Monday, March 5, 2012

’विश्व म्हणींचं...’


||श्री॥
’अक्षरे’(दिनांक ०४-०३-१२)..’उत्सव’ पुरवणीसाठी मजकूर...  (संजयजी डहाळे कृपया)
’विश्व म्हणींचं...’
पिढ्यान्‌पिढ्या, शतकानुशतक, रोजच्या जगण्या-बोलण्यांतून मंडळी संवाद साधत, विविध भावना व्यक्त करतांना, कांहीतरी ’म्हणता म्हणता’ नकळत ’म्हणीं’ची भर, वाक्य-कोशांत टाकीत आहेत..भाषा समृद्धी आणि संवर्धनार्थ !
सहज म्हणून आठवायला गेल तर तुम्हालाही आढळेल की आपल्या रोजच्या वापरांतल्या कितीतरी म्हाणींत जगण्याचे संकेत, सत्यता, अगदी ठासून भरले आहेत.
या ’म्हणी’ कधीकधी यमकयुक्त पंक्ती उदाहरणार्थ ’ज्याच करायला जावं भलं, तो म्हणतो आपलंचं खर’, किंवा,  ’असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ किंवा ’बैल गेला नि झोपा केला’, तर कधी नुसत्याच ’गद्य’..उदाहरणार्थ ’स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही..’, ’नाचता येईना अंगण वाकडे’, ’वरातीमागून घोड..’
संगणकावर, माहितीचं महाजाल चाळताचाळता एक छान Site दृष्टोत्पत्तीस आली. अभ्यासक दीपक शिन्दे यांनी या म्हणींच्या संदर्भांत खूप मौल्यवान माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवलाय्‌ या Siteद्वारे.
माहिती देतांनाची पूर्वपीठिका सांगतांना ते लिहितांत, ’म्हणी वाचून जमाना झाला असं वाटत असेल ना ? मला तर तसं वाटतं.. चौथीला – त्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात वाचलेल्या आणि रट्टा मारलेल्या काही म्हणी आजही आठवताहेत. गावी गेलो की त्यातल्याच काही विसरलेल्या म्हणींचा वापर ऐकायला मिळतो. बर्‍याचवेळा ते माझ्यासाठी ’टोमणे’ असतात. उदाहरण द्यायचं तर ’पालथ्या घड्यावर पाणी’ म्हणजे मला कितीही वेळा एखादी गोष्ट सांगितली तरी मी ती ऐकेनच असं नाही! असो. महाजालावरुन जमा केलेल्या काही नव्या - काही जुन्या म्हणी खाली देतोय. एखादी विसरली तर तुम्ही ’प्रतिक्रियेत’ लिहा!’
शिंदे महोदयांनी, नाही म्हणताम्हणता ’म्हणीं’चा खजिनाच आपल्या पुढं ओतलाय... अगदी ’अ’ पासून ’ज्ञ’ पर्यंत आद्यक्षर असलेल्या म्हणी या खजिन्यांत तुम्हाला भेटतील.
वाचायला सुरुवात केलींत तर करमणूक तर होईलंच पण अंतर्मुख पण व्हायला होईल. कारण प्रत्येक म्हण ही आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रसंगाच्या, व्यक्तीच्या, घटनेच्या, स्वभाव वैशिष्ट्य/वैचित्र्य यांच्या स्वरूपांत रोज भेटतेय, प्रत्यय, प्रतीती, अनुभव देते हे लक्षांत येईल. कारण कधीकधी या म्हणी आपण अगदी सहज, बोलता-सांगतां-विवादतांना आणि विशेषत: भांडतांना प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून वापरलेल्या असतांत... अगदी नकळत. पण भाषा समृद्धी आणि संवर्धनाचं हे केवढ मोठं दालन आहे हे आपण कधी ध्यानांतच घेत नाही...
या म्हणींचा उद्गम काय ? या प्रष्णाचं उत्तर शोधतांना आणखी कांही अनुत्तरित प्रष्ण सुचतांत..
’पाण्या’ला ’पाणी’ कां म्हणतांत ? ’तो माझ्या दारावरून गेला’ म्हणजे ’वरून’ ’उडत गेला कां ? वगैरे...
दीपकजींनी दिलेल्या म्हणींच्या सूचीपैकी ’अं’ आद्याक्षराच्या कांही म्हणी, वानगी दाखल बघूया, की ज्या सहसा अपरिचित..निदान मला तरी..आहेत !
अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.
अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
( टुणी’ म्हणजे बहुधा पोत उचलतांना लावतांना खुपसतांत तो आणकुचीदार आकडा)
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
अकिती आणि सणाची निचिती.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
अघळ पघळ अन घाल गोंधळ.
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
(यातल्या ’अठरा विश्वे’ची खरी फोड एकदा शंनांनी...शं.ना. नवरे...सांगितली ती अशी..
’अठरा विसावे’ म्हणजे अठरा गुणिले वीस म्हणजे तीनशे साठ दिवस म्हणजे वर्षभर जिथं ’गरिबी, विपन्नावस्था’ नांदतेय्‌ असं दारिद्र्य)
अडली गाय खाते काय.(किंवा ’काय बी खाय, न खाउन करते काय ?)
अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अती केला अनं मसनात गेला.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
अती राग ? मग भीक माग !
अशी ही यादी अजून खूप मोठी आहे. खरचं वाचण्याची इच्छा असली तर ’महाजाला’वर उपलब्ध आहे..
सगळ्या ’म्हणी वाचून शेवटी तुम्हीच म्हणाल..
’अती झालं अऩ हसू आलं...’

1 comment:

  1. विश्वनाथ जींचा, मी दूरदर्शन मधे कार्यरत असतांना एक कार्यक्रम झाला होता तो स्मरतोय.. कुठल्या शीर्षकांतर्गत ते मात्र स्मरत नाही..

    ReplyDelete