे पाठलाग केला. मनुष्यरूपात असल्याने माया सत्य आहे असे परब्रह्मस्वरुप रामचंद्रांनाही वाटले. सामान्य मनुष्यालाही 24 तास प्रत्यक्ष दिसत असलेले बहुरंगी मायिक विश्व सत्य वाटले तर काय नवल ? तरीही ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या हाच सिद्धांत होय. देवशोधन दशक, दृष्यनिरसन समास. रामाचं `मनुष्यत्व’, त्याच्या आदर्शवादाला वंदन करणार्या भाविकांसाठी व्यक्त करतांना दासांनी हे सांगितले!
तरीसुध्दा वाटतं, असा कसा,
पाहता पाहता दृष्टांत झाला ।
`राम’ मनुष्यांत आणुनी बसविला।
सामोरा गेला सुख-दुःखाला ।
कर्मयोगी सामान्य ।। 1063
परि तत्वनिष्ठा राजपदाची ।
त्यजुनी प्रीती स्वपतिनीची ।
अपेक्षापूर्ती सर्वसामान्यांची ।
मूकपणे केली `आदर्श’ ।। 1064
पण त्यापूर्वी, पितृआज्ञेने वनवासी झाल्यावर, एकपत्निव्रती रामाने, दैत्यांचे मायाजन्य सुवर्णमृग, न ओळखल्याने, आणि मज आणुनि द्या तो हरिण आयोध्यानाथा अशा लाडिक मागणीला, सर्वसामान्य माणसासारखे बळी पडून, प्रिय पत्नीला लक्ष्मणाच्या सुरक्षा भरवशावर सोडून, निबिड आरण्यांत, चाप-बाणासह धांव घेतलीच…
द्विधा मनःस्थिती रामाची ।
करावी हत्या सुवर्णमृगाची ?।
की दैत्यांच्या अनन्वित अत्याचारांची।
अखेरीस अस्तुरीच्छा ठरली श्रेष्ठ ।। 905
माय-तांत, अस्तुरी घरी ।
नंतर लष्करच्या भाकरी ।
मनोमन जाणिले अंतरी ।
आदर्श रामाने सुध्दा ।। 906
ऐशा रामाच्या पावलावरी ।
ठेवून पाउल जो वाटचाल करी ।
तोच `आदर्श’ ठरेल संसारी ।
निश्चितपणे ।। 907
त्याने धारिले चाप-बाण ।
हेतु ? भयग्रस्त उध्दरण ।
परंतु निराकरण करून ।
इच्छा-अपेक्षांचे आप्तांच्या।। 908
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-46
आई-बापांचे सोडून जाणे आणि संसारातील तुटणे
ज्याचिये आवडी ।
संसार त्यजिला ।
तेणे कां अबोला ।
धरिला गे माए?।।
माउलींची एक विरहिणी आपली आर्त व्यथा मांडतेय!
जवळपास सात शतकाहून अधिकच काळ लोटला असेल ही हृदयीची, विरहोपजीवी तळमळ उक्तींतून व्यक्त व्हायला! संत ज्ञानेश्वरादी त्या चार भावंडांना, एकेदिवशी, पंच पंच उषःकाली, आपल्या माय-बापानी, आपल्याला असे पोरके ठेवून, नदीपात्रांत प्राणाहुती दिल्याचे कळल्यावर काय अवस्था झाली असेल त्यांच्या मनाची! त्यांची ती अवस्था सतत मनात राहिल्यामळेच कदाचित, माउलींच्या विरहिण्या इतक्या आर्त झाल्या असाव्यांत कां ?
ज्यांनी हे तुटणे भोगलय ती व्यक्तीच ते जाणू जाणे!
खरंच! तुटणं, दुरावा फार क्लेशदायक असतांत!
सप्तशतकी प्रदीर्घ काळ लोटला तरी हे तुटणे दुरावणे माणसांना कांही चुकले नाही!
सप्तशतकं कशाला? अगदी क्रौंचद्विज युगुलाच्या ताटातुटीपासून.. कदाचित विश्वनिर्मितीच्याकाळी, महाप्रचंड आकाराची, महास्फोटांनंतर शकलं होऊन, आकाशगंगेतल्या दृश्य आणि त्याही पलीकडच्या अदृश्य अगणित तारकामंडलांतल्या सूर्यमालिका निर्माण झाल्या त्या अशा तुटण्यांतूनच ना? अगदी नवजात तान्ह्याची, देवकीच्या कान्ह्याची नाळ `माए’ पासून तुटली तशी! तशी बिचारी, आपले `आईपण’ सुध्दा भोगू शकली नाही! कारण,
`नंदभवन नंदलाल
ठुमक चलत आगे।
पीछें माँ यशोमती,
बाबा नंद आगे।
लाल चलन लागे।।’
असं पंडित नरेंद्र शर्मांनी वर्णन केलय, त्या गवळ्याच्या खटय़ाळ छकुल्याचे! देवकी बिचारी वंचितच राहिली या कौतुकाला, जन्मदात्री असून! प्रीती, वात्सल्य, माया, ममता, ही सगळी अतीव भक्तिजन्य रूपे.. प्रत्येक भावनेचा रंग, खुमारी, खोली आणि कधीकधी मत्सरापोटी विखारसुध्दा… जिथे आहेत, तिथे हे `तुटणं’ तर वेदनांचा आगडोंब उठवून सहन करणार्याला अर्धमेलं करत! पूर्ण जीव न घेतां, त्या वेदना भोगण्यापुरता जीव जिवांत ठेवतच ते `तुटणं’!
अरुण काकतकर 9822021521…
मुखपृष्ठ » संपादकीय »
भक्तिबोध-47
भक्तिजन्य व्यथांची करुण कथा…
राज्ञी कुंतीची अवस्थासुध्दा, देवकीपेक्षा वेगळी नव्हती. कारणे वेगळी होती. तिकडे कंस मामाचे, भयगंडापोटी निर्माण झालेले क्रौर्य, तर इकडे कुमारी माता कुंतीचे,लोकलज्जाजन्य भय ! त्यामुळे कांही क्षणांपूर्वी, नाळ तुटून, पहिला श्वास घेतो न घेतो तोच, कर्णाला टोपलींतून नदीपात्रांत सोडून द्यायला लागल्यामुळे ज्येष्ठ पांडव (?) असूनसुध्दा, त्याला कौरव दरबारातल्या केवळ सेनापतीपदापर्यंतच्या अतर्क्य प्रवासाला प्रारंभ करावा लागला होताच ना ?
अशीच एक विरहव्यथाजन रचना पाहा, हृदय पिळवणूक टांकणारे !
वाचल्यानंतर वाटेल, ही तर,`मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरा न कोया ।’ म्हणणार्या मीरेची व्यथा तर नव्हे ?
सर्वस्व तुजला वाहुनी,
माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारें तुला ?
सांगू कसे रे याहुनी ?
घरदार येते खावया,
नसते स्मृतींना कां दया ?
अंधार होतो बोलका, वेडय़ापिशा स्वप्नांतुनी
ज्ञानपीठाधीश किंवा त्याहूनही जास्तच योग्यतेच्या, कविवर्य कैलासवासी विंदा करंदीकरांचे हे काळीज चिरून टाकणारे शब्द, मागील भागात उल्लेखिलेल्या माउलीच्या विरहिणींतल्या उक्तींइतकेच उत्कट नव्हेत काय ?
या सगळ्या भावना भक्तिजन्य ! त्यांचा, विशेषतः प्रीतभावाचा स्पर्शच नको म्हणून तिचं वर्णन करणार्या या पंक्ती लिहिल्यांत,
कविराज मित्रवर्य सुधीर मोघ्यांनी
`प्रीती आभासाची काया, प्रीती स्वप्नांतली माया प्रीती घातकी किमया, प्रीती जाळणारी छाया’
पोएट् बोरकर तथा `बाकीबाब’ या दुराव्याबद्दल काय म्हणतांत ते मी मागील एकां भागांत उधृत केलय !
पण या आशयाच्या अनुषंगानं त्यांचं पुनःस्मरण करायला काय हरकत आहे?
पत्निविरह जाचक ठरतो आणि मग कवीचं मन भळभळायला लागतं..
`तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसूंही सुने, सुके
मुले मांजरापरी मुकी अन् दर दोघांच्यामधे धुके’
तर..
अशी ही भक्तिजन्य व्यथांची करुण कथा…
अरुण काकतकर 9822021521..
भक्तिबोध-48
भाषेच्या `मुळाक्षरां’ चा धांडोळा कशासाठी?
जगामध्ये शेकडो भाषांमधे हजारो ग्रंथ पारमार्थिक उन्नतीसाठी लिहिलेले आढळतात. त्या सर्वांमधून परमेश्वराचे जे सत्यरूप आहे तेच वेगवेगळया उदाहरणांतून सांगितले आहे.
ज्याची श्रवणेंद्रिये सक्षम, सजग आहेत, ते त्यांच्या बालपणापासून, माय-बाप, असल्यास थोरले बंधू, भगिनी, आजी आजोबा यांचे बोलणे, एकमेकांशी संवाद, संभाषण ऐकले हळूहळू भाषा आत्मसात करू लागतात. सुरुवातीला असतो निरर्थक नाद, मग मातेला, त्याने आधी `आई’ असे म्हणावे म्हणून ती त्याला `आ’ म्हणायला शिकवू लागते. कारण `अ’ कार हा वैश्विकनाद ॐ चं आद्याक्षर.. अ+उ+म..आकार चरण युगुल्। उकार उदर विशाल्। मकार महामंडल । मस्तकाकारे ।। काय सुंदर वर्णनांतून माउलींनी आद्यदैवत, `विघ्न’`हर्ता’गणेशु, सकलमतिप्रकाशु’ चे ओविरूप घडवलय ! आणि स्वरोच्चाराला आवश्यक असतात फक्त कंठ त ंत आणि बहिर्गमित्र हवा म्हणजे उश्वास. ते ना ओष्ठ्य. ना दंत्य वा दंत्योष्ठ्य, त्यामुळे उच्चारणाला सगळ्यांत निर्विकल्प. काय गंमत आहे पाहा ! निसर्गाने कर्णबधीरालासुध्दा, `अ अ’ उच्चारायची क्षमता दिली आहे, न ऐकता सुध्दा !
असो…
भाषेच्या `मुळाक्षरां’ चा हा धांडोळा कशासाठी ?
तर.. आधी श्रवण, मग वचन किंवा उच्चारण, नंतर वाचन, तर्क-बुध्दीयोगे आकलन.. अशी दीर्घ तपश्चर्या असते बालकाची अध्ययनपूर्व !
मी हे सगळं लिहिलय कारण उद्यापासून तिकडं `घुमान’ला, सगळे साहित्यिक आपापल्या `ग्रंथघागरी’ फुंकून घुमायला सुरुवात करतील ! त्यांना हे भान असणारच !
ज्यांच्या भानाबद्दल वाचकांच्या मनांत निश्चिती असते त्यांची उपस्थिती अभावानेच जाणवत आली आहे आजवरच्या संमेलनांत !
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-49
जमला घुमानि हा मेळा । नामदेवाच्या नावानं चांगभलं।।
विकू या ! कादा, मुळा, भेंडी ।
काढू चला ग्रंथ दिंडी ।
जमला घुमानि हा मेळा ।
लेखकू, कविनो पळा पळा ।
ब्रह्मानंदी हो टाळी ।
भेटता `भूते’ गळा गळी ।
त्यास्तव संधि मिळे येथे ।
परतुनि जाय ! नको वाटे ।
चर्चा, वादविवाद, भाषणे ।
आकळत नाहि किं कारणे ।
त्यातुन मथित कसे कांही ।
आडसालिही दिसत नाही ?।
कांही नाही ! घेउया मजा ।
वाटले, दाटलि मनि इच्छा ।
`आंबट द्राक्ष वेलिवरची’ ।
मूषक मी करि ‘चीं चीं ।
म्हणोनी मोडकी तोडकी, जी ।
अल्पाक्षरि सादर माझी ।
आज आत्ता किंवा काल, तिकडं सम्मेलन, मनोमीलन कांहींकरिता मधुमीलन (सुध्दा) स्थळी `परत परत तेच तेच या न्यायानं, `नेमेचि’ निघणारी, `ग्रंथदींडी’ मार्गस्थ झाली असेल, `नामदेवाच्या नावानं चांगभलं’ अशा आरोळ्या देत.
आणि आपल्या सगळ्यांना विदित आहेच की..
दासच सांगोनि गेले ।
नाही कांही जर लिहिले ।
अनुभव व्यर्थ गेले ।
रोजचे अनमोल ।।
असो.. विनोदाचा भाग सोडू !
तिथं आज अनेक वैचारिक, संशोधनात्मक ग्रंथ, कादंबर्या, लघुकथा संग्रह, कविता संग्रह..
कांही लोक `चारोळ्या’ म्हणतांत त्यांना, जो शब्द ऐकून मी खंतावतो, कारण ती एक सर्जनशील निर्मिती असते… हे सारं रसिक वाचकांना भेटणार आहे त्यांच्या कसबी कर्त्या-करवित्या सह, स्वाक्षरीनं अलंकृत करता येणारं !
त्यांतल्या भाषेच्या विविध शैली पाहिल्या, तर तुमच्या लक्षांत येईल..
संवादार्थ बोलीभाषा ।
उपदेशार्थ ग्रंथभाषा ।
प्रणय-प्रेमार्थ स्पर्शभाषा ।
प्रमाणभूत विश्वांत ।। 117
अश्रू ! भाषा सुख-दुःखाची ।
शीर्षशूळ ! संताप-क्रोधाची ।
भावमुद्रा ! नृत्याभिनयाची ।
निःशब्द, सर्वमान्य ।ऑ। 118
वृध्दाप्रती मार्दव । बालांप्रती लाघव । प्रणयाराधनी आर्जव ।
संवादांत बाणवावे ।।122
स्पर्धेमधे प्रभुत्व । कार्यामधे ममत्व । धनसंचयोत्तरी दातृत्व ।
रुजवू, फुलवू अखंड ।। 123
अरुण काकतकर 9822021521….
भक्तिबोध-49
साहित्यकृतींच्या अवतरणासाठी `निरभ्र आकाशाचे लेणे’
निसर्गाच्या विविध तर्हा ।
उ द्ध्वस्त करिती घरसंसारा ।
तेल घालोनि ठेवावा पहारा ।
लागतो नजरेचा ।। 1085
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकरांचा जन्म जरी पुण्याचा, तरी उभे आयुष्य गेले गोदामायच्या सान्निध्यात नाशिकग्रामी ! तिथे विविध ऋतुंमधली पाण्याची, म्हणजे दुष्काळाची आणि वर्षाऋतुतल्या किंवा अवकाळी कोसळलेल्या पावसामुळे आलेल्या पुराच्या अक्राळ विक्राळ रूपाशी त्यांचा दीर्घ परिचय होता. त्यांतूनच कथासदृश `कणा’ जन्मी असेल
कां? कविता कल्पनाविश्व, परकायाप्रवेश आणि प्रत्यक्ष अनुभव यांतूनच प्रसवते ना ?
किंवा,
`अभंग नाही नाही ओवी,
मूक जिवाने कशि रे गांवी ?नयनामधले अश्रू करिती
अखेरचा धावा…
उघड नयन देवा’
हे सिध्दकंठ माणिकताईंचं, व्यथाबाधितांचं प्रातिनिधिक आर्त ऐकताना वाटतं की, कविवर्य रा. ना. पवारांनी, मुक्या जीवाच्या.. अगदी वाचाहीन मनुष्यापासून ते मुक्या जनावरांच्या `नयना’तले अश्रू पाहायला त्या, आंधळ्या अभावदेवाला त्यांचे ` नयन’ उघडायचे आवाहन केलय, ते परकायाप्रवेशाद्वारेच ना ?
किंवा, सिध्दहस्त कवि मंगेश पांडगांवकरांनी, ‘श्रावणांत घन निळा बरसला…’
हे संगीतकार श्रीनिवास खळ्यांनी चार अंतरे चार वेगळ्या रागिण्यांमध्ये स्वरबध्द करून, ते दीदींकडून गाऊन घेऊन अजरामर केलेलं गीत लिहितांना निसर्गचक्रांतली…
पानगळ, पुन्हा पालवी ।
आषाढांत जळे नवी ।
श्रावणांत वाटे हवी हवी ।
सणवारांची बरसांत ।। 1086
शरदातले टिपुर चांदणे ।
निरभ्र आकाशाचे लेणे ।
शिशिरांत हुडहुडीची आवंतणे ।
परतुनि येण्या शिलेदारा ।। 1087
ही क्रमणा त्यांच्या अंतर्मनांतूनच उचंबळली असणार !
तसेच, विविध प्रकारच्या साहित्यकृतींच्या अवतरणासाठी जीवनानुभव ते कल्पनाविश्व साहाय्यभूत ठरतच असणार.
जेव्हा लेखक कागदावर लिहीत साहित्यनिर्मिती करीत तेव्हा ते, विशेषत्वाने काळजी घ्यायचे ती..
प्रीती, अक्षरांच्या वळणावर ।
आसक्ती शब्दांपल्याडल्या आशयावर ।
भक्ती लेवुनी साहित्यसंपदेचे पर ।
ज्ञानमार्गे झेपावी ।। 1088
या अपेक्षेनं……
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-50
घुमानमध्ये खल झाला कशाचा…
वाटोळे सरळें मोकळें।
वोतलें मसीचें काळें।
कुळकुळीत बळी चालिल्या ढाळें।
मुक्तमाळा जैशा।
अक्षरमात्र तितुकें नीट।
नेमस्त पैस काने नीट।
आडव्या मात्रा त्याहि नीट।
आर्कुलीं बेलांडय़ा।
पहिलें अक्षर जें काढिलें।
ग्रंथ संपे तों पाहाता गेलें।
येका टाकेंचि लिहिलें। ऐसें वाटे।
अक्षरांचे काळेपण।
टांकांचें ठोंसरपण।
तैसेंचि वळण बांकाण।
सारिखेंचि।
वोलीस वोली लागेना।
आर्कुली मात्रा भेदीना।
खालिले वोळीस स्पर्शेना।
अथवा लंबाक्षर।
पान शिषानें रेखाटावे।
त्यावरी नेमकेचि ल्याहावें।
दुरी जवळ न व्हावें।
अंतर वोळीचें।
कोठें शोधासी आडेना।
चुकी पाहातां सांपडेना।
गरज केली हें घडेना।
लेखकापासूनी।
ज्यांचे वय आहे नूतन।
त्यानें ल्याहावें जपोन।
जनासी पडे मोहन।
ऐसें करावें।।9।।
बहु बारिक तरुणीपणीं।
कामा नये म्हातारपणी।
मध्यस्त लिहिण्याची करणी।
केली पाहिजे।
कमाल आहे दासांची! त्रिवार दंडवत! त्याकाळी, लिखाणांतल्या अक्षराबद्दल, र्हस्व-दीर्घाच्या नियमांबद्दल, लेखनाच्या आशयाबद्दल, लिहिणार्याच्या वयाबद्दल आणि लेखनक्षमतेबद्दल, इतकं स्पष्ट आणि सोपं विवेचन केलंय दासांनी !
उद्या, गेले तीन दिवस साहित्यजत्रेंत घुमत असलेल्या, तात्पुरत्या `घुमान’वासी साहित्यिकांना, एकमेकांपासून दूर जातांना काय वाटणार ? कोण जाणे..
विरहवेदना की सुटकेचा निःश्वास?
मला वाटतं,
ऋचा, श्लोक आर्या, ओवी ।
गण-गौळण, लावणी आसमंत घुमवी । फटका, पोवाडा,
वा मुक्तछंद, नवी । गीतांचीच रूपे अभंग ।। 1089
वर्णन, निरूपण, निवेदन, कथा ।
निबंध, दीर्घांक, चरित्र, गाथा ।
समीक्षा, विश्लेषण वा ग्रंथा ।
संशोधनोत्तर मांडणी
अनिवार्य ।। 1090
जैसे, वर्णनहेतु निरीक्षण।
निरुपणपूर्व आकलन ।
दीर्घांक फुलविणे प्रसंगांतून।
उदाहरणार्थ ।। 1091
समीक्षापूर्व बारकाव्यांचा अभ्यास।
चरित्रासाठी जीवनानुभव विशेष।
आशय करितो, गाथा,
वा ग्रंथास। आकलनयोग्य
अध्याययोगे ।। 1092
या सर्व बाबींचा खल, नक्की झाला असणार तिथं….
अरुण काकतकर 9822021521….
मुखपृष्ठ » संपादकीय »
भक्तिबोध-50
पूर्णावस्थेशी समन्वय साधणारी तुर्यावस्था
तुर्या म्हणजे काय? समाधी अवस्थेत तुर्यावस्थेचे स्थान काय?
हिंदू तत्ववेत्ते, अरविंद शर्मा, तुर्यावस्थेचे वर्णन करताना म्हणतात की, ती रुपयाच्या चौथ्या भागासारखी असते. ती केवळ प्रातिनिधिक किंवा शब्दार्थापुरती मर्यादित नसते, तर ती संपूर्ण रुपयाची क्रयशक्ति धारण करणारी अवस्था असते. कारण रुपयाच्या पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या भागातले पूर्णावस्थेशी समन्वय साधणारी आणि सांधणारी अशी तिची अस्तित्वरूपी अवस्था असते..
तुर्या! भाग जगण्याची
असतो चौथा ‘
तुर्या! महति तिची ऐका।
तुर्या! अस्तित्व
सांभाळणारी नौका।
भवसागरी ।। 1073
ते पुढे एक सुंदर उदाहरण देताना म्हणतात, की कल्पना करा, चार पाण्यात भरलेले कलश एकावर एक असे रचून, एका टेकडीवर ठेवलेले आहेत. अशा रीतीने की टेकडी चढून गेल्यावर ते दृश्यमान होतील. एकएक कलश, निम्नस्थानापासून, जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि पूर्ण निद्रावस्थेचे द्योतक आहेत. या टेकडीचे शीर्ष म्हणजे तुर्यावस्था, तिच्या अस्तित्वामुळे, तिच्या योगे आपल्याला वरच्या तीन अवस्थाचे दर्शन घडते किंवा भान लाभते !
वरचे तीनही कलश किंवा अवस्था या चौथ्या म्हणजे टेकडीच्या प्रातिनिधिक अवस्थेच्या अस्तित्वाशिवाय, व्यर्थ आहेत. ती अवस्था म्हणजे तुर्या!
घट वरचा! द्राव दृश्यमान।
घट मधला! द्रावासि झाकलेपण।
घट तळाशि! द्रावास सगळ्या आधार कोण?
भंगला जर ।। 1078
म्हणजे थोडक्यात, संधिकालोत्तर निशेचा उदय होताना, दिनकराच्या साक्षीने कर्मयोग साधल्यावर, श्रमलेल्या शरीराला, थकलेल्या मनाला, कुटुंबांतले परतून आल्यावर, माय-तांत, पत्नी, लेकरे यांच्या नुसत्या दर्शनाने काही क्षणात मिळणारा दिलासा, `तकवा’ सोबत घेऊन निद्रादेवीची प्रार्थना म्हणजेच `तुर्या’ असावी कां?
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-50
मासा, कासव आणि निद्रावस्थेतील ज्ञानदृष्टांत
तुर्येसंदर्भांत शर्माजी आणखी एक अप्रतिम उदाहरण देतात. कासव आणि मासा यांची तुलना ते करतात ! कासवाला निसर्गानं पाण्यांत आणि जमिनीवर, दोनीही माध्यमात जीवनशैली सहजपणे विनासायास, व्यतीत करण्याचे वरदान दिले आहे. परंतु माशाला फक्त पाण्यातच आपले जीवनक्षेत्र मर्यादित कराव लागते. पाण्याबाहेर त्याचा जीव कासावीस होतो.
ते म्हणतात पाणी म्हणजे `माया’आणि अवनी किंवा भूमी म्हणजे प्रदीप्त, पवित्र धरा ! म्हणजे माशाला त्या प्रदीप्त पावित्र्याचा अनुभव घेण्यासाठी मृत्यूला कवटाळावे लागते किंवा जळतळाच्या भूभागावर जाऊन ते दिव्यानुभव घ्यावा लागतो. तरीसुध्दा ती अतृप्तेच्छा किंवा अपूर्णानुभवच ठरतो. कारण माशाला बाधित दृष्टी, म्हणजे अविद्ये समान..असल्यामुळे तो त्या पूर्ण प्रदीप्त दिव्यानुभवापासून वंचितच राहातो आणि जळातळीच्या, भूभागाजवळच्या जळाचे स्वरूप, म्हणजे `माया’, कर्दम मिश्रित गढूळंच असतं.
तुर्या नसलीच जर गाभ्यांत ।
चर्या असली जरि अस्तित्वांत ।
सूर्यासहि आणणे टप्प्यांत ।
तिला ! दुरापास्त ।। 1072
ते पुढ विवेचन करतात की गाढ़ निद्रा तुम्हाला काही प्रमाणात, समाधी अवस्थेची अनुभूतीसुध्दा देते. गाढ़ निद्रावस्थेत तुम्ही जागृत जगाकरिता जवळपास मृतावस्थेत असता. पण समाधी अवस्थेत तुम्ही विश्वाच्याकरिता मृत असूनसुध्दा अभौतिकदृष्ट्या जागृतावस्थेतच असता. जर गाढ निद्रा अभेद्य तमाधीन असेल तर समाधी अभेद्य तेजोमयी असते. म्हणजे तुर्या ही निर्विवाद समाधी आहे पण निद्रापूर्व ज्या चार ऊर्ध्वगामि स्तरांमधून ती स्थित असतें, त्यांच्यांतल्या सीमांचे आकलन अत्यंत सूक्ष्म किंवा अस्पष्ट असते.
तुर्या ! पायाचा पाषाण ।
तुर्या । अस्तित्वाचा प्राण !
तुर्या । कार्य, भाव, कारण ।
मनुष्यासी ।। 1077
त्याकारणे निसर्गे तुर्या ।
निवारण्या भंग भया ।
जगण्यांस देते छाया ।
आशीर्वचतरुपी ।। 1079
इतके सोपे ज्ञान ।
देवोनि दृष्टांत, उदाहरण ।
कां न करिती कीर्तन ।
शिष्यगण, महंत ?।। 1080
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-51
ईश्वर कैसा असेल नश्वर । पंचमहाभूती तो तर स्थिर।
जेया धरेवर अवतरते, वाढते ते जरावस्थेत पानगळीप्रमाणे पर्णहीन शुष्क शाखांवर, नव्या कोवळिकीला, पालवीली जागा करून देण्यासाठी झडून जाते म्हणजेच ज्याला आपण मृत्यू अथवा लय अथवा नष्ट होणे म्हणतो. ते सगळं नश्वर! पण निसर्गांत पंचमहाभूतांच्या स्वरूपांत, म्हणजे भूमी, जळ, अवकाश, हवा किंवा वारा आणि तेज ह्या गोष्टी कधी नष्ट झालेल्या कोणी पाहिल्यांत? ज्याप्रमाणे ती अवतरली कशी ते गूढ आणि अज्ञात तसेच त्यांची लयसुध्दा सर्वसामान्य, मर्यादित वर्षांचे आयुष्य जगणार्या मनुष्यांना अज्ञातच राहाणार ना? मग त्या मूलतत्त्वांना `ईश्वर’ असं संबोधून त्यावर भरवसा न ठेवतां, नश्वर बाबींच्या `भजन-पूजनांत स्वतःला झोकून द्या!’
अशी शिकवण, संताचे शिष्यगण आणि महंत आपदा-विपदने घेरलेल्या भाबडय़ाना कां करीत राहातात?
ईश्वर कैसा असेल नश्वर ।
पंचमहाभूती तो तर स्थिर ।
ज्ञानेंद्रियांना देतो साक्षात्कार ।
क्षणोक्षणी अखंड ।। 119
धूप-दीप, फळ-पुष्पे सगळी ।
बांग, शंखध्वनि वा टाळी ।
नश्वराची गोतावळी ।
बांडगुळे आगंतुक ।। 120
ऐशा नश्वरांची मांदियाळी
माजली सकळ धरातळी ।
मागे जनता भाबडी, भोळी ।
धापा टाकित धावताहे ।। 121
या मूलतत्त्वांना, त्यांच्या लहरीपणाला वेसण घालणे शक्य आहे? `उदंड झाले पाणी, स्नानं संध्या करावया।’
असे विश्वांत सर्वदूर घडणे शक्य आहे? पाहा विचार करून!
पंचमहाभूतांना वेसण ।
वैज्ञानिक संशोधाने प्रयत्न ।
हेचि प्रार्थना पूजन ।
अज्ञात शक्तिचे ।। 1103
अजाणतेपणी
पुष्प-बुक्कदि उधळणे ।
उपास सायास, नैवेद्य अर्पणे ।
अभावदेव प्रसन्नता
प्रतीक्षिणे । फोल
अनादिकाळापासोनी ।। 1104
`चमत्कार’ होती फसवणूक ।
निरक्षरांची अप्रत्यक्ष पिळवणूक ।
करीत होते भोंदू अध्यात्मिक ।
सर्वदा सदा ।। 1105
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-52
गुरु मार्गप्रदीप सदासर्वदा । गुरुचि प्रदान करितो प्रतिष्ठा।
श्रीरामकृष्ण आदिकरूनी ।
अति तत्पर गुरूभजनी ।
सिद्ध साधु आणी संतजनी ।
गुरूदास्य केलें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 05/01/ 42
रामाने वसिष्ठ ऋषी अन् श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींची शिष्य भावाने भक्ती आणि दास्य भावाने सेवा केली, मगच त्यांना ब्रह्मचर्याश्रमात सर्व विद्या प्राप्त झाल्या. अनेक सिद्धपुरूष, साधुसंतानासुद्धा ज्ञानप्राप्ती गुरूचरणांच्या सेवेनेच झालीय. देवांच्या अवतारांन सुद्धा गुरूशिवाय तरणोपाय नाहीच. गुरूनिश्चय समासात श्रीगुरूची महती समर्थ सांगताहेत.
गुरु हवाच मार्ग दावण्या ।
गुरु हवाच संकटांत सावरण्या ।
गुरुकृपाच जनसामान्या।
तारते भवसागरी ।। 124
गुरु करितो ज्ञानवृध्दी ।
गुरु वारी आपदा, व्याधी ।
गुरु देतो शिकवण साधी ।
प्राप्त परिस्थिति रिचविण्या ।। 1106
गुरु तम भेदी अज्ञानाचा ।
गुरु परिचय देई पंचमहाभूतांचा ।
गुरु आग्रही कृतिशीलतेचा ।
सत्कर्मांसाठी ।। 1107
गुरु जाणतो शिष्यमति ।
गुरु साधतो योग्य गति ।
गुरु वृध्दिगत ग्रहणशक्ती ।
करितो प्रमाणांत ।। 1108
गुरु मार्गदर्शक सखा । गुरु विपदेस विन्मुखा । गुरुसि घाला हाका ।
प्रकटेल हात देण्या ।। 1109
गुरु अंतर्बाह्य विवेक । गुरु सत्प्रवृत्ती, जनक । गुरु अशिष्यासि पावक । सजग सदा ।। 1110
गुरु ज्ञानगंगेचा उगम । गुरु शिकवी भेद, दंड, साम । गुरु आदर्श मानव राम । पाहावा सदा ।। 1111
गुरु रूपधारी कोणीही । गुरु मित्र, वैरी, शार्वीलिकही । गुरु, निसर्गाची वही । पंचमहाभूती ।। 1112
गुरु वेधतो शिष्योत्तम । गुरु सर्वांवरी करि प्रेम । गुरु उध्दरण्या सक्षम । मूढांसीही ।। 1113
गुरुवर असावी निष्ठा ।
गुरुचि प्रदान करितो प्रतिष्ठा । गुरु ज्ञानामृताच्या घटा । दडवित नाही कधिही ।। 1114
गुरु भीम, बलवान महारुद्र । गुरु शिष्यगणा सुभद्र । गुरु तर्क-बुध्दि-आकलन समुद्र । जीवमात्रा ।। 1115
गुरु मार्गप्रदीप सदासर्वदा ।
गुरु वारी शिष्याच्या आपदा ।
गुरु वेदांच्या वेदा ।
निरूपतसे ।। 125
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-53
शब्दांच्या प्रेमापोटी । केवळ उघडितो अनुभवकोठी ।
माझे एक सुहृद, सारंग कुलकर्णी, मला रोज दासांची ओवी पाठवीत. अजूनही त्यांनी तो उपक्रम सुरूच ठेवला आहे. त्या ओवीवरची माझी प्रतिक्रिया, ओविरूपांतूनच अवतरूं लागली.
साधारण 150 ओव्या लिहिल्यावर मी त्या कांही प्रथितयश संत-साहित्य अभ्यासक, लेखक, कवि, विचारवंत प्रथितयशांकडे अभिप्रयार्थ पाठवायला सुरुवात केली. कारण आशय दासांच्या, कालबाह्य संकल्पनांना छेद देणारा होता.
पण एकांही प्रथितयशानं नाराजीचा सूर न लावतां, भरभरून कौतुक करींत लिखाणाला शुभेच्छाच दिल्या.
एका वैद्यकीय उच्चशिक्षित, औषधीशास्त्रांतल्या स्नातकोत्तर पदवीधरानं, मी पुनर्जन्मित अध्यात्मिक आहे कीकाय असे आश्चर्यमिश्रित विधानही केले. म्हणजे ज्या `पुनर्जन्म’ संकल्पनेला मी छेद देण्यासाठी कांही ओव्या लिहिल्या, त्यांच्या मुळाचाच वेध घेतला त्यानं !
माझे सगळे लिखाण मी कष्टकरी कृतिशील कर्मयोगी असूनही आपदाग्रस्त असणार्यांच्या जीवनावुभवांतून प्रसवले आहे. मला कुठलाही उपदेश करायचा नाही. केवळ अंधश्रध्दांचे खंडन, वैज्ञानिक दृष्टिसंवर्धन, निसर्ग आणि पंचमहाभूतांना वंदन एवढेचं हेतु लिखाणामागे आहेत. या आमचे पोटीचं आजपर्यंत 1117 ओव्या लिहून झाल्यांत आणि स्रोत अजून भरभरून देतोय मला! कां ते ठावके नाही..
म्हणून..
नका मला म्हणू `स्वामी’ ।
सुख-दुःख, जीवनानुभवी ।
नाही भरीत वृथा चरवी ।
उपदेशाच्या क्षीराने ।ऑ। 126
मी साधा सरळ सामान्य ।
पोटार्थी कारसेवक मनी धन्य ।
तारावयास येत अन्य ।
सहसा नसे कुणी ।। 127
मी एक प्रस्तरखंड ।
शेंदुर चढविति विनाखंड ।
अंकुरू लागला भयगंड ।
मांदियाळी अंधश्रध्दांची जमेल ।। 1116
शब्दांच्या प्रेमापोटी ।
केवळ उघडितो अनुभवकोठी आशयाची रेटारेटी ।
टाळोनि न टळें त्यांत ।। 1117
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-54
दांभिक, ढोंग्यांचे माजले रान । अपप्रवृत्तीने होती बेभान।
शिष्य विकल्पें रान घेतो । गुरू मागें मागें धावतो । विचार पाहों जाता तो । विकल्पचि अवघा ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध ः 19/07/07
अनधिकारी मूर्ख शिष्य अध्ययन साधना न करता शंकांचा भडिमार करतो आणि गुरू मठाला मिळत असलेल्या भल्या मोठया देणगीच्या लोभापायी बाबापुता करत शिष्याच्या मागे मागे धावतो. विचार केला तर गुरू कोण आणि शिष्य कोण असा संभ्रम निर्माण होतो. अशा दांभिक गुरूंमुळे सामान्यजनामध्ये परमार्थाविषयीच संशय निर्माण होतो. श्रद्धा घटते.
शिष्य व्हावा यशस्वी । म्हणोनि त्यांसि शिकवी । अध्ययन अध्यापनापूर्वी । करि गुरु विषय-आशयाचे ।। 1118
परंतु परीक्षाकाळी । साहाय्यास जाणे जवळी । यशोमाला पडावी गळी । म्हणोनि ! हेतू अनिष्ट,अश्लाघ्य ।। 1119
अध्ययनार्थ उच्चश्रेणी वर्गांत । जर असला धडे घेत । कस त्याचा जोखण्यांत । सहभाग कनिष्ठाचा कां बा ?।। 1120
गुरुसि मिळत नाही सवड ?। की लोळत पडण्याची आवड ?। मग ज्ञानार्पण, अध्यापनाची कावड । घेवोचि नये ऐशाने ।।1121
ऐसे धुंडाळोनि खेचा । जनक्षोभ मुसळाने ठेचा । जखडा ऐशा घालोनि पेचा । कि सुटो नये ।।1122
सद्यकाळ हा,शैक्षणिक क्षेत्रांत, वर्षभर अध्ययनोत्तर परीक्षा, मूल्यांकनांचा काल आहे.
विविध ठिकाणी यांत होणार्या गैरप्रकारांची वार्तांकने आपण वाचतो-पाहातो आहोत. कांही वरिष्ठ `नेते’ मंडळीसुध्दा अशा प्रकारांचे समर्थन करताहेत आणि शासकीय अजगर सभा-सम्मेलने-अनावरण-उद्घाटने, चिंतन शिबिरे यांत सुस्तमग्न आहे. हे आपले दुर्दैव आपणच मतपेटींत टाकलेले ! तेव्हा भोगूया आपल्याच कर्मांची फळं ! काय ?
दांभिक, ढोंग्यांचे माजले रानं । अपप्रवृत्तीने होती बेभानं । गुरु कोणं कळेना शिष्य कोण । माळेचे मणि एका ।। 128
धावले पाहिजे शिष्याने । गुरुमागे असोशीने । ग्रंथगुह्य, संस्कार ज्ञानाने । पूर्णत्वप्राप्ती साधावया ।। 129
साधना साधकाचे ध्येय ।
गुरुमुखांतुन उलगडते प्रेय ।
धना साठी इतर पर्याय ।
तद्नंतर अनेक ।। 130
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-55
गुरु होतो वात्सल्याचा झरा। गुरु दीपस्तंभ एकमेव आधारा।
प्रज्ञावंत आणी अनन्य ।
तयास नलगे येक क्षण ।
अनन्य भावार्थेविण ।
प्रज्ञा खोटी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 08/06/46
प्रज्ञा म्हणजे वैचारिक प्रगल्भ बुद्धी. अनन्य म्हणजे एकनिष्ठ.
साधक निष्ठावान आणि प्रज्ञावंत असेल तर ज्ञानप्राप्ती एका क्षणात होते. पण भक्तिभावाशिवाय फक्त प्रज्ञा त्या टप्प्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. सत् शिष्य कसा असावा ते समर्थ सांगताहेत.
यापुढे जिथं जिथं भक्तीचा उल्लेख कींवा संदर्भ येईल तिथं तिथं मी त्याचा अर्थ प्रेम, उत्कंठा, असोशी असांच मानणारे आहे. कारण `भक्ती’ म्हणजे भजन-पूजन, उपास-तापस, जपजाप्य, आरत्या, तथाकथित ‘तीर्थ’स्थलांच्या
यात्रा हेतु, अगदी उतारवयांत सगळ्या गैरसोई साशीत प्रवास, नवल बोलणे फेडणे असा (ग़ैर)समज रूढ आहे.
ज्ञानार्जनासाठी असोशी ।
धारोनि मनि करितो तपासी ।
जाणा उज्वलेल भविष्यासी ।
शिष्य खरां ।। 1142
प्रज्ञा लौकिकर्थि ग्रंथावगत अध्ययना ।
म्हणे आवश्यक असतोच कणा ।
तैसीचि इतर संगीत-नृत्या-अभिनय कलागुणा ।
स्रोतरूप आपोआप ।। 1143
मेधा, प्रज्ञा, बुध्दीचे द्वार ।
सहजसाध्य करिते ज्ञानसागर ।
काठोकाठ अपरंपार ।
वोसंडुनि वाहावया ।। 131
तरि अंतरी उत्कंठा, तृषा ।
तळमळ, शुध्द अभिलाषा ।
साधकाचे ठाई सहसा ।
व्हावी दृश्यमान ।। 132
आणि मग हे सगळं तुम्हापाशी असेल, तर मग..
गुरु होतो वात्सल्याचा झरा ।
गुरु, दीपस्तंभ एकमेव आधारा ।
गुरु, भेदतो तमाच्या परा ।
तेजोनिधी दाविण्या ।। 133
पण समाजभाग गतिमंदासही ।
कसब कांही तरण्या जीवनप्रवाही ।
जाणेनि, अभ्यासोनि
न्यून त्याचेही ।
सुयोग्य दावावा पथ ।।1144
हे जो केरेल सहज साध्य ।
गुरु खरेचि होईल तो वंद्य ।
मनःपूर्वक श्रध्येय नि आराध्य ।
शिष्यासि ऐशा ।। 1145
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-56
सुसंस्कृत करणे हेच गुरूचे खरे कौशल्य
सूकर पूजिले विलेपने ।
म्हैसा मर्दिला चंदने ।
तैसा विषयी ब्रह्मज्ञाने ।
विवेके बोधला ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 05/03/58
डुकराची पूजा अंगभर सुवासिक द्रव्ये चोपडून केली तरी पुढच्या क्षणात ते उकिरडयावर लोळणार.
रेडयाचे चंदन लावून शरीर रगडले तरी तो शेणातच बसणार.
त्याचप्रमाणे छानछोकी ऐषारामाची आवड असलेल्या विषयासक्त शिष्याला ब्रह्मज्ञानाचा विवेक कितीही समजावला तरी मूळ चैनीची वृत्ती बदलेल काय ?
शिष्य कसा नसावा हे शिष्यलक्षण समासात समर्थांनी सांगितलय.
विविध देश-प्रदेशांत, निसर्गाचा अविभाज्य भाग असलेले जीवमात्र.. हिंस्र श्वापदं, गुर-ढोरं, मर्जार-श्वानादी पाळीव प्राणी, विविध कारणांसाठी उपयुक्त ठरली आहेत. अगदी हिंदू दैवतांची वाहने.. मूषकापासून सिंहापर्यंत… शिरोभागासाठी.. घोड़ा (तुंबरू), गजवदन, विघ्नहर्त्यासाठी, मत्स्य, नक्र(मगर), सूकर म्हणजे वराह, विष्णू अवतारासाठी मान्यताप्राप्त आहेत. ग्रीक पुराणदेवतासुध्दा अशा कांही प्रकारच्या आहेत. ग्रीस, इजिप्तनधल्या पिरॅमिडसतकेच सिंहाचा शिरोभाग आणि गरुडाचे पंख ल्यालेले स्फिंक्सही, सर्वदूर सुपरिचित आहेत.
असं असतांना कुशिष्याच्या तुलनेसाठी दासांनी या जीवमात्रांचा उल्लेख कां बरं केला असेल..
विकृतीला ना जातपात ।
पशु-पक्षी-मानव सर्वांत ।
लक्षणे दावी सतत ।
अतिरेकी ।। 134
सुकर-म्हैस, यक्ष-राक्षस ।
कुणास चुकला मद-मोह-पाश।
ऐशा जीवमात्रास ।
हेटाळावे कां कुणी ।। 135
तसेच, ज्ञानोपासनेसाठी, गुरुगृही दाखल होऊ पाहाणार्या.. भले तो पापी, संतापी, अनाचारी कां असेना… त्यांचे व्यक्तिमत्व, अंतःकरण उपदेशाने शुध्दीकरणाद्वारे सुसंस्कृत करणे हेच गुरूचे खरे कौशल्य आणि तीच गुरूंचीही कसोटी..
शिष्य, बर्या-वाइटासहित ।
स्वीकार करावा गुरुगृहांत ।
धरुन हात हातांत ।
गुरुने न्यावे सन्मार्गी।। 136
अरुण काकतकर 9822021521
मुखपृष्ठ » संपादकीय »
भक्तिबोध-57
प्राक्तन! एक कारण।
प्राक्तन! आलस्यासि निमंत्रण।
प्राक्तन! कृतिशीलासि आव्हान।
भेदून, करण्या क्रमणा।।1123
प्राक्तन! म्हणे विधिविखित।
प्राक्तन! `हरी’ भरवसा पात्र?।
प्राक्तन! भरवेल कवळ मुखांत।
म्हणावे शहाण्याने?।।1224
प्राक्तन! दावेल यश?।
प्राक्तन! पळवेल विघ्नासं?।
प्राक्तन! घडवेल विनासायांस?।
कार्य! निद्रिस्त व्हा बिनघोर।। 1225
प्राक्तन! ना वारेल उचित कर्म।
प्राक्तन! ना धारेल संपदेचे वर्म।
प्राक्तन! ना सजवेल विरूप चर्म।
निसर्गदत्त।। 1126
अशा या प्राक्तनाची
अतर्क्य रूपे, पाहावयाची।
होवू देत पांपणी काठांची।
दहिवरे प्रळयजळं।।1146
तीन वर्षाची कवळी पोरं।
माय बापान्ला नाही घोर।
खाईल कुल्यावर फटके चार।
ना जर मागेल भीक।।1127
पायाला अखंड चटके।
अंगावर धडुते फाटके।
मुख्यमंत्र्याचे वारस नेटके।
मात्र बापासवे शाळेंत।।1128
जेवढी वाढेल प्रजा।
मंत्रि’गणां’ची मजाच मजा।
`तापला तवा, पोळी भाजा’।
अध्यादेश काढिती।।1129
कुणा आली कणव दया।
हृदय द्रवले, वोसंडली माया।
पालन पोषण कराया।
नेती पोरे स्वगृही।। 1130
सवरु-शिकुनि मोठी झाली।
ठाव स्रोताचा घेऊ लागली।
मुळाशि येवुनि ठाकली।
विचारण्या जाब।।1131
डळमळतील सिंहासने।
गडबडतील चांचरत वचने।
डबडबतील अंतःकरणे।
कांहींची, कथेने।।1132
दुर्गा शस्रधारि पाहोनी।
भयभीत तळवे जुळवित दोन्ही।
करतील दयेसाठी विनवणी।
पापि नराधम अतिरेकी।। 1133
परिस्थिती होवू शकते ऐसी।
मदांध उधळती संपदेसी।
करोनि रिकामी जर धनराशी।
प्रामाणिक कष्टकर्यांची।।1134
पुराण इतिहासांत ऐशा कथा।
अभ्यासता ग्रंथ, गाथा।
किती टोकदार व्यथा।
असते, येते कळोनी।।1135
तान्हेला शुष्ककंठ तान्हा।
मातेसही फुटेना पान्हा।
घास नसल्या कारणे
क्षुधाशमना।
रडती दोघे कळवळत।। 1136
तैसीच अवस्था जनतेप्रती।
हाल अपेष्टा रोज भोगती।
मधुचंद्र कधि, कधि झगडा, युती।
जखमांवर चोळिती मीठ।।1137
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-59
परब्रह्म चारी दिशांना, अस्तित्व जाणवत नाही
तळघरामधे उदंड द्रव्य ।
भिंतीमधे घातले द्रव्य ।
स्तंभी तुळवटी द्रव्य ।
आपण मधें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 17/05/21
पूर्वजांनी घराच्या तळघरात, जाड भिंतींच्या पोकळीमध्ये, खांबामध्ये आणि तुळईमध्ये जागोजागी अमाप संपत्ती भावी पिढीसाठी जपून ठेवलीय. परंतु हे माहीतच नसल्याने हलाखीत दिवस काढतोय.
त्याचप्रमाणे परब्रह्म आपल्या चारी दिशांना कोंदाटले असूनही त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही.
अज्ञानापोटी ओढवून घेतलेले हे पारमार्थिक दारिद्य्रच नव्हे काय ?
घरोघरी आता बालकांमध्ये आनंदी आनंद आहे. कारण वर्षभर, खांद्यावर दप्तरांचं ओझं.. म्हणजे पुस्तकांचं. दुपारी मधल्या सुटीत मित्र-मौत्रिणींसेबत खायला खाऊचा डबा, नंतर.. हां..पाण्याची बाटली, या सगळ्यासकट, साधारण 2।।/3 शेर.. म्हणजे 100 शेरांचा एक मण व्हायचा पूर्वी.. त्या शेराच्या मापामधला..तर असं ओझं घेऊन, कुणी चालत तर कुणी सायकलीनं, कुणी आईच्यामागे स्वयंचलित दुचाकीवर बसून तर कुणी बाबांच्या चार चाकींतून..शाळेंत येऊन, त्रैमासिक चाचण्या देत, वार्षिक परीक्षा देऊन, थकलेली शरीरं आणि मनाला विश्रांतीचे.. म्हणजे मज्जा करायचे दिवस आलेंत. कुणी मामाच्या गावाला तर कुणी मावसभावाच्या मुंजीला किंवा लां।़।़बच्या दादाच्या लग्नाला, आई-बाबांसोबत जाणार, तर कुणी गिरिभ्रमण किंवा कोकणांतल्या स्वच्छ मउशार पुळणींवर, वाळूचे क़िल्ले बांधायला किंवा ओल्या वाळूत स्वतःच बोटांनी कोरलेलं नांव, येऊन परतणार्या लाटेंत विरघळून जातांना पाहात, टाळ्या वाहवून नकळत निसर्गाच्या गमतींना दाद देणार !
घरांच्या भिंतींत दडवून ठेवलेलं सोनं नाणं जरी मिळालं, आणि निसर्गानं बहाल केलेलं निरामय आरोग्य नसेल तर, ते ‘धन’ काय कामाचं ?
अवघा निसर्ग धनभारित ।
जीवमात्र सारा ऋणाइत ।
आपल्याचि कर्माचे फलित ।
कु-हाड घाली पायावरी ।। 142
`ये रे बाळा’ म्हणे काळी आई ।
परंतु माजली `इमलेशाही’ ।
वपन करुनी वृक्षवल्ली, वनराई ।
कुठे फेडतिल ही पापे ? ।। 143
समोरचे सुवर्णपात्र ।
अव्हेरित मनुष्यमात्र ।
कथिला देउनि मानपत्र ।
डोहाळे जाणा भिकेचे ।। 144
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-59
`माणुसकी’ धर्माचरणी । हेचि पाळू व्रत ।
इकडे दृश्य तिकडे देव ।
मध्ये सुन्यत्वाचा ठाव ।
तयास मंदबुद्धीस्तव ।
प्राणी ब्रह्म म्हणे ।ऑ।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 08/10/66
दृश्य म्हणजे जे इंद्रियांद्वारा समजते, उपभोगता येते ते.
निर्गुणाच्या साधनेला लागल्यावर एक एक गोष्ट निरसन करता करता शून्यावस्था प्राप्त होते. यापलीकडे खरा आत्मदेव असतो. साधक अज्ञानाने शून्यावस्थेलाच ब्रह्म मानतो. हे मानणे सुद्धा जिथे संपते ती ब्रह्मस्थिती .
इंद्रीया जाणवे तेचि खरे ।
अदृश्याचे वर्णन, अंदाज सारे ।
`कालापव्ययी’ व्यर्थ पसारे ।आ
निरुद्योगी मांडिती ।। 145
दशदिशांना पसरलेल्या, अज्ञात तमोगर्भी, केवळ भास्करतेजाच्या साहाय्याने, ज्ञानेंद्रियांकरवी जाणवणारे आपले क्षुद्र, अत्यल्पजीवी जगणे ! त्यात `ब्रह्म’ कसे असू शकते ? मुंबईच्या चौपाटीवर शहाळ्यांतलं पाणी पिऊन ते फेकणार, तोच त्यांतून एक इच्छापूर्ती महाकाय प्रकट झाला नि मला म्हणाला, `वत्सल, तुझे काय प्रिय करूं सांग ? काय हवे ते माग ! हा तुझी सेवक क्षणार्धांत तुजसमोर सेवेसाठी सादर करेल !’
मी आनंदांत होत्सांता त्याला म्हणालो, ‘ मला एक शंभर क्षेत्रफळाचा, स्यंपरिपूर्ण गाळा पाहिजे आहे रे ! देशासाठी कां मिळवून ?’ माझी मागणी ऐकून महाकाय क्रोधित होत, परत रिकाम्या शहाळ्यांतलं जाऊ लागला. जातांना मला म्हणाला, ‘अरे मराठी माणसा, ती मागणी मी जर पुरी करू शकलो, तर प्रथम मींच नाहीं कां जाणार तिथं निवासासाठी ? मराठी म्हणून जन्मलास ना ? आपल्या आई-बाबांच्या कर्माची फळं निमुटपणे भोग नां !’
तरी एका बाबीकरिता, सर्वधर्म संस्थापक-आद्य वगैरेंचे मनःपूर्वक आभार मारायला हवेंत..
शिशु, वृध्द, ऋग्ण, गर्भवती ।
कर्मकांडापासून यांना मुक्ती ।
धर्ममार्तंडही देती ।
हे ही नसे थोडके ।ऑ। 146
हृदयस्थ माया-ममतेची निगराणी।
सत्य-शिव-सुंदरदर्शने पांपणींत पाणी ।
`माणुसकी’ धर्माचरणी ।
हेचि पाळू व्रत ।ऑ। 147
जपू झरा, धरा, तारा ।
भवतीचा संपन्न निसर्गपिसारा ।
हव्यास, आक्रोशापरता बरा ।
उपकारक सर्वदा ।ऑ। 148
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-59
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले। कितीएक ते जन्मले आणि मेले।।
कैचे घर कैचा संसार ।
कायसा करिसी जोजार ।
जन्मभर वाहोन भार ।
सेखीं सांडून जासी ।ऑ।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 03/10/48
काय माझे घर घर, माझा प्रपंच, माझी माणसे करत बसला आहेस.
स्थावर जंगम मालमत्ता जन्मभर सांभाळण्याचा कुटाणा चालू आहे तुझा. ओझी वाहिलीस आयुष्यभर.
शेवट काय होणार ?
हे साठवलेले सगळे इथेच टाकून तू एकटा मृत्यपंथाने निघून जाशील, तुला कळणार देखील नाही. वैराग्य निरूपण समासात समर्थ व्यावहारिक गोष्टीची मर्यादा स्पष्ट करतात.परत परत ही कर्मयोगाची गाडी, `ब्रह्म’ नावाची अदृश्य, जाणिवेविणा वावरणारी कोडी, भाबडय़ा-भोळ्यांच्या मनात कोंबण्याचे अश्लाघ्य कर्म ही भोंदू साधुसंत, महंत मंडळी किती काळ आडवणार ? ते नसलेपणी उगा खुणावणारे भाकड, भाकर कमवायला जाणार्या कृतिशीलाला, `वैराग्य’ घे आणि शोध जा `ते’ ! नाहीतरी इथेच सोडून जायचे आहे ना सगळे ? (मग त्यातले थोडे माझ्या झोळींत ओत) !’ अशा धमक्या किती युगे देत राहाणार? आणि हीच जर इतिकर्तव्यता असेल जगण्याची तर…
मग जन्मास यावेचि कां बा ? ।
जर संसाराची साहेना आभा ।
अर्ध्यावर रडगाण्याची मुभा ।
पळपुटय़ाचे लक्षण ।। 149
धूलीकणहि दावितो अस्तित्व ।
पापणीत ! स्पर्शिता क्षणभर अंधत्व।
मुंगीसाठी आधारतत्व ।
होतसे गरज पडतां ।ऑ। 1152
अनादि अनंताच्या कालगणनेंत आपले `असणे’ म्हणजे एका क्षणाच्या पद्मांशापेक्षाही क्षुद्र ! मग त्याविषयी विरक्ति कां उगा प्रकट करत बसायची नि रडगांण्यात स्वतःला आणि आप्तेष्टांना
लोटायचं ?
जन्म ? तमांतरि तेजोरेखा ।
जन्म ? नियतीस, खेळण्या सारखा।
जन्म ? सर्वांगपरिपूर्णतेस पारखा।
जाणा जीवमात्रांस ।ऑ। 150
अरुण काकतकर 9822021521…
मुखपृष्ठ » संपादकीय »
भक्तिबोध-60
जयास जैसें भासले । तेणें तैसें कवित्व केलें ।
जयास जैसें भासले ।
तेणें तैसें कवित्व केलें ।
परी हें पाहिजे निवडिलें ।
प्रचितीनें ।।
।।जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 09/05/23
पिंड ब्रह्मांड रचनेविषयी ज्याला ज्या प्रकारे भासले, समजले त्या तशा शब्दात कवीने वर्णन केले आहे.मुळात वेदानाही जे अवर्णनीय वाटते त्या निर्गुण ब्रह्माचे अनेकांनी केलेले आकलन हे स्वानुभवाच्या कसौटीवर निवडूनच घेतले पाहिजे.
मुळांत `निर्गुण’ या शब्दंतच त्याचा अर्थ अध्याऋत आहे. त्याला ‘ब्रह्म’ असे संबोधल्या बरोबर, `नाम’ असणे हा एक गुणं नाही कां आपोआप प्राप्त होत ? मग ते ‘निर्गुणत्व’ आपोआप नाहीसे नाही कां होत ? उल्लेख टाळ्या किंवा अनुल्लेखतत्व पाळाल तरंच निर्गुणत्व प्राप्त होतं, अशी माझी… कदाचित विचित्र असेल… पण ठाम धारणा आहे.
जाणिव म्हणजे खरे ज्ञान ।
सशब्द अथवा निरव कारण ।
जगरहाटीसाठी पैरण ।
चिलखती ।। 151
जाणिवेविणा बरोबर सगुणत्व हातांत हात धरून चालत असते. आणि त्यांचीही ‘जाणीव’ मन धारण करीत असते. पंच ज्ञानेंद्रियापैकी कांहींनीतर किंवा एकत्रपणे अस्तित्व जाणवतो त्यालाच सगुण साकार मानतो मी ! आणि मग त्याच्याशी नाते संबंधातले विविध बंध.. सख्यत्व, माया, प्रेम, तिरस्कार, मत्सर आदि भावना…
निर्माण होतांत.
जैसे भावेल तैसे ध्यावे ।
त्यंस मांडोनि भजा-पुजावे ।
आळवावे, गोडवे गावे ।
इष्टाराध्याचे ।ऑ। 152
हा ऐसा शब्द-प्रवाहो ।
त्रिकाळ पसरुनी आपुले बाहो ।
कवळू पाहे ‘अपात्र’ कां हो ।
नवलचि, मजसारखे ।। 153
मी एक सर्वसामान्य माणूस ! जे पाहिलं, अनुभवला त्या आधारे अवघड संकल्पनांचा अन्वयार्थ शोधायला प्रयत्न करतोय.
आणि त्या प्रक्रियेला आनंदसुध्दा लुटतोय!
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-61
नेमाने वाचा भक्तिबोध ।
नेमाने वाचा भक्तिबोध ।
जर अंतःकरण होईल क्षुब्ध ।
सोडा दैवी `चमत्कारांचा’ शोध ।
एकचि उपायो, कार्यमग्नता।। 1163
कारण आजकाल, प्रार्थनास्थळांच्यासाठी, विश्वस्तांद्वारे वा शासनाद्वारे नियोजित सुरक्षाव्यवस्था पाहांता हसांवे की रडावे, समजोनासे झाले आहे. भोळे भाबडे, आपदा विपदांच्या निराकरणासाठी, त्यांना वारण्यासाठी ज्या श्रध्येयाकडे विनवणी करतांत तो..
`देव’ स्वतःच भेदरलेला ।
बुध्द, ख्रिस्त, महादेव वा अल्ला ।
`जर झाला अतिरेकी हल्ला’ ।
म्हणती, ‘लपावे कोठे ?’।। 846
राहावे सुखरूप भक्तनिवासी ।
म्हणजेच खोल त्याच्या मानसी ।
सापडणे कठिण `मारेकर्यासी’ ।
म्हणती, एकमताने ।। 847
पण तिथं तरी…
सुरक्षेची काय शाश्वती ? ।
विश्वस्ताची फिरली मती ।
फिरविण्या पाठ मिळाली संपत्ती ।
माहिती ‘त्यांना’ देईलं ।। 1171
शिवाय…..
उंबरठय़ाआंत नुसता वंदुनि ठेविला ।
ऐसा कैसा ‘देव’ भजिला, पूजिला ।
जर नाही अवडंबरे प्रदर्शिला ।
वस्तींत कळावे कैसे ?।। 1172
पण हौस भक्त, महंतांसी ।
ओरबाडिती स्वमनासी ।
काढून ‘थरथर कांपणार्यासी’ ।
भर चौकांत ठेविती मधोमध ।। 848
मग रंगते ‘रक्षणस्पर्धा’ ।
भाबडय़ांचा जीव अर्धाअर्धा ।
हिरव्या-भगव्या-निळ्यांची त्रेधा ।
वाचविण्या अनुयायी ।। 849
कारण…
भक्ताविणा कसला ‘देव’ ।
कसली ध्यान धारणा, श्रध्दाभाव ।
संपदाप्राप्तिप्रती सिध्द नाव ।
प्रवाही कसे बडवे ढकलतील?।। 850
इकडं भेदरलेला जमांत म्हणतेय…
ना दिसति सुरक्षा रक्षक ।
वा छपविलेले लघु छायक ।
मग शोधतिल शार्वीलिक ?।
कैसे, आणि कोठे?।। 1153
मशिद, चर्च, गाभारा ।
जीवास राखण्या बरा ।
प्रतिकृति आमुच्या न्या बाजारा ।
सजवा, पूजा वा बोळवा ।। 1154
आम्हा सोडवा, करा मोकळे ।
बेडय़ा न चढवा बळेबळे ।
जत्रा उत्सवांचे सोहळे ।
वृथा भोग, शीर्षशूळ ।। 1173
अरुण काकतकर 9822021521…
भक्तिबोध-62
माया नाना रूपे धरी । अदृश्याचा चक्रव्युह । मने तीन वृत्ति एक
माया विकारी ब्रह्म निर्विकारी ।
माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी ।
माया नाना रूपे धरी ।
ब्रह्म ते अरूप ।।
।।जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध ः 06/05/08
गुणमायेपासून जे जे निर्माण होते ते सर्व विकारी म्हणजे बदलत जाणारे आणि अंती नाश पावते. ब्रह्म मात्र अविचल आणि शाश्वत असते. सर्व चराचर सृष्टी ही मायेपासून निर्माण झाली. ब्रह्म स्वतः निष्क्रिय आहे. माया अनेकविध रूपांनी आणि रंगांनी प्रकट झालेली आपल्याला प्रत्यक्ष दिसते मात्र परब्रह्म निर्गुण निराकार असल्यामुळे दिसत नाही. त्याची अनुभूती सद्गुरू कृपेनेच होऊ शकते.
अरूपासि कसले अस्तित्व ?।
`मनासि दिसते’? कल्पना भ्रामक।
`दावा आम्हासि!’
म्हणतां कारणे अनेक ।
सांगती `अध्यात्म’वादी ।। 1174
`जाउन एकांती,तपःश्चर्या करा, ।
ऐहिकाच्या मोहासि मारा ।
उपदेश ऐका, पण श्रध्दापूर्वक भरा।
झोळ्या आमच्या नेमाने’ ।। 1175
न जमले, चिंता सोडा ।
सज्ज पाप-पुण्य व्यापारा ।
खर्चीला कांही आम्हाला मुद्रा ।
लुटा सुख बिनघोर !।। 1176
जो `ब्रह्मा’ मागे धावला ।
त्याचा कर्मभाव बुडाला ।
भवसागर लंघायाला ।
`ब्रह्म’ न होई आधार ।। 159
अदृश्याचा चक्रव्युह ।
परत-मार्ग भयावह ।
सामान्यांनी त्याचा मोह ।
न बाळगणेचि बरे ।। 160
कारण समाजात जगत असताना, सामान्य नागरिकांना इतकी व्यवधानं कशी राखावी लागतात, हे त्या (संधी) साधु, विरक्त (?), निरिच्छ (?), निर्मोही (?) व्यक्तींना कसं उमगांव!? कारण आपल्यासारख्याला,
मगज दोन कृती एक ।
मने तीन वृत्ति एक ।
बहुअवधानि मती एक ।
व्यक्तीमाजी ।। 161
या पलिकडची कुठलीही शक्ती निसर्गाने दिलेली नसते !
अरुण काकतकर 9822021521
अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये। न अधिकार ठेवण्या नांवें।
भक्तिबोध-63
कां मी लिहितो भरताडं ।
कुणि उघडलं तरी कां हे बाड ?
उघडोनि निद्रिस्त कवाड ।
पांपण्यांची ?।। 1147
ना तत्ववेत्ता, ना मी संत ।
भाव धारण करुनी मनांत ।
उर्जा फुंकू पाहातो शरीरांत ।
जगण्यासाठी अवसान ।ऑ। 154
शिरावर कां बा मग हे ओझे ।
पाप, पुण्य? कोणत्या काजे?।
कवळ केवळ जे माझे ।
नियती कां देइना?।। 155
जरा म्हणजे असतो शाप ?।
जरा जीवमात्रांसि आपोआप ।
जरा जीवनानुभवाचे रोप ।
वृक्षरूपी, वितरण्या छाया।। 1100
कां सगळे वृध्दापकाळीच मनी ।
उपदेशार्थ येते उफाळोनी ? ।
अनुभव उकळोनि, गाळुनी ।
अर्क संपृक्त निव्वळ !। 1141
मी एक प्रस्तरखंड ।
शेंदुर चढविति विनाखंड ।
अंकुरू लागला भयगंड ।
मांदियाळी अंधश्रध्दांची जमेल।। 1116
शब्दांच्या प्रेमापोटी ।
केवळ उघडितो अनुभवकोठी ।
आशयाची रेटारेटी ।
टाळोनि न टळें त्यांत ।। 1117
दासच सांगोनि गेले ।
नाही कांही जर लिहिले ।
अनुभव व्यर्थ गेले ।
रोजचे अनमोल ।। 1094
`हे भ्रामक, खोटें’ सांगोनि अस्वस्थ।
करणे ! त्यांसि, नाही रास्त ।
`अभावदेवा’वरी भिस्त ।
ठेविती भाबडे! ही चिंता।। 1061
पण जाणीव सत्याची देणे ।
लिहित चाललो याचि कारणे ।
कर्मावर श्रध्दा वळविणे ।
श्रेयस्कर! सांगा कोणी।। 1062
कोण कुठला यःकश्चितं ।
सारेच माझे अनिश्चितं ।
भयावह गर्दी गोंधळांत ।
दिवाभीत मी ।ऑ। 1065
मी कां अजुनी `आहे’ ?।
कोणत्या कारणे श्वास वाहे ? ।
प्राण कां न सुटो पाहे ?।
देहांतुनी ।। 1066
मन आजकाल अशांत ।
म्हणे, ‘चल विजनवासांत ।
नसेल कोणी स्वकीय आप्त ।
अपेक्षिण्या परस्पर ।ऑ। 1067
परंतु `पळणे’ योग्य नव्हे ।
अपूर्ण ठेवोनि कर्तव्ये ।
न अधिकार ठेवण्या नांवें ।
ऐशास ! मजला राहील।। 1068
अरुण काकतकर
9822021521
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment