Monday, March 19, 2012

शत शतक भास्कर..

शत शतक भास्कर.. ’विजयपताका शत शतकांच्या झळ्कती अंबरी गुढि, मायमराठी उभारी...’ अप्राप्य...केवळ अप्राप्य..! जगांतल्या कुठल्याही देशांतल्या, कुठल्याही क्रिकेटपटूला अप्राप्य...निदान पुढची,,, किती वर्ष म्हणावं ?...माहीत नाही, पण अप्राप्य असा हा पराक्रम, माझ्या माय मराठीच्या, वाघिणीच्या, दुधाची साय खाल्लेल्या एका जिगरबाजानं, मनाची एकाग्रता ढळू न देतां, मधून मधून परकीयांच्याचं(पॉंटिंग्‌, ग्रेग्‌ चॅपेल्‌) नव्हे तर, स्वकीयांच्या (कपिलदेव निखंज, बिशनसिंह बेदी..) सुद्धा अशुभ, अभद्र टीकेची यत्किंचित पर्वा न करतां, निश्चयानं, निग्रहानं घडविला हा इतिहास ! याचि देही, याचि डोळा याचि श्रवणेंद्रियांद्वारा याचि युगी याचि जगी, भोगिल्या आनंदधारा याचसाठी सकळे, केला अट्टाहास, स्वप्नांचा आभास, झाला खरा शंभराव्या वेळी बॅट्‌ आणि हेल्मेट्‌ उंचावत आकाशाकडे पाहून, त्यानं आभार मानले, शंभराव्या वेळी जगातले अब्जावधी प्रेक्षक श्रोते, प्राण कंठाशी आणून स्तब्ध उभे राहिले शंभराव्या वेळी जगांतलं प्रत्येक बालक, घामेजल्या तळव्याची, वळलेली, हवेंत धरलेली मूठ वेगानं खाली आणत उद्गारलं, ’Yes..Yes..' शंभराव्या वेळी तो निर्मिक देखिल स्तंभित झाला, स्वत:च जन्माला घातलेल्या, या अतुलनीय, आश्चर्यकारक, अद्भुत प्राणिमात्राकडे पाहून आणि...शंभराव्या वेळी सगळं जग हर्षविभोर होत्सातं, नाचू-गाऊ लागलं...’सच्चिन..सच्चिन...’...’आला रे आला..सच्चिन आला...आला रे..’ कारण, ज्यावर आयुष्यभर प्रेम केलं, त्या क्रिकेटचाच फक्त ध्यास त्यानं लहानपणी घेतला, तो त्यानं आजवर सोडलेला नाही, ’स्वप्न बघा आणि प्रयत्न करीत राहा, सातत्यानं...ती कधीतरी सत्यांत उतरतांतच, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवानं सांगतोय्‌..’ सचिन सांगत होता एका वाहिनीवरील एका मुलाखती दरम्यान. या सार्‍या यशासाठी तो वडिलांचे...प्रा. रमेश तेंडुलकरांचे विशेष आभार मानतो.... ’बोर्ग्‌चा शांतपणा, पीट्‌ सॅंप्रस्‌चा चिवटपणा मला आवडतोच...पण माझा अत्यंत आवडता टेनिस खेळाडू म्हणजे, मॅकॅन्रो...’ सांगत होता सचिन एका उत्तरादरम्यान. खरतर मॅक~न्रोमधला आक्रसताळेपणापासून सचिन अनेक योजनं दूर होता... आहे.. नेहमीच ! मी त्याला फक्त एकदांच सहकारी खेळाडूशी चढ्या आवाजांत बोलतांना आणि एकदाच चेंडू ग्राउंड्‌वर आपटतांना पाहिला आहे. किती संयम, किती शांतपणा नि परिपक्वता...मला नाही वाटतं कुठल्याही प्रशिक्षणानं ती साध्य होते इतक्या प्रमाणांत...तो तुमचा ’स्व भाव’ असावा लागतो जन्मत: ! ’प्रत्येक येणारा नवा बॉल्‌ हा नवी खेळी ऐनवेळी खेळायला लावनारा असतो. त्या वेळी तुम्ही आधी किती शतकं, अर्धशतकं केली आहेत त्यांची ’पुण्याई’ उपयोगाची नसते, तर तुमच्या कार्य करीत राहाण्याच्या अनुभवानं तुमच्यांत निर्माण झालेली परिपक्वताच तुमच्या मदतीला असते फक्त..’ किती मोलाचा संदेश आणि किती सहजपणे दिलेला...अगदी रोजच्या जगण्याच्या मैदानावरसुद्धा कायम ध्यानांत ठेवावा असा... हे असं बोलायला, संतबिंत असायला लागत नाही तर ’संभवामि युगेयुगे..’ असंच यांच अस्तित्व असतं आणि ते आपल्या अगदी नजिकच्या परिसरांत वावरतं असत हे, आपलं भाग्य असतं... ’मी देव नाहीये...I'm no GOD...’ हे म्हणतांना त्याचा निखळपणा, निरागसपणा, आणि प्रामाणिकपणा मनाला स्पर्शून गेला... तू देव नसशील कदाचित, पण , कांही वर्षांपूर्वी, श्रीलंकेत झालेल्या विश्वकरंडकादरम्यान, तुझा एक झेल सोडल्यानंतर, वासीम अक्रम नावाच्या महान गोलंदाजानं, ’अबे तू किसका कॅच्‌ छोडा है मालूम है तुझे ?’ हे काढलेले उद्गार किंवा , शेन वॉर्न्‌ सारख्या, फलंदाजांच्या कर्दनकाळानं, शारजाच्या सामन्यानंतर, ’Sometimes I dream of Sachin...perspire heavily, get drenched and wakeup with my heart beating hard...' ही दिलेली प्रांजळ आणि दिलखुलास दादवजा कबुली, हे सगळं कशाचं लक्षण आहे ? शतपैलूंची हिरकणी । आनंद सर्वत्र, वनिभुवनी । क्रीडा-जगता विक्रमी गवसणी । कोणी घातली या आधी ? ज्ञनोबा, शिवबा, लता नी आशा । घेउन अक्षरासिधार-स्वरांची भाषा । पवित्र, कणखर, महाराष्ट्र देशा । शतकोनिशतके अभिषेकिले ॥ त्याच परंपरेतिल हे नक्षत्र । सर्वोच्च मानासि एकमेव पात्र । ’आदर्श’ आंधळ्याना मात्र । जाणवेल ? मनि शंका ॥ ध्यास हा, ना आभास । स्वप्न नाहि, निखळ सत्यास । शत शतकांच्या पराक्रमास । कवळिले, सहजपणे ॥ म्हणून, त्र्वार वंदनासाठी आमचे हात जुळलेत आज.. यापरता कुठला ’गुढी पाडवा’ ’सण मोठा असूं शकतो ?..

No comments:

Post a Comment